18 May, 2020

जिल्ह्यातील जीवनावश्यक वस्तूंची दूकाने दररोज सुरु राहणार


जिल्ह्यातील जीवनावश्यक वस्तूंची दूकाने दररोज सुरु राहणार

हिंगोली,दि.18: जागतिक आरोग्‍य संघटनेने कोरोना (कोव्‍हीड-19) हा विषाणू मूळे पसरत असलेला आजार हा साथीचा संसर्गजन्‍य आजार म्‍हणून घोषीत केला आहे. कोरानाग्रस्त रुग्‍णांच्या संपर्कात लोकांनी येवू नये, तसेच सार्वजनिक किंवा खाजगी जागेत पाच किंवा त्‍यापेक्षा अधिक व्‍यक्‍तीनी एकत्र येणे, थांबणे, चर्चा करणे, काही कार्यक्रमाचे आयोजन केल्‍यास या विषाणूचा संसर्ग व प्रादुर्भाव पसरण्‍याची शक्‍यता लक्षात घेता सर्वसामान्‍य जनतेस व त्‍यांचे आरोग्‍यास धोकादायक होत आहे. यामुळे फौजदारी दंड प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 (1) (3)  अन्वये संपूर्ण जिल्ह्यामध्ये संचारबंदी लागू झाल्याचे जाहीर करण्यात आले आहे.  
सद्यपरिस्थीती विचारात घेता किराणा माल विक्री दुकाने, भाजीपाला विक्री करणारे दुकाने, दुध विक्री केंद्र, परवाना असलेले चिकन / मटन शॉप, बेकरी, स्वीट मार्ट संबंधीत दुकाने दररोज प्रतिदिन सकाळी 8.00 ते 1.00 या वेळेतच सुरु करण्याची परवानगी देण्यात आली आहे.
सदरील उद्योग सुरु करते वेळेस काही अटी व शर्तीचे पालन करने बंधनकारक असून यामध्ये संबंधितांनी दुकानाची सुरुवात करतांना संपुर्ण जागेचे सॅनिटायझेशन करुनच सुरुवात करावी. दुकानातील कामगार/खरेदीदार यांची नोंद ठेवणे गरजेचे आहे जसे की, नाव, संपर्काचा पत्ता व मोबाईल क्रमांक. तसेच दुकानदारानी व त्यांच्या सोबत काम करणा-या कामगारांनी नेहमीच नाक व तोंड मास्कने पुर्णपणे झाकुन ठेवणे बंधनकारक आहे. खरेदी करण्यासाठी आलेल्या दोन ग्राहकांमध्ये एक मिटरचे अंतर राहील याची दक्षता संबंधीत विक्रेत्यांनी घ्यावी. तसेच सॅनिटायझर्स उपलब्ध ठेवण्यात यावेत. तसेच खरेदी करण्यासाठी आलेल्या ग्राहकांसाठी दुकानासमोर एक मिटरचे अंतरांनी गोल/चौकोन आखावेत. दररोज कामावर येणा-या कामगारांची तपासणी थर्मल गन च्या सहाय्याने करण्यात यावी. दुकानदारांनी कामगारासाठी मास्क व सॅनिटायझर्स उपलब्ध करुन देण्यात यावेत. दुकानाच्या परिसरामध्ये कामगारासाठी पिण्याच्या व हात धुण्याच्या पाण्याची व साबण याची व्यवस्था करण्यात यावी व पाणी उपलब्ध राहील याची दक्षता घेण्यात यावी. तसेच शासनाने ठरवून दिलेल्या अंतराच्या परीसीमाचे तंतोतंत पालन करुन उद्योग धंद्याच्या ठिकाणी व परीसरामध्ये सामाजीक अंतराचे पालन करण्यात यावे व जागोजागी सुरक्षततेच्या उपाय योजनांची माहिती फलक लावण्यात यावेत.
त्या नुसार सामान खरेदीसाठी नागरिकांना पायी जावे लागणार आहे. त्यांना दूचाकी, तीन चाकी व चारचाकी वाहनांचा वापर करता येणार नाही. नागरीकांची वाहने रस्त्यावर येऊ नये याकरीता आवश्यक त्या ठिकाणी बॅरीकेटींगचा वापर करावा.
 आदेशात दिलेल्या कालावधी वगळता इतर कालावधी कोणासही घराच्या बाहेर पडता येणार नाही. तसेच आदेशाचे पालन न करणा-या कोणत्याही व्यक्ती, संस्था अथवा समुह आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 चे कलम 51 तसेच भारतीय दंड सहिता 1860 चे कलम 188 नुसार शिक्षेस पात्र असलेला अपराध केला असे समजण्यात येईल. संबंधित आयोजक तसेच आस्‍थापना मालक/चालक/व्‍यवस्‍थापक यांना प्रत्‍येकास आदेशापूर्वी स्वतंत्र नोटीस बजावणी शक्य नसल्याने याबाबतची माहिती प्रसार माध्यमे, उप विभागीय दंडाधिकारी, तालूका कार्यकारी दंडाधिकारी, पोलीस स्टेशन, सर्व जि. हिंगोली यांचे नोटीस बोर्डवर नागरिकांचे सुविधेसाठी उपलब्ध करुन देण्यात येत असल्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी रुचेश जयवंशी यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.     

****

No comments: