15 May, 2020

आज ‘राष्ट्रीय डेंग्यू दिन’


राष्ट्रीय डेंग्यू दिनानिमित्त प्रतिबंधात्मक उपाययोजना अंमलबजावणी करण्याचे आवाहन

हिंगोली,दि.15: राष्ट्रीय किटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रम अंतर्गत 16 मे (आज) हा दिवस राज्यात सर्वत्र ‘राष्ट्रीय डेंग्यु दिन’ म्हणुन साजरा करण्यात येणार आहे. डेंग्यु ताप हा विशिष्ट विषाणूमूळे होतो. डेंग्युचा प्रसार हा एजिप्टाय नावाच्या डासामूळे होतो. सदर डासाची उत्पत्ती साठलेल्या स्वच्छ पाण्यात होते. कोणतेही पाणी आठ दिवसापेक्षा जास्त साठवून ठेवू नये, याची सर्व नागरिकांनी खबरदारी घेणे अत्यंत आवश्यक आहे.
सद्यस्थितीत उन्हाळा सुरु असून राज्यात दुष्काळग्रस्त परिस्थितीमुळे बऱ्याच जिल्ह्यामध्ये पाण्याचा तुटवडा असल्याने पुरेश्या प्रमाणात पाणी पुरवठा न झाल्याने नागरिक पाणी साठवून ठेवतात. अशा साठलेल्या पाण्यात एडीस एजिप्टाय डास अंडी घालून डास उत्पत्ती होते. सदर डासाची उत्पत्ती कमी करणे / नियंत्रणात ठेवणे यासाठी जनतेस आरोग्य शिक्षण देणे आवश्यक असून लोक सहभागाशिवाय या आजाराचे नियंत्रण शक्य नाही.
राष्ट्रीय डेंग्यू दिन दि. 16 मे रोजी डेंग्यू विषयी जनतेमध्ये जनजागृती निर्माण होवून प्रतिबंधात्मक उपाय योजनांच्या अंमलबजावणीसाठी त्यांचा सक्रीय सहभाग प्राप्त करुन घेण्याच्या दृष्टीने प्रत्येक वर्षी विविध उपक्रमाद्वारे नागरिकांपर्यंत माहिती पोहचविण्याचा प्रयत्न करणे हा मोहिमेचा प्रमुख उद्देश आहे.
केंद्र शासनाने डेंग्यु संबंधी मोबाईल ॲप्लीकेशन तयार केले असून ॲन्ड्राईड मोबाईलवर प्ले-स्टोर मध्ये जावून ‘India Fights Dengu’ हे ॲप शोधून मोबाईलवर डाऊनलोड करुन घेतल्यास डेंग्यु विषयी सर्व माहिती उपलब्ध होणार आहे.
कोवीड-19 सोबत गृह भेटीद्वारे जलद ताप रुग्ण सर्वेक्षण, हस्तपत्रिका वाटप, कंटेनर सर्वेक्षण, सर्व स्तरावर स्वच्छता मोहिमेचे आयोजन, डास उत्पत्ती स्थानात गप्पी मासे सोडण्याचा धडक कार्यक्रम व एक दिवस कोरडा पाळणे याविषयी जनतेमध्ये जनजागृती  निर्माण करण्यात येणार आहे. ‘राष्ट्रीय डेंग्यु दिन’ यशस्वी होण्यासाठी आरोग्य संस्थेचे अधिकारी व कर्मचारी, आशा वर्कर, ग्रामसेवक, अंगणवाडी सेविका, यांनी ‘राष्ट्रीय डेंग्यु दिन’ साजरा करण्यात बाबतचे आवाहन जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. गणेश जोगदंड यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

****



No comments: