16 March, 2021

इसापूर धरणातून उन्हाळी हंगामासाठी पाणी पाळ्या चालू सुरक्षेच्या दृष्टीने जनतेनी सूचनांचे पालन करावे : जलसंपदा विभागाचे आवाहन

 


हिंगोली, दि. 16 (जिमाका) : उर्ध्व पैनगंगा प्रकल्पाच्या इसापूर धरणाच्या लाभक्षेत्रांतर्गत नांदेड, हिंगोली व यवतमाळ जिल्ह्यातील सर्व लाभधारकांना व जनतेला सन 2020-21 मध्ये रब्बी हंगामातील सिंचनासाठी इसापूर उजवा कालवा व इसापूर डावा कालव्यातून तीन पाणी पाळ्या देण्यात आलेल्या आहेत व रब्बी हंगाम राबविण्यात आलेला आहे. सध्या उन्हाळी हंगाम सुरू झालेला असून उन्हाळी हंगामातील पाणी चालू आहे.

सध्या प्रकल्पावरील कालव्यातून लाभक्षेत्रांना पाणी सोडले जात आहे. कालवे पूर्ण भरुन वाहत असल्यामुळे कोणीही व्यक्ती, मुले, स्त्रिया यांनी कालव्यावरून फिरु नये, कालव्यामध्ये पोहण्यास जाऊ नये, कालव्यामध्ये धुणी, भांडी, वाहने, जनावरे धुण्यासाठी जाऊ नये, कालव्याच्या सेवापथावरुन वाहनांची, बैलगाड्यांची, जनावरांची  ये-जा करू नये. यामुळे अपघात होऊन जिवित व वित्त हानी होण्याची शक्यता नाकारता येणार नाही व अशा प्रकारच्या अनेक घटना घडलेल्या आहेत.

त्यामुळे वरील सूचनांचे सर्व जनतेने काटेकोरपणे पालन करावे. या आवाहनाकडे कोणी दुर्लक्ष केल्यामुळे दुर्देवाने काही जिवित हानी व वित्त हानी झाल्यास हे कार्यालय कोणत्याही परिस्थितीत जबाबदार राहणार नाही व अशा वेळी कालवा बंद करण्यात येणार नाही. या प्रकल्पावर जवळपास एक लाख हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली भिजते. त्यामुळे कालवा बंद केल्यास लाखो हेक्टर जमीन सिंचनापासून वंचित राहील, सिंचन विस्कळीत होईल, हजारो शेतकऱ्यांमध्ये असंतोष निर्माण होईल. त्यांचे हाताशी आलेल्या पिकांचे लाखो रुपयांचे नुकसान होईल. उन्हाळा चालू झाला असल्यामुळे पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. यामुळे शेतकऱ्यांमध्ये, जनतेमध्ये असंतोष पसरुन शेतकऱ्यांच्या रोषाला सामोरे जाण्याची शक्यता नाकारता येणार नाही. त्यामुळे सर्व जनतेनी वरील सूचनांचे पालन करावे, असे आवाहन जलसंपदा विभागातर्फे कार्यकारी अभियंता, उर्ध्व पेनगंगा प्रकल्प विभाग क्र. 01, नांदेड यांनी  केले आहे.

****

No comments: