12 March, 2021

कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजना जमीन विकण्यास इच्छुक शेकऱ्यांनी संपर्क साधण्याचे आवाहन

 


हिंगोली, (जिमाका) दि. 12 : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांत शंभर टक्के अनुदानावर (मोफत) शेतजमीन उपलब्ध करण्यासाठी कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजना राबविण्यात येत आहे.

या योजनेंतर्गत लाभार्थ्यांना लाभ देण्यासाठी जमीन विकण्यास इच्छुक असलेल्या शेतकऱ्यांनी         दि. 20 मार्च, 2021 पर्यंत सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, हिंगोली येथे संपर्क साधून विहित अर्ज सादर करावेत, असे आवाहन शिवानंद मिनगीरे, सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, हिंगोली यांनी केले आहे.

या योजनेंतर्गत अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या दारिद्र्यरेषेखालील भूमिहीन कुटुंबाना चार एकर कोरडवाहू (जिरायत) जमीन किंमत कमाल रुपये 5 लाख प्रती एकर किंवा दोन एकर ओलीताखालील (बागायती) जमीन किंमत कमाल रुपये 8 लक्ष प्रती एकर या मर्यादेत शेतजमीन उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. या योजनेसाठी लाभार्थी हा अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील असावा. लाभार्थी दारिद्र्यरेषेखालील भूमिहीन असावा. लाभार्थ्यांचे वय किमान 18 वर्षे व कमाल 60 वर्षे असणे आवश्यक आहे.

या योजनेच्या निवडीसाठी दारिद्र्यरेषेखालील भूमिहीन परित्यक्त्या स्त्रिया, दारिद्र्यरेषेखालील विधवा स्त्रिया, अनुसूचित जाती, जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत अनुसूचित जातीचे अत्याचारग्रस्त यांना प्राधान्यक्रम देण्यात येणार आहे. 

*****  

No comments: