16 November, 2021

 

महा-रेशीम अभियान-2022 सुरु

रेशीम शेतीसाठी नोंदणी करण्याचे आवाहन

 

हिंगोली (जिमाका), दि. 16 : महा-रेशीम अभियान-2022 सुरु झाले आहे.  हे रेशीम अभियान      दि. 25 नोव्हेंबर, 2021 पर्यंत राबविण्यात येणार आहे. या कालावधीतच रेशीम शेती करण्यास इच्छुक शेतकऱ्यांना नोंदणी करता येणार आहे. त्यामुळे या कालावधीत आवश्यक कागदपत्रासह जिल्हा रेशीम कार्यालयाकडे नोंदणी करणे आवश्यक आहे. नोंदणी न केलेल्या शेतकऱ्यास शासकीय अनुदानाचा लाभ देता येत नाही. त्यामुळे इच्छुक शेतकऱ्यांनी अशोक वडवळे, वरिष्ठ तांत्रिक सहायक, जिल्हा रेशीम कार्यालय, हिंगोली येथे संपर्क साधून नोंदणी करावे, असे आवाहन जिल्हा रेशीम विकास अधिकारी स्वप्नील तायडे यांनी केले आहे.

सद्यस्थितीत मनरेगा व नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प या योजनांच्या माध्यमातून रेशीम शेतीसाठी अनुदान देण्यात येते. मनरेगाच्या माध्यमातून तीन वर्षासाठी कुशल व अकुशल मिळून प्रती एकर 03 लाख 35 हजार 740 रुपये अनुदान देण्यात येते. तसेच एक एकर रेशीम शेतीतून वार्षिक 01 लाख 25 हजार रुपयांचे उत्पन्न मिळवता येते. रेशीम उद्योग हा मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण करणारा तसेच शेतकऱ्यांना आर्थिक स्वावलंबी बनविणारा एक उत्तम जोडधंदा आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात नोंदणी करुन स्वत:चा उत्कर्ष साधावा, असेही आवाहन प्रसिध्दीपत्रकाद्वारे करण्यात आले आहे.

*******

No comments: