15 November, 2021

 शेतकऱ्यांनी रब्बी हंगामात पिकांसाठी संयुक्त खताची योग्य मात्रा द्यावी

 

हिंगोली (जिमाका), दि. 15 : जिल्ह्यात खरीप हंगामातील पिकांची काढणी पूर्ण झालेली असून रब्बी हंगामातील पिकांची पेरणी सुरु आहे. यामध्ये प्रामुख्याने हरभरा, गहू इत्यादी पिके आहेत. रब्बी हंगामातील पिकांसाठी रासायनिक खते जिल्ह्यात उपलब्ध आहेत. परंतु बऱ्याच शेतकऱ्यांचा कल हा डी.ए.पी. खताच्या वापराकडे दिसून येतो. त्यामुळे बाजारात डी.ए.पी. खताची मागणी वाढलेली दिसते. उपलब्ध संयुक्त खतामधून सुध्दा पिकाच्या शिफारशीप्रमाणे रासायनिक खताची मात्रा देता येऊ शकते. त्यामुळे शेतकऱ्यांनी डी.ए.पी. खताचा आग्रह न धरता संयुक्त खतातून पिकास योग्य मात्रेत खत द्यावे.

बाजारात 10:26:26, 15:15:15, 12:32:16 आणि 20:20:00:13 ही संयुक्त खते मुबलक प्रमाणात उपलब्ध आहेत. तसेच सिंगल सुपर फॉस्फेट , म्युरेट ऑफ पोटॅश, 24:24:00 ही खते सुध्दा उपलब्ध आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी रब्बी पेरणी करताना वरील संयुक्त खते द्यावीत.

हरभरा पिकासाठी एकरी 10 किलो नत्र, 20 किलो स्फूरद, 12 किलो पालाश देण्यासाठी 10:26:26 हे खत 75 किलो वापरल्यास एकरी 1765 रुपये किंवा 15:15:15 हे खत 50 किलो अधिक सिंगल सुपर फॉस्फेट 50 किलो अधिक म्युरेट ऑफ पोटॅश 40 किलो वापरल्यास 2492 रुपये किंवा डीएपी 75 किलो अधिक म्युरेट ऑफ पोटॅश 25 किलो वापरल्यास 2320 रुपये खर्च येतो.

गहू (कोरडवाहू) पिकाला 40:20:00 एकरी खताची मात्रा देण्यासाठी 20:20:00:13  हे खत 100 किलो अधिक 50 किलो युरिया मिसळून दिल्यास एकरी 2766 रुपये तसेच बागायती वेळेवर गहू पेरण्यासाठी 40:20:20 ही मात्रा देण्यासाठी 10:26:26 हे खत 80 किलो अधिक युरिया 43 किलो वापरल्यास एकरी 4940 रुपये खर्च येतो.

उशीरा पेरण्यात येणाऱ्या गव्हासाठी एकरी 32:16:16 नत्र, स्फूरद व पालाश देण्यासाठी 15:15:15 हे खत 100 किलो अधिक युरिया 40 किलो दिल्यास 2813 रुपये किंवा डीएपी 35 किलो अधिक म्युरेट ऑफ पोटॅश 80 किलो अधिक 35 किलो युरिया दिल्यास 2690 रुपये किंवा 20:20:00:13 हे खत 80 किलो अधिक म्युरेट ऑफ पोटॅश 80 किलो अधिक 50 किलो युरिया मधून दिल्यास एकरी 3850 रुपये खर्च येतो. यावरुन डीएपी खताऐवजी इतर संयुक्त खते वापरल्यास खर्चात बचत होते आणि शिफारशीप्रमाणे मात्रा सुध्दा देता येते. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी रब्बी हंगामात पिकासाठी डीएपी ऐवजी संयुक्त व इतर खतांचा वापर करावा, असे आवाहन एन. आर. कानवडे, कृषि विकास अधिकारी, जिल्हा परिषद, हिंगोली यांनी केले आहे.  

*****

No comments: