21 July, 2023

 

जिल्ह्यात एक रुपया  विमा हप्ता भरुन 3 लाख 45 हजार 793 शेतकऱ्यांनी काढला पिक विमा

जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी लाभ घेण्याचे आवाहन

 

हिंगोली (जिमाका), दि. 21 : राज्यात होणारा अवकाळी पाऊस किंवा अतिवृष्टी  या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांच्या पिकाचं मोठ्या प्रमाणात अनेकदा नुकसान झाले आहे. त्यांचे हे नुकसान कमी करण्यासाठी  पिक  विमा योजना राबविण्यात आली आहे. मात्र, त्याचा हप्ता काही वेळेस शेतकऱ्यांना भरणे शक्य नव्हते. त्यामुळे अनेक शेतकरी  पिक  विमा  घेत नाहीत. त्यांची  ही अडचण ओळखून राज्य  शासनाने  सर्वसामावेशक पिक विमा योजना राबविण्याचा निर्णय घेतला आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या हिस्स्याची  रक्कम राज्य शासन भरत आहे. या योजनेमुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात दिलासा मिळण्यास मदत होणार आहे. ही योजना खरीप व रब्बी  हंगामासाठी  सन 2023-24 पासून ते 2025-26 या तीन वर्षासाठी राबविण्यात येणार आहे.

            प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप-2023 मध्ये दि. 20 जुलै अखेर हिंगोली जिल्ह्यातील 3 लाख 45 हजार 793 शेतकऱ्यांनी प्रती अर्ज एक रुपया भरुन पिक विम्याचा लाभ घेतला आहे. या अर्जदार शेतकऱ्यांनी 2 लाख 16 हजार 90 हेक्टर क्षेत्राचा 1140.64 कोटी रुपयाचा विमा संरक्षित केला आहे. या शेतकऱ्यांचा राज्य हिस्सा अनुदान 113.57 कोटी रुपये व केंद्र हिस्सा अनुदान 87.75 कोटी रुपये असे एकूण 201.35 कोटी रुपयाचा विमा हप्ता शासन भरणार आहे.

खरीप 2022 मध्ये 3 लाख 88 हजार 417 शेतकऱ्यांनी पीक विमा भरला होता. खरीप 2022 च्या तुलनेत यावर्षी 89.03 टक्के शेतकऱ्यांनी सहभाग घेऊन पीक विमा भरला आहे. या योजनेला शेतकऱ्यांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे.  

जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी  प्रधानमंत्री पीक  विमा योजनेचा लाभ मिळण्यासाठी  दि. 31 जुलै पर्यंत पीक विमा पोर्टलवर नोंदणी करुन मोठ्या  प्रमाणात  सहभागी  व्हावे, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी  शिवराज घोरपडे यांनी केले आहे.

*****

No comments: