20 July, 2023

 

मराठवाडा मुक्ती संग्रामाचा अमृत महोत्सव यशस्वी करावा

-- जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर


 

 

हिंगोली (जिमाका), दि. 20 : मराठवाडा मुक्ती संग्रामास या वर्षी 75 वर्षे पूर्ण होत आहेत. संपूर्ण मराठवाड्यात हे वर्ष मराठवाडा मुक्ती संग्रामाचे अमृत महोत्सवी वर्ष म्हणून साजरे होत आहे. यानिमित्त मराठवाडा मुक्तीसंग्रामातील शहीद लोकांची आठवण म्हणून मराठवाडा मुक्ती संग्रामाचा अमृत महोत्सव साजरा करण्यात येत आहे. मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने शासनाने सामान्य प्रशासन विभागाच्या दि. 7 जुलै, 2023 रोजीच्या शासन निर्णयान्वये जिल्हानिहाय कार्यक्रमाची रुपरेषा ठरवून दिले आहे. त्यानुसार सर्व विभागांनी आपापसात समन्वय ठेवून व योग्य नियोजन करुन मराठवाडा मुक्ती संग्रामाचा अमृत महोत्सव यशस्वी करावा, असे निर्देश जिल्हाधिकारी श्री. पापळकर यांनी  यावेळी दिले.  

            मराठवाडा मुक्तीसंग्राम अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन व नियोजन करण्यासाठी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या अध्यक्षतेखाली दि. 19 जुलै रोजी आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी अपर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी, उप मुख्य कार्यकारी अधिकारी अनंत कुंभार, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नितीन तडस, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवराज घोरपडे यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. 

यावेळी बोलताना जिल्हाधिकारी श्री. पापळकर म्हणाले, हिंगोली जिल्ह्यात मराठवाडा मुक्तीसंग्राम अमृत महोत्सवानिमित्त स्वातंत्र्य सैनिकांचा सत्कार, त्यांचे अनुभव कथन कार्यक्रम आयोजित करणे, तालुका स्तरापर्यंत मुक्ती संग्राम लढ्याची गाथा कळावी म्हणून सांस्कृतिक कार्यक्रम, देशभक्तीपर गीते, नाटिका, पथनाट्य इत्यादी कार्यक्रमाचे आयोजन करणे, मराठवाडा मुक्ती संग्राम चित्ररथ तयार करुन मंडळनिहाय रथयात्रा काढणे, मुक्ती संग्राम संदर्भात छायाचित्रे, पोस्टर्स, भितीचित्रे, वस्तू, पुस्तके यांचे प्रदर्शन भरविणे, मुक्तीसंग्रामासंदर्भात रांगोळी स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा या कार्यक्रमाचे आयोजन करणे, डिजिटल बोर्ड लावणे, रक्तदान शिबीर, आरोग्य शिबीर, दिव्यांगासाठी कार्यशाळा, मराठवाडा मुक्ती संग्रामातील सर्व वारसा स्थळांना, हुतात्मा स्मारकांना विद्यार्थ्यांच्या भेटी, तिथे श्रमदान करणे, जिल्ह्यातील सर्व हुतात्मा स्मारक ते हुतात्मा राहत होते त्याठिकाणापर्यंत गौरव रॅली यासह अनेक कार्यक्रमांनी मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा अमृत महोत्सव साजरा करावयाचा आहे. तसेच आयोजित कार्यक्रमाला स्वातंत्र्य सैनिकांला बोलावून त्यांचा सन्मान करावा. मराठवाडा मुक्तीसंग्रामाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त दर्शनी बोर्ड तयार करावेत. तसेच प्रत्येक कार्यक्रमामध्ये स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त कार्यक्रमाचे फलक लावावेत. ज्येष्ठ नागरिंकाची आरोग्य तपासणी शिबिरे घ्यावीत. यासाठी सर्व विभागांनी आपण राबवित असलेल्या कार्यक्रमाचा आराखडा सादर करावा, असे निर्देशही जिल्हाधिकारी श्री. पापळकर यांनी दिले.  

*******

No comments: