21 July, 2023

 

किटकनाशकामुळे होणाऱ्या विषबाधा टाळण्यासाठी

कार्यशाळेचे आयोजन करुन शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावेत

                                                                                                - जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर

 

हिंगोली (जिमाका), दि. 21 : किटकनाशके, बुरशीनाशकांची फवारणी करतांना निष्काळजीपणामुळे, अनावधानाने अथवा नजर चुकीने विषबाधा होऊ शकते. ते टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी काय काळजी घ्यावी याबाबत किटकनाशके/ बुरशीनाशके उत्पादक कंपन्या व कृषि विभागाने क्षेत्रीय स्तरावर व्यापक प्रमाणात कार्यशाळांचे आयोजन करुन मार्गदर्शन करावे. तसेच विषबाधा होऊ नये याबाबत प्रचार व प्रसिध्दी करण्यात यावी, अशा सूचना जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी यावेळी दिल्या.

येथील जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक 18 जुलै, 2023 रोजी किटकनाशके विषबाधा उपाययोजना तज्ञ समितीची बैठक घेण्यात आली. या बैठकीस जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी शिवराज घोरपडे, जिल्हा परिषदेचे कृषि विकास अधिकारी यु.एस. वाघमारे, जिल्हा आरोग्य अधिकारी यांचे प्रतिनिधी डॉ. प्रकाश जाधव, बीएएसएफ इंडिया लि. चे तांत्रिक सहायक तथा एफडीओ रामदास काळे उपस्थित होते.

शेतकऱ्यांनी घ्यावयाची काळजी :

1) वारा शांत असतांना म्हणजे सकाळी लवकर अथवा सायंकाळी उशीरा फवारणी करावी. 2) फवारणी वाऱ्याच्या प्रवाहाच्या दिशेने करावी विरुध्द दिशेने करु नये. 3) फवारणी करतांना किटकनाशकाचा त्वचेशी व डोळ्याशी संपर्क होणार नाही याची दक्षता घ्यावी. 4) फवारणी करताना किटकनाशकाचे अंश नाकाव्दारे श्वसन मार्गात व तोंडाद्वारे पोटात प्रवेश करणार नाहीत यासाठी नाकाला व तोंडाला मास्क / रुमाल बांधावा. तसेच डोळ्यावर चष्मा घालावा. केस झाकावेत. 5) फवारणी करतांना अंगभर कपडे घालावेत. शक्यतो वाटर प्रुफ सुरक्षा कीटचा वापर करावा. 6) पिकाची उंची एक फुट वा त्यापेक्षा जास्त असल्यास फवारणी करतांना गम बुटचा वापर करावा. 7) फवारणीचा व्यवसाय करणारे शेतकरी / शेतमजूर यांनी तालुक्याच्या आरोग्य केंद्रामध्ये नियमित आरोग्य तपासणी करुन घ्यावी. 8) किटकनाशके / बुरशीनाशके पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोतापासून व खाद्यपदार्थापासून दूर ठेवावेत. तसेच फवारणी नंतर फवारा व किटकनाशकाचे रिकामे डबे वाहत्या पाण्यात धूऊ नये. 9) किटकनाशकाचे रिकामे डबे इतर उपयोगासाठी न वापरता ते खोलवर जमिनीत पुरुन टाकावेत. 10) किटकनाशके / बुरशीनाशके फवारणी करताना ते वा त्यांचे अंश जनावरांच्या चाऱ्याच्या, खाद्यपदार्थाच्या संपर्कात येणार नाहीत वा त्यावर उडून जाणार नाहीत याची दक्षता घ्यावी, 11) विहिर, नदी, नाले, ओढे अथवा पानवठे यांच्या संपर्कात किटकनाशके/ बुरशीनाशके येणार नाहीत यांची दक्षता घ्यावी. 12) फवारणी करतांना वा फवारणी झाल्यानंतर शेतकरी / शेतमजुरास अस्वस्थ वाटत असल्यास घरगुती उपचार न करता त्वरित नजीकच्या आरोग्य केंद्रात पुढील उपचारासाठी दाखल करावे. तसेच प्रसार मध्यमांनी शेतकन्यांच्या हितासाठी मोफत व व्यापक प्रमाणात प्रसिध्दी देण्यात यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर व व कृषि विभागाने केले आहे.

****

No comments: