07 March, 2017

6 ते 12 मार्च कालावधीत मनरेगा सप्ताहाचे आयोजन
        हिंगोली, दि.7:- महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना अर्थात मनरेगा योजना ही खऱ्या अर्थाने सर्वसमावेशक होऊन त्याचा तळागाळातील जनतेला लाभ व्हावा यासाठी शासन, लोकप्रतिनिधी, शासकीय अधिकारी कर्मचारी आणि जनता या सर्वांनी मिळून 6 ते 12 मार्च या कालावधीत मनरेगा सप्ताह यशस्वी करण्याचे आवाहन विभागीय आयुक्त डॉ.पुरुषोत्तम भापकर यांनी केले.
            डॉ.भापकर यांनी मनरेगा सप्ताहाच्या यशस्वीतेसाठी औरंगाबाद विभागातील सर्व जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, रोजगार हमी योजनेचे संबंधित अधिकारी, वन अधिकारी, कृषी अधिकारी यांच्याशी व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारे संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते.
            डॉ. भापकर यांनी यावेळी ग्रामसभेसाठी संपर्क अधिकारी वर्ग 2 व 3 वरिष्ठ श्रेणी यांची ग्राम संपर्क अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात यावी, ग्रामसभेत संबंधित ग्राम पंचायतचे ग्रामसेवक, तलाठी, कृषी सहायक, लागवड अधिकारी, ग्राम रोजगार सेवक, कार्यान्वयीन यंत्रणांचे सर्व संबंधित कर्मचारी व संपर्क अधिकारी यांनी उपस्थित राहणे बंधनकारक असून त्यांनी वरिष्ठ कार्यालयाने दिलेल्या सूचनांप्रमाणे आवश्यक कार्यवाही करावी, विशेष ग्रामसभेसाठी नियुक्त केलेल्या तालुक्यातील सर्व ग्राम पंचायतीच्या संपर्क अधिकारी यांचे दिनांक 7 मार्च, 2017 रोजी संबंधित तालुक्याचे उपविभागीय अधिकारी यांनी प्रशिक्षण घेऊन योजनेबाबत व ग्रामसभेमध्ये करावयाच्या कार्यवाहीबाबत योजना व विषयनिहाय आवश्यक मार्गदर्शन उपस्थित उपविभागीय अधिकारी, तहसिलदार, गट विकास अधिकारी, वन अधिकारी, लागवड अधिकारी, उप अभियंता सिंचन, बांधकाम व तालुका कृषी अधिकारी यांनी करावे , प्रत्येक ग्रामसभेसाठी नियुक्त केलेल्या संपर्क अधिकारी यांना समृद्ध महाराष्ट्र जनकल्याण योजनांची हस्तपुस्तिका व मनरेगाची आवश्यक माहितीही देऊन आवश्यकतेप्रमाणे जॉबकार्ड उपजिल्हाधिकारी (रोहयो), उपमुख्य कार्यकारी अधिकारी पंचायत नरेगा, गट विकास अधिकारी यांनी उपलब्ध करुन द्यावेत, ग्रामपंचायत अंतर्गत पात्र असलेल्या 100 टक्के लाभार्थ्यांना ग्रामसभेमध्ये जॉबकार्ड वाटप तसेच नुतनीकरण करण्यात यावे, कमी वेळेत मोठ्या संख्येने कुटुंबांना जॉबकार्ड वाटप करावे लागणार असल्याने जॉबकार्ड लिहिणे, कुटुंबाचा फोटो उपलब्ध करणे, नवीन फोटो काढणे, फोटो डकवणे इत्यादीसाठी ग्रामसेवकाने ग्राम रोजगार सेवक, सरपंच, गावातील तरुण, बचत गट व इतर सुशिक्षित बेरोजगार, स्वयंसेवी / सामाजिक संस्था इत्यादी यांचा सहभाग घ्यावा.
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेची माहिती देणे समृद्ध महाराष्ट्र जनकल्याण योजनेतंर्गत 11 कामांची माहिती उपस्थित ग्रामस्थांना देणे, ग्रामपंचायत अंतर्गत जॉबकार्ड, मिळण्यापासून वंचित राहिलेल्या सर्व कुटुंबांना ग्रामसभेत जॉबकार्ड अदा करणे, ग्रामपंचायत अंतर्गत उपलब्ध असलेल्या जॉबकार्डचे नुतनीकरण करणे, समृध्द महाराष्ट्र जनकल्याण योजनेतंर्गत ग्राम पंचायत अंतर्गत सन 2016-17 व सन 2017-18 मध्ये घ्यावयाच्या कामांची निवड करणे, समृद्ध महाराष्ट्र जनकल्याण योजनेंतर्गत सन 2016-17 व सन 2017-18 साठी वैयक्तिक लाभाच्या कामासाठी लाभार्थी निवड करणे, यामध्ये सिंचन विहिर, वैयक्तिक शौचालय, शेततळे, फळबाग लागवड आणि सार्वजनिक स्वरुपाच्या ग्राम सबलीकरणांतर्गत कामांची निवड करणे, ग्रामसभेने निवडलेल्या लाभार्थी, कामे व सन 2016-17 व सन 2017-18 सुधारित वार्षिक कृती आराखड्यास ग्रामसभेची मान्यता घेणे, ग्रामसभेत केलेल्या कार्यवाहीच्या प्रपत्राच्या दोन प्रतीपैकी एक प्रत गट विकास अधिकारी यांनी संकलीत करुन तहसिलदार यांच्याकडे सादर करावी, तहसिलदार यांनी प्राप्त झालेल्या आराखड्याच्या आधारे छाननी समितीची मान्यता घेण्याच्या दृष्टीने आवश्यक ती कार्यवाही करावी, उप विभागीय अधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील छाननी समितीने नियमानुसार आवश्यक ती कार्यवाही तात्काळ करावी, ग्रामसभेने मंजूर केलेल्या सन 2016-17 व 2017-18 च्या सुधारित कामांचा ग्राम पंचायत वार्षिक आराखडा दोन प्रतीत तयार करुन एक प्रत गट विकास अधिकारी व तहसिलदार यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे दिनांक 10 मार्च 2017 रोजी सादर करावा, तसेच ग्रामपंचायत सुधारित आराखड्यास दिनांक 11 मार्च पर्यंत पंचायत समिती सर्वसाधारण सभेची मान्यता घेवून जिल्हाधिकारी यांच्याकडे विहित नमुन्यात आराखडा सादर करण्यात यावा, असेही डॉ. भापकर यांनी असे सूचित केले.
            यानंतर जिल्हाधिकारी यांनी पंचायत समितीच्या सुधारित वार्षिक आराखड्यास जिल्हा परिषद सर्वसाधारण सभेची नियमानुसार तात्काळ मान्यता घेऊन सदर सुधारीत वार्षिक आराखडा आयुक्त, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना, महाराष्ट्र नागपूर यांच्याकडे दिनांक 20 मार्च 2017 पर्यंत सादर करावा, वैयक्तिक लाभाची कामे मोठ्या प्रमाणावर घ्यावयाची असल्याने ई-हजेरी पत्रके पर्याप्त संख्येमध्ये ग्रामसेवक व ग्राम रोजगार सेवक यांना उपलब्ध करुन देण्याची जबाबदारी तहसिलदार, गट विकास अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, तालुका लागवड अधिकारी व वन अधिकारी यांची राहील,अनेक कामे छोट्या स्वरुपाची व कमी कालावधीची असल्याने उदा. शोषखड्डा, शौचालय, नाडेप / व्हर्मी कंपोस्ट हे प्रत्येक गावात समूह स्वरुपात मोठ्या स्वरुपात होणार असल्याने ई- हजेरी पत्रके त्या संख्येत 24 तासात ग्रामसेवक, ग्राम रोजगार सेवक यांना उपलब्ध करुन दिले जातील हे संबंधित तहसिलदार व गट विकास अधिकारी यांनी पहावे, ई- हजेरी पत्रके वितरीत करण्यास कोणताही कालापव्यय होणार नाही याची सर्व संबंधितांनी दक्षता घ्यावी,वेळेत शेकडोच्या संख्येने ई-हजेरी पत्रके उपलब्ध करुन देणे आवश्यक असल्याने यासाठी आवश्यक मनुष्यबळ संबंधित कार्यान्वीत यंत्रणांना जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद यांनी उपलब्ध करुन द्यावेत व याबाबत आवश्यक ते पूर्वनियोजन करुन कार्यवाही करावी, घेण्यात येणारी वैयक्तिक लाभाची कामे मोठ्या संख्येने व कमी कालावधीची असल्याने सदर कामाचे मोजमाप वेळेत होऊन अकुशल व कुशल देयके निर्धारीत कालावधीत अदा करणे आवश्यक असल्याने कामांच्या प्रमाणात प्रत्येक तालुक्यास आवश्यक ते तांत्रिक मनुष्यबळ उपलब्ध करुन देण्याची जबाबदारी जिल्हाधिकारी यांची राहील, याबाबत संबंधित जिल्हाधिकारी यांनी आवश्यक ते पूर्वनियोजन करुन कार्यवाही करावी, अशा सूचना ही आयुक्त डॉ. भापकर यांनी यावेळी दिल्या.
****

No comments: