29 March, 2017

थकीत कर्ज रक्कम तात्काळ भरण्याचे आवाहन

हिंगोली, दि. 29 : सामाजिक न्याय विभागांतर्गत येणाऱ्या सर्व मागासवर्गीय महामंडळाच्या थकीत कर्जाच्या वसूलीचा आढावा घेतला असता जिल्ह्यातील सर्व महामंडळामध्ये वसूलीचे प्रमाण अत्यंत अल्प असल्याचे निदर्शनास आले आहे. तरी लाभार्थ्यांनी महामंडळाकडून घेतलेल्या कर्जाची रक्कम तात्काळ भरण्याचे आवाहन जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांनी केले आहे.
 जिल्ह्याची थकीत वसूली 100 टक्के झाल्यानंतरच आपण इतर गरजू लाभार्थीना अर्थसहाय्य करून त्यांना स्वावलंबी आणि त्यांची आर्थिक उन्नती करू शकतो. त्यामुळे सर्व मागासवर्गीय कर्जधारकांनी त्यांचे नावे असणारी थकीत कर्ज रक्कम अनुक्रमे महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ (मर्या.), साहित्यरत्न लोकशाहिर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ (मर्या.), महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्ग वित्त व विकास महामंडळ (मर्या.), वसंतराव नाईक भटक्या जाती व विमुक्त जमाती विकास महामंडळ (मर्या.), संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळ (मर्या.) या हिंगोली जिल्ह्यातील मागासवर्गीय महामंडळाकडे त्वरित भरणा करावी, असे आवाहन जिल्हाधिकरी अनिल भंडारी यांनी प्रसिध्दी पत्रकात नमूद केले आहे.

*****

No comments: