08 March, 2017

महिलांनी सक्षम होणे काळाजी गरज
- जिल्हाधिकारी अनिल भंडारी 

        हिंगोली, दि.8: महिला सक्षम होणे काळाची गरज आहे. त्याकरीता महिलांनी मनात कोणतीही भिती न बाळगता समोर आले पाहिजे. समाजाने देखील महिलांना प्रोत्साहित करुन साथ दिली पहिजे असे  प्रतिपादन जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांनी दिली.
येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन समितीच्या सभागृहात जागतिक महिला दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालय, तालुका विधी समिती आणि जिल्हा रुग्णालय हिंगोली यांच्या संयुक्त विद्यमाने पीसी ॲन्ड पीएनडीटी ॲक्ट या विषयावर कायदेविषयक कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी प्रमुख पाहूणे म्हणून जिल्हा न्यायाधीश-1 एम. पी. दिवटे, जिल्हा पोलीस अधीक्षक अशोक मोराळे, निवासी उपजिल्हाधिकारी अनिल माचेवाड, निवडणूक उपजिल्हाधिकारी गोविंद रणवीरकर जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. बाबासाहेब रोडगे यांची प्रमुख उपस्थिती होती.
            जिल्हाधिकारी म्हणाले की, महिला दिन हा केवळ औपचारिक पध्दतीने साजरा न करता या दिनाचे निमित्त साधून महिलांना सक्षम करण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न करावेत. तसेच महिलांचे प्रश्न संवेदनशिलतेने हाताळावेत. व त्यांचे प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न करावा. समाजात महिलांना समानतेची वागणूक देण्याचा प्रयत्न करावा. तसेच पालकांनी मुलींना उच्चशिक्षित बनवावे. तसेच साक्षरतेचेही प्रमाण वाढविण्याचा प्रयत्न करावा. ग्रामीण भागातील मजूर महिलांचे आर्थिक सक्षमीकरण करण्यावर भर देण्यात यावा. महिलांनी त्यागाची भावना काढून आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी. तसेच महिलांनी आपले प्रश्न प्रशासनानेसमोर मांडण्यासाठी पुढे सरसावले पाहिजेत. आपपसामधील न्युनगंड ठेवू नये व महिलांमधील भितीचे वातावरण काढून टाकावा आणि आत्मविश्वास वाढवावा.

 या प्रसंगी पोलीस उपअधीक्षक श्रीमती सुजाता पाटील यांनी महिला विषयक पोलीसांची भूमिका या विषयावर मार्गदर्शन करतांना म्हणाल्या की, महिलांनी कायद्याचा योग्य अवलंब करत अन्याया विरुध्द लढा देण्यास शिकले पाहिजे. सुशिक्षीत महिलांनी कायद्याचं ज्ञान ग्रामीण भागातील माहिलापर्यंत पोहचवून  त्यांना पुढे येण्याबाबत मार्गदर्शन करणे आवश्यक आहे. करणार केले.
सेनगाव तहसीलदार श्रीमती वैशाली पाटील महिला व बालकल्याण विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या मनोधेर्य योजना या विषयावर मार्गदर्शन करतांना म्हणाल्या की, महिलांनी सकारात्मक दृष्टिकोन ठेवून पुढे येण्याची गरज आहे. कायद्याने समान संधी दिली असल्याने महिलांनी कोणताही न्युनगंड न बाळगता पुरुषाच्या बरोबरीने काम करण्याची आवश्यकता आहे. एक महिला सक्षम झाल्यास अनेक महिला सक्षम होऊन प्रगती साधण्यास मदत होईल. महिलांनी एकत्र येवून कार्य केल्याने महिलांचे अनेक प्रश्न तात्काळ मार्गी लागतील, असेही श्रीमती पाटील यावेळी म्हणाल्या. 
श्री. महादेव हादवे  यांनी यावेळी पीसी ॲन्ड पीएनडीटी ॲक्ट 1994 या विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले.  
उपजिल्हा निवडणूक अधिकारी गोविंद रणवीरकर यांनी महिलांनी मतदार नोंदणी यादीत आपली नोंदणी करण्याचे आवाहन करत महिलांमध्ये मतदानाबाबत जनजागृती करण्याबाबत मार्गदर्शन केले. यावेळी नवीन मतदारांना निवडणूक ओळखपत्राचे मान्यवरांच्या हस्ते वितरण करण्यात आले.
यावेळी विविध क्षेत्रातील महिलांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन नायब तहसीलदार  व्ही.के.कावरखे यांनी केले. तर श्रीमती सुकेशनी ढवळे यांनी आभार मानले.

**** 













No comments: