05 March, 2017

तरुण वकीलांनी निरंतर अभ्यास करावा
--- न्यायमुर्ती ता. वि. नलवडे
उच्च न्यायालय, मुंबई खंडपीठ औरंगाबादचे न्यायमुर्ती ता. वि. नलवडे यांच्या हस्ते
जिल्हा सत्र न्यायालयाच्या प्रस्तावित नवीन इमारतीचा भूमीपूजन व पायाभरणी सोहळा उत्साहात संपन्न
हिंगोली,दि.5:-  तरुण वकीलांना केवळ वकीलीची पदवी घेवून थांबण्याएैवजी निरंतर अभ्यास केला पाहिजे. हा अभ्यासच भविष्यात त्यांना मदत करेल असा विश्वास मुंबई उच्च न्यायालय औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमुर्ती ता. वि. नलवडे यांनी व्यक्त केले.
हिंगोली येथे सुमारे 34 कोटी 5 लाख रुपये खर्चातून बांधण्यात येणाऱ्या जिल्हा सत्र न्यायालयाच्या नवीन इमीरतीच्या कामाचे भुमीपूजन न्यायमुर्ती ता. वि. नलवडे यांच्या हस्ते झाले, त्याप्रसंगी ते बोलत होते.  
जिल्हाधिकारी कार्यालय आणि पोलीस अधीक्षक कार्यालयाजवळ प्रस्तावित नवीन जिल्हा सत्र न्यायालयाच्या इमारतीचा भुमीपूजन व पायाभरणी सोहळा उच्च न्यायालय, मुंबई खंडपीठ औरंगाबादचे न्यायमुर्ती ता.वि.नलवडे यांच्या व मान्यवरांच्या हस्ते दिपप्रज्वलनाने सुरुवात करुन कोनशिलेचे उद्घाटन करण्यात आले.      

यावेळी आमदार तान्हाजी मुटकूळे, माजी आमदार बळीराम कोटकर, माजी आमदार गजानन घुगे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एच. पी. तुम्मोड, जिल्हा पोलीस अधीक्षक अशोक मोराळे, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश परभणी श्रीमती मु. श्री. जवळकर, जिल्हा सत्र न्यायाधीश श्रीमती बारणे, भारतीय विधी परिषद, नवी दिल्ली उपाध्यक्ष ॲड. सतीश आ. देशमुख, नगर परिषदेचे मुख्याधिकारी रामदास पाटील, नगराध्यक्ष बाबाराव बांगर, उपनगराध्यक्ष दिलीपराव चव्हाण, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता सुरेश देशपांडे, हिंगोली वकील संघाचे अध्यक्ष शेख लालामियाँ शेख बाबामियाँ, स्वातंत्र्य सैनिक माणिकराव टाकळगव्हाणकर-देशमुख तसेच विविध विभागाचे अधिकारी, वकील संघ, वकील, लोकप्रतिनिधी, पत्रकार आदिंची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. 
न्यायमुर्ती श्री. ता.वि.नलवडे म्हणाले की, वकीलांनी केवळ वकीलीचा अभ्यास करुन चालणार नाही, तर त्यापुढेही वेळोवेळी शिक्षण घेवून कायद्याचा अभ्यास केला पाहिजे. तसेच न्यायालयात वकीली करतांना चुकीचे पाऊल पडणार नाही याची दक्षता घेतली पाहिजे. तसेच प्रलोभनापासून दुर राहिले पाहिजे. केवळ तालुका व जिल्हा न्यायालयात काम करुन थांबू नका, तर या ठिकाणी तीन ते चार वर्ष काम केल्यानंतर औरंगाबाद खंडपीठात काम करण्यासाठी येण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले. औरंगाबाद येथे काम करण्यासाठी मोठ्या प्रमाणात संधी असून या संधीचा तरुण वकीलांनी लाभ घ्यावा, असेही सांगितले.
तसेच कायदे हे नितीमुल्यावर आधारित आहेत. त्यामुळे माणूस बदलला तरी नितीमुल्य बदलत नाहीत, हे लक्षात ठेवले पाहिजे. घटना समजावयाची असेल तर छत्रपती शाहू महाराज, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे चरित्र वाचल्यानंतर घटना समजायला वेळ लागणार नसल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. विधी अभ्यासक्रमात या महापुरुषांच्या चरित्राचाही समावेश करावा, अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली. त्यासाठी भारतीय विधी परिषदेचे उपाध्यक्ष ॲड. सतीश देशमुख यांनी आवश्यक ते प्रयत्न करावेत. तसेच बार कॉन्सिलने विधी महाविद्यालय हिंगोली येथे सुरु करावे, अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली. येथील न्यायालयाची इमारत बांधण्यासाठी तीस महिन्यांची मुदत असून सदरचे बांधकाम दिलेल्या मुदतीतच पूर्ण करावे, यासाठी मुदतवाढ घेण्याची वेळ येवू नये, अशी सुचना सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना यावेळी केली.
उपाध्यक्ष, भारतीय विधी परिषद, नवी दिल्ली श्री. सतीश आ. देशमुख म्हणाले की, या प्रस्तावित इमारतीमुळे वेळ व पैसा यातून सामान्य नागरिकास दिलासा मिळणार आहे. तसेच नियोजित इमारत बांधकामासंदर्भातील माहिती दिली व वकील संघाच्या कार्यपध्दतीवर प्रकाश टाकला. 
जिल्हा न्यायाधीश -1 श्री. म.पा. दिवटे म्हणाले की, न्यायपालिका ही सर्वात महत्वाची आहे . न्यायपालिका सामान्यांना न्याय देण्यास ही तत्पर आहे. तसेच हिंगोली जिल्हा व सत्र न्यायालयाच्या प्रस्तावित इमारतीचे  भुमीपूजन व पायाभरणी सोहळा निमित्त ते बोलत होते. तसेच इमारतीच्या वास्तुमधील सोयीसुविधांचीही यावेळी माहिती दिली.  
प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती मु. श्री. जवळकर म्हणाल्या की, न्यायालयासमोरील प्रलंबित प्रकरणे तात्काळ निकाली काढण्यावर भर देण्यात येईल. तसेच या वास्तूची अतिशय मजबुतीने उभारणी होणार आहे. सामान्य जनतेला न्याय मिळावा, यासाठी व पक्षकारांना सोसावा लागणारा त्रासही या इमारतीमुळे कमी होणार आहे. यातून पक्षकारांचीही गैरसोय दूर होण्यास मदत होणार आहे. न्याय व्यवस्था ही वकील वर्ग , पोलीस यंत्रणा व कर्मचारी यांच्या समन्वायाने चालत असते. तसेच या इमारतीमध्ये असलेल्या सुविधांचीही यावेळी श्रीमती मु. श्री. जवळकर यांनी माहिती दिली.
या कार्यक्रमाची सुरुवात श्रीमती अनुराधा नांदेडकर व त्यांच्या संच (चमुने) स्वागतपर गीत सादर करुन व्यासपीठावरील मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन जी.पी.ढाले यांनी केले तर  वकील संघाचे अध्यक्ष शेख लालामियाँ समारोप प्रसंगी सर्वांचे आभार मानले. 
कार्यक्रमप्रसंगी परभणी, हिंगोली व वाशिम जिल्ह्यातील वकील मंडळी आदिंची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
****








 

No comments: