23 June, 2017

कोसळणाऱ्या विजेपासून नागरीकांनी स्वतःचा बचाव करण्याचे आवाहन
हिंगोली, दि. 23 : दरवर्षी अंगावर वीज पडल्यामुळे मोठ्या प्रमाणात लोक मरण पावतात अथवा दुर्घटनाग्रस्त होतात, त्यामुळे कोसळणाऱ्या विजेपासून नागरीकांनी स्वतःचा बचाव करण्यासाठी जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांनी खालीलप्रमाणे खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे.
आकाशात विजा चमकत असल्यास हे करा : आकाशात विजा चमकत असल्यास शेतात काम करणाऱ्या व्यक्तींनी तात्काळ शेताजवळील घरात किंवा सुरक्षित ठिकाणी जावे. पोहणारे, मच्छीमारी करणाऱ्यांनी तात्काळ पाण्यातून बाहेर यावे, जवळ आसरा नसेल तर पायाखाली लाकूड, प्लास्टिक, गोणपाट अशा वस्तू अथवा कोरडा पालापाचोळा ठेवा. तसेच विजेपासून बचावासाठी दोन्ही पाय एकत्र करून गुडघ्यावर दोन्ही हात ठेवून डोके जमिनीकडे गुडघ्यामध्ये झुकवा वडोके जमिनीवर टेकणार नाही याची काळजी घ्या, झाडाच्या उंचीपेक्षा दुप्पट अंतरावर उभे राहावे, वीजवाहक वस्तूपासून दूर रहा. उदा. विजेचे खांब, टेलीफोन खांब, लोखंडी पाईप ई. पासून दूर राहावे, वीज पडल्यास प्राथमिक उपचारा करीता मुख्यतः हृदय व श्वसन प्रकियेत अडथळा येतो त्यामुळे विद्युतघात झाल्यास लगेच हृदयाच्या बाजूने मालीश करावी. तोंडाने श्वसन प्रक्रियेस मदत करावी, विजा चमकत असल्यास संगणक, विद्युत उपकरणे बंद करून ठेवावीत.
आकाशात विजा चमकत असल्यास हे करू नका : पाण्याचे नळ, फ्रीज, टेलिफोन यांना स्पर्श करू नका. बाहेर असाल तर भ्रमणध्वनी तात्काळ बंद करावा, विजेच्या खांबाजवळ उभे राहू नका. झाडाखाली आश्रय घेऊ नका, दोन चाकी, सायकल यावर असाल तर तात्काळ उतरून सुरक्षित ठिकाणी जावे, धातूची कांडी असलेल्या छत्रीचा वापर करू नका. 

***** 

No comments: