06 December, 2017

शेंदरी बोंडअळीचे एकात्मिक व्यवस्थापन



वृत्त क्र. 565                                              दिनांक : 06 डिसेंबर 2017
शेंदरी बोंडअळीचे एकात्मिक व्यवस्थापन
हिंगोली,दि.06: कपासीचे  फरदड  घेऊ नये , वेळेवर  कपासीची वेचणी करुन डिसेंबरनंतर शेतामध्ये कपासीचे पीक ठेवू नये . हंगाम संपल्यानंतर शेतामध्ये  जनावरे किंवा शेळ्या , मेंढ्या चरण्यासाठी  सोडाव्यात . शेतातील पिकाचे  अवशेष जाळून टाकावेत. हंगाम संपल्यानंतर ताबडतोब  पऱ्हाटीचा वापर करावा किंवा बंदोबस्त करावा. शेतात किंवा शेताजवळ पऱ्हाटी रचून ठेवू नये. पीक  फेरपालट करावी. अंबाडी, भेंडी, मुद्रीका अशी पिके  कपाशीपूर्वी किंवा नंतर घेऊ नयेत. त्यामुळे या बोंडअळीच्या  जीवनक्रमात  खंड पडेल आश्रय ओळी लावावी. देशी कापूस , पारंपारिक बिगर बी.टी. कापूस किंवा  उशिरा लावलेली भेंडी हे आश्रय  पीक  म्हणून लावावे. नियमित सर्व बी.टी. कपासीचे सर्वेक्षण करावे. कामगंध सापळ्याचा वापर करुन किंवा हिरवी बोंडे फोडून या बोंड अळीचे सर्वेक्षण करावे.कामगंध सापळे आणि प्रकाश सापळ्याचा वापर करावा. हंगामामध्ये  हे सापळे शेतामध्ये आणि हंगाम संपल्यानंतर जिनिंग मिलजवळ बाजारामध्ये  लावावे. प्रादुर्भावग्रस्त गळालेली पाते व बोंडे जमा करुन नष्ट करावेत. डोंमकळ्या दिसून आल्यास त्या तोडून आतील अळ्यासह नष्ट करावे. कामगंध सापळ्याचा वापर शेंद्री बोंड अळीचे पतंग मोठ्या प्रमाणात आकर्षित करणे आणि  नर मादी मिलनामध्ये अडथळे आणणे यासाठी करता येतो. कपासीची पऱ्हाटी उपटल्यानंतर शेताची खोल नांगरट करुन अळीचे कोष नष्ट करावे.
कमी कालावधीचे (150 दिवस) आणि एकाचवेळी  जवळपास वेचणी  करता येणाऱ्या  संकरित  वाणाची लागवड  करावी. रस शोषण करणाऱ्या  किडीसाठी  प्रतिबंधात्मक वाणाची  निवड करावी. यामुळे  या किडीच्या  व्यवस्थापनासाठी फवारण्यात  येणाऱ्या  काही किटकनाशकामुळे  फुले लावण्यात येणारी  अनियमितता टाळता येईल . ट्रायकोग्रामाटॉयडीया बॅक्ट्री या परोपजीवी गांधीलमाशीचे कार्ड (1.5 लाख अंडी/हे) शेतामध्ये  लावावेत, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी श्री. व्ही.डी. लोखंडे  यांनी केले आहे .
00000

No comments: