13 July, 2022

 

नदीकाठच्या गावातील नागरिंकानी सतर्क रहावे

नागरिकांनी पूर परिस्थितीत काळजी व खबरदारी घ्यावी

- जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांचे आवाहन

 

            हिंगोली, (जिमाका) दि. 13 : जिल्ह्यात पावसाचा जोर दिवसेंदिवस वाढत असून सद्यस्थितीत नद्या, नाले, ओढे तुडूंब भरुन वाहत आहेत. यामुळे नद्यांना पूर येण्याची शक्यता नाकारता येत नाही. यासाठी नागरिकांनी खबरदारी घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी केले आहे.

नद्यांना आलेल्या पूरामुळे  जिल्ह्यातील नदीकाठच्या गावांना , नद्यांना जोडलेल्या कालव्यातून पाणी मोठ्या प्रमाणात वाहून कालव्या काठच्या गावांना देखील पुराचा फटका बसण्याची शक्यता  असल्याने नदी, नाले, कालव्या काठच्या नागरिकांनी सतर्क राहावे.

            नागरिकांनी पूर परिस्थितीत काय करावे आणि काय करु नये याबाबत सूचना केलेल्या आहेत. त्या पुढीलप्रमाणे आहेत.

काय करावे :

            1) गावात पूरस्थिती निर्माण झाल्यास अथवा होण्याची शक्यता असल्यास घरातील उपयुक्त सामान, महत्वाची कागदपत्रे, जनावरे सुरक्षित ठिकाणी हलवा, विजेवर चालणाऱ्या उपकरणांचा वीज पुरवठा बंद करावा.

            2) गावात अचानक पूरस्थिती निर्माण झाल्यास तात्काळ तहसील, पोलीस, नगर पालिका प्रशासनास कळवावे. गावात, घरात जंतुनाशक असतील तर ते पाण्यात विरघळणार नाहीत याची दक्षता घ्या.

            3) पूर स्थितीत उंच ठिकाणी जावे तसेच जातेवेळी सोबत रेडिओ, टॉर्च, सुके खाण्याचे पदार्थ, पिण्याचे पाणी सोबत ठेवावे. शक्य असल्यास घरातील वाहने उंच ठिकाणी हलवावेत. घर सोडून जाताना दारे, खिडक्या सर्व घट्ट बंद करुन जावे.  

            4)  पूर स्थिती असेपर्यंत पाळीव प्राणी, जनावरे उंच ठिकाणी बांधण्यात यावीत. चुकूनही पाळीव प्राणी, इतर जनावरे यांना नदी काठी, ओढ्या काठी बांधू नये. कुंटुंबातील सर्व व्यक्तींकडे ओळखपत्र राहील याची काळजी घ्या.

            5) पुरामध्ये अडचणीत सापडला असाल तर आजूबाजूच्या साधनांचा वापर करा (उदा. पाण्यावर तरंगणारे मोठे लाकूड, प्लास्टिकचे ड्रम याचा वापर करावा). कोणी व्यक्ती वाहत जात असेल तर दोरीच्या सहाय्याने त्याला वाचवण्याचा प्रयत्न करा. पूर स्थितीत घाबरुन जाऊ नका. प्रशासनाच्या सूचनांचे पालन करा.

काय करु नये :

            1) पूर असलेल्या भागात, नदीच्या पुलावर विनाकारण भटकू नका. पुराच्या पाण्यात चुकूनही जाऊ नका, तसेच पूर आल्यानंतर पुलावरुन गाडी घालण्याचा अथवा पूल ओलांडण्याचा प्रयत्न करु नका .

            2) दूषित, उघड्यावरील अन्न पाणी टाळा. शक्यतो उकळलेले पाणी व सुरक्षित अन्न सेवन करा. सुरक्षित ठिकाणी रहा व विद्युत तारांना स्पर्श करु नका .

            3) पोहता येत असेल तरच बुडणाऱ्या व्यक्तींना वाचवा परंतु अपरिचित व खोल पाण्यात जाऊ नका.

4) पूर परिस्थितीत नदी, नाले, पूल, धरण इत्यादी ठिकाणी विनाकारण गर्दी करु नका.

******   

No comments: