29 July, 2022

 

जिल्ह्यात कलम 37 (1)(3) चे आदेश लागू

 

            हिंगोली (जिमाका), दि. 29 :  जिल्ह्यात दि. 31 जुलै, 2022 ते 9 ऑगस्ट, 2022 या कालावधीत मुस्लीम धर्मीयांचा मोहरम साजरा होत आहे. तसेच दि. 1 ऑगस्ट, 2022 रोजी पहिला श्रावण सोमवार व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती साजरी होत आहे. दि. 8 ऑगस्ट, 2022 रोजी हिंगोली शहर ते कळमनुरी व कळमनुरी ते हिंगोली शहर अशी कावड यात्रा काढण्यात येणार आहे.

            तसेच जिल्ह्यात विविध धार्मिक, सामाजिक संघटना, राजकीय पक्ष तसेच शेतकरी संघटना, केंद्र सरकारच्या अग्नीपथ योजनेच्या निषेधार्थ भरतीपूर्वी प्रशिक्षण संस्था यांच्या वतीने, सद्यस्थितीत राज्यात चालू असलेल्या राजकीय घडामोडीच्या अनुषंगाने विविध पक्ष, संघटना त्यांच्या मागणी संदर्भाने समर्थनार्थ अथवा विरोध प्रकट करण्यासाठी  मोर्चे, धरणे आंदोलने, रास्ता रोको, उपोषणे  तसेच इतर प्रकारच्या निषेध आंदोलने करीत आहेत. अशा विविध घटनामुळे कायदा व सुव्यवस्थेचा  प्रश्न निर्माण  होण्याची शक्यता नाकारता येत नाही. असे विविध प्रश्न हाताळण्यासाठी व कायदा व सुव्यवस्था आबाधित  राखण्यासाठी संपूर्ण हिंगोली जिल्ह्यात  दिनांक 30 जुलै, 2022 रोजीचे 06.00 वाजल्यापासून ते दिनांक 13 ऑगस्ट, 2022 रोजीचे 24.00 वाजेपावेतो मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1)(3) चे आदेश लागू करण्यात येत असल्याचे अतिरिक्त जिल्हादंडाधिकारी यांनी कळविले आहे.

            त्यानुसार शासकीय कर्तव्य पार पाडणाऱ्या कर्मचाऱ्या व्यतिरिक्त कोणतीही व्यक्ती सार्वजनिक ठिकाणी त्यांच्या जवळ शस्त्र, काठी, तलवार, बंदुका बाळगणार नाहीत. लाठ्या किंवा काठ्या, शारीरिक इजा होण्यास त्या कारणीभूत ठरतील, सहज हाताळता येतील अशा वस्तु जवळ बाळगणार नाहीत. कोणतेही क्षारक पदार्थ, स्फोटक द्रव्ये जवळ बाळगणार नाहीत. दगड, क्षेपणीक उपकरणे, किंवा सर्व प्रवर्तक द्रव्य गोळा करून ठेवणार नाही, किंवा जवळ बाळगणार नाहीत. आवेशी भांडणे अंगविक्षेप, विटंबनात्मक नकला करणार नाही. सभ्यता, नितिमत्ता यास बाधा येईल किंवा अराजक माजेल अशी चिन्हे निशाणी, घोषणा फलक किंवा अशी कोणतीही वस्तु जवळ बाळगणार नाही किंवा ठेवणार नाहीत. व्यक्ती किंवा समुहाच्या भावना जाणुन बुजुन दुखावतील या उद्देशाने वाद्य वाजणार नाहीत किंवा असभ्य वर्तन करणार नाहीत. पाच किंवा पाचपेक्षा अधिक व्यक्तीं रस्त्यावर जमण्यास सक्त मनाई करण्यात आले आहे. हा आदेश कामावरील कोणतेही पोलीस अधिकारी, शासकीय कर्मचारी, विवाह, अंत्ययात्रा, धार्मिक कार्यक्रम, यात्रा व इतर सक्षम अधिकारी यांनी विशेषरित्या परवानगी दिलेल्या मिरवणुकांना लागू होणार नाही, असे अतिरिक्त जिल्हादंडाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी  यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे.

****

No comments: