19 June, 2025

आंतरराष्ट्रीय योग दिन, योग संगम पोर्टलवर नोंदणी करा-जिल्हाधिकारी

हिंगोली (जिमाका), दि.19: जिल्ह्यात येत्या 21 जून रोजी अकरावा आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहात व व्यापक सहभागासह साजरा करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर योगदिनाचे आयोजन अधिक प्रभावी व व्यापक स्वरुपात होण्यासाठी ‘योग संगम’ या केंद्र शासनाच्या https://yoga.ayush.gov.in/yoga-sangam या पोर्टलवर नोंदणी करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी केले आहे. यावर्षी २१ जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिन हा ‘‘योगा फॉर वन अर्थ वन हेल्थ (एक पृथ्वी, एक आरोग्यासाठी योग)’’ या संकल्पनेवर साजरा करण्यात येणार आहे. योग शास्त्र ही भारतीयांनी जगाला दिलेली देणगी आहे. उच्च रक्तदाब, मधुमेह, स्थौल्य, थॉयराईड वृध्दी, मनोविकार, सांध्याचे विकार तसेच सध्याच्या जीवन शैलीमुळे निर्माण झालेले अनेक आजार योग करण्यामुळे कमी होऊ शकतात. योगाच्या दैनंदिन आचरणामुळे निरोगी राहण्यास मदत होते व सकारात्मक ऊर्जा कायम राहते. हिंगोली जिल्ह्यातील जिल्हा रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालये, स्त्री रुग्णालय, ग्रामीण रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र, नागरी आरोग्य केंद्र, शाळा, महाविद्यालये खाजगी संस्था इत्यादी स्तरावर ‘योग संगम’ पोर्टलवर जास्तीत जास्त नोंदणी करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी राहुल गुप्ता, मुख्य कार्यकारी अधिकारी अंजली रमेश, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नितीन तडस, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कैलाश शेळके यांनी केले आहे. या प्रक्रियेमुळे देशभरातील सर्व योग कार्यक्रमांचे एकत्रीकरण होईल आणि नागरिकांना त्यांच्या नजीकच्या योग उपक्रमांची माहिती सहज उपलब्ध होईल. आंतरराष्ट्रीय योग दिन 2025 अधिक व्यापक, सर्वसमावेशक आणि यशस्वी करण्यासाठी सर्व घटकांनी सक्रीय सहभाग नोंदवावा, असे आवाहनही करण्यात आले आहे. ******

18 June, 2025

आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त शिबिराचे आयोजन * योग शिबिराचा लाभ घेण्यासाठी सर्वांनी उपस्थित राहण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन

हिंगोली (जिमाका), दि.18 : आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त येथील संत नामदेव पोलीस कवायत मैदानावर जिल्हा प्रशासन, क्रीडा विभाग, योग विद्याधाम, पतंजली योग समिती, जिल्हा योगा संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने दि. 21 जून, 2025 रोजी सकाळी 6 ते 7 वाजे दरम्यान योग शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या योग शिबिराचा सर्व लोकप्रतिनिधी, सर्व अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी व जनतेनी जास्तीत जास्त सहभाग नोंदवून लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे अपर जिल्हाधिकारी महेंद्रकुमार कांबळे यांनी केले आहे. येथील जिल्हाधिकारी कार्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिन कार्यक्रमाची पूर्वतयारीचा आढावा घेण्यासाठी जिल्हास्तर समितीची बैठक अपर जिल्हाधिकारी महेंद्रकुमार कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी अभिमन्यू बोधवड, जिल्हा क्रीडा अधिकारी राजेश्वर मारावार, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नितीन तडस, शिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रसकर, क्रीडा अधिकारी आत्माराम बोथीकर, योग शिक्षक रत्नाकर महाजन, विठ्ठल सोळंके, क्रीडा शिक्षक आर. एन. गंगावणे, जिल्हा योग संघटनेच्या प्रतिनिधी ज्योती शेळके, राष्ट्रीय सेवा योजनेचे जिल्हा समन्वयक डॉ. सचिन हाटकर, प्रवीण पांडे, विविध संघटनेचे पदाधिकारी, अधिकारी उपस्थित होते. पंतप्रधान महोदयांनी 2014 च्या राष्ट्रीय महासभेत दिनांक 21 जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून दरवर्षी साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच संयुक्त राष्ट्रसंघाने 21 जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून घोषित केला आहे. त्याअनुषंगाने दि. 21 जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून साजरा करण्यात येतो. हा दिवस जगभरात साजरा करण्यात येतो. पाच हजार वर्षाहून अधिक परंपरा असणारी योगविद्या ही भारताने जगाला दिलेली देणगी आहे. व्यक्तीच्या शारीरिक आणि आत्मिक विकासासाठी योगविद्या सहाय्यभूत आहे. तसेच केंद्र शासनाने दि. 21 जून, 2025 हा दिवस 11 वा आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून आयोजित करण्याचे निर्देश दिलेले आहेत. योगा दिनाच्या निमित्ताने जगभरात योगासनाची परंपरा स्वीकारणे व ती करणे ही आपल्या देशासाठी अभिमानाची बाब आहे. कारण योग हा आपल्या भारताच्या सांस्कृतिक वारसाचा अविभाज्य भाग आहे. दि. 21 जून, 2025 रोजी आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करुन जनतेमध्ये आरोग्य आणि भावनिक निरोगीपणा सुधारणा, एक लक्षणीय मालमत्ता म्हणून त्यांचे महत्व आणि योगदान यावर प्रकाश टाकून योगाचा सराव सुरु ठेवण्यासाठी लोकांना प्रेरणा देणे तसेच योगासने नागरिकांचा एक अविभाज्य भाग बनविणे आणि त्याद्वारे सर्वांसाठी आरोग्यदायी जीवन जगणे हे योग दिनाद्वारे सरकारचे उद्दिष्ट असल्याचे सांगून या योग दिनासाठी जिल्ह्यातील सर्व अधिकारी, कर्मचारी, नागरिक, योग साधक, खेळाडू, विद्यार्थी यांनी उपस्थित राहून योगाचा लाभ घ्यावा, असे आवाहन अपर जिल्हाधिकारी महेंद्रकुमार कांबळे यांनी यावेळी केले आहे. यावेळी बोलताना अपर जिल्हाधिकारी श्री. कांबळे यांनी आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आयोजित योग शिबिरासाठी सर्वांनी समन्वय ठेवून आवश्यक त्या सर्व सुविधा उपलब्ध करुन द्याव्यात. तसेच विद्यार्थ्यांची रॅली काढून घोषवाक्याच्या माध्यमातून योग दिनाचे महत्व सांगून योग शिबिरासाठी जास्तीत जास्त नागरिक उपस्थित राहण्यासाठी आवाहन करावेत, अशा सूचना केल्या. ***

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्याचे आवाहन

हिंगोली (जिमाका), दि. 18 : सन 2024-25 या शैक्षणिक वर्षात 10 वी, 12 वी, पदवी, पदव्युत्तर, वैद्यकीय व अभियांत्रिकी इत्यादी अभ्यासक्रमामध्ये विद्यार्थ्यांना सरासरी 60 टक्के किंवा त्यापेक्षा जास्त टक्केवारी गुण प्राप्त झाले असतील, अशा उत्तीर्ण झालेल्या मातंग समाज व तत्सम 12 पोटजातीतील विद्यार्थी-विद्यार्थीनींना महामंडळाकडून ज्येष्ठता व जास्त गुण क्रमांकानुसार जिल्ह्यातील प्रथम 03 ते 05 विद्यार्थ्यांस उपलब्ध निधीच्या अधिन राहून साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे शिष्यवृत्ती मंजूर करण्यात येते. त्यामुळे दिनांक 15 जुलै, 2025 पर्यंत कार्यालयीन वेळेत संपूर्ण कागदपत्रानिशी मातंग समाज व तत्सम 12 पोटजातीतील विद्यार्थ्यांनी जिल्हा कार्यालयात संपर्क करावा. उशीरा आलेल्या अर्जाचा जिल्हा कार्यालयामार्फत स्वीकार करण्यात येणार नाही. मातंग समाज व तत्सम 12 पोटजातीतील विद्यार्थ्यांनी अर्जासोबत मार्कशीट, शाळा सोडल्याचा दाखला, रेशन कार्ड, जातीचा दाखला, उत्पन्नाचा दाखला, आधारकार्ड, दोन फोटो, पुढच्या वर्गात प्रवेश घेतल्याची पावती किंवा बोनाफाईड सर्टिफिकेट इत्यादी कागदपत्रासह जिल्हा व्यवस्थापकांच्या नावे शिष्यवृत्ती मागणीचा अर्ज साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ मर्या. जिल्हा कार्यालय डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, रिसाला बाजार, रिसाला बाजार, सरकारी दवाखान्याजवळ, हिंगोली-413513 येथे सादर करावा, असे आवाहन जिल्हा व्यवस्थापक, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ (मर्या.) हिंगोली यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे. ***

विविध क्रीडा प्रबोधनीमध्ये सरळ व खेळनिहाय कौशल्य चाचणीद्वारे प्रवेश • 24 जून पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

हिंगोली (जिमाका), दि. 18 : शिवछत्रपती क्रीडापीठ, म्हाळुंगे, बालेवाडी पुणे अंतर्गत महाराष्ट्र राज्यात विविध क्रीडा प्रबोधिनीमध्ये रिक्त जागांवर सन 2025-26 करिता सरळ प्रवेश 50 टक्के व कौशल्य चाचणीद्वारे 50 टक्के प्रक्रियेंतर्गत खेळाडून प्रवेश देण्यात येणार आहे. क्रीडा प्रबोधिनीमध्ये 17 क्रीडा प्रकारात प्रशिक्षण देण्यात येते. तथापि, व्हॉलीबॉल करिता 13, सायकलींग-13, जलतरण-7, फुटबॉल-7, ज्युदो-5, जिमनॅस्टीक्स-9 याप्रमाणे खेळाडूंच्या जागा रिक्त असल्याने याच खेळातील खेळाडूनी अर्ज करावेत. जिल्हास्तरावर क्रीडा प्रबोधिनी विभाग चाचणीसाठी सहभागी होणाऱ्या खेळाडूंची नावे जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, हिंगोली येथे नोंदणी करावी. प्रवेशासाठी खेळाडूचे नाव, जिल्हा, खेळ प्रकार, जन्म दिनांक, वय व क्रीडा कामगिरी प्रमाणपत्र याबाबत माहिती संकलित करुन जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाकडे दि. 24 जून, 2025 पर्यंत अर्ज सादर करुन लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी राजेश्वर मारावार यांनी केले आहे. **

धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियानांतर्गत विशेष शिबिराचे आयोजन आदिवासी बांधवांनी योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

हिंगोली (जिमाका), दि. 18 : देशातील आदिवासी जमातीच्या आर्थिक व सामाजिक विकासासाठी धरती आबा जनजाती ग्राम उत्कर्ष अभियान ही योजना दि. 2 ऑक्टोबर, 2024 पासून मा. पंतप्रधान महोदय यांच्या हस्ते सुरु करण्यात आली आहे. या योजनेच्या अंमलबजावणीसाठी 25 प्राधान्यक्षेत्रे व 17 मंत्रालये निश्चित करण्यात आली आहेत. भारत सरकारने आदिवासी समुदायांचे सशक्तीकरण करण्यासाठी प्रधानमंत्री जन जाती न्याय महाभियान आणि धरती आबा जन जातीय ग्राम उत्कर्ष अभियान या दोन महत्वाच्या आणि कालबच्द मोहीम हाती घेतल्या आहेत. देशभरातील आदिवासी भागांमध्ये सेवा व पायाभूत सुविधा संतृप्त करणे हा या दोन्ही उपक्रमांचा उद्देश आहे. याव्दारे आदिवासी जमातींचा सामाजिक व आर्थिक विकास साध्य करण्याचे उहिष्ट आहे. या पार्श्वभूमीवर जनजातीय कार्य मंत्रालयाने 15 जून ते 30 जून, 2025 या कालावधीत धरती आबा या अभियानाच्या माध्यमातून जनजागृती करणे व लाभार्थ्यांना विविध योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी विशेष शिबिराचे आयोजन करण्यात येत आहे. आदिवासी जमातीच्या शेवटच्या टप्यापर्यंत वैयक्तीक लाभ पोहोचवणे आणि धरती आबा जनजागृती उत्कर्ष अभियानाची जनजागृती निर्माण करणे हा याअभियाना चा उदेश आहे. हे अभियान हिंगोली जिल्ह्यातील 81 गावामध्ये राबविण्यात येणार आहे. परंपरागत आईसी मोहिम वेगळे म्हणून या अभियानामध्ये गावपातळीवर क्लस्टर पातळीवरील शिबीरे आयोजित करुन आधारकार्ड, आयुष्यमान भारत कार्ड, जात प्रमाणपत्र, पी-एम किसान, जनधन खाते, प्रधानमंत्री जन आरोग्य योजना, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी, रेशन कार्ड नोंदणी, गॅस कनेक्शन, किसान क्रेडीट कार्ड, अटल पेन्शन योजना, कौशल्य विकास प्रशिक्षण, सौर उर्जेव्दारे वीज पुरवठासाठी लाभार्थी नोंदणी, एफआरए पटाधारकासाठी कृषी, मत्स्य व्यवसाय, पशुसंवर्धन-उपजिवेकेच्या योजनांसाठी नोंदणी, स्वदेश दर्शन योजनेअंतर्गत होम स्टे योजनेसाठी लाभार्थी नोंदणी इत्यादी सेवा प्रत्यक्षात पुरविण्याचे नियोजन आहे. याशिवाय या अभियानात सिकलसेल आजाराविषयी जनजागृती व तपासणी शिबीर, सर्वसाधारण आरोग्य तपासणी शिबीर, गरोदर स्त्रिया, स्तनदा माता, लहान मुले यांच्यासाठी पोषण शिबीर, क्षयरोग तपासणी शिबीर यावरही भर दिला जाणार आहे. या शिबीरामध्ये सीएससीएस, स्थानिक प्रशासन, फ्रंटलाइन कामगार आणि विविध विभागांशी समन्वय साधून योजनांचा लाभ पात्र आदिवासी व्यक्ती व कुंटुंबापर्यंत पोहोचवला जाईल. ही शिबीरे 15 जून ते 30 जून, 2025 या कालावधीत गाव, क्लस्टर पातळीवर लाभ संतृप्ती शिबीरे (Benefit Saturation Camps) आयोजित करण्यात येणार आहेत. या शिबीरामध्ये मोठ्या संख्येने आदिवासी बांधवानी सहभाग नोंदवावा व योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन कळमनुरीचे प्रकल्प अधिकारी डॉ. सुनिल बारसे यांनी आदिवासी नागरिकांना केले आहे. ******

इतर मागासवर्गीय महामंडळाच्या विविध कर्ज योजनेचा लाभ घ्यावा

हिंगोली (जिमाका), दि. 18 : महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ यांच्या उप कंपनी जगदज्योती महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळ, संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळ व संत सेनाजी महाराज केशशिल्पी महामंडळ या तीनही महामंडळामार्फत इतर मागासवर्गीय समाजाच्या सर्वांगीण कल्याणासाठी बेरोजगारांना स्वयंम उद्योगासाठी विविध कर्ज योजना राबविण्यात येतात. तसेच इतर मागासवर्गीय प्रवर्गातील गरजु व कुशल व्यावसायिक व्यक्तींना कृषी संलग्न व पारंपारिक उपक्रम व लघु उद्योग व मध्यम उद्योग उत्पादन, व्यापार विक्री सेवाक्षेत्र इत्यादी व्यवसायासाठी महामंडळाच्या विविध कर्ज योजना आहेत. त्याचा तपशील पुढीलप्रमाणे आहे. 1) एक लाख रुपयापर्यंतची थेट कर्ज योजना : या योजनेमध्ये अर्जदाराचा सिबील क्रेडीट स्कोअर किमान 500 पेक्षा जास्त असावा, अर्जदाराचे कौटुंबिक वार्षिक उत्पन्न एक लाख रुपयापेक्षा कमी असावे, परतफेडीचा कालावधी 48 समान मासिक हप्त्यांमध्ये राहील. नियमित परतफेड करणाऱ्या लाभार्थ्यांना या योजनेत व्याज अदा करावे लागणार नाही, परंतु थकीत झालेल्या हप्त्यांवर द.सा.द.शे. 4 टक्के व्याजदर आकारण्यात येईल. 2) 20 टक्के बीज भांडवल कर्ज योजना : यासाठी उद्दिष्ठ 46 असून या योजनेमध्ये 75 टक्के रक्कम ही बँकेची असून त्यावरील व्याज हे बँकेच्या नियमाप्रमाणे राहील . 20 टक्के रक्कम ही महामंडळाची असून त्यावर द.सा.द.शे. 6 टक्के व्याज आकारण्यात येते व 5 टक्के सहभाग हा लाभार्थ्यांचा आहे. या योजनेची कर्ज मर्यादा पाच लाखापर्यंत असून परतफेडीचा कालावधी पाच वर्षाचा समान 60 हप्त्याचा आहे. 3) वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना : ही योजना बँकेमार्फत राबविण्यात येत असून कर्ज मर्यादा 15 लाख रुपयापर्यंत आहे. या योजनेसाठी महामंडळाच्या वेबपोर्टल संगणक प्रणालीवर नाव नोंदणी करणे अनिवार्य आहे. या योजनेत कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न मर्यादा आठ लाख पर्यत आहे. कर्ज परतफेडीचा कालावधी बँकेच्या निकषाप्रमाणे तसेच कर्ज रक्कमेचे हप्ते नियमित भरल्यास व्याजाची रक्कम (12 टक्केच्या मर्यादेत) व्याज परतावा रक्कम अनुदान स्वरुपात बँक प्रमाणिकरणानुसार लाभार्थ्याच्या आधार लिंक बँक खात्यात दरमहा महामंडळामार्फत जमा करण्यात येईल. तसेच लाभार्थ्याने ऑनलाईन पोर्टलवर उद्योग सुरु असल्याचे किमान दोन फोटो अपलोड करणे अनिवार्य आहे. 4) गट कर्ज व्याज परतावा योजना : ही योजना बँकेमार्फत राबविण्यात येत आहे. यासाठी कर्ज मर्यादा 10 लाख ते 50 लाख रुपयापर्यंतची आहे. या योजनेत महामंडळाच्या वेबपोर्टल संगणक प्रणालीवर नाव नोंदणी करणे अनिवार्य आहे. गटातील लाभार्थीचे वय 18 ते 45 वर्षे असावे. तसेच गटातील लाभार्थ्यांनी यापूर्वी महामंडळाचा किंवा इतर कोणत्याही शासकीय योजनेचा लाभ घेतलेला नसावा. तसेच इतर मागास प्रवर्गातील महामंडळाच्या निकषांनुसार विहित केलेल्या वार्षिक उत्पन्न मर्यादेतील उमेदवारांच्या बचत गट, भागीदार संस्था, सहकारी संस्था, कंपनी (कंपनी अधिनियम 2013 अंतर्गत), एलएलपी, एफपीओ अशा शासन प्रमाणिकरण प्राप्त संस्थाना बँकेतर्फे स्वयंरोजगार उद्योग उभारणीसाठी जे कर्ज दिले जाईल. त्या कर्ज रक्कमेवरील व्याज परतावा हा बँक प्रमाणिकरणानुसार महामंडळाकडून अदा केला जाईल. 5) शैक्षणिक कर्ज व्याज परतावा योजना : ही योजना बँकेमार्फत राबविण्यात येत आहे. कर्जरकमेवरील व्याज परतावा देशांतर्गत व परदेशी उच्च शिक्षणासाठी कर्ज मर्यादा 10 लाख ते 20 लाख रुपये पर्यंतची आहे. या योजनेत महामंडळाच्या वेबपोर्टल संगणक प्रणालीवर नाव नोंदणी अनिवार्य आहे. विद्यार्थ्यांचे वय 17 ते 30 वर्षे असावे. अर्जदाराचे कौटुंबिक वार्षिक उत्पन्न मर्यादा 8 लाख रुपये असावी. विद्यार्थी बारावी 60 टक्के गुणासह उत्तीर्ण असावा. रक्कमेवरील व्याज परतावा हा बँक प्रमाणिकरणानुसार महामंडळाकडून अदा केला जाईल. 6) महिला स्वयंसिध्दी व्याज परतावा योजना : ही योजना महिला आर्थिक विकास महामंडळाच्या लोक संचलित साधन केंद्रामार्फत राबविली जात आहे. इतर मागास प्रवर्गातील किमान 50 टक्के महिलांचा समावेश असलेल्या पात्र महिला बचत गटास प्रथम टप्प्यात 5 लाख रुपयापर्यंत बँकेमार्फत कर्ज उपलब्ध करुन घेण्यास मान्यता देण्यात येईल. कर्ज परतफेडीचा कालावधी बँकेच्या निकषाप्रमाणे तसेच कर्ज रकमेचे हप्ते नियमित भरल्यास व्याजाची रक्कम (12 टक्केच्या मर्यादेत) व्याज परतावा रक्कम अनुदान स्वरुपात बँक प्रमाणिकरणानुसार लाभार्थ्यांच्या आधार लिंक बॅंक खात्यात दरमहा महामंडळामार्फत जमा करण्यात येईल. वरील कर्ज योजना या बँकेमार्फत असून लाभार्थ्यांने महामंडळाच्या www.msobcfdc.org या संकेत स्थळावर ऑनलाईन अर्ज भरावा. तसेच या योजनेचा लाभ हा इतर मागासवर्गीय समाजातील व्यक्तीने जास्तीत जास्त घ्यावा. अधिक माहितीसाठी महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ मर्या. जिल्हा कार्यालय डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, रिसाला बाजार, हिंगोली-413513, दूरध्वनी क्र. 02456-224442 वर संपर्क साधावा, असे आवाहन महामंडळाच्या जिल्हा व्यवस्थापकांनी केले आहे. ******

17 June, 2025

हिंगोली जिल्ह्यातील ग्रामपंचायती रंगणार आता एका रंगात

हिंगोली (जिमाका), दि. 17 : जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी अंजली रमेश यांच्या संकल्पनेतून व अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अनुप शेंगुलवार यांच्या मार्गदर्शनाखाली उप मुख्य कार्यकारी अधिकारी केशव गड्डापोड यांच्या नेतृत्वात हिंगोली जिल्ह्यातील 563 ग्रामपंचायतीच्या इमारती एक रंगात करण्याच्या कामास मागील आठवड्यात सुरुवात झाली आहे. सर्व ग्रामपंचायत इमारतीत स्वतंत्र शौचालय, बैठक व्यवस्था, संगणक संच, पिण्यासाठी पाणी, नियमित स्वच्छता, ऑफिससाठी खुर्ची, टेबल, अभ्यांगतासाठी स्वतंत्र खुर्च्या, प्रिंटर, वायफाय, इन्व्हर्टर इत्यादी सुविधा उपलब्ध करुन देण्याबाबत सर्व गटविकास अधिकारी यांना सूचना दिलेल्या आहेत. त्यानुसार सर्व गटविकास अधिकारी यांनी तालुकास्तरावर सर्व ग्रामसेवक (ग्राम पंचायत अधिकारी) यांच्या बैठका घेऊन नियोजन केले आहे. यासाठी ग्रामपंचायतींनी 15 वा वित्त आयोगाचा निधी ग्रामपंचायत स्तरावर खर्च करावयाचा आहे. याबाबत दर आठवड्याला गटविकास अधिकारी यांचा आढावा घेऊन कामास गती देण्याचे निर्देश मुख्य कार्यकारी अधिकारी अंजली रमेश यांनी दिले आहेत. या उपक्रमासाठी विष्णू भोजे यांना जिल्ह्याचे समन्वयक म्हणून नेमण्यात आल्याची माहिती जिल्हा परिषदेने दिली आहे. ******

प्राधान्यक्रम ठरवून निधी मागणीचे प्रस्ताव तात्काळ सादर करावेत - जिल्हाधिकारी राहुल गुप्ता

• सन 2024-25 च्या खर्चाचे उपयोगिता प्रमाणपत्र तातडीने सादर करावेत • आकांक्षीत तालुक्यातील कामे दिलेल्या निर्देशांकानुसार तातडीने पूर्ण करावेत • धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियानांतर्गत 15 ते 30 जून या कालावधीत विविध शिबिराचे आयोजन हिंगोली (जिमाका), दि. 17 : जिल्ह्यातील सर्व कार्यालय प्रमुखांनी जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गतच्या कामाबाबत लोकप्रतिनिधीशी समन्वय साधून व प्राधान्यक्रम ठरवून निधी मागणीचे प्रस्ताव तात्काळ सादर करावेत, असे निर्देश जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी आज दिले. येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा वार्षिक योजनेचा आढावा घेण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी अंजली रमेश, सहायक जिल्हाधिकारी योगेश मीना, जिल्हा नियोजन अधिकारी ग. गो. चितळे, आदिवासी विकास विभागाचे प्रकल्प अधिकारी सुनिल बारसे, समाज कल्याणच्या सहायक आयुक्त गीता गुठ्ठे यांची प्रमुख उपस्थिती होती. जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी सर्व कार्यालय प्रमुखांनी जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत सन 2024-2025 च्या कामावर केलेल्या खर्चाचा ताळमेळ तात्काळ पूर्ण करुन उपयोगिता प्रमाणपत्रासह अहवाल सादर करावा. तसेच अखर्चित निधीची माहिती तात्काळ सादर करावी. तसेच सन 2025-26 या वर्षात करावयाच्या कामाचे योग्य नियोजन करुन निधी मागणीचे परिपूर्ण प्रस्ताव तात्काळ सादर करावेत, अशा सूचनाही जिल्हाधिकारी श्री. गुप्ता यांनी यावेळी दिल्या. यावेळी जिल्हाधिकारी श्री. गुप्ता यांनी कृषी, पशुसंवर्धन, महावितरण, आरोग्य, क्रीडा, पाणीपुरवठा, नगरविकास, तीर्थक्षेत्र, पर्यटन क्षेत्रावरील सन 2024-25 च्या खर्चाचा तसेच सन 2025-26 प्रस्तावित खर्चाचा सविस्तर आढावा घेतला. तसेच विद्यार्थ्यांना आपल्या गावापासून शाळेत नेआण करण्यासाठी मानव विकास अंतर्गत नवीन आलेल्या बस आहेत. या बससाठी शिक्षण विभागाने रुट प्लॅन तयार करुन द्यावा, अशा सूचना दिल्या. जिल्ह्यातील हिंगोली या आकांक्षीत तालुक्यात केंद्र शासनाने दिलेल्या निर्देशानुसार महिला व बालकांना देण्यात येणारे पोषण आहार, प्रधानमंत्री आवास योजना, ओडीएफ प्लस गावे, जलजीवन मिशन, कृषी, पशुसंवर्धन, पाणीपुरवठा, ज्या अंगणवाडीमध्ये शौचालयाची सुविधा नाही त्या ठिकाणी शौचालय उभारणे यासह निर्धारित निर्देशांकानुसार सर्व सुविधा उपलब्ध करुन द्यावेत. केलेल्या कामाची छायाचित्रे, माहितीचा डेटा अपलोड करावा व निती आयोगाकडून बक्षीस पात्र ठरवावेत, असेही त्यांनी यावेळी सांगितले. देशातील आदिवासी जमातीच्या आर्थिक व सामाजिक विकासासाठी धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियान ही योजना हिंगोली जिल्ह्यातील 81 गावांमध्ये विविध 17 यंत्रणेमार्फत राबविण्यात येणार आहेत. या अभियानाच्या पहिल्या टप्यात 15 ते 30 जून या कालावधीत लाभार्थ्यांसाठी विविध शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे. यासाठी आदिवासी विकास विभागाचे प्रकल्प अधिकारी हे समन्वय अधिकारी असून त्यांनी सर्व विभागाशी समन्वय ठेवून हे शिबीर यशस्वी होण्यासाठी नियोजन करावे, अशा सूचना श्री. गुप्ता यांनी यावेळी दिल्या. या बैठकीस विविध विभागाचे विभाग प्रमुख उपस्थित होते. ******

16 June, 2025

मोटार सायकल भाड्याने देण्यासाठी लायसन्स देण्यावर घालण्यात आलेले निर्बंध मागे

हिंगोली, दि. 16 (जिमाका) : शासनाच्या 12 एप्रिल, 2016 च्या पत्रातील निर्देशानुसार महाराष्ट्र राज्यात रेंट-ए-मोटार सायकल स्कीम-1997 अंतर्गत मोटार सायकल भाड्याने देण्यासाठीचे लायसन्स देण्याबाबत निर्बंध घालण्यात आले होते. मोटार वाहन अधिनियम-1988 चे कलम 75 व रेंट-ए-मोटार सायकल स्कीम-1977 अंतर्गत मोटार सायकल भाड्याने देण्यासाठी लायसन्स देण्याबाबत तरतूद करण्यात आली आहे. शासनाने दि. 28 एप्रिल, 2025 रोजीच्या पत्रान्वये महाराष्ट्र राज्यात रेंट-ए-मोटार सायकल स्कीम-1977 अंतर्गत मोटार सायकल भाड्याने देण्यासाठी लायसन्स देण्यावर घालण्यात आलेले निर्बंध मागे घेतलेले आहेत. याची सर्व नागरिकांनी नोंद घ्यावी, असे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, हिंगोली यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे. ******

15 June, 2025

शाळेच्या पहिल्या व दुसऱ्या दिवशी साजरा होणार “शाळा प्रवेशोत्सव

* 16 जूनपासून सुरू होणार शाळा * विद्यार्थ्यांचे केले जाणार स्वागत हिंगोली, दि. 15 (जिमाका) : शाळांमध्ये विद्यार्थ्यांची उपस्थिती वाढविणे आणि शैक्षणिक गुणवत्ता सुधारण्याच्या दृष्टीने शैक्षणिक वर्ष 2025-26 साठी ‘शाळा प्रवेशोत्सव’ मोठ्या उत्साहात साजरा करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. या वर्षाच्या शैक्षणिक वर्षाची सुरुवात सोमवार, दिनांक 16 जून 2025 पासून होणार आहे. यानिमित्ताने पहिल्या व दुसऱ्या दिवशी खास स्वागत समारंभाचे आयोजन केले जाणार आहे. यामध्ये संबंधित क्षेत्रातील लोकप्रतिनिधी, अधिकारी सहभागी होणार असून, ते विद्यार्थ्यांचे स्वागत करतील. गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी यावर्षी ‘दत्तक शाळा योजना’ही राबविण्यात येणार आहे. जिल्ह्यातील 50 पेक्षा जास्त पट असलेल्या शाळा शासकीय अधिकाऱ्यांनी दत्तक घ्यायच्या आहेत. या शाळांना वर्ग 1 व वर्ग 2 चे अधिकारी वर्षभर भेट देतील, शाळेतील शैक्षणिक गुणवत्ता, भौतिक सुविधा, विद्यार्थ्यांच्या गरजांची माहिती घेऊन त्यावर उपाययोजना करतील. या शाळा भेटींचे नियमित अहवाल संबंधित अधिकाऱ्यांनी सादर करणे अनिवार्य आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या वाढविण्यासाठी शासनाने विशेष प्रचार मोहीम राबविण्याचे ठरविले आहे. पालकांना शाळांमध्ये उपलब्ध सुविधा, शिष्यवृत्ती योजना व उपक्रमांची माहिती दिली जाणार आहे. प्रमुख भर इयत्ता 1 लीच्या प्रवेशात वाढ करण्यावर असेल. यासाठी शाळा, तालुका व जिल्हा पातळीवर विशेष प्रयत्न करण्यात येणार आहेत. या उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी सुनिश्चित करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने नियोजन केले आहे. संबंधित अधिकारी, शाळा प्रशासन हे समन्वयाने हे कार्य यशस्वी करणार असल्याचे प्रसिध्दीपत्रकाव्दारे शिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रसकर यांनी केले आहे. *-*-*-*

14 June, 2025

विद्यार्थ्यांचे परदेशी शिक्षणाचे स्वप्न आता भारतातच पूर्ण होणार : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

* पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठांना आशयपत्र प्रदान कार्यक्रम संपन्न मुंबई, दि.१४: भारतीय विद्यार्थ्यांना परदेशातील विद्यापीठांमध्ये उच्च शिक्षणासाठी जाण्याची गरज राहणार नाही कारण आज राज्य शासनाने राष्ट्रीय शिक्षण धोरणातंर्गत पाच परदेशी विद्यापीठांसोबत आशयपत्र प्रदान केले आहे.आंतरराष्ट्रीय विद्यापीठांचे भारतातील पहिले शैक्षणिक हब मुंबई, नवी मुंबईत उभारण्यात येत असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. हॉटेल ताज येथे 'मुंबई रायझिंग : क्रिएटिंग अ‍ॅन इंटरनॅशनल एज्युकेशन सिटी' या पाच जागतिक विद्यापीठांना (एलओआय) आशयपत्र प्रदान करण्याचा कार्यक्रम पार पडला कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते.यावेळी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान, उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील,केंद्रीय शिक्षण सचिव तथा विद्यापीठ अनुदान आयोगाचे अध्यक्ष विनित जोशी,अपर मुख्य सचिव असिमकुमार गुप्ता, सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल, ब्रिटनच्या उच्चायुक्त लिंडी कॅमेरॉन, ऑस्ट्रेलियाचे कॉन्सुल जनरल पॉल मर्फी,अमेरिकेचे कॉन्सुल जनरल माईक हॅंकी, इटलीचे कॉन्सुल जनरल वॉल्टर फेरारा, अ‍ॅबर्डीन विद्यापीठाचे उपप्राचार्य ग्लोबल एंगेजमेंट प्रा.सिलादित्य भट्टाचार्य, यॉर्क विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. चार्ली जेफ्री, वेस्टर्न ऑस्ट्रेलिया विद्यापीठ उपकुलगुरू गॉय लिटलफेअर, इलिनॉय इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचे अध्यक्ष इलिनॉय टेक राज ईचंबाडी, आयईडी चे रिकार्डो बाल्बो,अधिष्ठाता,विविध विद्यापीठांचे प्रतिनिधी उपस्थित होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की,युनिव्हर्सिटी ऑफ अॅबर्डीन (स्कॉटलंड, यु.के.),युनिव्हर्सिटी ऑफ यॉर्क (यु.के.),युनिव्हर्सिटी ऑफ वेस्टर्न ऑस्ट्रेलिया (ऑस्ट्रेलिया),इलीनॉय इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (अमेरिका),इस्तितुतो यूरोपीओ दी डिझाईन (इटली) ही जगातील पाच नामवंत विद्यापीठे भारतात येत आहेत. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसरात ही विद्यापीठे उभी राहणार आहेत.याचं परिसरात येत्या काही वर्षात मेडिसिटी,स्पोर्टस सिटी आणि इनोव्हेशन सिटी उभारणारण्यात येणार आहे. येथे आगामी कालावधीत दहा विद्यापीठ एकत्र येतील अशी संकल्पना राबवण्यिाचा विचार आहे. सध्या या पाच विद्यापीठांमुळे हा परिसर पूर्ण शिक्षण आणि संशोधन साठी ओळखला जाईल.मुंबईची सध्या वित्तीय,औद्योगिक आणि मनोरंजन उद्योगाचे शहर म्हणून ओळख आहे. विद्यापीठामुळे एज्युकेशनल सिटी अशी ओळख होईल.विकसित भारत २०४७ मध्ये हा निर्णय महत्वाची भूमिका बजावेल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, अ‍ॅबरडीन विद्यापीठ, यॉर्क विद्यापीठ, वेस्टर्न ऑस्ट्रेलिया विद्यापीठ, इलिनॉय इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी आणि इस्टिट्यूटो युरोपियो डी डिझाईन हे मुंबई,नवी मुंबईत पूर्ण कॅम्पस आणणार आहेत - राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० शी सुसंगत अशा प्रकारचा हा पहिलाच उपक्रम नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ विकसित होत आहे. अटल सेतू निर्माण झाला आहे.. पायाभूत सुविधांच्या व्यवस्था आणि आंतरराष्ट्रीय कनेक्टिव्हिटी यामुळे विद्यापीठाशी निगडित सर्वांना उपयुक्त ठरेल. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामुळे परदेशातील अनेक विद्यापीठांना भारतात येण्यासाठी उत्सुकता दाखवली आहे.ज्या भारतीय तरुणांना परदेशी जाऊन शिक्षण घेणं शक्य नाही त्यांचे स्वप्न आता अपुरे राहणार नाही. सध्या पाच विद्यापीठे आली आहेत. पण भविष्यात अजूनही विद्यापीठांचे स्वागत करायला आम्ही तयार आहोत.नुकताच वेर्स्टन युनर्व्हसिटी आणि गोंडवाना विद्यापीठ यांच्यात सामंजस्य करार झाला असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. *विकसित भारत करण्यासाठी नवीन शैक्षणिक धोरण हातभार लागेल: केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान* केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान म्हणाले की,मुंबई ही स्वप्नांची नगरी आहे त्याचबरोबर ही आर्थिक राजधानी देखील असून आगामी कालावधीत मुंबई येथे शिक्षणाचे हब होण्यासाठी परदेशी पाच विद्यापीठांचा खूप महत्त्वाचं योगदान राहील. भारत हा प्राचीन काळापासून शिक्षण क्षेत्रात जागतिकस्तरावर नावलौकिक राहीला आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वामध्ये विकसित भारतची स्वप्न साकारण्यासाठी अनेक योजना राबविल्या जात आहेत. नवीन शैक्षणिक धोरणामुळे जागतिक पातळीवरच्या विद्यापीठांना देखील आपल्या संस्था भारतात सुरू करता येणार आहेत त्याचबरोबर भारतातील शिक्षण संस्थांना परदेशामध्ये आपल्या शाखा उघडता येणे शक्य होणार आहे.भारतात जागतिक दर्जाचे शिक्षण विद्यार्थ्यांना कमी खर्चात उपलब्ध होईल. आज भारतातील आयआयटी, आयआयएम, आयएफ, सिम्बॉयसिस यासारख्या संस्था परदेशामध्ये सुरू झाल्या आहेत.परदेशी विद्यापीठ भारतात येवून शिक्षण देणार भारताला विकसित बनवण्यासाठी आणि शिक्षण क्षेत्रात पुढे नेण्यासाठी हा निर्णय खूप महत्त्वाचा आहे असेही केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान म्हणाले. यावेळी गुजरात अहमदाबाद विमान दूर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या प्रवाश्यांना यावेळी श्रध्दांजली वाहण्यात आली.मुख्यमंत्री यांचे विशेष कार्यकारी अधिकारी कौस्तुभ ढवसे यांनी सुत्रसंचालन केले.प्रास्ताविक सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी केले.यावेळी केंद्रीय शिक्षण सचिव विनित जोशी यांनी मनोगत व्यक्त केले. *जागतिक दर्जाची पाच विद्यापीठे नवी मुंबईत* *युनिव्हर्सिटी ऑफ अ‍ॅबरडीन*, यूकेमधील सर्वात जुन्या विद्यापीठांपैकी एक आणि भारतात कॅम्पस स्थापन करणारे पहिले स्कॉटिश विद्यापीठ असून 200 हून अधिक भारतीय विद्यापीठे आणि संशोधन केंद्रांसह अनेक दशकांच्या विद्यापीठ भागीदारी यामध्ये असून आयआयटी - इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी; एम्स - ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस; मणिपाल अकादमी; आयसीएआर - इंडियन कौन्सिल ऑफ अ‍ॅग्रिकल्चरल रिसर्च, आयसीएमआर - इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च आणि दिल्ली विद्यापीठ यांचा समावेश आहे. जगातील टॉप 100 विद्यापीठांमध्ये स्थान मिळवलेले आणि आयव्ही लीग समतुल्य संस्था आणि मुंबईत कॅम्पस स्थापन करणारे ऑस्ट्रेलियातील प्रतिष्ठित ग्रुप ऑफ एट (Go8) विद्यापीठांमध्ये पहिल्या क्रमांकावर असलेले *वेस्टर्न ऑस्ट्रेलिया विद्यापीठ*. भारतीय विद्यार्थ्यांच्या आकांक्षा आणि भविष्यात जागतिक कार्यबल आणि अर्थव्यवस्थेच्या विकसित होत असलेल्या गरजा पूर्ण करण्यासाठी तयार केलेले विज्ञान,औद्योगिक व इंजिनिअरींग या क्षेत्रात (STEM)व्यवसाय या विषयांमध्ये पदवीपूर्व आणि पदव्युत्तर अभ्यासक्रम असतील. *यॉर्क विद्यापीठ* ही यूकेमधील सर्वात प्रतिष्ठित संशोधन-केंद्रित संस्थांपैकी एक आहे तसेच ते रसेल ग्रुपची सदस्य आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता आणि सायबर सुरक्षा, व्यवसाय, अर्थशास्त्र आणि सर्जनशील उद्योगांसह संगणक विज्ञानातील अत्याधुनिक पदवीपूर्व आणि पदव्युत्तर अभ्यासक्रम उपलब्ध होतील. उदयोन्मुख क्षेत्रातील कार्यक्रम - एआय, सायबर सुरक्षा, सर्जनशील उद्योग - जागतिक उद्योगांच्या इनपुटसह डिझाइन केले जातील.भारतीय विद्यार्थ्यांसाठी नोकरीचा संधी उपलब्ध होतील. *इलिनॉय इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (इलिनॉय टेक)* हे स्वतंत्ररित्या पदवी देणारे आणि भारतात कॅम्पस स्थापन करणारे पहिले अमेरिकन विद्यापीठ आहे.संगणक विज्ञान, अभियांत्रिकी आणि व्यवसाय यासारख्या उच्च मागणी असलेल्या क्षेत्रांमध्ये पदवीपूर्व आणि पदवीधर शिक्षण उपलब्ध होतील. त्यांचा प्रसिद्ध एलिव्हेट प्रोग्राम देखील ते राबवणार आहेत. जो सर्व विद्यार्थ्यांना इंटर्नशिप, संशोधन, स्पर्धा उपलब्ध करून देईल. युरोपमधील प्रीमियम डिझाइन शाळांपैकी एक, *इस्टिटुटो युरोपियो डी डिझाइन (IED) फॅशन*, उत्पादन डिझाइन आणि व्हिज्युअल कम्युनिकेशनमध्ये जागतिक दर्जाचे कौशल्य उपलब्ध करून देईल. *****

13 June, 2025

ग्रामीण भागातील स्पर्धा परीक्षा देणाऱ्या मागासवर्गीय मुलामुलींनी अर्थसहाय्यासाठी प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन

हिंगोली (जिमाका), दि. 13 : जिल्हा परिषद सेस योजना सन 2025-26 मधून 20 टक्के मागासवर्गीय कल्याण निधी अंतर्गत ग्रामीण भागातील विविध स्पर्धा परीक्षा देणाऱ्या मागासवर्गीय मुला-मुलींना अर्थसहाय्य पुरविण्यासाठी अर्जदारांकडून प्रस्ताव मागविण्यात आले आहेत. या योजनेंतर्गत विद्यार्थी हा ग्रामीण भागातील रहिवाशी असावा. विद्यार्थी हा कोणत्याही शाखेचा पदवीधर व मागील पाच वर्षात त्यांने एमपीएससी, युपीएससी, एसएससी-सीजीएल, आयबीपीएस मार्फत घेण्यात आलेली पूर्व किंवा मुख्य परीक्षा उत्तीर्ण झालेला असावा. ही योजना डीबीटी तत्वावर राबवावयाची असल्याने निवड झालेल्या लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर जास्तीत जास्त 20 हजार रुपये वर्ग करण्यात येणार आहेत. हिंगोली जिल्ह्यातील ग्रामीण भागातील रहिवाशी असणाऱ्या एससी, एसटी, व्हीजेएनटी व एसबीसी प्रवर्गातील मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी आपले परिपूर्ण प्रस्ताव संबंधित गट विकास अधिकारी, पंचायत समिती अथवा जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद, हिंगोली या कार्यालयात दि. 25 जून, 2025 पर्यंत सादर करावे. विलंबाने प्रस्ताव सादर केल्यास त्याचा विचार केला जाणार नाही याची दक्षता घ्यावी, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी अंजली रमेश, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अनुप शेंगुलवार, प्रकल्प संचालक नामदेव केंद्रे, जिल्हा समाज कल्याण अधिकारी गिता गुट्टे यांनी केले आहे. ***

लॅपटॉप खरेदीच्या अर्थसहाय्यासाठी पात्र लाभार्थ्यांनी प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन

हिंगोली (जिमाका), दि. 13 : जिल्हा परिषद सेस योजना सन 2025-26 मधून 20 टक्के मागासवर्गीय कल्याण निधी अंतर्गत ग्रामीण भागातील मागासवर्गीय विद्यार्थ्यांना लॅपटॉप खरेदीसाठी अर्थसहाय्य पुरविण्यासाठी अर्जदारांकडून प्रस्ताव मागविण्यात आले आहे. या योजनेंतर्गत विद्यार्थी हा ग्रामीण भागातील रहिवाशी असावा. वैद्यकीय (एमबीबीएस, बीएएमएस, बीडीएस, बीएचएमएस व तत्सम), अभियांत्रिकी (बीई, बीटेक) या शाखेतील पदवी किंवा पदव्युत्तर अभ्यासक्रमात शिक्षण घेत असावा. ही योजना डीबीटी तत्वावर राबवावयाची असल्याने निवड झालेल्या लाभार्थ्यांनी प्रथम लॅपटॉप खरेदी करुन अनुदानासाठी मूळ देयकासह प्रस्ताव जिल्हा समाज कल्याण अधिकारी यांच्याकडे सादर केल्यानंतर अनुदानाची रक्कम त्यांच्या खरेदी किंमती इतकी किंवा जास्तीत जास्त 30 हजार रुपये त्यांच्या बँक खात्यावर वर्ग करण्यात येणार आहे. हिंगोली जिल्ह्यातील ग्रामीण भागातील रहिवाशी असणाऱ्या एससी, एसटी, व्हीजेएनटी व एसबीसी प्रवर्गातील मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी आपले परिपूर्ण प्रस्ताव संबंधित गट विकास अधिकारी, पंचायत समिती अथवा जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद, हिंगोली या कार्यालयात दि. 25 जून, 2025 पर्यंत सादर करावे. विलंबाने प्रस्ताव सादर केल्यास त्याचा विचार केला जाणार नाही याची दक्षता घ्यावी, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी अंजली रमेश, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अनुप शेंगुलवार, प्रकल्प संचालक नामदेव केंद्रे, जिल्हा समाज कल्याण अधिकारी गिता गुट्टे यांनी केले आहे. ***

इतर मागास बहुजन कल्याण, दुग्धविकास मंत्री अतुल सावे यांचा हिंगोली दौरा

हिंगोली (जिमाका), दि. 13 : राज्याचे इतर मागास बहुजन कल्याण विभाग, दुग्धविकास, अपारंपारिक ऊर्जा, दिव्यांग कल्याण मंत्री अतुल सावे हे शनिवार, दि. 14 जून, 2025 रोजी हिंगोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रमाचा तपशील पुढीलप्रमाणे आहे. शनिवार, दि. 14 जून, 2025 रोजी सकाळी 6.30 वाजता छत्रपती संभाजीनगर येथून वाहनाने समृध्दी महामार्गाने हिंगोलीकडे प्रयाण. सकाळी 10 वाजता शासकीय विश्रामगृह हिंगोली येथे आगमन व राखीव. सकाळी 11 वाजता शासकीय विश्रामगृह हिंगोली येथे मोदी सरकारची 11 वर्षे 'संकल्प से सिध्दीतक' या विषयावर पत्रकार परिषदेस उपस्थिती. दुपारी 12 वाजता शासकीय विश्रामगृह हिंगोली येथून अर्धापूर जि. नांदेडकडे वाहनाने प्रयाण. *****

जिल्ह्यात शस्त्र व जमावबंदी आदेश लागू

हिंगोली (जिमाका), दि. 13 : जून महिन्यात हिंगोली जिल्ह्यात होणाऱ्या विविध सण-उत्सव, स्पर्धा आणि सभा, बैठका, धरणे आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्याच्या दृष्टीने जिल्ह्यात शस्त्र व जमावबंदी आदेश लागू करण्याचे आदेश अतिरिक्त जिल्हादंडाधिकारी अभिमन्यू बोधवड यांनी दिले आहेत. दि. 14 जून, 2025 रोजी श्री गजानन महाराज शेगाव पालखी आगमन दुपारी औंढा नागनाथ, मुक्कामी जवळा बाजार, दि. 20 जून रोजी राजमाता मॉसाहेब जिजाऊ पुण्यतिथी तिथीप्रमाणे, दि. 26 जून रोजी छत्रपती शाहू महाराज जयंती, दि. 27 जून रोजी मोहरम मास आरंभ होत आहे. तसेच मराठा आरक्षण व इतर आरक्षण संबंधाने घडणाऱ्या राजकीय घडामोडी, नागरिक, विविध संघटना, पक्ष यांच्या मागण्यासंदर्भात मोर्चे, धरणे, आंदोलने, रास्ता रोको, उपोषणे करीत असतात. अशा विविध घटनांमुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. असे विविध प्रश्न हाताळण्यासाठी तसेच कायदा व सुव्यवस्था आबाधित राखण्यासाठी संपूर्ण हिंगोली जिल्ह्यात दि. 13 जून, 2025 रोजी मध्यरात्रीपासून ते दि. 28 जून, 2025 रोजी मध्यरात्रीपर्यंत मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1)(3) अन्वये शस्त्र व जमावबंदी आदेश लागू करण्यात येत असल्याचे अतिरिक्त जिल्हादंडाधिकारी यांनी कळविले आहे. त्यानुसार शासकीय कर्तव्य पार पाडणाऱ्या कर्मचाऱ्या व्यतिरिक्त कोणतीही व्यक्ती सार्वजनिक ठिकाणी त्यांच्याजवळ शस्त्र, काठी, तलवार, बंदुका बाळगणार नाहीत. लाठ्या किंवा काठ्या, शारीरिक इजा होण्यास त्या कारणीभूत ठरतील, सहज हाताळता येतील अशा वस्तूजवळ बाळगणार नाहीत. कोणतेही क्षारक पदार्थ, स्फोटकद्रव्ये जवळ बाळगणार नाहीत. दगड, क्षेपणीक उपकरणे, किंवा सर्व प्रवर्तक द्रव्य गोळा करुन ठेवणार नाही, किंवा जवळ बाळगणार नाहीत. आवेशी भांडणे अंगविक्षेप, विटंबनात्मक नकला करणार नाही. सभ्यता, नितिमत्ता यास बाधा येईल किंवा अराजक माजेल, अशी चिन्हे निशाणी, घोषणा फलक किंवा अशी कोणतीही वस्तू जवळ बाळगणार नाही किंवा ठेवणार नाहीत. व्यक्ती किंवा समूहाच्या भावना जाणून बुजून दुखावतील, या उद्देशाने वाद्य वाजणार नाहीत किंवा असभ्य वर्तन करणार नाहीत. पाच किंवा पाचपेक्षा अधिक व्यक्तीं रस्त्यावर जमण्यास सक्त मनाई करण्यात आले आहे. हा आदेश कामावरील कोणतेही पोलीस अधिकारी, शासकीय कर्मचारी, विवाह, अंत्ययात्रा, धार्मिक कार्यक्रम, यात्रा व इतर सक्षम अधिकारी यांनी विशेषरित्या परवानगी दिलेल्या मिरवणुकांना लागू होणार नाही, असे अतिरिक्त जिल्हादंडाधिकारी, हिंगोली यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे. **

12 June, 2025

पीक प्रात्यक्षिक घटकांतर्गत लाभार्थी निवडीसाठी शेतकऱ्यांनी ऑफलाईन अर्ज करण्याचे आवाहन

हिंगोली(जिमाका), दि. 12 : खरीप हंगामासाठी राष्ट्रीय अन्न सुरक्षा आणि पोषण अभियान कडधान्य अन्नधान्य पिके व वाणिज्यिक पिके, राष्ट्रीय खाद्यतेल अभियान-तेलबिया आणि आरकेव्हीवाय महाराष्ट्र पौष्टिक तृणधान्य (श्री अन्न) अभियान सन 2025-26 अंतर्गत पीक प्रात्यक्षिक या घटकांतर्गत केंद्र शासनाने निर्गमित केलेल्या मार्गदर्शक सूचनेनुसार लाभार्थी निवड कार्यक्रमाची अंमलबजावणी करावयाची आहे. हिंगोली जिल्ह्यातील सर्व शेतकरी बांधवासाठी कृषी विभागाकडून चालू खरीप हंगामासाठी पीक प्रात्यक्षिके गट लाभार्थ्यांमार्फत घ्यावयाचे आहेत. याकरिता लाभार्थी गटांची निवड महाडिबीटी पोर्टलवर ऑनलाईन पध्दतीने प्रथम अर्ज करणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्वावर करण्यात येणार आहे. त्यानुसार आतापर्यंत महाडीबीटी पोर्टलवर लाभार्थ्यांची निवड झालेली आहे. सद्यस्थितीत महाडीबीटी पोर्टलवर येणाऱ्या विविध तांत्रिक अडचणीमुळे यापुढे विविध योजनांतर्गत पीक प्रात्यक्षिक या घटकासाठी गट लाभार्थ्यांची निवड ऑफलाईन करावयाची आहे. ऑफलाईन गट लाभार्थी निवड मार्गदर्शक सूचनांच्या अधीन राहून करण्यात यावी. ऑफलाईन निवड केलेल्या गटांची नोंदणी महाडीबीटी पोर्टलवर करणे व त्यांची माहिती केंद्र शासनाने विकसित केलेल्या कृषी मॅपर पोर्टलवर भरणे अनिवार्य आहे. पीक प्रात्यक्षिके कार्यक्रमासाठी पात्रता, निकष खालीलप्रमाणे आहेत. शेतकरी गट हा 31 मार्च, 2024 पूर्वी नोंदणी केलेला असावा. शेतकरी गट कोणत्याही शासन यंत्रणेकडे नोंदणीकृत असावा. जसे आत्मा, महाराष्ट्र ग्रामीण जीवोन्नोती अभियान, राष्ट्रीय ग्रामीण जीवोन्नती अभियान, महिला आर्थिक विकास महामंडळ, नाबार्ड इत्यादी ठिकाणी नोंदणी केलेला असावा. एकाच कुटुंबातील एकाच व्यक्तीस लाभ देण्यात येईल. पीक प्रात्यक्षिकासाठी निवडलेल्या गटात 25 पेक्षा जास्त शेतकरी असल्यास संबंधित गटाने एकाच गावातील 25 शेतकऱ्यांची निवड करावी. एक गाव एक गट एक प्रात्यक्षिक या तत्वावर पीक प्रात्यक्षिकांची अंमलबजावणी करावयाची आहे. त्यामुळे एका गावातून अधिक गटांचे अर्ज प्राप्त झाल्यास गट लाभार्थ्यांची निवड पारदर्शकपणे होईल याची दक्षता घेण्यात येईल. ज्या गट अर्जदारांनी महाडीबीटी पोर्टलवर अर्ज सादर केला आहे. या अर्जदारांपैकी पात्र अर्जदारांना ऑफलाईन निवड करताना प्राधान्य देण्यात येईल. गटातील शेतकऱ्यांना पीक प्रात्यक्षिकाचा लाभ देताना ॲग्रीस्टॅकवर नोंदणी असणे बंधनकारक आहे. तसेच गटातील ज्या सभासदांना लाभ द्यावयाचा आहे त्यांची फार्मर आयडी बंधनकारक आहे. या योजनेंतर्गत हिंगोली जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपनी, कृषी क्षेत्रात काम करणारी सहकारी संस्था आदींनी ऑफलाईन अर्ज करावे. यासाठी शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपनीनी कागदपत्रे संबंधित तालुका कृषी अधिकारी कार्यालयाकडे दि. 17 जून, 2025 पर्यंत कार्यालयीन वेळेत सादर करावेत, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राजेंद्र कदम यांनी केले आहे. ********

बालकामगार दिनानिमित्त राबविण्यात आली स्वाक्षरी मोहिम

हिंगोली (जिमाका), दि. 12 : जगभरात 12 जून हा आंतरराष्ट्रीय बालकामगार विरोधी दिन म्हणून पाळला जातो. या पार्श्वभूमीवर सरकारी कामगार अधिकारी कार्यालय व जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालय, जिल्हा बाल संरक्षण कक्षाच्या संयुक्त विद्यमाने जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये अपर जिल्हाधिकारी महेंद्रकुमार कांबळे यांच्या उपस्थितीत स्वाक्षरी मोहिम राबविण्यात आली. यावेळी सरकारी कामगार अधिकारी एस. जी. फड, दुकाने निरीक्षक एस. जे. पेरके, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी सरस्वती कोरडे, बाल संरक्षण अधिकारी (संस्थात्मक) गणेश मोरे, बाल संरक्षण अधिकारी संस्थाबाह्य जरीबखान पठाण, सामाजिक कार्यकर्ता रामप्रसाद मुडे, रेशमा पठाण, समुपदेशक सचिन पठाडे, क्षेत्रबाह्य कार्यकर्ता अनिरुध्द घनसावंत इत्यादी उपस्थित होते. **

बालमृत्यूचे प्रमाण शून्यावर आणण्यासाठी जिल्ह्यात 'स्टॉप डायरिया अभियान' यशस्वीपणे राबवा- जिल्हाधिकारी राहुल गुप्ता

• जिल्ह्यात 16 जून ते 31 जुलै या कालावधीत राबविणार अभियान हिंगोली (जिमाका), दि. 12 : अतिसारामुळे होणारे बालमृत्यूचे प्रमाण शून्यावर आणण्यासाठी जिल्ह्यात दि. 16 जून ते 31 जुलै, 2025 या कालावधीत विविध उपक्रम राबवून 'स्टॉप डायरिया अभियान' यशस्वीरित्या राबवावे, असे निर्देश जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी आढावा बैठकीत दिले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात दि. 10 जून रोजी जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या अध्यक्षतेखाली स्टॉप डायरियाबाबत जिल्हा सुकाणू समितीची बैठक घेण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी अंजली रमेश, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कैलास शेळके, शासकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. चक्रधर मुंगल, प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नामदेव पवार, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. देवेंद्र जायभाये, जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी डॉ. सतीश रुणवाल, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. दीपक मोरे, सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. पांडुरंग फोपसे, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ.शैलेजा स्वामी, वैद्यकीय अधीक्षक डॉ. सचिन राठोड, बाल विकास प्रकल्प अधिकारी व्ही. आर. वाकडे यांच्यासह वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते. स्टॉप डायरियाचे उद्दिष्ट राज्यातील अर्भक मृत्यूदर, बालमृत्यू दर कमी करणे हे राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानाचे प्रमुख उद्दिष्ट आहे. देशामध्ये 5 वर्षापर्यंतच्या बालकांच्या मृत्युमागे अतिसार हे प्रमुख कारण असून सुमारे 1 ते 7 टक्के बालके अतिसारामुळे दगावतात आणि त्या बालमृत्युचे प्रमाण उन्हाळा व पावसाळ्यात जास्त असते. ‘अतिसारावर करा मात, स्वच्छता व ओआरएसची घेऊनी साथ’ या घोषवाक्याचा अवलंब करुन 'स्टॉप डायरिया' अभियान यशस्वीपणे राबवावे. अतिसार झालेल्या सर्व मुलांकरिता ओआरएस आणि झिंकचे वाटप होईल व त्यांच्यामार्फत ते पोहचेल हे सुनिश्चित होईल. पाच वर्षाखालील मुलांच्या अतिसार प्रतिबंधक आणि व्यवस्थापनासाठी पालकांचे काळजी घेणाऱ्यांचे योग्य समुपदेश करावे. स्टॉप डायरियाचे ध्येय अतिसारामुळे होणारे बालमृत्यू शून्यावर पोहचविणे हे अंतिम ध्येय आहे. पावसाळ्यात दूषित पाण्यामुळे आजार होतात. सर्व ग्रामपंचायतीमध्ये जलजन्य आजार रोखण्याबाबत लोकांमध्ये जनजागृती निर्माण करण्यासाठी जिल्ह्यात 16 जून ते 31 जुलै दरम्यान अभियान राबविण्यात येत आहे. हे अभियान जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभाग, पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग, महिला व बालकल्याण विभाग, शिक्षण विभाग व ग्रामपंचायत विभाग आदीच्या संयुक्त विद्यामाने राबविण्यात येत आहे. या अभियानामध्ये गावातील अंगणवाड्या प्राथमिक आरोग्य केंद्र, सरकारी कार्यालय व प्राथमिक शाळा या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची गुणवत्ता असणे आवश्यक आहे. पावसाळ्यामध्ये दूषित पाणी पिऊन डायरिया, गॅस्ट्रो व कावीळ यासारखे अनेक आजार होत असतात. त्यामुळे पिण्याचे पाणी निर्जंतुक करुन पिण्यासाठी वापरल्यास या आजारांना दूर ठेवता येते. यासाठी गावस्तरावर विविध उपक्रम घेऊन लोकांमध्ये जनजागृती करण्यात येत आहे. अभियान यशस्वी करण्यासाठी जिल्हा व तालुका पातळीवर सर्व अधिकारी व कर्मचारी यांचा सहभाग राहणार आहे. या बैठकीला तालुका आरोग्य अधिकारी डॉ. गणेश जोगदंड, डॉ. संदीप काळे, डॉ. गजानन चव्हाण, डॉ. डी. व्ही सावंत, बालरोग तज्ञ डॉ. गोपाल कदम, डॉ. स्नेहल नगरे, जिल्हा साथरोग वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रकाश जाधव, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक शंकर तावडे, जिल्हा लेखापाल व्यवस्थापक श्रीपाद गारुडी, सांख्यिकी अधिकारी अजय कदम, डॉ निशांत थोरात, डॉ. प्रशांत पुठावार, डीपीएचएन मनीषा वडकुते, अमोल कुलकर्णी, अझर अली, लक्ष्मण गाभने, सुरभी शाहू आदी सर्व विभाग प्रमुख, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. ******

11 June, 2025

जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी घेतला आरोग्य विभागाचा आढावा

हिंगोली दि.11: जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी नुकताच जिल्हाधिकारी कार्यालयात नियामक मंडळाच्या बैठकीत जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेचा सविस्तर आढावा घेतला. प्रामुख्याने एनकॉसचा आढावा घेण्यात आला 11 प्राथमिक आरोग्य केंद्र एनकॉस करण्याच्या सक्त सूचना देण्यात आल्या. तसेच संजीवनी अभियानाचा आढावा घेण्यात आला. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी अंजली रमेश, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कैलास शेळके, शासकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. चक्रधर मुंगल, प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नामदेव पवार, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. देवेंद्र जायभाये, जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी डॉ. सतिश रुणवाल, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. दीपक मोरे, सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. पांडुरंग फोपसे, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ शैलेजा कुप्पास्वामी, वैद्यकीय अधीक्षक डॉ. सचिन राठोड, डॉ. नरवाडे, डॉ. काळे, डॉ अनुराधा दहिफळे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. गणेश जोगदंड, डॉ. गजानन चव्हाण, डॉ. काळे, डॉ. सावंत, जिल्हा साथरोग वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रकाश जाधव, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक शंकर तावडे, जिल्हा लेखा व्यवस्थापक श्रीपाद गारुडी, डॉ. प्रशांत पुठावार, डॉ. निशांत थोरात यांची उपस्थिती होती. या बैठकीत राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत राबविल्या जाणाऱ्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी, प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या सुविधा आणि आरोग्य सेवा यांचा आढावा घेण्यात आला. जिल्हाधिकारी राहुल गुप्ता म्हणाले, “ग्रामीण भागातील नागरिकांना दर्जेदार आरोग्य सेवा देण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये मूलभूत सेवा देण्यात याव्यात, प्राथमिक आरोग्य केंद्राच्या ठिकाणी शक्यतो जास्तीत जास्त प्रसूती झाल्या पाहिजेत. संस्थात्मक प्रसुतीचे प्रमाण वाढविण्यात यावे, अशा सूचना श्री. गुप्ता यांनी दिल्या. बैठकीत क्षयरोग, निश्चय मित्र, कुष्ठरोग, एनसीडी, माता बाल संगोपन कार्यक्रम, जननी शिशु सुरक्षा योजना, ओरल हेल्थ, मेंटल हेल्थ, राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम, जलजन्य व कीटकजन्य आजार, फ्लोरोसिसचे रुग्ण आढळून आलेल्या गावाचा आढावा घेण्यात आला. यावेळी 11 प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी, सर्व कार्यक्रम अधिकारी व राष्ट्रीय आरोग्य अभियानातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. ******

मागासवर्गीय मुलींनी वसतीगृह प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज करावेत

हिंगोली (जिमाका),दि.11 : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने हिंगोली शहरातील नवीन मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतीगृह तसेच मागासवर्गीय व आर्थिकदृष्ट्या मागास मुलींचे शासकीय वसतीगृह ही दोन्ही वसतिगृहे सहायक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय, हिंगोली यांच्या नियंत्रणाखाली सुरु आहेत. सन 2025-26 या शैक्षणिक वर्षात वसतिगृहात प्रवेश करण्यासाठी फक्त ऑनलाईन पध्दतीनेच अर्ज स्वीकारणे सुरु झालेले आहे. हिंगोली जिल्ह्यातील मागासवर्गीय मुलींसाठी नवीन मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह, हिंगोली येथे 100 विद्यार्थी क्षमतेचे तर मागासवर्गीय व आर्थिकदृष्ट्या मागास मुलींचे शासकीय वसतिगृह, हिंगोली येथे 75 क्षमतेचे वसतिगृह सुरु आहेत. नवीन मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतीगृह, हिंगोली येथे जुने प्रवेशित विद्यार्थी 83 असून सन 2025-26 या वर्षासाठी 17 रिक्त असलेल्या जागा भरावयाच्या आहेत. तर मागासवर्गीय व आर्थिकदृष्ट्या मागास मुलींचे शासकीय वसतीगृह, हिंगोली येथे जुने प्रवेशित विद्यार्थी 35 असून सन 2025-26 या वर्षासाठी 40 रिक्त असलेल्या जागा भरावयाच्या आहेत. वरील रिक्त जागेसाठी https://hmas.mahait.org या संकेतस्थळावर वसतिगृहाचे नाव नमूद करुन मागासवर्गीय पात्र मुलींनी ऑनलाईन अर्ज करावेत. तसेच ऑनलाईन भरण्यात आलेल्या अर्जाची प्रिंट काढून त्यासोबत आवश्यक कागदपत्रासह आपला अर्ज वसतिगृहात डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन परिसर, दर्गा रोड, जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या पूर्व बाजूस, हिंगोली या पत्त्यावर जमा करावेत, असे आवाहन गृहपाल, मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतीगृह, हिंगोली यांनी केले आहे. **

09 June, 2025

आषाढी वारी पालखी सोहळ्यामधील भक्तांना आवश्यक सोयीसुविधा उपलब्ध करुन द्याव्यात - जिल्हाधिकारी राहुल गुप्ता

हिंगोली (जिमाका),दि.09 : दरवर्षीप्रमाणे यावर्षीही हिगोली जिल्ह्यातून श्री क्षेत्र शेगाव येथून श्रीक्षेत्र पंढरपूर येथे प्रस्थान होणारी गजानन महाराज दिंडी आषाढी वारी पदयात्रा, संत नामदेव महाराज संस्थान नर्सी नामदेव तसेच हिंगोली जिल्ह्यातून जाणाऱ्या इतर पायी दिंड्या व पदयात्रेमधील आषाढी वारी पालखी सोहळ्यामधील भक्तांना आवश्यक सोयीसुविधा उपलब्ध करुन द्याव्यात, असे निर्देश जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी सर्व संबंधित विभागाला दिले. हिंगोली जिल्ह्यातून जाणाऱ्या आषाढी वारी पालखी सोहळा व दिंडी पदयात्रेतील भाविकांना मूलभूत आवश्यक सोयीसुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी यांच्या दालनात आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी अभिमन्यू बोधवड, उपविभागीय अधिकारी समाधान घुटुकडे, प्रतीक्षा भूते, नगर पालिका प्रशासनचे सहायक आयुक्त जगताप, तहसीलदार श्रीकांत भुजबळ, जीवककुमार कांबळे, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी राहुल गावडे, नगर परिषदेचे मुख्याधिकारी अरविंद मुंढे, पोलीस अधीक्षक कार्यालय, जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालय, जिल्हा आरोग्य अधिकारी यांचे प्रतिनिधी, सार्वजनिक बांधकाम विभाग, महावितरण तसेच विविध विभागाचे प्रतिनिधी, पालखी सोहळा आयोजक आदी उपस्थित होते. दिंडीतील वारकऱ्यांना हिंगोली जिल्ह्यात प्रवेश केल्यापासून दिंडी व दिंडी रथासमवेत तसेच मुक्कामाच्या ठिकाणी पुरेसा पोलीस बंदोबस्त, वाहतुकीचे व्यवस्थापन, वाहतूक मार्गात बदल, फिरते शौचालय, सार्वजनिक शौचालय, मुक्कामाच्या ठिकाणी डास प्रतिबंधक धूर फवारणी, स्वच्छता, पाण्याची सोय, दिंडी मार्गावरील दवाखाने, डॉक्टर, आरोग्य पथक, पुरेशा प्रमाणात औषधाची उपलब्धता, वैद्यकीय पथकासह रुग्णवाहिका, पालखी मार्गावर फिरते रुग्णवाहिका, दिंडी मार्गाचे रस्ता दुरुस्ती, मुक्कामाच्या ठिकाणी विद्युत पुरवठा, दिंडी मार्गावरील धाबे, हॉटेल्सची अन्न सुरक्षा तपासणी आदी सुविधा उपलब्ध करुन द्याव्यात. सर्व संबंधित विभागप्रमुखांनी नेमून दिलेली जबाबदारी चोखपणे पार पाडावी आणि भाविकांची गैरसोय होणार नाही याची दक्षता घ्यावी, अशा सूचना जिल्हाधिकारी श्री. गुप्ता यांनी बैठकीत दिल्या. ******

08 June, 2025

सोयाबीनच्या प्रमाणित बियाणे वाटपामध्ये महाबीज यंत्रणा आणि कृषी विभागाकडून कोणताही घोटाळा नसल्याचा खुलासा

हिंगोली (जिमाका),दि.०८ : राष्ट्रीय खाद्यतेल अभियान गळीतधान्य अंतर्गत हिंगोली जिल्ह्यात खरीप हंगाम 2025 मध्ये सोयाबीन पिकाचे समुह निवडण्यात आलेले आहेत. त्यासाठी सोयाबीन पिकाचे पाच वर्षाच्या आतील बियाण्याचे १०० टक्के अनुदानावर कमीत-कमी ०.२० हेक्टर ते १ हेक्टर क्षेत्रासाठी लागणारे बियाणे वाटपाचा कार्यक्रम चालू असून त्यासाठी नोंदणी केलेल्या पात्र लाभार्थ्यांना जास्तीत जास्त ७५ किलो बियाणे मंजूर असल्याचे कृषि आयुक्तालय, पुणे यांच्या नोंदणीकृत प्राप्त लाभार्थ्यांना सूचना प्राप्त आहेत, त्यासाठी महाबीज यंत्रणेकडून २२ किलो प्रती बॅग पॅकींग असलेले बियाणे देण्यात येत आहे. सोयाबीनची पेरणी बीबीएफ टोकन तंत्रज्ञानाव्दारे केल्यास उत्पादनामध्ये वाढ झाल्याचे दिसून आले आहे. त्यासाठी प्रती एकरी २२ किलो बियाणे पुरेसे असते या उद्देशाने महाबीज यंत्रणेकडून २२ किलो प्रती बॅग बियाणे पॅकींग करण्यात आली आहे. तथापि, लाभार्थ्यांना ७५ किलो बियाणे मंजूर झाले असल्यास २२ किलो पॅकींगमध्ये ७५ किलो बियाणे देणे शक्य होत नाही आणि प्रमाणित बियाणे असल्याने ते बॅग फोडून देता येत नाही. म्हणून २२ किलोच्या तीन बॅगा म्हणजे ६६ किलो बियाणे देण्याचे निश्चित करण्यात आले होते, जर शेतकऱ्यांना ७५ किलो बियाणे पाहिजे असल्यास त्यांनी ८८ किलो बियाणे घेऊन ७५ किलो बियाणे अनुदानित व उर्वरीत १३ किलो बियाणे विना अनुदानित स्वखर्चाने घ्यावे लागेल. संबंधित प्रमाणित बियाणे वाटपामध्ये महाबीज यंत्रणेकडून आणि कृषी विभागाकडून कोणताही घोटाळा नसून सर्व शेतकऱ्यांनी याची नोंद घ्यावी आणि वरीलप्रमाणे बियाणे खरेदी करावे. शासकीय अनुदानित बियाण्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन राजेंद्र कदम, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, हिंगोली यांनी केले आहे. ***

06 June, 2025

हिंगोली जिल्हा परिषदेत शिवस्वराज्य दिन उत्साहात साजरा

हिंगोली, (जिमाका) दि. 06: हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या लोककल्याणकारी स्वराज्याच्या प्रेरणेचा स्मृतीदिन म्हणजे शिवस्वराज्य दिन, आज हिंगोली जिल्हा परिषदेच्या प्रांगणात उत्साहात साजरा करण्यात आला. शिवस्वराज्य दिन हे नव्या पिढीला प्रेरणा व नवचैतन्य देणारे स्मरण आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी 6 जून 1674 रोजी रायगडावर राज्याभिषेक करून स्वराज्याची स्थापना केली. महाराष्ट्र शासनाने 2021 पासून हा दिवस शिवस्वराज्य दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. आज येथील जिल्हा परिषदेच्या प्रांगणात शिवस्वराज्य दिनानिमित्त जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी अंजली रमेश यांच्या हस्ते भगवा स्वराज्यध्वज शिवशक राजदंडासह गुढीची पूजा करुन व गुढी उभारुन अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा गांधी, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. त्यानंतर राष्ट्रगीत व महाराष्ट्र गीताचे सादरीकरण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अनुप शेंगुलवार, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक नामदेव केंद्रे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी (सा.प्र.) अनंत कुंभार, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (स्वच्छता व पाणी पुरवठा) संजय कुलकर्णी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कैलाश शेळके, जिल्हा समाज कल्याण अधिकारी राजू एडके, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. सखाराम खुणे, ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता अतुल साळुंके, बाधंकाम विभागाचे कार्यकारी अभियंता शिवाजी पद्यमणे, लघु पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता प्रियंका राजपूत, शिक्षणाधिकारी (योजना) संदीपकुमार सोनटक्के, शिक्षणाधिकारी (प्राथमिक व माध्यमिक) प्रशांत दिग्रसकर, उप अभियंता एस. बी. गिते तसेच जिल्हा परिषदेतील सर्व विभाग प्रमुख, अधिकारी व कर्मचारी यांची उपस्थिती होती. *****

स्वाधार योजनेच्या अर्जातील त्रुटीची पूर्तता करण्यासाठी 10 जून अंतिम मुदत

हिंगोली (जिमाका), दि. 06 : भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचे अर्ज शैक्षणिक वर्ष 2024-25 पासून ऑनलाईन पध्दतीने विभागाच्या संकेतस्थळावर दि. 15 मार्च, 2025 पर्यंत स्वीकारण्यात आले होते. विहित मुदतीत ऑनलाईन अर्ज भरलेल्या सर्व विद्यार्थ्यांच्या अर्जाची तपासणी कार्यालयाकडून करण्यात आली आहे. यामध्ये ज्या विद्यार्थ्यांच्या अर्जात त्रुटी आहेत. त्यांनी ऑनलाईन पध्दतीने त्रुटीची पूर्तता करुन अर्ज फेरसादर करण्यासाठी 10 जून, 2025 पर्यंत अंतिम मुदत दिली आहे. विहित मुदतीत त्रुटीची पूर्तता करुन अर्ज ऑनलाईन फेर सादर न केल्यास अर्ज अपात्र, बाद ठरतील. तसेच विद्यार्थ्यांसाठी बँक खाते भरण्याबाबतचा टॅब उपलब्ध करुन देण्यात आला आहे. त्याअनुषंगाने सर्व विद्यार्थ्यांचे बँक खाते तपशील भरुन घेण्याच्या अनुषंगाने कार्यवाही करावी. विद्यार्थ्यांना ऑनलाईन अर्जातील त्रुटी पूर्ण करण्यात तसेच बँक खाते भरण्यास अडचण येत असल्यास सहाय्यक आयुक्त , समाज कल्याण कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन सहायक आयुक्त यादव गायकवाड यांनी केले आहे. ******

विकसित कृषी संकल्प अभियान औंढा नागनाथ तालुक्यात उत्साहात संपन्न विकसित कृषी संकल्प अभियान औंढा नागनाथ तालुक्यात उत्साहात संपन्न

हिंगोली (जिमाका), दि. 06 : भारतीय कृषि अनुसंधान परिषद, नवी दिल्ली व कृषी विज्ञान केंद्र तोंडापुर, जि. हिंगोली अंतर्गत विकसित कृषी संकल्प अभियान कार्यक्रम औंढा नागनाथ तालुक्यातील असोला, कोंडशी व वडद या गावांमध्ये उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमाचे सनियंत्रक कृषि विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ तथा प्रमुख डॉ. पी. पी. शेळके यांनी विकसित कृषि संकल्प अभियान भेटीचा मुख्य उद्देश खरीप हंगामाच्या पूर्व तयारीमध्ये मदत करणे, शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेणे आणि शासनाच्या योजनांची माहिती देत शेतकऱ्यांच्या शंकेचे निरासन केले. तसेच त्यांनी नैसर्गिक शेतीचे महत्व, हवामान आधारित पिक सल्ला घेउन शेतकऱ्यांनी शेती करावी, असे सांगितले. यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राजेंद्र कदम यांनी विविध योजनांची माहिती देताना नैसर्गिक शेतीचे महत्व सांगितले. तसेच त्यांनी वसंतराव नाईक कृषि विद्यापीठ परभणी व कृषि विज्ञान केंद्राच्या सल्ल्याने शेतकऱ्यांनी शेती करावी, असे आवाहन केले. या विकसित कृषि संकल्प अभियान कार्यक्रमामध्ये भारतीय कृषि अनुसंधान परिषद,नवी दिल्ली केंद्रीय लिंबूवर्गीय संशोधन संस्था, नागपूर येथील प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. ए. तिरुग्नानवेल यांनी प्रमुख मार्गदर्शन करतांना लिंबूवर्गीय पिकांचे लागवड तंत्रज्ञान, योग्य वेळेवर खत व्यवस्थापन, कीड व रोग व्यवस्थापन, फवारणी करतांना घ्यावयाची काळजी याची माहिती देऊन शेतकऱ्यांच्या शंकेचे निरसन केले. प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. सुरजित मंडल यांनी माती नमुना कसा घ्यावा, त्याचे महत्त्व, माती परीक्षण नुसार खत व्यवस्थापन या विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले. परभणी येथील पशुवैद्यक आणि पशु विज्ञान महाविद्यालयाचे सहयोगी प्राध्यापक डॉ. सईद अली यांनी पावसाळ्यात जनावराची घ्यावयाची काळजी, एकात्मिक पद्धतीने कीड व रोग व्यवस्थापन, गोठ्याची स्वच्छता व स्वच्छ दुध उत्पादन विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले. गोळेगाव कृषी महाविद्यालयाचे सहायक प्राध्यापक डॉ. एस.एच. सारंग यांनी विद्यापीठाचे नवीन विकसित केलेले सोयाबीन व तूर पिकाच्या वाणाची माहिती व या पिकाचे उत्पादन तंत्रज्ञान, बीज प्रक्रियाचे महत्व सर्वांना अवगत करून दिले. इफकोचे वरिष्ठ मार्केटींग व्यवस्थापक डॉ. शिवाजी पोवार यांनी इफकोचे उद्देश, शेती मध्ये नॅनो युरिया, डी.ए.पी. वापरण्याची पद्धत व प्रमाण या विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे सूत्र संचालन डॉ. अतुल मुराई यांनी तर आभार प्रदर्शन अनिल ओळंबे यांनी केले. या अभियानांतर्गत किसान रथाद्वारे अनेक गावामध्ये जाऊन विविध तंत्रज्ञान विषय माहिती देण्यात येत आहे. तसेच विविध विषयाच्या घडीपत्रिका सुद्धा शेतकऱ्यांना वितरीत करण्यात येत आहेत. या कार्यक्रमांमध्ये इफकोचे प्रतिनिधी आणि आय.पी.एल.चे प्रतिनिधी यांनी देखील कृषि फवारणीसाठी ड्रोन प्रात्यक्षिकासह सहभाग घेतला. या कार्यक्रमादरम्यान शेतकऱ्यांकडून अभिप्राय देखील नोंदवण्यात आला. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी असोला, कोंडसी व वडद गावचे सरपंच, बी. टी. राठोड, गुलाबराव सूर्यवंशी, संतोष हाणवते, बबनराव ढोबळे यांचे मोलाचे सहकार्य लाभले. *******

05 June, 2025

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या हस्ते वृक्षारोपण

हिंगोली (जिमाका), दि. 05 : जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून आज जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. या वृक्षारोपणामुळे परिसरातील नागरिकांना ऑक्सिजन उपलब्ध व्हावा, जिल्हाधिकारी कार्यालय परिसराचे सुशोभिकरण व्हावे. यासाठी जिल्हा प्रशासन 5 स्टार हिंगोलीकर हा उपक्रम हिंगोली जिल्ह्यातील सर्व नगर परिषद व नगर पंचायत कार्यक्षेत्रामध्ये हाती घेण्यात आला आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी यावेळी केले. आज येथील जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात हिंगोली नगर परिषदेच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या हस्ते वृक्ष लागवड करुन कार्यक्रमास प्रारंभ करण्यात आला. याप्रसंगी नगर पालिका प्रशासनचे सहायक आयुक्त प्रदीप जगताप, नगर परिषदेचे उप मुख्याधिकारी प्रकाश साबळे, शाम माळवटकर, स्वच्छता निरीक्षक बाळू बांगर यांची प्रमुख उपस्थिती होती. जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली वृक्ष लागवडीची चळवळ ही संपूर्ण जिल्ह्यात व्यापक प्रमाणात राबविण्यात येत आहे. या वृक्ष लागवड कार्यक्रमास प्रशासकीय इमारतीतील विविध विभागाचे अधिकारी-कर्मचारी तसेच येथील नगर परिषदेचे अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते. *****

आपत्ती काळात जनसंपर्क अधिकाऱ्यांनी माध्यमांना वस्तुनिष्ठ माहिती द्यावी - अपर जिल्हाधिकारी अमृत नाटेकर

पावसाळ्यातील आपत्ती व्यवस्थापन अनुषंगाने जनसंपर्क अधिकारी यांची बैठक मुंबई, दि. ५ : आपत्तीच्या काळात जनतेपर्यंत वस्तुनिष्ठ व खरी माहिती पोहचणे अधिक गरजेचे असते. यासाठी आपत्ती काळात घडणाऱ्या सर्व घटना, आपत्ती व्यवस्थापन व मदत कार्याची वस्तुनिष्ठ माहिती संबंधित यंत्रणांकडून घेऊन प्रसारमाध्यमांद्वारे माध्यमातून नागरिकांपर्यंत पोहचविण्याची जनसंपर्क अधिकाऱ्यांवर मोठी जबाबदारी असते. आपत्तीच्या काळात जनसंपर्क अधिकाऱ्यांनी अधिक सतर्क राहून प्रसार माध्यमांना वस्तुनिष्ठ माहिती द्यावी, असे आवाहन मुंबई महानगर प्रदेश प्राधिकरणाचे (एमएमआरडीए) अपर जिल्हाधिकारी अमृत नाटेकर यांनी केले. यंदाच्या पावसाळ्यातील आपत्ती व्यवस्थापनाच्या अनुषंगाने माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्यावतीने मुंबईतील सर्व यंत्रणा व विभागांच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांची बैठक मंत्रालयात झाली. यावेळी माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे संचालक (प्रशासन) हेमराज बागुल, संचालक (वृत्त व जनसंपर्क) डॉ. गणेश मुळे यांच्यासह विविध विभागाचे जनसंपर्क अधिकारी उपस्थित होते. अपर जिल्हाधिकारी अमृत नाटेकर म्हणाले, नैसर्गिक आपत्ती संदर्भात कोणतीही अचूक पूर्वसूचना मिळत नसते. अशा वेळी यंत्रणांमध्ये, विभागांमध्ये समन्वय असणे आवश्यक आहे. आपत्तीपूर्व तयारी, तातडीचा प्रतिसाद आणि समन्वय महत्त्वाच्या असून या काळात माहितीचा अचूक प्रसार आणि जनतेपर्यंत सकारात्मक संदेश पोहोचविणे गरजेचे असते. जनसंपर्क अधिकाऱ्यांनी आपत्ती संदर्भातील माहिती प्रसारित करण्यापूर्वी तिची खातरजमा करूनच प्रसारित केली पाहिजे, असेही त्यांनी सांगितले. आपत्ती काळात जनसंपर्क अधिकाऱ्यांनी समन्वय, संवाद आणि संवेदनशीलतेवर भर द्यावा - हेमराज बागुल आपत्कालीन परिस्थितीत समन्वय, संवाद आणि संवेदनशीलता यावर भर द्यावा असे सांगून संचालक (प्रशासन) हेमराज बागुल म्हणाले, आपत्ती काळात जनसंपर्क अधिकाऱ्यांनी वस्तुनिष्ठ माहिती देण्याबरोबरच जनतेच्या मनात विश्वास निर्माण करावा. चुकीची माहिती आणि विसंवाद शासनाची प्रतिमा मलीन करू शकते. त्यामुळे संस्थांची प्रतिमा जपण्यास प्राधान्य द्यावे, असेही श्री. बागुल म्हणाले. अफवांचे खंडन करण्यास प्राधान्य द्यावे – डॉ. गणेश मुळे आपत्तीच्या वेळी प्रशासनाच्या प्रत्यक्ष कृती आणि मदतकार्याची वस्तुनिष्ठ माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्याच्या कामाबरोबरच आपत्ती काळात पसरवल्या जाणाऱ्या अफवांचे खंडन करण्यास जनसंपर्क अधिकाऱ्यांनी प्राधान्य द्यावे, असे संचालक ( वृत्त व जनसंपर्क) डॉ. गणेश मुळे यांनी सांगितले. श्री.मुळे म्हणाले, आपत्ती परिस्थितीत स्थानिक, राज्य व केंद्रीय यंत्रणा तत्काळ मदत कार्यात सहभागी होतात. या यंत्रणांकडून वस्तुनिष्ठ माहिती घेवून ती समाजमाध्यमे, वृत्तपत्रे, दूरचित्रवाणी व रेडिओ यांसारख्या माध्यमांच्या सहाय्याने जनतेपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी जनसंपर्क अधिकाऱ्यांनी पार पाडावी. जनतेच्या मनात विश्वास निर्माण करून त्यांना मदतीच्या उपाययोजनांची माहिती देणे, आणि आवश्यक सूचना पोहचवणे हे जनसंपर्क अधिकाऱ्यांचे महत्वाचे काम असल्याचे सांगून डॉ. मुळे म्हणाले जनसंपर्क अधिकाऱ्यांमध्ये समन्वय राहण्यासाठी आणि माहितीच्या आदान- प्रदानासाठी प्रत्येक विभागाने स्वतःचा व्हॉटसॲप ग्रुप तयार करावा, ज्यामध्ये समन्वय करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा समावेश असावा. मुद्रित, इलेक्ट्रॉनिक व समाज माध्यमांना तत्काळ माहिती देण्यात यावी. आपल्या कार्यक्षेत्रात अचानक धोकादायक परिस्थिती उद्भवल्यास त्याची माहिती तत्काळ समाजमाध्यमांद्वारे नागरिकांपर्यंत पोहोचवावी, आपत्ती व्यवस्थापन पुस्तिका दरवर्षी अद्ययावत माहितीसह असावी, विशेषतः महत्त्वाचे हेल्पलाइन नंबर आणि यंत्रणांचे संपर्क तपशील याचा त्यामध्ये समावेश असावा असेही श्री.मुळे म्हणाले. यावेळी उल्हासनगर महापालिकेचे उपायुक्त अजय साबळे, मुंबई दूरदर्शनच्या उपसंचालक संगीता गोडबोले, ठाण्याचे जिल्हा माहिती अधिकारी मनोज सानप, आकाशवाणीचे सहायक संचालक डॉ.संतोष जाधव, सहायक संचालक (माहिती) इर्शाद बागवान यांनीही विविध सूचना मांडल्या. ००००

सामाजिक वनीकरण विभागामार्फत जागतिक पर्यावरण दिन उत्साहात साजरा

हिंगोली, दि.05 (जिमाका): जिल्ह्यातील सामाजिक वनीकरण विभाग हिंगोलीच्या वतीने हिंगोली, कळमनुरी, वसमत या तीनही सामाजिक वन परिक्षेत्रामध्ये जागतिक पर्यावरण दिन उत्साहात साजरा करण्यात आला. जागतिक पर्यावरण निमित्त बळसोंड ग्रामपंचायत परिसरात आयोजित कार्यक्रमात आमदार तानाजी मुटकुळे, जिल्हाधिकारी राहुल गुप्ता, छत्रपती संभाजीनगरचे वनसंरक्षक प्रमोदचंद लाकरा तसेच सामाजिक वनीकरण विभागीय वनाधिकारी पुष्पा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली कळमनुरी, हिंगोली, वसमत या सामाजिक वनीकरण परिक्षेत्रात हिंगोली, सेनगाव, औंढा, वसमत, कळमनुरी या सर्व तालुक्यात विविध ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी अनेक सामाजिक कार्यकर्ते, वृक्ष प्रेमी संघटना, जवळपास 15 शाळेतील विद्यार्थी मोठ्या संख्येने उत्साहात सहभागी झाले होते. 'चला जाऊया वनाला' या उपक्रमाची माहिती विद्यार्थ्यांना देऊन त्यांना वनांचे, पर्यावरणाचे महत्त्व पटवून देण्यात आले. जंगलांचे महत्त्व, वन्य प्राणी, तापमानात होणारी वाढ, वृक्ष लागवडीचे महत्त्व इत्यादी बाबत जनजागृती करून त्याचे महत्त्व पटवून देण्यात आले. प्रभात फेरी, वन्यप्राण्यांसाठीचे पानवठे, अटल आनंदवन वृक्ष लागवड, झाडांची ओळख, वनांचे आगीपासून संरक्षणाबाबत माहिती देण्यात आली. तसेच विविध परिक्षेत्रात मानवी जीवनातील वनांचे महत्त्व या विषयावर इको क्लब शाळेत वृक्षारोपण, वृक्षदिंडी, वकृत्व स्पर्धा, वृक्षांची ओळख स्पर्धा घेऊन विद्यार्थ्यांमध्ये वने व वन्य जीवाबद्दल आपुलकी निर्माण करून जनजागृती करण्यात आली. पर्यावरणविषयक जनजागृती कार्यशाळा, पर्यावरण संवर्धन व जतन करण्यासाठीचे लोगो स्पर्धा, वृक्षदिंडी, प्रभातफेरीसारख्या कार्यक्रमाचे आयोजन ‘रोपे आपल्या दारी’अंतर्गत निसर्गप्रेमी यांना आनंदवृक्ष भेट देण्यात आली. सामाजिक वनीकरण विभागाचे पुष्पा पवार व अंगद खटाणे, जयश्री बर्गे, वनपाल कीर्तनकार, मठवाले, बिरसोने, गायकवाड, खंदारे, पारस्कर, डोईफोडे व वनरक्षक घुगे, कोटकर, यादव रसाळ, पंडित व इतर सर्व वनरक्षक यांनी उपक्रमासाठी परिश्रम घेतले. तसेच जागतिक पर्यावरण दिन कार्यक्रमासाठी जिल्ह्यातील सर्व शाळेतील मुख्याध्यापक, शिक्षक वृंद प्रतिष्ठित नागरिक व विद्यार्थी यांनी उपक्रमासाठी आमदार तानाजी मुटकुळे यांच्या समवेत हिरीरीने सहभाग घेतला. ******

समृद्धी महामार्ग वाढवण बंदराशी जोडणार;हा महामार्ग राज्याच्या समृद्धीचा कॉरिडॉर ठरेल-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

इगतपुरी येथे हिंदु हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाच्या अंतिम टप्प्याचे लोकार्पण संपन्न नाशिक, दि. ५ : हिंदु हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग राज्याच्या विकासात महत्वाची भूमिका बजावणार आहे. हा महामार्ग राज्याच्या समृद्धीचा कॉरिडॉर ठरणार आहे. येत्या काळात या महामार्गाला वाढवण बंदराशी जोडण्यात येईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. हिंदु हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाच्या अंतिम टप्प्याचे लोकार्पण व सायन पनवेल महामार्गावरील ठाणे खाडी पूल क्रमांक तीन दक्षिण वाहिनीचा लोकार्पण सोहळा दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या हस्ते झाला. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, अन्न व औषध प्रशासन, विशेष साहाय मंत्री नरहरी झिरवाळ, सार्वजनिक बांधकाम (सा. उ.) राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर, आमदार निरंजन डावखरे, आमदार नितीन पवार, आमदार हिरामण खोसकर, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अपर मुख्य सचिव मनीषा म्हैसकर, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक आणि उपाध्यक्ष अनिल गायकवाड आदी उपस्थित होते. मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, समृद्धी महामार्गासाठी विक्रमी वेळेत भूसंपादन करण्यात आले आहे. या मार्गामुळे विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रासह राज्यातील २४ जिल्हे जेएनपीटी बंदराशी जोडले गेले आहेत, आता हा महामार्ग वाढवण बंदराशी जोडला जाईल. ७०१ किलोमीटर लांबीच्या या महामार्गासाठी ५५ हजार ३३५ कोटी रुपयांचा खर्च झाला आहे. समृद्धी महामार्गाचा ७६ किलोमीटर मार्ग नाशिक आणि ठाणे जिल्ह्यातून जातो. या भागात सह्याद्रीच्या डोंगर रांगा असून अतिशय खडतर मार्ग काढत महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने हे अभियांत्रिकी आव्हान पेलले. यातील इगतपुरी जवळील बोगदा हा ८ किलोमीटर लांबीचा असून तो राज्यातील सर्वाधिक लांबीचा आणि देशातील सर्वाधिक रुंदीचा बोगदा आहे. समृद्धी महामार्गासह पालखी मार्गावर वन विभागाच्या माध्यमातून वृक्षारोपण करण्याचा निर्णय घेतला आहे. या महामार्गामुळे एक हजार शेततळी तयार झाली आहेत. याबरोबरच दर ५०० मीटर अंतरावर जलपुनर्भरण व्यवस्था करण्यात आली आहे. या महामार्गालगत सौर ऊर्जा निर्मिती करण्यात येणार आहे. त्यापैकी ३५ मेगावॉट प्रकल्पाचे काम सुरू आहे. महामार्गालगत गेल कंपनीतर्फे गॅस वाहिनी टाकण्यात आली आहे. या माध्यमातून नव्याने विकसित होणाऱ्या स्टीलसिटी गडचिरोली पर्यंत गॅस पोहोचविता येईल. तसेच धार्मिक आणि पर्यटन स्थळे या मार्गामुळे जोडली आहेत. वाशी खाडीवरील तिसऱ्या पुलामुळे वाहतूक सुलभ होण्यास मदत होईल, असेही मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सांगितले. महामार्ग अपघात मुक्त करण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. या महामार्गामुळे वन्यजीवांच्या संचारत अडथळे येऊ नयेत म्हणून १०० प्रकारच्या संरचना तयार करण्यात आल्या आहेत. देशात अशा प्रकारची रचना प्रथमच साकारण्यात आली आहे. त्यामुळे वन्य प्राण्यांचा संचार विना व्यत्यय सुरू आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले. आगामी काळात शक्तिपीठ महामार्ग साकारण्यात येणार आहे. या महामार्गामुळे मराठवाड्यातील आर्थिक चित्र बदलण्यास मदत होईल, असेही श्री. फडणवीस यांनी सांगितले. उपमुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले, समृद्धी महामार्गामुळे वेळ, प्रदूषण आणि इंधनाची बचत होणार आहे. या महामार्गामुळे कृषी, पर्यटन विकास, औद्योगिकीकरणाला चालना मिळणार आहे. पर्यावरण पूरक असा महामार्ग राज्याच्या विकासात गेम चेंजर ठरेल. तसेच नाशिक जिल्ह्याच्या विकासाला चालना मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. समृद्धी महामार्ग मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, कोकण भागासाठी लाभदायक ठरेल, त्याचप्रमाणे शक्तिपीठ महामार्ग उपयुक्त ठरेल. या महामार्गावर प्रवाशांना आवश्यक मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील. वाहन चालवतांना चालकांनी वेग मर्यादेचे पालन करावे, असेही आवाहन उपमुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी केले. जागतिक पर्यावरण दिनाच्या शुभेच्छा देत उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले, पर्यावरण संवर्धनासाठी यंदा १० कोटी रोपांच्या लागवडीचे उद्दिष्ट निश्चित केले आहे. या महामार्गानंतर आता राज्यातील अन्य प्रकल्पांनाही गती देण्यात येईल, असे सांगत त्यांनी या प्रकल्पासाठी परिश्रम घेणारे अधिकारी, कर्मचारी आणि कामगारांचे उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी कौतुक केले. यावेळी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे अधिकारी व कर्मचारी, नागरिक उपस्थित होते. तत्पूर्वी. मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी समृद्धी महामार्गाचे लोकार्पण केले. त्यानंतर मुख्यमंत्री श्री. फडणवीस, उपमुख्यमंत्री श्री. शिंदे, उपमुख्यमंत्री श्री. पवार यांच्यासह मान्यवरांनी महामार्गाची पाहणी केली. यावेळी मुख्यमंत्री श्री. फडणवीस आणि उपमुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी वाहनाचे सारथ्य केले. 00000

शेतकऱ्यांनी सोयाबीनसाठी डीएपीचा आग्रह धरु नये

हिंगोली (जिमाका), दि. 05 : जिल्ह्यातील एकूण खरीप पिकाच्या जवळपास 72 टक्के क्षेत्र सोयाबीन पिकाखाली येत असून त्या खालोखाल तूर, हळद व कापूस इत्यादी पिकांची लागवड केली जाते. जिल्ह्यामध्ये मे 2025 अखेर 16 हजार 900 मेट्रिक टन खतांचे आवंटन शासनाकडून मंजूर असून आतापर्यंत 16 हजार 27 मेट्रिक टन खत जिल्ह्यासाठी उपलब्ध झाले आहे. म्हणजे जवळपास 95 टक्के खत पुरवठा झालेला असून आगामी आठ दिवसात आणखी खत उपलब्ध होणार आहे. जिल्ह्यात एकूण खताचा विचार केल्यास खताचा तुटवडा नाही. तथापि, सोयाबीन पिकवणारे शेतकरी डीएपी खताचा आग्रह धरत आहेत. सोयाबीन पिकासाठी प्रती हेक्टरी 30 किलो नत्र, 60 किलो स्फुरद व 30 किलो पालाश या व्यतिरिक्त 20 किलो गंधकाची आवश्यकता असते. परंतु डीएपी खतामधून 18 टक्के नत्र व 46 टक्के स्फुरद हे दोनच मूलद्रव्य उपलब्ध होतात. त्यामधून सोयाबीन या पिकाला लागणारी सर्व मूलद्रव्ये उपलब्ध होत नाहीत म्हणून त्याकरिता पर्यायी खताचा वापर करावा. त्यामध्ये विशेषत: 20:20:0:13 अधिक एमओपी 12 : 32 : 16, 14 : 35 : 14 इत्यादी खताचा उपयोग केल्यास सोयाबीन पिकाची मूलद्रव्याची गरज भागते. तूर, मूग, उडीद या कडधान्य पिकासाठी डीएपी खत उपयुक्त आहे. जिल्ह्यातील सर्व शेतकरी बांधवांनी आपल्या जमिनीतील माती परीक्षण करुन खताचा वापर करावा. जेणेकरुन उत्पादन खर्च कमी होतो आणि उत्पादन वाढण्यास मदत होते. त्यामुळे सोयाबीन पिकासाठी डीएपी खताचा आग्रह धरु नये, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राजेंद्र कदम यांनी केले आहे. ******

शेतकऱ्यांनो, विना परवाना बियाणे खरेदी करु नका

हिंगोली (जिमाका), दि. 05 : कापूस बियाणे बाजूच्या राज्यामधून तसेच बाजूच्या जिल्ह्यामधून पक्की पावती नसलेले कोणतेही बियाणे खरेदी करु नये. विशेषत: त्यामध्ये एचटीबीटी कापूस असण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा प्रकारे अवैधरित्या बियाणे खरेदी झाल्यास बियाणे अधिनियम 1966 नुसार कारवाई होऊ शकते. तसेच अवैधरित्या बिना पावतीचे बियाणे खरेदी केल्यास उगवण शक्ती कमी निघाल्यास, बियाण्याची शुध्दता इत्यादी तक्रारीची दखल नियमानुसार घेता येत नाही आणि शेतकऱ्यांची फसवणूक होऊ शकते. कापूस व इतर पिकांचे बियाणे जिल्ह्यामध्ये मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे. शेतकरी बांधवांनी परवानाधारक विक्रेत्याकडूनच रितसर पक्की पावती घेऊन बियाणे खरेदी करावे, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राजेंद्र कदम यांनी केले आहे. *****

अभ्यासाचे नियोजन आणि आत्मविश्वास हीच यशाची गुरुकिल्ली - जिल्हाधिकारी राहुल गुप्ता • महिन्याच्या पहिल्या बुधवारी कार्यशाळेचे आयोजन

हिंगोली, दि.05 (जिमाका): स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळवायचे असेल तर अभ्यासाच्या वेळापत्रकाचे नियोजन, सातत्य, सराव आणि आत्मविश्वास ठेवल्यास कुठलेही ध्येय सहज साध्य करता येते, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी शिवाजीराव देशमुख सभागृह येथे नुकत्याच आयोजित स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यशाळा प्रसंगी बोलताना केले. जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या वतीने जिल्ह्यातील स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांकरिता मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. आपल्या मार्गदर्शनामध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतःचे वैयक्तिक अनुभव सांगताना विद्यार्थ्यांना महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केले. परीक्षेकरिता उपलब्ध असणारा कालावधी आणि त्या अनुषंगाने अभ्यासाचे, वेळेचे नियोजन, केलेल्या अभ्यासाचा सारांश आणि त्याचा सराव, जास्तीत जास्त प्रश्नपत्रिकांचा सराव आणि त्यातून स्वतःची गुणवत्ता पारखणे आवश्यक आहे. याचबरोबर स्वतःवरील खंबीर आत्मविश्वास, इतरांशी तुलना न करता केवळ स्वतःवर लक्ष केंद्रित करून परीक्षांना सामोरे जा. एका प्रयत्नात यश मिळाले नाही तरी खचून न जाता अधिक उमेदीने पुन्हा तयारीला लागा. तुम्हाला यश नक्कीच मिळेल, असा विश्वास देखील जिल्हाधिकारी श्री. गुप्ता यांनी यावेळी व्यक्त केला. या चर्चासत्राला शहरातील स्पर्धा परीक्षा तयारी करणाऱ्या विद्यार्थी व विद्यार्थिनींनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती. जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनानंतर विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना उत्तरे देऊन त्यांचे समाधान केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माध्यमप्रतिनिधी प्रद्युम्न गिरीकर यांनी केले. दर महिन्याच्या पहिल्या बुधवारी मार्गदर्शन कार्यशाळा स्पर्धा परीक्षा मधून यश मिळवून शासकीय सेवेत कर्तव्य बजावणाऱ्या अधिकाऱ्यांमार्फत महिन्याच्या पहिल्या बुधवारी अशा प्रकारचे चर्चासत्र, कार्यशाळा आयोजित करण्याचा संकल्प यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी व्यक्त केला. अनुभवी व्यक्तींकडून विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन मिळाले तर त्यांना स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळविणे अधिक सोपे जाईल, असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला. त्यामुळे हिंगाली जिल्ह्यातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना याचा लाभ होईल. त्यांना शहरातच योग्य मार्गदर्शन मिळाल्यास शासकीय नोकरीमध्ये हिंगोलीकर विद्यार्थ्यांचा टक्का वाढेल, आणि इतरांनाही त्यांच्यापासून प्रेरणा मिळेल, असेही जिल्हाधिकारी श्री. गुप्ता यांनी सांगितले. *****

04 June, 2025

पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकरी ओळखपत्र क्रमांक आवश्यक

हिंगोली (जिमाका), दि. 04 : प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजना मृग व आंबिया बहारामध्ये अधिसूचित फळपिकांसाठी सन 2024-25 व 2025-26 या दोन वर्षाच्या कालावधीसाठी हिंगोली जिल्ह्यात राबविण्यास दि. 12 जून, 2024 च्या शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात आलेली आहे. तसेच दि. 11 एप्रिल, 2025 च्या शासन निर्णयानुसार दि. 15 एप्रिल, 2025 पासून कृषी विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांच्या लाभासाठी शेतकरी ओळखपत्र क्रमांक (फार्मर आयडी) अनिवार्य करण्यात आला आहे. त्यामुळे पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजना मृग व आंबिया बहार सन 2025-26 मध्ये योजनेत सहभागी होण्यासाठी ॲग्रीस्टॅक अंतर्गत शेतकरी ओळखपत्र क्रमांक (फार्मर आयडी) बंधनकारक राहील, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राजेंद्र कदम यांनी केले आहे. ***

जिल्ह्यात शस्त्र व जमावबंदी आदेश लागू

हिंगोली (जिमाका), दि. 04 : जून महिन्यात हिंगोली जिल्ह्यात होणाऱ्या विविध सण-उत्सव, स्पर्धा आणि सभा, बैठका, धरणे आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्याच्या दृष्टीने जिल्ह्यात शस्त्र व जमावबंदी आदेश लागू करण्याचे आदेश अतिरिक्त जिल्हादंडाधिकारी अभिमन्यू बोधवड यांनी दिले आहेत. दि. 7 जून, 2025 रोजी शिवराज्य अभिषेक दिन, दि. 10 जून रोजी वटपोर्णिमा, दि. 11 जून रोजी संत कबीर जयंती, दि. 12 जून रोजी श्री गजानन महाराज शेगाव पालखी आगमन दुपारी पानकन्हेरगाव व मुक्कामी सेनगाव व दि. 13 जून रोजी दुपारी नर्सी नामदेव तसेच मुक्कामी डिग्रस कऱ्हाळे येथे आहे. तसेच मराठा आरक्षण व इतर आरक्षण संबंधाने घडणाऱ्या राजकीय घडामोडी, नागरिक, विविध संघटना, पक्ष यांच्या मागण्यासंदर्भात मोर्चे, धरणे, आंदोलने, रास्ता रोको, उपोषणे करीत असतात. अशा विविध घटनांमुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. असे विविध प्रश्न हाताळण्यासाठी तसेच कायदा व सुव्यवस्था आबाधित राखण्यासाठी संपूर्ण हिंगोली जिल्ह्यात दि. 29 मे, 2025 रोजी मध्यरात्रीपासून ते दि. 13 जून, 2025 रोजी मध्यरात्रीपर्यंत मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1)(3) अन्वये शस्त्र व जमावबंदी आदेश लागू करण्यात येत असल्याचे अतिरिक्त जिल्हादंडाधिकारी यांनी कळविले आहे. त्यानुसार शासकीय कर्तव्य पार पाडणाऱ्या कर्मचाऱ्या व्यतिरिक्त कोणतीही व्यक्ती सार्वजनिक ठिकाणी त्यांच्याजवळ शस्त्र, काठी, तलवार, बंदुका बाळगणार नाहीत. लाठ्या किंवा काठ्या, शारीरिक इजा होण्यास त्या कारणीभूत ठरतील, सहज हाताळता येतील अशा वस्तूजवळ बाळगणार नाहीत. कोणतेही क्षारक पदार्थ, स्फोटकद्रव्ये जवळ बाळगणार नाहीत. दगड, क्षेपणीक उपकरणे, किंवा सर्व प्रवर्तक द्रव्य गोळा करुन ठेवणार नाही, किंवा जवळ बाळगणार नाहीत. आवेशी भांडणे अंगविक्षेप, विटंबनात्मक नकला करणार नाही. सभ्यता, नितिमत्ता यास बाधा येईल किंवा अराजक माजेल, अशी चिन्हे निशाणी, घोषणा फलक किंवा अशी कोणतीही वस्तू जवळ बाळगणार नाही किंवा ठेवणार नाहीत. व्यक्ती किंवा समूहाच्या भावना जाणून बुजून दुखावतील, या उद्देशाने वाद्य वाजणार नाहीत किंवा असभ्य वर्तन करणार नाहीत. पाच किंवा पाचपेक्षा अधिक व्यक्तीं रस्त्यावर जमण्यास सक्त मनाई करण्यात आले आहे. हा आदेश कामावरील कोणतेही पोलीस अधिकारी, शासकीय कर्मचारी, विवाह, अंत्ययात्रा, धार्मिक कार्यक्रम, यात्रा व इतर सक्षम अधिकारी यांनी विशेषरित्या परवानगी दिलेल्या मिरवणुकांना लागू होणार नाही, असे अतिरिक्त जिल्हादंडाधिकारी, हिंगोली यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे. ******

03 June, 2025

स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना जिल्हाधिकारी करणार आज मार्गदर्शन

हिंगोली(जिमाका), दि. 03 : जिल्ह्यातील स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना बुधवार, (दि.४) रोजी शिवाजीराव देशमुख सभागृह येथे सायंकाळी 5 वाजता कार्यशाळा घेण्यात येत आहे. या कार्यशाळेत जिल्हाधिकारी राहुल गुप्ता हे मार्गदर्शन करणार आहेत. हिंगोली जिल्ह्यातील अनेक विद्यार्थी स्पर्धा परीक्षेची तयारी करीत आहेत, परंतु योग्य मार्गदर्शनाअभावी विद्यार्थ्यांना यश मिळत नाही. त्यामुळे स्पर्धा परीक्षेत योग्य तंत्राचा वापर करून यश मिळविण्याच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी राहुल गुप्ता हे मार्गदर्शन करणार आहेत. यामध्ये विद्यार्थ्यांना असणारे प्रश्न देखील ते सोडविणार आहेत. त्यामुळे जास्तीत-जास्त युवकांनी या कार्यशाळेचा लाभ घेण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. ***

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त येहळेगाव तु. येथे विशेष जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन

हिंगोली, दि.03 (जिमाका): केंद्र सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या नांदेड येथील केंद्रीय संचार ब्यूरोच्या वतीने येहळेगाव तुकाराम येथे गुरुवार, (दि. 5) रोजी पर्यावरण दिनानिमित्त विशेष जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. वाढते प्रदूषण, स्वच्छतेचा अभाव मोठ्या प्रमाणावर जंगलांचा ऱ्हास, वन्य जीवांची शिकार, नद्यांचे प्रदूषण, शेतीत रासायनिक खतांचा व किटकनाशकांचा अमर्याद वापर आणि अयोग्य जीवनशैली यामुळे पृथ्वीला हानी पोहचत आहे. या सर्व मानवनिर्मित आपत्ती पासून पृथ्वीचे संवर्धन व संरक्षण करण्यासाठी जगभरात सर्वत्र दिनांक 5 जून रोजी जागतिक पर्यावरण दिनाचे आयोजन केले जाते. या दिनानिमित्त ग्रामस्‍थांमध्‍ये जागृती निर्माण करण्यासाठी उपरोक्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. ‘प्‍लास्‍टीक प्रदूषण मुक्‍ती’ हे ब्रिद वाक्‍य घेऊन या वर्षीचा पर्यावरण दिन साजरा करण्‍यात येत आहे. या कार्यक्रमात ग्रामस्‍थांच्‍या सहभागातून वृक्ष दिंडीचे आयोजन करण्‍यात येणार आहे तसेच नांदेड येथील जोशाबा सांस्‍कृतिक कलासंच यांच्‍या सांस्‍कृतिक कार्यक्रमाच्‍या माध्‍यमातून पर्यावरणाविषयी जनजागृती करण्‍यात येणार आहे. यांनतर मान्‍यवर ग्रामस्थांच्‍यावतीने भव्य वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. या कार्यक्रमानिमित्त गावपातळीवर पर्यावरणावर आधारित स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धांमध्ये विद्यार्थी सहभागी होतील. या वेळी सांस्कृतिक कार्यक्रम, पर्यावरणाचे संवर्धन या विषयावर विविध मान्यवरांचे मार्गदर्शन आणि विजेत्या स्पर्धकांचा प्रमाणपत्र व पारितोषिक देऊन सत्कार करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाच्‍या आयोज‍नासाठी येहळेगाव येथील रेणुकाई सांस्‍कृति‍क क्रीडा मंडळ, पर्यावरण संवर्धनात सक्रिय कार्यरत असलेली सद्भाव सेवाभावी संस्‍था हिंगोली, जायन्‍टस ग्रूप हिंगोली, ग्रामपंचायत येहळेगाव, आखाडा बाळापूर, कळमनुरी, वसमत येथील पर्यावरण मि‍त्रमंडळ, येहळेगाव येथील युवक मंडळ आदी संस्‍था सहभागी होणार आहेत या कार्यक्रमाला केंद्रीय संचार ब्‍यूरोचे प्रसिद्धी अधिकारी सुमित दोडल, उपविभागीय अधिकारी श्रीमती प्रति‍क्षा भुते, पोलीस निरीक्षक विष्णुकांत गुठ्ठे, जिल्हा कृषी अधिकारी राजेंद्र कदम, सरपंच, जिल्हा परिषद सदस्‍य, पंचायत समिती सदस्‍य तसेच सर्व पदाधि‍कारी, सद्भाव सेवाभावी संस्‍थेचे अभयकुमार भरतीया यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.

02 June, 2025

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत फळबाग लागवडीसाठी शेतकऱ्यांनी अर्ज करावेत

हिंगोली (जिमाका), दि. 02 : जिल्ह्यात फळबाग लागवडीच्या माध्यमातून फळबाग लागवडीखालील क्षेत्रात वाढ करणे. शाश्वत रोजगार निर्मिती करुन स्थानिक पातळीवर पूरक व्यवसायात वाढ करणे व उत्पादन वाढविणे हा योजनेचा उद्देश आहे. ही योजना जिल्ह्यात सर्व ग्राम पंचायतीमध्ये राबविण्यात येत असून लागवड जून ते मार्च या कालावधीत करण्यात येईल. लाभार्थीस 100 टक्के अनुदानावर सलग शेतावर, शेताच्या बांधावर व पडीक जमिनीवर विविध फळझाडांची, वृक्षांची, फूल पिकांची, मसाला पिकांची लागवड करता येते. फळपिके, वृक्ष व इतर पिके : आंबा, काजू, चिकू, पेरु, डाळींब, संत्रा, मोसंबी, कागदी लिंबू, नारळ, बोर, सिताफळ, आवळा, चिंच, कवठ, जांभूळ, अंजीर कलमे, साग, गिरीपुष्प, सिंध्दी, शेवगा, हादगा, बांबू, जट्रोफा, कडीपत्ता, पानपिंपरी, करंज व इतर औषधी वनस्पतींचा समावेश आहे. नवीन फळपिके : द्राक्ष, ड्रॅगनफ्रूट, अव्हेकेडो, केळी (3 वर्ष) चा समावेश आहे. फूल पिके : गुलाब, मोगरा, निशीगंधा, सोनचाफा . मसाला पिके : लवंग, दालचिनी, जायफळ, मिरी . पात्रतेचे निकष : लाभधारकाच्या नावे जमीन असणे आवश्यक आहे. तसेच लाभार्थी जॉबकार्ड धारक व अल्प, अत्यल्प भूधारक असावा. जमीन कूळ कायद्याखाली येत असल्यास व सातबाराच्या उताऱ्यावर जर कुळाचे नाव असले तर योजना कुळाच्या संमतीने राबविण्यात यावी. योजनेतील लाभार्थींना लागवड केलेल्या फळझाडे, वृक्षांच्या दुसऱ्या व तिसऱ्या वर्षी बागायत पिकांचे 90 टक्के आणि कोरडवाहू पिकांचे 75 टक्के असणे आवश्यक आहे. लाभार्थ्यांना 0.05 हेक्टर ते 2 हेक्टर क्षेत्राच्या मर्यादेत फळझाड लागवड करता येते. इच्छूक शेतकऱ्यांनी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत फळबाग लागवडीसाठी लाभ घ्यावयाचा आहे. अधिक माहितीसाठी संबंधित गावचे कृषी सहाय्यक, कृषी पर्यवेक्षक, मंडळ कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा. तसेच जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या योजनेमध्ये सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी केले आहे. *****

फळबाग लागवड करा, शासकीय अनुदान मिळवा !

• भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना : मागील वर्षात 205 हेक्टर क्षेत्रावर लागवड हिंगोली (जिमाका), दि. 02 : भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेंतर्गत जिल्ह्यात मागील वर्षात 205 हेक्टर क्षेत्रावर फळबाग लागवड करण्यात आली आहे. ही योजना राज्य शासनाच्या अर्थसहाय्याने कृषी विभागामार्फत राबविली जात असून शेतकऱ्यांना 100 टक्के अनुदान मिळत आहे. उत्पन्न वाढीचा शाश्वत मार्ग आणि टिकाऊ शेतीकडे वाटचाल करणाऱ्या शेतकऱ्यांचा या योजनेमुळे विश्वास वाढत आहे. भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना ही शासनाच्या कृषी विभागामार्फत राबविली जाणारी एक महत्वाची योजना आहे. या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे शेतकऱ्यांना बहुवार्षिक फळबाग लागवडीसाठी प्रोत्साहन देणे आणि त्यांना आवश्यक आर्थिक सहाय्य उपलब्ध करुन देणे हा आहे. या योजनेंतर्गत आंबा, पेरु, संत्रा, डाळिंब, काजू, नारळ, सीताफळ, आवळा, जांभूळ, कोकम, फणस, अंजीर, चिकू, कागदी लिंबू, मोसंबी आणि चिंच अशा 16 प्रकारच्या फळपिकांची लागवड करता येते. योजनेचे निकष : अर्ज करणाऱ्या शेतकऱ्यांच्या नावावर सातबारा असणे आवश्यक आहे. सातबारा संयुक्त खातेदारांच्या नावावर असेल तर सर्व खातेदारांचे संमतीपत्र अनिवार्य आहे. सातबारांवर कुळाचे नाव असल्यास त्यांच्या संमतीसह अर्ज करता येतो. संस्थात्मक लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत लाभ घेतलेले शेतकरी या योजनेस पात्र ठरत नाहीत. अर्ज कसा करावा : सर्वप्रथम महाडीबीटीच्या https://mahadbt.maharashtra.gov.in या पोर्टलवर ऑनलाईन नोंदणी करावी. त्यानंतर कृषी विभाग या पर्यायांतर्गत भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना निवडावी. आवश्यक कागदपत्रांमध्ये सातबारा उतारा, आधारकार्ड, बँक पासबूक, संमतीपत्र यांचा समावेश असतो. ही सर्व कागदपत्रे स्कॅन करुन पोर्टलवर अपलोड करावीत. नंतर अर्ज पूर्ण भरुन ऑनलाईन सादर करावा आणि त्याची प्रिंट घ्यावी. अर्ज मंजूर झाल्यानंतर लागवड करुन शासकीय अनुदानासाठी अंतिम प्रस्ताव सादर करावा. या वर्षापासून प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य दिले जाणार आहे. जिल्ह्यातील फळ लागवडीचे क्षेत्र : संत्रा : जिल्ह्यात संत्रा हे सर्वाधिक पसंतीचे फळपीक ठरत आहे. हवामान, जमीन आणि सिंचन व्यवस्था लक्षात घेता संत्रा लागवडीसाठी अतिशय पोषक आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी सर्वाधिक प्रमाणात 65.9 हेक्टर क्षेत्रावर संत्रा पिकाची लागवड केली आहे. राज्य शासनाच्या या महत्वाकांक्षी योजनेतून जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांना शेतीत नवा पर्याय मिळाला आहे. पेरु : हे फळ कमी कालावधीत उत्पादन देणारे आणि देखभालीला सोपे असल्यामुळे शेतकऱ्यांचा कल याकडे झपाट्याने वाढत आहे. जिल्ह्यात 32.10 हेक्टर क्षेत्रावर पेरुची लागवड केली आहे. पाणीटंचाई असलेल्या भागातही पेरुचे पीक चांगले येत असल्याचे निदर्शनास आले आहे. सीताफळ : या फळांची बाजारात वर्षभर मागणी असल्यामुळे शेतकरी मिश्र पध्दतीने लागवड करत आहेत. यामुळे उत्पादन वाढीसोबत जोखीमही कमी होते आणि उत्पादनातील वैविध्य टिकून राहते. जिल्ह्यात सध्या 24.73 हेक्टरवर लागवड केली आहे. जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी फळबाग लागवड करुन भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राजेंद्र कदम यांनी केले आहे. ******

फलोत्पादन योजनेचे अनुदान शाश्वत शेतीला प्रोत्साहन • लाभ घेण्याचे आवाहन

हिंगोली (जिमाका), दि. 02 : एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना वर्गवारी घटकानुसार 40 ते 50 टक्के अनुदान दिले जात आहे. या अभियानाचा उद्देश फलोत्पादनाला प्रोत्साहन देणे, शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविणे हा आहे. या अभियानाच्या माध्यमातून फळबाग उत्पादनात वाढ, गुणवत्ता आणि शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावेल अशी अपेक्षा आहे. हे पाऊल शाश्वत शेतीच्या विकासाला प्रोत्साहन देईल. तसेच पीक काढणीनंतरचे नुकसान कमी करण्यास मदत करेल. शेतकऱ्यांनी या योजनेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा व फलोत्पादन पिकांच्या वाढीसाठी आवश्यक सुविधा मिळवाव्यात. अभियानांतर्गत ड्रॅगन फ्रुट, ॲव्होकॅडो, खजूर, फुले, मसाला पिके, हळद, शेडनेट हाऊस, हरितगृह, प्लास्टिक मल्चींग, सामूहिक शेततळे, त्यांचे अस्तरीकरण, फळबाग पुनरुजीवन, कांदा चाळ, फॉर्म गेट पॅक हाऊस, प्राथमिक प्रक्रिया केंद्र, रेफरव्हॅन, रायपनिंग चेंबर, पॉवर टिलर, पीक संरक्षण उपकरणे, साठवणूक व विक्रीसाठी सुविधा, शीतगृह विक्री केंद्र, मधुमक्षिका वसाहत इत्यादी बाबीसाठी अर्ज मागविण्यात येत असल्याचे कृषी विभागाने स्पष्ट केले आहे. असा करा अर्ज : महाडीबीटीच्या संकेतस्थळावर लॉगिन करा. योजनेच्या टप्यानुसार अर्ज सादर करा. आवश्यक कागदपत्रे अपलोड करा, याशिवाय नजीकच्या कृषी विभागाच्या कार्यालयात प्रत्यक्ष जाऊन माहिती घ्यावी. या वर्षापासून प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य दिले जाणार आहे. आवश्यक कागदपत्रे : लाभार्थीच्या नावे सातबारा असणे आवश्यक तसेच सातबाऱ्यांमध्ये फळपिकांची नोंद आवश्यक, 8 अ नमुना, आधारकार्ड छायांकित प्रत, आधारलिंक बँक पासबूकची छायांकित प्रत, आधार लिंक मोबाईल क्रमांक आवश्यक आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा. अधिक माहितीसाठी कृषी सहाय्यक, कृषी पर्यवेक्षक, मंडळ कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, उपविभागीय कृषी कार्यालय यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राजेंद्र कदम यांनी केले आहे. ******

हिवताप प्रतिरोध महिना साजरा करण्याचे आवाहन

हिंगोली (जिमाका), दि. 02 : राष्ट्रीय कीटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा शल्यचिकित्सक यांच्या मार्गदर्शनाखाली जून हा महिना हिवताप प्रतिरोध महिना साजरा करण्यात येतो. या महिन्यात हिवताप व इतर कीटकजन्य डेंग्यू, चिकुनगुनिया, जे.ई., चंडीपुरा, हत्तीरोग इत्यादी आजाराविषयी जनतेमध्ये जागृती निर्माण होऊन त्याचा प्रतिरोध, उपाय योजनाच्या अंमलबजावणीमध्ये सक्रिय सहभाग प्राप्त करून घेण्याच्या दृष्टीने प्रत्येक वर्षी विविध उपक्रमांव्दारे हिवताप प्रतिरोध महिना पारेषण काळापूर्वी म्हणजे जून महिन्यात साजरा करण्यात येतो. या जनजागरण मोहिमेमध्ये गांव पातळीवर हिवतापाची लक्षणे, उपचार व प्रतिरोधाच्या विविध उपाय योजनांची माहिती योग्य त्या माध्यमाद्वारे पोहचविणे आवश्यक आहे. डासोत्पती प्रतिबंध उपाय योजनामध्ये सहभाग वाढविणे हा या मोहिमेचा प्रमुख उद्देश आहे. यामध्ये पत्रकार परिषद, खाजगी वैद्यकीय व्यावसायिक सभा, जलद ताप रुग्ण सर्वेक्षण, हस्तपत्रिका वाटप, आशा बळकटीकरणासाठी कार्यशाळेचे आयोजन, कंटेनर सर्वेक्षण, ग्रामीण आरोग्य पोषण आहार समितीची सभा, सर्व स्तरावरुन स्वच्छता मोहिमेचे आयोजन, दिंडीचे आयोजन, डासोत्पत्ती स्थानात गप्पीमासे सोडण्याचा धडक कार्यक्रम, बचत गटाच्या सभा, शिक्षकांसाठी सामाजिक जाणीव, सर्व स्तरावरील अधिकाऱ्यांनी फवारणी कार्यक्रमाचे पर्यवेक्षण व एक दिवस कोरडा दिवस पाळणे या विषयी जनतेमध्ये जनजागृती निर्माण करणे आदी उपक्रम राबविण्यात येणार आहेत. हिंगोली जिल्ह्यातील सर्व आरोग्य संस्थेचे अधिकारी, कर्मचारी, आशा वर्कर, ग्रामसेवक, अंगणवाडी ताई, स्थानिक प्रतिष्ठित नागरिक यांचा लोक सहभाग घेऊन गावपातळीवर हिवताप प्रतिरोध महिना साजरा करण्यात यावा, असे आवाहन जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. गजानन चव्हाण यांनी केले आहे. ******