09 June, 2025

आषाढी वारी पालखी सोहळ्यामधील भक्तांना आवश्यक सोयीसुविधा उपलब्ध करुन द्याव्यात - जिल्हाधिकारी राहुल गुप्ता

हिंगोली (जिमाका),दि.09 : दरवर्षीप्रमाणे यावर्षीही हिगोली जिल्ह्यातून श्री क्षेत्र शेगाव येथून श्रीक्षेत्र पंढरपूर येथे प्रस्थान होणारी गजानन महाराज दिंडी आषाढी वारी पदयात्रा, संत नामदेव महाराज संस्थान नर्सी नामदेव तसेच हिंगोली जिल्ह्यातून जाणाऱ्या इतर पायी दिंड्या व पदयात्रेमधील आषाढी वारी पालखी सोहळ्यामधील भक्तांना आवश्यक सोयीसुविधा उपलब्ध करुन द्याव्यात, असे निर्देश जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी सर्व संबंधित विभागाला दिले. हिंगोली जिल्ह्यातून जाणाऱ्या आषाढी वारी पालखी सोहळा व दिंडी पदयात्रेतील भाविकांना मूलभूत आवश्यक सोयीसुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी यांच्या दालनात आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी अभिमन्यू बोधवड, उपविभागीय अधिकारी समाधान घुटुकडे, प्रतीक्षा भूते, नगर पालिका प्रशासनचे सहायक आयुक्त जगताप, तहसीलदार श्रीकांत भुजबळ, जीवककुमार कांबळे, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी राहुल गावडे, नगर परिषदेचे मुख्याधिकारी अरविंद मुंढे, पोलीस अधीक्षक कार्यालय, जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालय, जिल्हा आरोग्य अधिकारी यांचे प्रतिनिधी, सार्वजनिक बांधकाम विभाग, महावितरण तसेच विविध विभागाचे प्रतिनिधी, पालखी सोहळा आयोजक आदी उपस्थित होते. दिंडीतील वारकऱ्यांना हिंगोली जिल्ह्यात प्रवेश केल्यापासून दिंडी व दिंडी रथासमवेत तसेच मुक्कामाच्या ठिकाणी पुरेसा पोलीस बंदोबस्त, वाहतुकीचे व्यवस्थापन, वाहतूक मार्गात बदल, फिरते शौचालय, सार्वजनिक शौचालय, मुक्कामाच्या ठिकाणी डास प्रतिबंधक धूर फवारणी, स्वच्छता, पाण्याची सोय, दिंडी मार्गावरील दवाखाने, डॉक्टर, आरोग्य पथक, पुरेशा प्रमाणात औषधाची उपलब्धता, वैद्यकीय पथकासह रुग्णवाहिका, पालखी मार्गावर फिरते रुग्णवाहिका, दिंडी मार्गाचे रस्ता दुरुस्ती, मुक्कामाच्या ठिकाणी विद्युत पुरवठा, दिंडी मार्गावरील धाबे, हॉटेल्सची अन्न सुरक्षा तपासणी आदी सुविधा उपलब्ध करुन द्याव्यात. सर्व संबंधित विभागप्रमुखांनी नेमून दिलेली जबाबदारी चोखपणे पार पाडावी आणि भाविकांची गैरसोय होणार नाही याची दक्षता घ्यावी, अशा सूचना जिल्हाधिकारी श्री. गुप्ता यांनी बैठकीत दिल्या. ******

No comments: