26 June, 2025
बँकांनी खरीप पीक कर्जाचे उद्दिष्ट वेळेत पूर्ण करावे - जिल्हाधिकारी राहुल गुप्ता
• जिल्हाधिकारी श्री. गुप्ता यांनी घेतला विविध बँकांचा आढावा
हिंगोली (जिमाका), दि. 26 : जिल्ह्यातील सर्व बँकांनी योग्य नियोजन करुन सन 2025-26 च्या खरीप पीक कर्जाचे जास्तीत-जास्त वितरण करुन वेळेत उद्दिष्ट पूर्ण करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी दिले.
येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या अध्यक्षतेखाली आज जिल्हास्तरीय समन्वय समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा अग्रणी बँकेचे प्रमुख जिल्हा व्यवस्थापक पंकज बोरकर, आरबीआयचे अधिकारी अरुण बाबू, एसबीआय ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थेचे संचालक हेमराज बनसोड, विविध बँकेचे व विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
यावेळी बोलताना जिल्हाधिकारी श्री. गुप्ता म्हणाले, जिल्ह्यात बँकनिहाय पीक कर्ज वितरणाचा तपशील, पीक कर्जाचा केलेला परतावा, पीक कर्ज नूतनीकरण प्रकरणे याची तपशीलवार माहिती उपलब्ध करुन द्यावी. तसेच चालू वर्षात खरीप पीक कर्जाचे 875 कोटी 90 लाखांचे उद्दिष्ट आहे. आतापर्यंत 278 कोटी 81 लाख 75 हजार रुपयांचे पीक कर्ज वितरण झाले आहे. त्याची टक्केवारी 31.38 टक्के इतकी आहे. यासाठी गावात शिबिरांचे तसेच गावभेटीचे आयोजन करुन सर्व बँकांनी चालू वर्षात जास्तीत-जास्त पीक कर्जाचे वितरण करुन वेळेत उद्दिष्ट पूर्ण करावे. ज्या बँका उद्दिष्ट पूर्ण करणार नाहीत. तसेच बँकेचे अधिकारी बैठकीला अनुपस्थित आहेत त्यांच्यावर कारवाई प्रस्तावित करण्यात येईल, असे निर्देश दिले.
तसेच प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना, प्रधानमंत्री स्वनिधी, मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजना, प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना, अटल पेन्शन योजना, जीवन ज्योती विमा योजना, पशुसवंर्धन व मत्स्यव्यवसाय विभागाच्या योजना, किसान क्रेडिट कार्ड, बचतगटांना कर्जाची प्रकरणे तात्काळ मंजूर करुन त्याचा अहवाल सादर करावा. बचतगटांना तालुकानिहाय कार्यक्रम घेऊन लोकप्रतिनिधींच्या हस्ते कर्जाचे वितरण करावे. तसेच विविध योजनेत आपणांस देण्यात आलेले उद्दिष्ट वेळेत पूर्ण करावे. धरती आबा योजनेंतर्गत जिल्ह्यात विविध ठिकाणी शिबिराचे आयोजन करण्यात येत आहे. या शिबिरांमध्ये बँकांचे स्टॉल लावून शासनाच्या विविध योजनाचा लाभ द्यावा. जिल्ह्यात मागणीप्रमाणे नवीन शाखा सुरु करण्याची कार्यवाही करावी किंवा बँक ग्राहक सेवा केंद्र सुरु करुन नागरिकांना सेवा उपलब्ध करुन द्याव्यात. आरसेटीने शेतकरी व नागरिकांना रेशीम, हळद प्रक्रिया उद्योग यासह विविध प्रशिक्षणाचे आयोजन करुन लाभ द्यावा. प्रॉपर्टी कार्डच्या आधारे नागरिकांना कर्ज उपलब्ध करुन द्यावेत, असे निर्देशही जिल्हाधिकारी श्री. गुप्ता यांनी यावेळी दिले.
***
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment