26 June, 2025
जिल्ह्यातील ५ हजाराहून अधिक लोकसंख्येची १४ गावे 'रुफटॉप सोलर मॉडेल व्हिलेज' घोषित होणार - जिल्हाधिकारी राहुल गुप्ता
हिंगोली, दि. २६ (जिमाका): सन २०११ च्या जणगणनेनुसार जिल्ह्यातील ५,००० हून अधिक लोकसंख्या असलेली १४ गावे ‘रूफटॉप सोलर मॉडेल व्हिलेज’ म्हणून घोषित करण्याची कार्यवाही करण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत संबंधित गावे सौरऊर्जेवर आधारित विविध सुविधा प्राप्त करून घेणार असून, हरित ऊर्जा वापरात जिल्ह्याची मोठी कामगिरी होणार असल्याचे जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी आज आढावा बैठकीत सांगितले.
जिल्हाधिकारी कार्यालयात आज जिल्हास्तरीय रुफटॉप सोलर, प्रधानमंत्री सूर्यघर मोफत योजनेचा आढावा या बैठकीत जिल्हाधिकारी श्री. गुप्ता यांनी घेतला.
यावेळी महावितरणचे अधीक्षक अभियंता आर. एम. चव्हाण, शिखर बँकेचे व्यवस्थापक पंकज बोरकर, महाऊर्जेचे जिल्हा व्यवस्थापक प्रशांत गायकवाड, महावितरणचे उपविभागीय अभियंता रणजीत देशमुख, श्री. पिसे, डिग्रसचे सरपंच, यांच्यासह रुप टॉप सोलरचे व्हेंडर यावेळी उपस्थित होते.
जी गावे १०० टक्के सौरऊर्जायुक्त होतील, त्या गावांना केंद्र शासनाचे १ कोटी रुपयांचे अनुदान मिळणार असून, या अनुदानाच्या रकमेतून या योजनेच्या माध्यमातून घरगुती सौर दिवे, पथदिवे, सौरपंप, शासकीय इमारतींवरील सोलर पॅनल्स आदींची कार्यवाही हाती घेतली जाणार असल्याचे जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी सांगितले. महावितरण व मेडाच्या अधिका-यांनी याकामी पुढाकार घेऊन ग्रामपंचायतींच्या सहकार्याने गावोगावी जनजागृती मोहीम राबवण्यात येणार असून, स्वयंपूर्ण व हरित ऊर्जेवर चालणारी गावे हे मुख्य उद्दिष्ट असल्याचे जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी सांगितले.
या योजनेंतर्गत शासकीय अनुदानासोबत स्वयंप्रेरित सहभागालाही प्रोत्साहन दिले जाणार असल्याचे जिल्हाधिकारी श्री. गुप्ता यांनी संबंधित यंत्रणांनी तातडीने अंमलबजावणी सुरू करावी, असे निर्देश दिले आहेत.
या योजनेच्या माध्यमातून जी व्यक्ती एखाद्या घराला सौरऊर्जेवर आणण्यासाठी प्रोत्साहीत करेल, त्याने त्याचा संदर्भ सोलर अँप्लिकेशनमध्ये टाकल्यास त्याला १ हजार रुपयांचे प्रोत्साहनपर अनुदान मिळणार असून, यामधूनही युवकांना पैसे कमावण्याची व गावे सौरऊर्जेवर चालविण्यासाठी प्रोत्साहन देण्याची संधी मिळणार असल्याचे जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी सांगितले.
यावेळी महावितरणचे अधीक्षक अभियंता आर. एम. चव्हाण यांनी जिल्ह्यात वीज वितरणाच्या सुरू असलेल्या पायाभूत सुविधा, भविष्यात येणा-या योजना आणि सद्यस्थितीत चालू असलेल्या योजनांची सादरीकरणाव्दारे माहिती दिली. तसेच हानी कमी करण्यासाठी आरडीएसएस, तसेच वीज वाहिन्यांचे विलगीकरणाची माहितीही जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी यावेळी संबंधित यंत्रणेकडून जाणून घेतली.
या योजनेमध्ये मॉडेल सोलर व्हिलेजकरिता हिंगोली जिल्ह्यातील एकूण १४ गावांची निवड करण्यात आली आहे. त्यानुसार निवड करण्यात आलेल्या गावामध्ये जास्तीत जास्त घरावरती सौरसंच आस्थापित करण्यासाठी महावितरणद्वारे कार्यक्रम राबवण्याकरिता
जिल्हाधिकारी श्री. गुप्ता यांनी सूचना दिल्या तसेच जिल्ह्यातील सर्व शासकीय इमारतीवर वीज पारेषण संलग्न सौरसंच बसवण्याकरिता सर्व शासकीय
इमारतींचे सर्वेक्षण करून प्रस्ताव सादर करण्याकरिता महाऊर्जा विभागास सूचना दिल्या.
*****
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment