17 June, 2025
प्राधान्यक्रम ठरवून निधी मागणीचे प्रस्ताव तात्काळ सादर करावेत - जिल्हाधिकारी राहुल गुप्ता
• सन 2024-25 च्या खर्चाचे उपयोगिता प्रमाणपत्र तातडीने सादर करावेत
• आकांक्षीत तालुक्यातील कामे दिलेल्या निर्देशांकानुसार तातडीने पूर्ण करावेत
• धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियानांतर्गत 15 ते 30 जून या कालावधीत विविध शिबिराचे आयोजन
हिंगोली (जिमाका), दि. 17 : जिल्ह्यातील सर्व कार्यालय प्रमुखांनी जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गतच्या कामाबाबत लोकप्रतिनिधीशी समन्वय साधून व प्राधान्यक्रम ठरवून निधी मागणीचे प्रस्ताव तात्काळ सादर करावेत, असे निर्देश जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी आज दिले.
येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा वार्षिक योजनेचा आढावा घेण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी अंजली रमेश, सहायक जिल्हाधिकारी योगेश मीना, जिल्हा नियोजन अधिकारी ग. गो. चितळे, आदिवासी विकास विभागाचे प्रकल्प अधिकारी सुनिल बारसे, समाज कल्याणच्या सहायक आयुक्त गीता गुठ्ठे यांची प्रमुख उपस्थिती होती.
जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी सर्व कार्यालय प्रमुखांनी जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत सन 2024-2025 च्या कामावर केलेल्या खर्चाचा ताळमेळ तात्काळ पूर्ण करुन उपयोगिता प्रमाणपत्रासह अहवाल सादर करावा. तसेच अखर्चित निधीची माहिती तात्काळ सादर करावी. तसेच सन 2025-26 या वर्षात करावयाच्या कामाचे योग्य नियोजन करुन निधी मागणीचे परिपूर्ण प्रस्ताव तात्काळ सादर करावेत, अशा सूचनाही जिल्हाधिकारी श्री. गुप्ता यांनी यावेळी दिल्या.
यावेळी जिल्हाधिकारी श्री. गुप्ता यांनी कृषी, पशुसंवर्धन, महावितरण, आरोग्य, क्रीडा, पाणीपुरवठा, नगरविकास, तीर्थक्षेत्र, पर्यटन क्षेत्रावरील सन 2024-25 च्या खर्चाचा तसेच सन 2025-26 प्रस्तावित खर्चाचा सविस्तर आढावा घेतला. तसेच विद्यार्थ्यांना आपल्या गावापासून शाळेत नेआण करण्यासाठी मानव विकास अंतर्गत नवीन आलेल्या बस आहेत. या बससाठी शिक्षण विभागाने रुट प्लॅन तयार करुन द्यावा, अशा सूचना दिल्या.
जिल्ह्यातील हिंगोली या आकांक्षीत तालुक्यात केंद्र शासनाने दिलेल्या निर्देशानुसार महिला व बालकांना देण्यात येणारे पोषण आहार, प्रधानमंत्री आवास योजना, ओडीएफ प्लस गावे, जलजीवन मिशन, कृषी, पशुसंवर्धन, पाणीपुरवठा, ज्या अंगणवाडीमध्ये शौचालयाची सुविधा नाही त्या ठिकाणी शौचालय उभारणे यासह निर्धारित निर्देशांकानुसार सर्व सुविधा उपलब्ध करुन द्यावेत. केलेल्या कामाची छायाचित्रे, माहितीचा डेटा अपलोड करावा व निती आयोगाकडून बक्षीस पात्र ठरवावेत, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
देशातील आदिवासी जमातीच्या आर्थिक व सामाजिक विकासासाठी धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियान ही योजना हिंगोली जिल्ह्यातील 81 गावांमध्ये विविध 17 यंत्रणेमार्फत राबविण्यात येणार आहेत. या अभियानाच्या पहिल्या टप्यात 15 ते 30 जून या कालावधीत लाभार्थ्यांसाठी विविध शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे. यासाठी आदिवासी विकास विभागाचे प्रकल्प अधिकारी हे समन्वय अधिकारी असून त्यांनी सर्व विभागाशी समन्वय ठेवून हे शिबीर यशस्वी होण्यासाठी नियोजन करावे, अशा सूचना श्री. गुप्ता यांनी यावेळी दिल्या.
या बैठकीस विविध विभागाचे विभाग प्रमुख उपस्थित होते.
******
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment