18 September, 2018

महाराष्ट्रातील 3 शाळांना ‘स्वच्छ विद्यालय’ पुरस्कार हिंगोली जिल्ह्यातील 1 तर लातूरच्या 2 शाळांचा सन्मान






महाराष्ट्रातील 3 शाळांना ‘स्वच्छ विद्यालय’ पुरस्कार
हिंगोली जिल्ह्यातील 1 तर लातूरच्या 2 शाळांचा सन्मान

            नवी दिल्ली,18: हिंगोली जिल्ह्यातील गोटीवाडी येथील ‘पोस्ट बेसिक आश्रम शाळे’ला ‘स्वच्छ विद्यालय’ या राष्ट्रीय पुरस्काराने केंद्रीय मनुष्य बळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांच्य हस्ते आज गौरविण्यात आले, तर लातूर जिल्ह्यातील दोन शाळांना ‘स्वच्छ विद्यालय’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आल्यामुळे या जिल्ह्याला विशेष पुरस्काराने गौरविण्यात आले.  विशेष पुरस्काराने सन्मान करण्यात आला.
            येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय केंद्रामध्ये केंद्रीय मनुष्य बळ विकास मंत्रालयाच्यावतीने ‘स्वच्छ विद्यालय’ पुरस्कार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी  केंद्रीय पाणी पुरवठा आणि स्वच्छता विभागाचे सचिव परमेश्वरन अय्यर, केंद्रीय शालेय शिक्षण  विभागाच्या सचिव रिना रे, सहसचिव मनिष गर्ग, सीबीएससीच्या अध्यक्ष अनिता करवाल उपस्थित होते.      
            याप्रसंगी देशभरातील एकूण 52 शाळांना ‘स्वच्छ विद्यालय’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यापैकी 37 शाळा या ग्रामीण भागातील तर 15 शाळा शहरी भागातील आहेत.  एकूण 52 पैकी  45 शाळा या शासकीय अथवा शासकीय अनुदान प्राप्त आहेत. 7 शाळा खाजगी आहेत. आज प्रदान झालेल्या पुरस्काराचे स्वरूप प्रमाणपत्र, 50 हजार रूपये रोख असे आहे. 50 हजार रूपये शाळांच्या खात्यात डिजीटल सेवेतंर्गत जमा करण्यात आलेले आहेत. 
हिंगोलीतील गोटेवाडीच्या आश्रम शाळेला पुरस्कार
            हिंगोली जिल्ह्यातील गोटेवाडी येथील ‘पोस्ट बेसिक आश्रम शाळे’ला स्वच्छतेच्या सर्व कसोटया पुर्ण केल्याबद्दल ‘स्वच्छ विद्यालय’ या राष्ट्रीय पुरस्काराने गौरिवण्यात आले. पुरस्कार आदिवासी विभागाचे प्रकल्प संचालक डॉ. विशाल राठोड, मुख्याध्यापक साहेबराव आवचर आणि विद्यार्थी यांनी हा पुरस्कार स्वीकारला.
लातूर जिह्याला 3 पुरस्कार
            लातूर जिल्ह्यातील दोन शाळांना ‘स्वच्छ विद्यालय’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आल्यामुळे या जिल्ह्याला विशेष पुरस्काराने गौरविण्यात आले. लातूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी जी. श्रीकांत, सामाजिक न्याय विभागाचे  जिल्हा प्रमुख श्री बाबासाहेब आरवत यांनी हा पुरस्कार स्वीकारला. देशभरातील केवळ 9 जिल्ह्यांना विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
****

No comments: