06 September, 2018

जलयुक्त शिवार अभियान पत्रकार पुरस्काराकरीता अर्ज करण्याचे आवाहन


जलयुक्त शिवार अभियान पत्रकार पुरस्काराकरीता अर्ज करण्याचे आवाहन
        हिंगोली,दि.6 : जलयुक्त शिवार अभियानाबाबत वृत्तपत्रातून तसेच इलेक्ट्रॉनिक्स माध्यमाव्दारे जलसंधारणाचे महत्व सर्वदूर पोहोचविणाऱ्या पत्रकारांना राज्य शासनाकडून  गत वर्षीपासून राज्य, विभाग तसेच जिल्हा या तीन स्तरांवर पुरस्कार देण्यात येतात. त्यासाठी सोमवार दि. 10 सप्टेंबर, 2018 पर्यंत विहित नमुन्यातील प्रवेशिका तीन प्रतीत पाठविण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
            या अभियानाबाबत जनजागृती, लोकसहभाग वाढविणे, पाण्याचा ताळेबंद व कार्यक्षम वापर, पाणलोटाच्या यशोगाथा आदी योगदान देणाऱ्या पत्रकारांना हा पुरस्कार देण्यात येतो.  पुरस्कारासाठी महाराष्ट्र राज्यात प्रकाशित होणाऱ्या मराठी, हिंदी, इंग्रजी या भाषेतील साप्ताहिके व पाक्षिकातील लिखाणाचा विचार केला जाणार आहे. दि. 1 जानेवारी, 2017 ते 31 डिसेंबर, 2017 या कालावधीत प्रसिध्द झालेल्या बातम्यांचा या पुरस्कारासाठी विचार होईल.
            मुद्रित माध्यम गटासाठी  जिल्हा स्तरावरील प्रथम क्रमांकाला 15 हजार, व्दितीय क्रमांकास 12 हजार, तृतीय क्रमांकास 10 हजार, विभागीय स्तरावरील प्रथम क्रमांकाला 30 हजार, व्दितीय क्रमांकाला 20 हजार, तृतीय क्रमांकाला 15 हजार तर राज्यस्तरावरील प्रथम क्रमांकाला 50 हजार, व्दितीय क्रमांकाला 35 हजार, तृतीय क्रमांकाला 25 हजार अशी बक्षीसे आहेत.
    तर इलेक्ट्रानिक माध्यमातील मराठी वृत्तकथा प्रसारित करणाऱ्यांना राज्यस्तरावर  प्रथम क्रमांकास 1 लाख रुपये, व्दितीय क्रमांकास 71 हजार तर तृतीय क्रमांकास 51 हजारांचे बक्षीस आहे.
            वृत्तपत्रांचे बातमीदार, स्तंभलेखक, मुक्त पत्रकार या पुरस्कार स्पर्धेत भाग घेण्यास पात्र असतील. कोणत्याही एका पारितोषिकासाठीच अर्ज करता येईल. एका वृत्तपत्राच्या एका आवृत्तीच्या एकाच पत्रकारास या स्पर्धेत भाग घेता येईल. एकाच पत्रकाराचा अर्ज संपादकामार्फत स्वीकारण्यात येईल. जिल्हास्तरीय पुरस्कारासाठी संबंधित जिल्ह्यातून प्रसिध्द होणारी वृत्तपत्रे, नियतकालिके यांमध्ये प्रसिध्द झालेल्या साहित्याचाच विचार केला जाईल. सलग दोन वर्षे एकाच पत्रकारास पुरस्कार प्राप्त झाल्यास तिसऱ्या वर्षी त्याची प्रवेशिका स्वीकारली जाणार नाही. स्पर्धकांनी शासन अथवा शासकीय महामंडळाच्या सेवेत नसल्याचे प्रतिज्ञापत्र प्रवेशिकेसोबत जोडणे आवश्यक आहे. कोणाचेही शिफारस पत्र जोडण्याची आवश्यकता नाही.  पुरस्कार पात्रतेच्या अटी व शर्तीच्या अधिक माहितीसाठी राज्य शासनाच्या ग्रामविकास व जलसंधारण विभागाने दि. 28 सप्टेंबर व दि. 24 ऑक्टोबर 2016 रोजी निर्गमित केलेल्या शासन निर्णयाचे अवलोकन करावे.
            तरी जलयुक्त शिवार अभियान पत्रकार पुरस्काराकरीता आपल्या प्रवेशिका सोमवार दि. 10 सप्टेंबर, 2018 पर्यंत जिल्हा माहिती कार्यालय, एस-6, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, हिंगोली  येथे कार्यालयीन वेळेत सादर कराव्यात.

****

No comments: