19 October, 2018


पालकमंत्री दिलीप कांबळे यांची टंचाई सदृश्य भागाची पाहणी




           
            हिंगोली,दि.19: हिंगोली आणि कळमनुरी तालुक्यातील परिसरातील पावसाअभावी वाढ न झालेल्या तुर आणि कापूस आदी खरीप पिकांची पाहणी पालकमंत्री दिलीप कांबळे यांनी आज केली. जिल्ह्यातील टंचाई सदृश्य भागाची पाहणी करण्याकरीता कांबळे हे हिंगोली जिल्ह्याच्या दोन दिवसीय दौऱ्यावर आहेत.
            यावर्षी जिल्ह्यात समाधानकारक पाऊस न झाल्याने जिल्ह्यातील काही भागात टंचाई सदृश्य परिस्थिती निर्माण झाली असून, पाण्याअभावी खरीप हंगामातील पीकांची वाढ झालेली नाही. त्या अनुषंगाने कांबळे हे हिंगोली जिल्ह्यातील दुष्काळी तालुक्यांच्या पाहणी दौऱ्यावर असून, आज सर्वप्रथम त्यांनी हिंगोली तालूक्यातील संतुक पिंपरी, राहूरी खुर्द, केसापूर आणि काळकोंडी तर कळमनुरी तालूक्यातील जांभरुन, रेणापूर, सालेगाव, वाकोडी आणि मोरवाडी या गावांमध्ये टंचाई सदृश स्थितीची पाहणी केली.
            यावेळी खासदार राजीव सातव, आमदार सर्वश्री तान्हाजी मुटकुळे, डॉ. संतोष टारफे, रामराव वडकुते,  जिल्हाधिकारी अनिल भंडारी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एच.पी. तुम्मोड, अप्पर जिल्हाधिकारी जगदिश मिनियार यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी-कर्मचारी शेतकरीबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. दुष्काळ जाहीर करण्यात यावा यासह विविध आशयांचे निवेदन यावेळी दिलीप कांबळे यांना देण्यात आले. यावेळी पालकमंत्री कांबळे यांनी शेतकरी बांधवांची भेट घेवून आस्थेवाईकपणे चौकशी करत टंचाई सदृश परिस्थितीची माहिती घेतली. दौऱ्याच्या दूस-या दिवशी कांबळे हे सेनगाव तालूक्यातील टंचाई सदृश्य गावांना भेटी देणार आहेत.

****


No comments: