26 October, 2018

नवउद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी स्टार्टअप इंडिया उपक्रमाचे आयोजन - अप्पर जिल्हाधिकारी जगदिश मिनियार


नवउद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी स्टार्टअप इंडिया उपक्रमाचे आयोजन
                                                अप्पर जिल्हाधिकारी जगदिश मिनियार

        हिंगोली,दि.26 : नवउद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी राज्यात स्टार्टअप इंडिया यात्रा हा उपक्रम महाराष्ट्र शासनामार्फत राबविण्यात येत आहे. नौकरीच्या मागे न लागता स्वयंरोजगारकडे वळावे असे आवाहन अप्पर जिल्हाधिकारी जगदिश मिनियार यांनी केल.
            येथील आदर्श महाविद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या महाराष्ट्र स्टार्ट अप यात्रा बुट कँपच्या उदृघाटनाप्रसंगी मागदर्शन करतांना श्री. मिनियार हे बोलत होते. यावेळी आदर्श महाविद्यालयाचे प्राचार्य बी.डी. वाघमारे, स्टार्ट अप इंडियाचे गुणित मलिक, मोहित सोनी, कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता विभागच्या सहायक संचालीका रेणुका तम्मलवार, उद्योजक सुनिल बगडीया, आयटीआयचे प्राचार्य श्री. भगत, श्री. सुडे आदींची उपस्थिती होती.
            पुढे श्री. मिनियार म्हणाले की, भारतीय तरुणांमध्ये स्टार्टअप सुरू करण्याची उमेद खूप मोठी आहे, मात्र याविषयात मार्गदर्शन फारच कमी उपलब्ध आहे. हे लक्षात घेऊनच केंद्र शासनामार्फत स्टार्टअप इंडिया हा कार्यक्रम राबविण्यात येत आहे. उद्योगाच्या बाबतीत आपल्या हिंगोली जिल्ह्याची ओळख ही नाउद्योग जिल्हा म्हणुन असून हे अतिशय निराशेची बाब आहे. नाउद्योग जिल्ह्याची औळख पूसन टाकण्यासाठी आपल्या जिल्ह्यातील नवयुवक, नागरिकांनी आपल्या नविन कल्पना घेवून या स्टार्ट अप इंडिया अंतर्गत स्वंयरोजगाराकडे वळावे असे ही श्री. मिनियार यावेळी म्हणाले.
            स्टार्ट अप इंडियाचे गुणित मलिक यांनी स्टार्ट इंडिया कार्यक्रमाची माहिती देतांना म्हणाले की स्टार्टअप इंडिया-महाराष्ट्र यात्रेचे आयोजन केंद्रीय औद्योगिक धोरण व प्रोत्साहन विभाग, केंद्रीय कौशल्य विकास आणि उद्योजकता विभाग तसेच महाराष्ट्र शासन आणि महाराष्ट्र राज्य इनोवेटिव्ह सोसायटीच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले आहे. स्टार्टअप इंडियाच्या पुढाकाराने देशातील छोट्या जिल्ह्यांमधील नवउद्योजक प्रतिभेला शोधणे हा या यात्रेचा मुख्य उद्देश आहे. नवउद्योजकांना तसेच उद्योग क्षेत्रात भविष्य घडवू इच्छिणाऱ्यांना आवश्यक मार्गदर्शन, सुविधा प्रदान करून देणेही या यात्रे मागचा मानस आहे. मराठवाडा विभागात औरंगाबाद, बीड आणि हिंगोली येथे, पश्चिम महाराष्ट्रात पुणे आणि सोलापूर येथे विदर्भामध्ये नागपूर, चंद्रपूर, अकोला तर कोकण विभागात रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये स्टार्टअप शिबीर आयोजित करण्यात येणार आहे.
            तसेच नाविन्यपूर्ण कल्पना घेऊन येणाऱ्या व्यक्तींसाठी आणि स्टार्ट अपसाठी आवश्यक त्या सुविधांनी युक्त सुसज्ज व्हॅन स्टार्टअप इंडिया यात्रेत असणार आहे. ही व्हॅन 16 जिल्ह्यांतून 23 शहरांमधून जाणार असून 3 नोव्हेंबरला नागपूर येथे पोहोचणार आहे. नागपूर येथे भव्य समारोपीय कार्यक्रम होणार आहे. या दरम्यान 10 ठिकाणी शिबीर आयोजित केले जातील, जिथे स्टार्टअप इंडिया आणि महाराष्ट्र स्टार्टअप धोरण यावर सादरीकरण केले जाणार असल्याची माहिती ही श्री. मलिक यांनी यावेळी दिली.
            यावेळी प्राचार्य वाघमारे म्हणाले की, विद्यार्थी आणि बेरोजगारांनी आता नोकरी ऐवजी स्वयंरोजगाराकडे वळण्याची गरज आहे. कारण आज प्रत्येक क्षेत्रात नौकऱ्या कमी झालेल्या आहेत. त्यामुळे आता युवकांनी आपली मानसीकता बदलून आपला स्वत:चा उद्योग सुरु करुन दूसऱ्यांना रोजगार देण्याचा प्रयत्न करावा.  
            कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा. धनंजय कुलकर्णी यांनी केले तर प्रा. जोशी यांनी आभार मानले.           यावेळी कार्यक्रमास जिल्ह्यातील महाविद्यालयीन प्राध्यापक वृंद, प्रशिक्षण केंद्राचे प्रमुख, महाविद्यालयीन विद्यार्थी-विद्यार्थीनी आदींची उपस्थिती होती.
****

No comments: