31 October, 2018

हिंगोली जिल्ह्याची विकासात्मक वाटचाल…


विशेष लेख क्र. 03                                             दिनांक : 31 ऑक्टोबर, 2018

हिंगोली जिल्ह्याची विकासात्मक वाटचाल…

            मागील चार वर्षांमध्ये राज्य शासनाने नागरिकांच्या हिताचे सामाजिक, राजकीय आणि आर्थिक विषयक धोरणात्मक निर्णय घेतले आहेत. त्यामुळे राज्यात सामाजिक, आरोग्य, सहकार, शैक्षणिक, आर्थिक आदी क्षेत्रात अमुलाग्र बदल होत असून, महाराष्ट्र आर्थिक विकासाकडे झेपावत आहे. राज्य शासनाने राज्याच्या सर्वागिंण विकासाकरीता विविध महत्वकांक्षी योजना राबविण्याचा निर्णय घेत अनेक योजने अंतर्गत उल्लेखनीय कामे केली आहेत. 1 मे, 1999 साली नवनिर्मित हिंगोली जिल्ह्याने राज्याचे सामाजिक न्याय राज्यमंत्री तथा पालकमंत्री दिलीप कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली विकासाकडे झेप घेतली आहे. राज्य शासनाच्या जलयुक्त शिवार अभियान, मागेल त्याला शेततळे, स्वच्छ महाराष्ट्र अभियान, प्रधानमंत्री आवास योजना, मुख्यमंत्री ग्राम सडक योजना आदी समाजोपयोगी महत्वकांक्षी कल्याणकारी योजनांची अंमलबजाणी जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांच्या मार्गदर्शनात जिल्ह्यात यशस्वीरित्या राबविण्यात येत आहे.
जलयुक्त शिवार योजना
                सन 2015-2016 मध्ये जिल्ह्यात जलयुक्त शिवार अभियानांतर्गत 124 गावे निवडण्यात आली होती. सदर गावांमध्ये विविध यंत्रणाद्वारे एकूण 4 हजार 87 कामे प्रस्तावित करण्यात आली होती. यापैकी एकूण 4 हजार 87 कामे पूर्ण झाली असून यासाठी एकूण 82 कोटी 59 लाख रुपये निधी खर्च करण्यात आला आहे. या 124 गावांपैकी 124 गावे जलयुक्त झालेली आहेत. सन 2015-2016 या वर्षात गाळ काढण्याच्या मोहिमेतंर्गत शासकीय मशीन, लोकसहभागातून खोलीकरण, रुंदीकरण या माध्यमातून 67 कामे करण्यात आली असून 10.45 लक्ष घनमीटर गाळ काढण्यात आला
                 तर सन 2016-2017 मध्ये जिल्ह्यात एकूण 100 गावांची निवड केली असून या गावात विविध यंत्रणाद्वारे एकूण 4 हजार 117 कामे प्रस्तावित करण्यात आली होती. त्यापैकी 4 हजार 104 कामे पूर्ण झाली असून, त्यावर 53 कोटी 42 लाख रुपयांचा निधी खर्च झाला. यातील 9 कामे प्रगतीपथावर आहेत.  या 100 गावांपैकी 99 गावे जलयुक्त झालेली आहेत. सन 2016-2017 या वर्षात 121 कामे करण्यात आली असून 25.14 लक्ष घनमीटर गाळ काढण्यात आला .
                सन 2017-2018 मध्ये जिल्ह्यातील 80 गावांची निवड करण्यात आली असून एकूण 2 हजार 469  कामे प्रस्तावित करण्यात आली आहे. त्यापैकी 2 हजार 92 कामे पूर्ण झाली आहे तर 134 कामे प्रगतीपथावर असून 15.84 कोटी खर्च झालेला आहे.
                जलयुक्त शिवार अभियानाच्या माध्यमातून झालेल्या जल व मृद संधारणाच्या उपचारामुळे भुजल पातळीत दोन ते तीन मिटर इतकी लक्षणीय वाढ झाली असून, त्यामुळे रब्बी व उन्हाळी लागवाड क्षेत्रात वाढ झाल्याचे दिसून येत आहे. या अभियानाच्या माध्यमातून 31 हजार 281 टि.सी.एम. इतका पाणीसाठा जिल्ह्यात निर्माण झाला आहे. या पाण्यामुळे 62 हजार 538 हेक्टर जमिनीला एक संरक्षित पाणी देणे शक्य झाले आहे. लोकसहभागातून शेतात गाळ टाकण्याच्या मोहिमेमुळे जवळपास 2 हजार हेक्टर शेतजमिनी सुपीक झाली असून पिक उत्पादनात वाढ होत आहे. तसेच या मोहिमेमुळे सिंचन तलावांच्या साठवण क्षमतेत वाढ होऊन विहिरीची पाणी पातळी देखील वाढण्यास मदत  झाली आहे. यामुळे गावांमधील पाणी टंचाईचा प्रश्न सुटत असून, मागील वर्षी जिल्ह्यात 55 गावांना टँकरद्वारे पाणीपूरवठा करण्यात आला होता. परंतू जलयुक्तच्या झालेल्या कामामुळे यावर्षी केवळ 5 गावांना टँकर सुरु असून, जिल्ह्याची  टँकरमुक्तीच्या दिशेने यशस्वी वाटचाल सुरु आहे.
                जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत केलेल्या जलसंधारणाच्या कामामुळे शेतीला संजीवनी मिळत असून, जिल्ह्यातील  सिंचन क्षेत्र वाढण्यास मदत होत आहे.
मागेल त्याला शेततळे
                मागेल त्याला शेततळे योजने अंतर्गत जिल्ह्यास सुरुवातीस केवळ 1 हजार 500 शेततळ्याचे उद्दिष्ट प्राप्त झाले होते. परंतू सदर उद्दिष्ट जिल्ह्याने वेळेपूर्वीच पूर्ण केल्याने मा. जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांनी 1 हजार शेततळ्यांची अधिकची मागणी केल्यानूसार आता जिल्ह्यास एकूण 2 हजार 500 शेततळ्यांचे उद्दिष्ट प्राप्त झाले आहे. प्राप्त उद्दिष्टापैकी दीडपट जास्त शेततळ्यांची मंजूरी घेण्याचे निकषानूसार पात्र 3 हजार 840 शेततळे मंजूर करुन 3 हजार 354 शेततळ्यास कार्यारंभ आदेश दिले असून, 2 हजार 504 शेततळ्यांची कामे पुर्ण झाली आहेत. उर्वरित शेततळ्यांची कामे प्रगतीपथावर आहेत. या शेततळ्याच्या माध्यमातून 5 हजार 484 टीसीएम पाणी साठवण क्षमता निर्माण झाली आहे. या पाणीसाठ्यातून 2 हजार 504 हेक्‍टर क्षेत्राला संरक्षित सिंचन करण्याची सुविधा निर्माण झाली आहे. शेतकऱ्यांना खरीप हंगामात या शेततळ्याचा चांगलाच उपयोग होतांना दिसत आहे.
स्वच्छ महाराष्ट्र अभियान
                केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत अभियानाच्या धर्तीवर राज्यामध्ये ‘स्वच्छ महाराष्ट्र अभियान’ राबविण्यात येत आहे. जिल्ह्यातील 563 ग्रामपंचायती पैकी एप्रिल 2018 अखेर सर्व ग्रामपंचायती हागणदारी मुक्त झाल्या असून त्यांना याकरिता प्रमाणपत्रही प्राप्त झाले आहेत. तसेच 95.5 टक्के छायाचित्रांचे जिओ टँगीगचे काम झाले आहेत. तसेच मुख्य संशोधन संस्था यांनी देखील तपासणी केली आहे. तसेच जिल्ह्यातील हिंगोली कळमनुरी, आणि वसमत नगर परिषद आणि नवनिर्मित औंढा नागनाथ व सेनगांव नगर पंचायती राज्य शासनाने हगणदारी मुक्त घोषित केल्या असून, Q.C.I. झाल्या आहे.
प्रधानमंत्री आवास योजना
                 सन 2022 पर्यत देशातील प्रत्येक कुटुंबाला जल जोडणी, शौचालयाची व्यवस्था, 24 तास वीज व पोहोच रस्ता या सुविधांसह पक्के घर असायला हवे, या मा. पंतप्रधान महोदयांच्या संकल्पनेतून सर्वासाठी घरे या संकल्पनेतून नागरी आणि ग्रामीण भागाकरिता प्रधानमंत्री आवास योजना ही महत्वकांक्षी योजना सुरु केली आहे. या योजने अंतर्गत (ग्रामीण) भागाकरीता जिल्ह्याला 3 हजार 275 घरकुलांचे उद्दिष्ट प्राप्त झाले होते. यापैकी 4 हजार 573 घरकुलांची प्रत्यक्षात कामे सुरु झाली आहेत. तर यापैकी 2 हजार 935 घरकुलांचे कामे पुर्ण झाली असून उर्वरित घरकुलांचे काम प्रगतीपथावर आहे. तसेच नागरी भागाकरीता हिंगोली आणि वसमत नगर परिषदांना पुढील 5 वर्षा अंतर्गत हिंगोली करीता 3 हजार 125 घरकुलांचे उद्दिष्ट प्राप्‍ झाले असून, वसमत करीता 2 हजार 711 आणि कळमनुरी/औंढा/सेनगांव करीता 992 असे एकुण 6 हजार 828 घरकुलांचे उद्दिष्ट प्राप्त झाले असून या घरकुलांचे कामे प्रगतीपथावर आहेत.
मुख्यमंत्री ग्राम सडक योजना
                राज्यातील न जोडलेल्या वाड्या-वस्त्या जोडण्यासाठी व सध्या अस्तित्वात असलेल्या परंतु दुरावस्था झालेल्या रस्त्यांच्या दर्जा वाढविण्यासाठी राज्यात मुख्यमंत्री ग्राम सडक योजना राबविण्यात येत आहे. या योजनेतंर्गत राज्यात सुमारे 30 हजार कि. मी. लांबीच्या रस्त्यांचे जाळे उभारण्याचे काम सुरु असून, ही कामे डिसेंबर-2019 पूर्वी पूर्ण करण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. या योजनेतंर्गत सन 2015-16 मध्ये हिंगोली जिल्ह्यातील 08 गावांकरीता 58.93 कि.मी. रस्ता मंजूर असून, या रस्त्यांची कामे पूर्ण झाली आहेत. याकरीता आतापर्यंत 25 कोटी 94 लक्ष खर्च झाला आहे. सन 2016-17 अंतर्गत 41 कामे मंजूर झाली असून, 154.7 कि.मी. रस्त्यांची कामे करण्यात येत आहे. यासाठी 73 कोटी 80 लाखाची प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. यापैकी 121.12 कि.मी. लांबीच्या रस्त्यांची कामे पूर्ण झाली आहेत. यावर 55 कोटी 97 लाख निधी सदर कामांवर खर्च झाला असून, उर्वरीत कामे डिसेंबर-2018 पर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे. यावर्षी म्हणजे सन 2017-18 अंतर्गत एकूण 166.46 कि.मी. लांबीची रु. 72.56 कोटीची 47 कामे मंजुर असून सर्व कामे सुरू झाली आहेत.
                हिंगोली जिल्ह्याची निर्मिती अगदी अलीकडच्या काळात देखील झाली असली तरी जिल्ह्याने प्रारंभी पासूनच विविध क्षेत्रात विकास साधून महाराष्ट्राच्या प्रगतीत नेहमी मोठे योगदान दिले आहे. केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध महत्वकांक्षी योजनेच्या माध्यमातून हिंगोली जिल्ह्याची विकासाच्या दृष्टीने यशस्वी वाटचाल सुरु आहे.

****

                                                                                                                        --अरुण सुर्यवंशी
                                                                                                                        जिल्हा माहिती अधिकारी,
                                                                                                                        हिंगोली

No comments: