28 February, 2022

 जिल्ह्यात कलम 37 (1)(3) चे आदेश लागू

 

हिंगोली, (जिमाका) दि. 28 : जिल्ह्यात कोरोना (कोविड-19)  ओमिक्रॉन या विषाणूचा संसर्ग होत असल्यामुळे देशात व राज्यात कायदा व सुव्यवस्थेच्या अनुषंगाने केंद्र शासनाने सर्व राज्यांना सतर्कता बाळगण्याबाबत सूचना दिल्या आहेत. त्या अनुषंगाने संपूर्ण जिल्ह्यात रात्रीची संचारबंदी व दिवसा जमावबंदीचे आदेश निर्गमित करण्यात आले आहेत.

दि. 01 मार्च, 2022 रोजी महाशिवरात्री, दि. 04 मार्च, 2022 पासून 12 वी उच्च माध्यमिक परीक्षा तसेच        दि. 15 मार्च, 2022 पासून 10 वी माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा, दि. 5 व 6 मार्च, 2022 रोजी कळमनुरी येथील श्री रामचंद्र स्वामी महाराज व श्री जगदंबा देवी संस्थान कळमनुरी (लमाणदेव यात्रा) साजरी होणार आहे.

दि. 01 नोव्हेंबर, 2021 रोजी पासून हिंगोली, कळमनुरी, वसमत या तिन्ही आगारातील समस्त कर्मचारी यांनी सामुहिक संप पुकारलेला आहे. जोपर्यंत राज्य परिवहन महामंडळ राज्य शासनात विलीन करुन घेणार नाहीत तो पर्यंत संप मागे घेणार नाही असा ईशारा दिला आहे. तसेच नागरिकांच्या वतीने, विविध संघटना, पक्ष यांच्यातर्फे त्यांच्या मागण्यासाठी मोर्चे, धरणे, आंदोलने, रास्ता रोको, उपोषणे करीत असतात. अशा विविध घटनांमुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. असे विविध प्रकारचे प्रश्न हाताळण्यासाठी तसेच जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याकरीता संपूर्ण हिंगोली जिल्ह्यात  दिनांक 01 मार्च, 2022 रोजीचे 06.00 वाजल्यापासून ते दिनांक 15 मार्च, 2022 रोजीचे 24.00 वाजेपावेतो मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1)(3) चे आदेश लागू करण्यात येत असल्याचे अतिरिक्त जिल्हादंडाधिकारी, हिंगोली यांनी  आदेश काढले आहेत.

            त्यानुसार शासकीय कर्तव्य पार पाडणाऱ्या कर्मचाऱ्या व्यतिरिक्त कोणतीही व्यक्ती सार्वजनिक ठिकाणी त्यांच्या जवळ शस्त्र, काठी, तलवार, बंदुका बाळगणार नाहीत. लाठ्या किंवा काठ्या, शारीरिक इजा होण्यास त्या कारणीभूत ठरतील, सहज हाताळता येतील अशा वस्तु जवळ बाळगणार नाहीत. कोणतेही क्षारक पदार्थ, स्फोटक द्रव्ये जवळ बाळगणार नाहीत. दगड, क्षेपणीक उपकरणे, किंवा सर्व प्रवर्तक द्रव्य गोळा करुन ठेवणार नाही, किंवा जवळ बाळगणार नाहीत. आवेशी भांडणे, अंगविक्षेप, विटंबनात्मक नकला करणार नाही. सभ्यता, नितिमत्ता यास बाधा येईल किंवा अराजक माजेल अशी चिन्हे निशाणी, घोषणा फलक किंवा अशी कोणतीही वस्तु जवळ बाळगणार नाही किंवा ठेवणार नाहीत. व्यक्ती किंवा समुहाच्या भावना जाणून बुजून दुखावतील या उद्देशाने वाद्य वाजणार नाहीत किंवा असभ्य वर्तन करणार नाहीत. पाच किंवा पाचपेक्षा अधिक व्यक्तीं रस्त्यावर जमण्यास सक्त मनाई करण्यात आले आहे. हा आदेश कामावरील कोणतेही पोलीस अधिकारी, शासकीय कर्मचारी, विवाह, अंत्ययात्रा, धार्मिक कार्यक्रम, यात्रा व इतर सक्षम अधिकारी यांनी विशेषरित्या परवानगी दिलेल्या मिरवणुकांना लागू होणार नाही, असे अतिरिक्त जिल्हादंडाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी  यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे.

****

No comments: