10 August, 2022

 

स्वातंत्र्याचा 75 वा वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात

संबंधित विभागाने आपणास दिलेली जबाबदारी चोखपणे पार पाडावी

- निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी

* ‘घरोघरी तिरंगा’ हा उपक्रम यशस्वीपणे राबविण्याचे आवाहन


 

हिंगोली, (जिमाका) दि. 10 : स्वातंत्र्य दिनाचा 75 वा वर्धापन दिनानिमित्त 15 ऑगस्ट, 2022 रोजी मुख्य शासकीय ध्वजारोहणाचा कार्यक्रम नवीन प्रशासकीय इमारत जिल्हाधिकारी कार्यालय, हिंगोली येथे सकाळी 9.05 वाजता होणार आहे. हा समारंभ यशस्वी होण्यासाठी प्रत्येक विभागाने दिलेली जबाबदारी चोखपणे पार पाडावी, असे निर्देश निवासी  उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी यांनी दिले आहेत. 

स्वातंत्र्य दिन साजरा करण्याच्या अनुषंगाने येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित पूर्वतयारीच्या बैठकीत मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी संदीपकुमार सोनटक्के, तहसीलदार नवनाथ वगवाड, नगर परिषदेचे मुख्याधिकारी डॉ.अजय कुरवाडे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता डी. बी. पोत्रे आणि सर्व संबंधित विभागातील अधिकारी उपस्थित होते.

देशाच्या स्वातंत्र्याला 75 वर्ष पूर्ण होत असल्याने देशात आजादी का अमृत महोत्सव साजरा करण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत दि. 13 ते 15 ऑगस्ट 2022 या कालावधीसाठी केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे घरोघरी तिरंगा हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. घरोघरी तिरंगा आणि स्वातंत्र्यदिन कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विविध विभागांना त्यांच्या जबाबदाऱ्यांचे वाटप करण्यात आले आहे. संबधित आधिकाऱ्यांनी त्यांना दिलेली जबाबदारी वेळेत पूर्ण करावी, तसेच याप्रसंगी कुठल्याही प्रकारचा शिष्टाचार भंग होणार नाही, याची सर्वांनी काळजी घेणे आवश्यक आहे, असेही श्री.सुर्यवंशी यांनी यावेळी सांगितले.

स्वातंत्र्य दिनाचा मुख्य समारंभ यशस्वीपणे पार पाडण्यासाठी प्रत्येक शासकीय विभागाला जबाबदारी सोपविण्यात आली आहे. त्या सर्व विभागानी आपली जबाबदारी  योग्यपणे व इतर विभागाशी समन्वय ठेवून पार पाडावी. सर्वजनिक बांधकाम विभागाने मुख्य ध्वजारोहणाच्या अनुषंगाने मंडप, मैदानाची दुरुस्ती, ध्वजस्तंभाची रंगरंगोटी या व इतर आवश्यक सुविधांचे नियोजन करावे.  त्याप्रमाणेच मुख्य कार्यक्रमात पथ संचलनात सहभागी होणाऱ्या पोलीस कर्मचारी व विद्यार्थी तसेच नागरिकांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी, अशा सूचना निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी यांनी यावेळी संबंधितांना दिल्या. तसेच घरोघरी तिरंगा हा उपक्रम यशस्वीरित्या राबविण्यासाठी सर्व अधिकाऱ्यांनी प्रयत्न करावीत,असेही श्री.सुर्यवंशी यांनी यावेळी आवाहन केले.

 

****

No comments: