18 December, 2023

 

शेतकऱ्यांसाठी रब्बी हंगाम पीक स्पर्धेचे आयोजन

31 डिसेंबर पर्यंत शेतकऱ्यांनी सहभागी होण्याचे आवाहन

 

हिंगोली (जिमाका), दि. 18 : राज्यामध्ये पिकाची उत्पादकता वाढविण्यासाठी विविध भागांमध्ये शेतकऱ्यांकडून विविध प्रयोग करण्यात येतात व उत्पादकतेत वाढ करण्यात येते. शा  प्रयोगशील शेतकऱ्यांना मिळालेल्या उत्पादकतेबाबत प्रोत्साहन देऊन गौरव केल्यास त्यांची इच्छाशक्‍ती, मनोबल यामध्ये वाढ होऊन आणखी उमेदीने नवनवीन अद्यावत तंत्रज्ञानाचा वापर केला जाईल. यामुळे कृषि उत्पादनामध्ये भर घालण्यासाठी शेतकऱ्यांचे योगदान मिळेल. तसेच त्यांचे मार्गदर्शन परिसरातील इतर शेतकऱ्यांना  होऊन राज्याच्या एकूण उत्पादनात मोलाची भर पडेल. हा उद्देश  ठेऊन शेतकऱ्यांसाठी रब्बी हंगाम-2023 साठी राज्यांतर्गत  पीकस्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

      वंचित, दुर्लक्षित तसेच पौष्टिक तृणधान्य पिकांच्या क्षेत्रात आणि उत्पादन तंत्रज्ञानात वाढ होण्याची आवश्यकता विचारात घेऊन तसेच जास्तीत जास्त शेतकरी पिक स्पर्धांमध्ये सहभागी होतील, या दृष्टीकोनातून दि. 20 जुलै, 2023 च्या शासन निर्णयान्वये रब्‍बी हंगाम-2023 पासून पिकस्‍पर्धा तालुका, जिल्‍हा व राज्‍य पातळीवर राबविण्‍यात येणार आहे. त्यानुसार कृषी विभागामार्फत रब्बी हंगाम सन 2023 मध्ये सर्वसाधारण व आदिवासी गटासाठी ज्वारी, गहू, हरभरा, करडई व जवस  या पाच पिकांसाठी पिकस्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 31 डिसेंबर, 2023 पर्यंत आहे. अर्ज दाखल करण्‍याच्‍या तारखेच्या दिवशी शासकीय सुट्टी असल्‍यास त्‍यापुढील शासकीय सुट्टी  नसलेली तारीख गृहीत धरण्‍यात यावी. पीकनिहाय स्पर्धेसाठी सर्वसाधारण गटासाठी 300 रुपये व आदिवासीसाठी 150 रुपये प्रवेश शुल्क राहील.

 या स्पर्धेत भाग घेण्यासाठी शेतकऱ्याकडे स्वतःच्या नावे जमीन असणे व ती जमीन तो स्वतः कसत असणे आवश्यक आहे. स्पर्धेत भाग घेणाऱ्या शेतकऱ्याला एकाच वेळी एकापेक्षा जास्त पिकासाठी स्पर्धेत भाग घेता येईल. पिक स्पर्धेमध्ये सहभागी लाभार्थीच्या स्वतःच्या शेतावर त्या पिकाखाली किमान  40 आर क्षेत्रावर सलग लागवड असणे आवश्यक आहे. या स्पर्धेसाठी अर्ज करण्यासाठी विहित नमुन्यातील अर्ज (प्रपत्र-अ), ठरवून दिलेले प्रवेश शुल्क भरल्याचे चलन, सातबारा, आठ-अ चा उतारा, जात प्रमाणपत्र (केवळ आदिवासी असल्यास), पिक स्पर्धेसाठी शेतकऱ्यांने संबंधित सातबारा वरील घोषित केलेल्या क्षेत्राचा चिन्हांकित केलेला नकाशा, बँक खाते चेक, पासबूकच्या पहिल्या पानाची छायांकित प्रत आदी कागदपत्रे आवश्यक आहेत.

            तालुकास्तर, जिल्हास्तर, व राज्यस्तरावरील पिकस्पर्धा निकाल-  प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाचे पिकस्पर्धा विजेते निवडण्यात येणार आहेत. तालुकास्तरीय पहिले बक्षीस 5 हजार रुपये, दुसरे बक्षीस 3 हजार रुपये व तिसरे बक्षीस 2 हजार रुपये असणार आहेत. जिल्हास्तरीय पहिले बक्षीस 10 हजार रुपये, दुसरे 7 हजार रुपये व तिसरे 5 हजार रुपये आहे. तर राज्यस्तरीय पहिले बक्षीस 50 हजार रुपये, दुसरे 40 हजार रुपये व तिसरे बक्षीस 30 हजार रुपये असणार आहे.

   दुय्यम तसेच पौष्टिक तृणधान्य पिकांच्या क्षेत्रात आणि उत्पादनात वाढ व्‍हावी यासाठी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी पिक स्पर्धेत सहभागी व्हावे,असे आवाहन कृषि विभागामार्फत करण्यात आले आहे. पिक स्पर्धेबाबत अधिक माहितीसाठी संबंधित तालुका कृषि अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच महाराष्ट्र शासनाच्या कृषि विभागाच्या www.krishi.maharashtra.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी,असे आवाहन शिवराज घोरपडे,जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी, हिंगोली यांनी केले आहे.

*****  

No comments: