17 December, 2023

 

विकसित भारत संकल्प यात्रेला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

 

·         सरकाळी येथील कार्यक्रमास केंद्रीय उपसचिव कौस्तुभ गिरी यांची प्रमुख उपस्थिती

 




हिंगोली (जिमाका), दि. 17 :   केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनेविषयी प्रत्येक गावात विश्वासर्हता निर्माण व्हावी, लोकांच्या शंकांचे निरसन व्हावे आणि सर्व वंचित घटकातील समाजाला लाभ मिळावा यासाठी विकसित भारत संकल्प यात्रा आपल्या गावापर्यंत येत आहे. या विकसित भारत संकल्प यात्रेला ग्रामीण उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. आज हिंगोली तालुक्यातील सरकाळी येथे केंद्र शासनाचे उपसचिव तथा विकसित भारत संकल्प यात्रेचे जिल्हा प्रभारी  कौस्तुभ गिरी यांनी आज भेट देऊन ग्रामस्थांशी संवाद साधला.

सर्वसामानयांना विकासाच्या प्रवाहात येता यावे, त्यांना जीवन जगण्याचे साधन उपलब्ध व्हावे, आरोग्यापासून निवासापर्यंत सर्व प्रकारच्या सुविधा मिळाव्यात, शिक्षणासह स्वयंरोजगाराचे मार्ग समृध्द व्हावेत यासाठी केंद्र व राज्य सरकारने अनेक लोककल्याणकारी योजना राबवित आहे. पात्र लाभार्थ्यांना या योजनांचा लाभ पोहोचावा यासाठी जिल्हा प्रशासन दक्ष आहे. लोकांच्या मनामध्ये शासकीय योजनाप्रती ज्या काही धारणा आहेत त्या या यात्रेतून अधिक भक्कम होण्यास मोलाची मदत होत आहे. जिल्हा प्रशासनाच्या वतीने ही यात्रा प्रत्येक लाभधारकापर्यंत पोहोचविण्यासाठी सूक्ष्म नियोजन केले आहे. या सर्व योजनांचा लाभ सर्व वंचित घटकातील समाजाने घ्यावा,असे आवाहन यावेळी जिल्हा प्रशासनाने केले आहे.

विकसित भारत संकल्प यात्रेत आज सरकळी येथे केंद्र शासन व राज्य शासनाच्या विविध विभागाच्या विविध योजनांची माहिती गावातील प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचवण्याकरिता शासनाने पाठविलेल्या एलईडी रथामधून देण्यात आली. याप्रसंगी गावातील महिला व पुरुष मंडळींनी या एलईडी रथासोबत आलेल्या विविध योजनांचा लाभ घेतला. या कार्यक्रमात सरकळी येथे आज उपसचिव कौस्तुभ गिरी यांच्या हस्ते आयुष्यमान कार्ड, जात प्रमाणपत्र, अधिवास प्रमाणपत्र, नमुना आठ, विवाह नोंदणी आदी विविध प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले. यावेळी सहायक गटविकास अधिकारी विष्णू भोजे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविकात शासनाच्या विविध योजनांची माहिती दिली.

यावेळी पंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी ए.एल. बोंद्रे, हिंगोलीचे तहसीलदार नवनाथ वगवाड, गटविकास अधिकारी गणेश बोथीकर, सहायक गटविकास अधिकारी विष्णू भोजे, बाल विकास प्रकल्प अधिकारी आर.आर. मगर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. नामदेव कोरडे यांच्यासह मंडळ अधिकारी, तलाठी, ग्रामसेवक उपस्थित होते.

            यावेळी बालाजी खंडूजी गायवाळ यांनी महात्मा गांधी रोजगार हमी योजनेतून सिंचन विहीर मिळाल्यामुळे, माधव पाटोळे यांनी प्रधानमंत्री आवास योजनेतून घरकुल मिळाल्यामुळे तर उत्तम पाटोळे यांनी आयुष्यमान भारत कार्डच्या माध्यमातून उपचार मिळाल्यामुळे केंद्र व राज्य शासनाचे तसेच जिल्हा प्रशासनाचे आभार व्यक्त केले. तसेच यावेळी ड्रोन यंत्राद्वारे कोणती कामे करता येतात याबाबतचे प्रात्यक्षिक करुन दाखवण्यात आले. या विकसित भारत संकल्प यात्रेला सरकाळी गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

******

 

No comments: