07 September, 2021

जिल्हाधिकारी कार्यालयात राजे उमाजी नाईक यांना अभिवादन

 


जिल्हाधिकारी कार्यालयात राजे उमाजी नाईक यांना अभिवादन

 

हिंगोली (जिमाका), दि.7 :  राजे उमाजी नाईक यांच्या जयंतीनिमित्त अप्पर जिल्हाधिकारी शंकर बरगे  यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात राजे उमाजी नाईक यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी,  उपजिल्हाधिकारी  गोविंद रणवीरकर, जिल्हा पुरवठा अधिकारी श्रीमती अरुणा संगेवार आदिंसह‍ प्रशासकीय इमारतीमधील सर्व विभागप्रमुख व कर्मचारी यांनी राजे उमाजी नाईक यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.

 

                                                            *****

 

 

06 September, 2021

 

जिल्ह्यात कोविड-19 चा नवीन एकही रुग्ण नाही  

तर 02 रुग्णांवर उपचार सुरु

 

हिंगोली, (जिमाका) दि. 06 : जिल्ह्यात  कोविड-19 चा नवीन एकही नाही, तर 02 रुग्णावर उपचार सुरु असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजेंद्र सुर्यवंशी यांनी आज दिली आहे.

           जिल्ह्यात आजपर्यंत कोविड-19 चे एकूण  16 हजार 29 रुग्ण झाले असून, त्यापैकी  15 हजार 635 रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आज घडीला जिल्ह्यात 02 कोविड-19 पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तसेच कोविड-19 मुळे जिल्ह्यात आतापर्यंत 392 व्यक्तींचा मृत्यू झाला असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राजेंद्र सुर्यवंशी यांनी कळविले आहे.

*******

 

घरगुती गणेशोत्सव सजावट स्पर्धा

उत्सव गणेशाचा जागर मताधिकाराचा

 

हिंगोली, (जिमाका) दि. 06 : दरवर्षी भाद्रपद महिन्यातील गणेश चतुर्थीला महाराष्ट्रातील गणेश भक्तांच्या घरी तसेच सार्वजनिक गणेश मंडळांमध्ये गणेशाचे आगमन होते आणि वातावरण चैतन्याने भरुन जाते. स्वातंत्र्यपूर्व काळात समाज प्रबोधनासाठी सुरु केलेली सार्वजनिक गणेशोत्सवाची परंपरा महाराष्ट्र आजही त्याच हिरिरीने जपतो आहे. याच प्रयत्नाचा एक भाग म्हणून यंदा महाराष्ट्र राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालय आणि बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समिती यांच्या संयुक्त विद्यमाने ‘उत्सव गणेशाचा जागर मताधिकाराचा’ हा विषय घेऊन उपक्रम आयोजित करण्यात येणार आहेत.

यंदा कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक गणेश मंडळांना देखाव्यांच्या आयोजनावर असलेली बंधने लक्षात घेऊन घरगुती गणेशोत्सव सजावट स्पर्धा आयोजित केली जाणार आहे. सार्वजनिक मंडळांबरोबरच घरोघरीही गणेशाची सुंदर आरास केली जाते. घरोघरी छोटेखानी देखावे साकारले जातात. अशा देखाव्यांच्या माध्यमातून सामाजिक संदेश देखील दिला जातो. या स्पर्धेचा विषय ‘उत्सव गणेशाचा जागर मताधिकाराचा’ हा आहे. मताधिकार हा 18 वर्षांवरील नागरिकाचा कायदेशीर अधिकार आहे. त्यासाठी प्रत्येक पात्र नागरिकाने आपले नाव मतदार यादीत नोंदवणे आणि मताधिकार बजावणे आवश्यक आहे. हे सूत्र केंद्रस्थानी ठेवून गणेश-मखराची सजावट, गणेश दर्शनासाठी घरी येणाऱ्या भाविकांमध्ये, नातेवाईकांमध्ये मतदार नाव नोंदणी, वगळणी यासंबंधीची जागरुकता करण्यासाठी अभिनव कल्पना राबवता येतील. तसेच मताधिकार बजावताना, जात, धर्म, पंथ निरपेक्ष राहून आपला लोकप्रतिनिधी निवडणे, पैसे किंवा इतर आमिषांना बळी न पडता मताधिकार बजावणे, यांसारख्या विषयांवर, घरगुती गणेशोत्सव सजावटीतूनही जागृती करता येऊ शकते. मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या संकेतस्थळावर आणि समाजमाध्यमांवर स्पर्धेची सविस्तर नियमावली देण्यात आलेली आहे.

या स्पर्धेबरोबरच सार्वजनिक गणेश मंडळांमार्फत निवडणूक आयोगाचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम, तसेच मतदार नाव नोंदणी आणि वगळणी यांसाठी प्रसार-प्रचार केला जाणार आहे. गणेश मंडळाच्या मंडपात आणि ऑनलाइन माध्यमांद्वारेही ही जागृती केली जाणार आहे. मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे आणि बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीचे अध्यक्ष अॅ़ड. नरेश दहिबावकर यांनी अधिकाधिक नागरिकांना या उपक्रमामध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.

दि. 1 जानेवारी 2022 या अर्हता दिनांकावर आधारित मतदार याद्यांच्या पुनरीक्षणांचा कार्यक्रम दि. 1 नोव्हेंबर 2021 पासून सुरु होत आहे. यामध्ये 1 जानेवारी 202 रोजी 18 वर्षे पूर्ण होणाऱ्या नवमतदारांच्या नोंदणीसाठी अर्ज स्वीकारले जातील.

*****

02 September, 2021

 

जिल्ह्यात कोविड-19 चा नवीन 01 रुग्ण ;  तर 02 रुग्ण बरे झाल्याने डिस्चार्ज

05 रुग्णांवर उपचार सुरु

 

हिंगोली, (जिमाका) दि. 02 : जिल्ह्यात 01 नवीन कोविड-19 रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजेंद्र सुर्यवंशी यांनी आज दिली आहे.

आज प्राप्त झालेल्या अहवालानुसार आरटीपीसीआर टेस्टद्वारे हिंगोली परिसरात 01 व्यक्ती कोविड-19 पॉझिटिव्ह आढळून आला आहे. तर 02 कोविड-19 रुग्ण बरे झाल्याने त्यांना आज डिस्चार्ज देण्यात आला आहे.

           जिल्ह्यात आजपर्यंत कोविड-19 चे एकूण  16 हजार 29 रुग्ण झाले असून, त्यापैकी  15 हजार 632 रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आज घडीला जिल्ह्यात 05 कोविड-19 पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तसेच कोविड-19 मुळे जिल्ह्यात आतापर्यंत 392 व्यक्तींचा मृत्यू झाला असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राजेंद्र सुर्यवंशी यांनी कळविले आहे.

*******

 


रेशीम शेती प्रशिक्षणाचे उद्घाटन संपन्न

हिंगोली (जिमाका), दि. 02 : जिल्हा रेशीम कार्यालय एस.बी.आयच्या जिल्हा ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थेच्या संयुक्त विद्यमाने येथील जिल्हा ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण (आरसेटी) संस्थेमध्ये जिल्ह्यातील रेशीम उत्पादक शेतकऱ्यांसाठी दि.31 ऑगस्ट, 2021 ते 9 सप्टेंबर, 2021 या कालावधीत रेशीम शेती या विषयावर निवासी तांत्रिक उद्योजकता प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रशिक्षणाचे उद्घाटन आज जिल्हा रेशीम विकास अधिकारी स्वप्नील तायडे , एस.बी.आय आर.से.टी चे संचालक श्री.बोईले जिल्हा रेशीम कार्यालयाचे वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक अशोक वडवळे यांच्या उपस्थितीत संपन्न झाले.

              यावेळी  रेशीम कार्यालयाचे वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक अशोक वडवळे यांनी  रेशीम शेती हा पारंपारिक शेतीला उत्तम जोडधंदा असून शेतकऱ्यांनी स्वत:चा उत्कर्ष साधून घेण्यासाठी रेशीम शेतीचा पर्याय स्वीकारावा, असे आवाहन केले. तर जिल्हा रेशीम विकास अधिकारी स्वप्नील तायडे यांनी  जिल्हयातील शेतकऱ्यांनी रेशीम शेतीचा स्वीकार करुन आपले उत्पन्न दुप्पट करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करत  रहावे, असे आवाहन केले.

            या प्रशिक्षणाला जिल्हयातील तोंडापुर, आंबा, आरळ, चुंचा करंजी येथील 35 शेतकरी  उपस्थित आहेत. या सर्वांना पुढील 10 दिवस निवासी प्रशिक्षण देण्यात येणार आहे. प्रशिक्षणामधे रेशीम शेती विषयाचे तांत्रिक मार्गदर्शन तसेच उद्योजकता विकास या बाबतीत सखोल मार्गदर्शन केले जाणार आहे. या प्रशिक्षण कालावधीत जिल्हा रेशीम कार्यालयाचे रमेश भवर, शिलवंत इंगोले, रंगनाथ जांबुतकर, रजनीश कुटे, तान्हाजी परघणे  हे मार्गदर्शन करणार आहेत.

*****

01 September, 2021

 

जिल्ह्यात कोविड-19 चा नवीन एकही रुग्ण नाही  

01 रुग्ण बरा झाल्याने डिस्चार्ज तर 06 रुग्णांवर उपचार सुरु

 

हिंगोली, (जिमाका) दि. 01 : जिल्ह्यात  कोविड-19 चा नवीन एकही नाही, तर 01 रुग्ण बरा झाल्याने डिस्चार्ज देण्यात आले असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजेंद्र सुर्यवंशी यांनी आज दिली आहे.

           जिल्ह्यात आजपर्यंत कोविड-19 चे एकूण  16 हजार 28 रुग्ण झाले असून, त्यापैकी  15 हजार 630 रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आज घडीला जिल्ह्यात 06 कोविड-19 पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तसेच कोविड-19 मुळे जिल्ह्यात आतापर्यंत 392 व्यक्तींचा मृत्यू झाला असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राजेंद्र सुर्यवंशी यांनी कळविले आहे.

*******

 

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आरोग्याची काळजी घेवून गणेशोत्सव साजरा करावा

- जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर

 


हिंगोली (जिमाका), दि. 01 : संभाव्य तिसरी लाटेची शक्यता लक्षात घेऊन कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आरोग्याची काळजी घेऊन गणेशोत्सव साजरा करावा. तसेच खबरदारी म्हणून कमीत कमी गणेश मूर्तीची स्थापना करावी, असे  आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी केले.

            जिल्हाधिकारी कार्यालयाच्या डिपीसी सभागृहात आयोजित शांतता कमिटीच्या बैठकीत जिल्हाधिकारी पापळकर बोलत होते. यावेळी पोलीस अधीक्षक राकेश कलासागर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय दैने, अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत काळे, सहायक पोलीस अधीक्षक यतीष देशमुख, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी, उप विभागीय अधिकारी उमाकांत पारधी यांची प्रमुख उपस्थिती होती.

 जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर पुढे म्हणाले की, डेंग्यू, मलेरिया आणि कोविडच्या लक्षणात जवळपास साम्य आहे. त्यामुळे कोविडची तपासणी केल्याशिवाय कोविडची बाधा झाल्याचे लक्षात येत नाही. त्यामुळे सर्दी, फडसे आलेल्या मंडळाच्या सदस्यांनी मंडळाच्या ठिकाणी जाण्याचे टाळावेत. प्रत्येक मंडळाच्या सदस्यांनी आपल्यामुळे कोविडमध्ये वाढ होणार नाही याची खबरदारी घ्यावी. आपले कुटुंब, नातेवाईक यांचे रक्षण करावे. याची सुरुवात आपल्या घरापासूनच करावी  आणि सर्वांनी जबाबदारीने गणेशोत्सव साजरा करावा. मंडळाच्या ठिकाणी मास्क, सॅनिटायझर व सुरक्षित अंतर या कोविडच्या त्रिसूत्रीचे पालन करावे.

कोविड-19 च्या अनुषंगाने यावर्षी जिल्ह्यातील सर्व गणेश मंडळांनी श्री गणेशाची मुर्ती सार्वजनिक मंडळाच्या ठिकाणी 04 फुट व घरगुती गणपती 02 फुटांच्या मर्यादेत प्रतिष्ठापणा करावी. सार्वजनिकरित्या गणपती न बसवता घरच्या घरीच पर्यावरणपूरक गणपतीची प्रतिष्ठापना करावी. आरती, भजन, किर्तन वा अन्य धार्मिक कार्यक्रम आयोजित करतांना भाविकांसाठी फेसबुक लाईव्ह, केबल तसेच अन्य सोशल मिडीयाचा वापर करुन थेट प्रक्षेपण करावे. जेणेकरुन भक्तांना घर बसल्या दर्शनाचा लाभ घेता येईल.ऑनलाईन माध्यमातून प्रक्षेपण करावे. गणेशाच्या मूर्ती इको फ्रेंडली असाव्यात. यासाठी गणेश मंडळांनी पुढाकार घ्यावा. आगमन व विसर्जनासाठी गर्दीत जाणे टाळून स्वत: व कुटुंबियांचे कोरोना साथीच्या रोगापासून संरक्षण करावे, असेही जिल्हाधिकारी पापळकर यांनी यावेळी सांगितले.

गणेश मुर्तीचे विसर्जन करण्यासाठी कृत्रिम तलाव तयार करण्यात येणार आहेत. शक्यतो श्रीगणेशाचे विसर्जनही घरच्या घरीच करावे. तर नागरी भागातील विसर्जन हे नगर पालिकेमार्फत आपल्या वार्डात विशेष गाडीच्या मार्फत करण्यात येणार असून जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी कोविड-19 च्या नियमांचे पालन करुन आपले एक जबाबदार नागरिक असल्याचे कर्तव्य पार पाडावे व गणेशोत्सव, गौरी पूजनच्या अनुषंगाने गर्दी न करता कोरोनाच्या प्रतिबंधात्मक उपाय योजनांचे तंतोतंत पालन करावे, असे आवाहन करुन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी सर्वांना गणेशोत्सवाच्या व गौरीपूजनाच्या शुभेच्छा दिल्या.   

              यावेळी पोलीस अधीक्षक  राकेश कलासागर यांनी शासनाने दिलेल्या मार्गदर्शन सुचनानुसार गणेशोत्सव साजरा करावा. कोविड-19 च्या अनुषंगाने यावर्षी जिल्ह्यातील सर्व गणेश मंडळांनी श्री गणेशाची मुर्ती सार्वजनिक मंडळाच्या ठिकाणी 04 फुट व घरगुती गणपती 02 फुटांच्या मर्यादेत प्रतिष्ठापणा करावी व अत्यंत साध्या पध्दतीने गणेशोत्सव साजरा करावा. सर्व गणेश मंडळांनी गणेश मुर्तीची प्रतिष्ठापना व विसर्जन अशा कोणत्याही प्रकारच्या मिरवणूकीस परवानगी नसल्याचे स्पष्ट केले. पर्यावरण नियंत्रण मंडळाने किंवा इतर प्राधिकरणाने ठरवून दिलेल्या मापदंडाचे उल्लंघन करीत फटाक्याचा वापर करुन ध्वनी किंवा हवेचे प्रदुषण करण्यास प्रतिबंध असेल. सार्वजनिक गणेश मंडळाच्या ठिकाणी तिर्थ प्रसाद व महाप्रसादाचे आयोजन करण्यात येवू नये. मंदिर परिसर, विसर्जनाच्या ठिकाणी, गणेश उत्सवाच्या ठिकाणी गर्दी होऊ नये म्हणून कलाकारांच्या कलागुणांचे सादरीकरण करण्यासाठी परवानगी राहणार नाही. तसेच गणेशोत्सवानिमित्त कोरोना नियमांचे पालन करुन विविध आरोग्य उपक्रम, स्वच्छता, ध्वनी प्रदूषण, इको फ्रेंडली गणेशाची स्थापना, रक्तदान अशा सामाजिक उपक्रम राबविणाऱ्या गणेश मंडळांना पारितोषिक देण्यात येणार आहे. यासाठी प्रत्येक पोलीस स्टेशनमधून तीन गणेश मंडळाची निवड करुन त्यांचा सत्कार करण्यात येणार असल्याची माहिती दिली.

              प्रारंभी अपर पोलीस अधीक्षक यशवंत काळे यांनी सार्वजनिक गणेशोत्सव दि. 10 सप्टेंबर ते 19 सप्टेंबर, 2021 या कालावधीत साजरा होत आहे. या गणेशोत्सवाच्या अनुषंगाने राज्य शासनाकडून आलेल्या मार्गदर्शक सूचनांची माहिती बैठकीत उपस्थित सर्व गणेश मंडळांच्या प्रतिनिधींना दिली. सहायक पोलीस अधीक्षक यतीष देशमुख यांनी  आभार मानले.

या बैठकीस तहसीलदार, सर्व नगर परिषदेचे मुख्याधिकारी, सर्व पंचायत समितीचे गटविकास अधिकारी, पोलीस विभागाचे सर्व अधिकारी, जिल्ह्यातील गणेश मंडळाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

****