06 September, 2025

श्री गणेशोत्सव काळात अवैद्य मद्य विक्रीवर छापे * ४ लाख ६६ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त

हिंगोली (जिमाका),दि.६: राज्य उत्पादन शुल्क हिंगोली विभागाने दिनांक ३, ४ व ५ सप्टेंबर २०२५ रोजी "श्रीगणेश उत्सव" काळात अवैध मद्य वाहतुकीवर करडी नजर ठेवत मोहीम राबवून राज्य उत्पादन शुल्कचे निरीक्षक , राज्य उत्पादन शुल्क भरारी पथकाचे निरीक्षक तसेच हिंगोली दुय्यम निरीक्षक बिट क्र. १,२,३ यांच्या पथकाने सेनगांव, कळमनुरी, हिंगोली, वसमत व औंढा नागनाथ परिसरात अवैध मद्य विक्री, वाहतूक विरोधात छापे टाकून ०३ आरोपीविरुध्द महाराष्ट्र दारुबंदी कायदा १९४९ चे कलमांतर्गत गुन्हे नोंद करण्यात आले आहेत. या कारवाईत देशी मद्याच्या १८० मिलीच्या ८०८ बाटल्या (१८० मिली बॉटलचे १७ बॉक्स) व १ चार चाकी वाहन, २ दुचाकी वाहन असा एकूण ४ लाख ६६ हजार २८० रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करुन ०३ आरोपीविरुध्द महाराष्ट्र दारुबंदी कायदा १९४९ चे कलमांतर्गत गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. वरील कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक आदित्य पवार यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक मोहन मातकर, निरीक्षक भरारी पथक रमेश चाटे, दुय्यम निरीक्षक टी.बी. शेख, कृष्णकांत पुरी (बिट क्र.१ व ३), प्रदीप गोणारकर (बिट क्र. २), तसेच सहायक दुय्यम निरीक्षक श्री.कांबळे, जवान आडे, राठोड, वाहनचालक वाघमारे व इतर कर्मचारी यांनी पार पाडली. *****

04 September, 2025

जागतिक कौशल्य स्पर्धेत सहभागी होण्यासाठी 30 सप्टेंबरपर्यंत नोंदणी करा

हिंगोली (जिमाका), दि. 4 : जगातील सर्वात मोठ्या कौशल्य स्पर्धेचे आयोजन सन 2026 मध्ये करण्याचे निश्चित झाले आहे. या जागतिक कौशल्य स्पर्धेचे आयोजन दर दोन वर्षांनी करण्यात येते. सन 2026 मध्ये या स्पर्धेचे आयोजन शांघाई येथे करण्यात येणार असून ही जगातील सर्वात मोठी व्यावसायिक शिक्षण व कौशल्य उत्कृष्टता स्पर्धा आहे. हिंगोली जिल्ह्यातील 23 वर्षांखालील तरुणांसाठी त्यांच्यातील कौशल्य सादर करण्यासाठी ही सुवर्ण संधी आलेली आहे. या स्पर्धेच्या पूर्व तयारीच्या दृष्टीने 63 क्षेत्रांशी संबंधित जिल्हा व राज्यस्तरावर व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय, क्षेत्रातील कौशल्य स्पर्धा (सेक्टर स्कील कॉम्प्यूटेशन), विविध औद्योगिक आस्थापना यांच्या सहकार्याने कौशल्य स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहे. या स्पर्धेचे आयोजन प्रथमत: जिल्हास्तर, तद्नंतर विभागस्तर व राज्यस्तरावर होणार असून त्यात निवड झालेले उमेदवार देशपातळीवर व देशपातळीवरील निवड झालेले उमेदवार जागतिक नामांकनासाठी पाठविण्यात येतील. जागतिक कौशल्य स्पर्धा सन 2026 मधील जिल्हास्तरीय कौशल्य स्पर्धेसाठी पात्रता निकष खालील प्रमाणे निश्चित करण्यात आलेले आहे. जागतिक कौशल्य स्पर्धा 2026 करिता वयोमर्यादा हा एकमेव निकष ठरविण्यात आलेला आहे. या स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी 50 क्षेत्रांकरिता उमेदवाराचा जन्म दिनांक 01 जानेवारी, 2004 किंवा तद्नंतरचा असणे अनिवार्य आहे. तसेच डिजिटल कन्स्ट्रक्शन, क्लाऊड कॉम्प्यूटींग, सायबर सेक्युरिटी, आयसीटी नेटवर्क इन्फ्रास्ट्रक्चर, ॲडिटीव्ह मॅन्यूफॅक्चरींग, इंडस्ट्रीयल डिझाईन टेक्नॉलॉजी, इंडस्ट्री 4.0, मेट्रॉनिक्स (Mechatronics), ऑप्टोइलेक्ट्रॉनिक टेक्नॉलाजी, रोबोट सिस्टीम इंटीग्रेशन, वाटर टेक्नॉलाजी, डेंटल प्रोस्थेटीक्स, एअरक्राफ्ट मेंटनन्स या क्षेत्रांसाठी उमेदवाराचा जन्म दिनांक 01 जानेवारी, 2001 किंवा तद्नंतरचा असणे अनिवार्य आहे. शांघाई येथे आयोजित जागतिक कौशल्य स्पर्धा 2026 करिता जिल्हा, विभाग, राज्य आणि देशपातळीवरुन प्रतिभासंपन्न, कुशल उमेदवारांचे नामांकन करण्याच्या दृष्टीने आयोजित स्पर्धेसाठी सर्व आयटीआय, पॉलटेक्नीक, एमएसएमई टूल्स रुम, सीआयपीईटी, आयआयटी, अभियांत्रिकी महाविद्यालय, आयएचएम/हॉस्पिटॅलिटी इन्स्टिट्यूट, कार्पोरेट टेक्निकल इन्स्टीट्यूट, कौशल्य प्रशिक्षण संस्था, महाविद्यालये, महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ, एमएसबीव्हीइटी, खाजगी कौशल्य विद्यापीठ, फाईपन आर्ट कॉलेज, फ्लॉवर ट्रेनिंग इन्स्टीट्यूट, इन्स्टीट्यूट ऑफ ज्वलेरी मेकींग, कौशल्य प्रशिक्षण केंद्र (टीपी/टीसी/व्हीटीआय) इत्यादी सर्व संस्था, आस्थापनांना आपणाकडील विद्यार्थी, प्रशिक्षणार्थी, कामगारांना स्पर्धेत सहभागी होण्यासाठी अवगत करण्यात यावे. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी इच्छूक असणाऱ्या उमेदवारांनी https://www.skillindiadigital.gov.in या लिंकवर भेट देऊन दिनांक 30 सप्टेंबर, 2025 पर्यंत नोंदणी करणे आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी या कार्यालयाचा दुरध्वनी क्र. 02456 - 224574 यावर किंवा कार्यालयाचा पत्ता : मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, 3 रा माळा, हिंगोली येथे कार्यालयीन वेळेत संपर्क करावा आणि जिल्ह्यातील जास्तीत जास्त उमेदवारांनी या स्पर्धेत सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त बा. सु. मरे यांनी केले आहे. *****

दूध उत्पादक शेतकऱ्यांनी बँकेत जाताना प्रकल्प तयार ठेवावा-सुजित झोडगे

हिंगोली, दि. 4 (जिमाका): दुग्ध व्यवसायातून उत्पादन वाढीसाठी शेतकऱ्यांनी बँकेत कर्जासाठी अर्ज करताना नियोजित प्रकल्प तयार ठेवावा, असे आवाहन जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक सुजित झोडगे यांनी यावेळी केले. वसमत तालुक्यातील पांगरा शिंदे येथे आयोजित दूध उत्पादक शेतकरी कर्जमेळाव्यात जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक श्री. झोडगे यांनी शेतकऱ्यांना आज मार्गदर्शन केले. यावेळी पशुसंवर्धन उपायुक्त सखाराम खुणे, बँक व्यवस्थापक शालिकराम जाधव, प्रदीप महाजन, श्रीपाद दैठणकर, राहुल बेंदोले, सहाय्यक आयुक्त (वसमत) डॉ. अजय मुस्तुरे, राजेसाब कल्यापुरे आणि पशुधन पर्यवेक्षक प्रवीण पंचलिंगे उपस्थित होते. उत्पादन वाढविण्यासाठी दूध उत्पादक शेतकऱ्यांनी कर्ज मिळविण्यासाठी बँकेत अर्ज करताना त्यांचा नियोजित प्रकल्प सोबत ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. या प्रकल्पामुळे बँकेला कर्ज मंजुरी सोपी होते, तसेच शेतकऱ्याच्या कर्ज परतफेडीबाबत अधिक स्पष्टता येते, असेही श्री. झोडगे म्हणाले. केंद्र व राज्य शासनाच्या वतीने राष्ट्रीय दुग्ध विकास मंडळाकडून दूध उत्पादन वाढविणे आणि दुग्ध व्यवसाय उद्योगाला प्रोत्साहन देणे हा मुख्य उद्देश्य आहे. शासनाच्या मत्स्य व्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय विभागामार्फत हा प्रकल्प राबविण्यात येत आहे. त्यामुळे या मेळाव्याचे आयोजन स्थानिक दुग्ध संकलन केंद्राच्या वतीने करण्यात आले होते. कार्यक्रमात शेतकऱ्यांना बँक कर्ज प्रक्रिया, आवश्यक कागदपत्रे, तसेच प्रकल्प लेखनाविषयी सविस्तर माहिती देण्यात आली. हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी दुधाचे उत्पादन वाढवण्यासाठी जिल्हाधिकारी राहुल गुप्ता स्वतः पुढाकार घेत आहेत. दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांना गायी, म्हशी किंवा शेळ्या खरेदीसाठी बँका कर्ज उपलब्ध करून देतात. मात्र शेतकऱ्यांनी प्रकल्प तयार ठेवणे गरजेचे असल्याचे पशुसंवर्धन उपायुक्त सखाराम खुणे यांनी सांगितले. मेळाव्याला बँक ऑफ इंडिया, स्टेट बँक ऑफ इंडिया, शिरड शहापूर व चौंढी रेल्वे स्टेशन शाखा व्यवस्थापक, तसेच पशुसंवर्धन विभागातील अधिकारी उपस्थित होते. परिसरातील पांगरा शिंदे, लोहरा, वापटी, कुपटी आदी गावांतील शेतकऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक रमेश चेंडके यांनी केले तर संचालन प्रताप शिंदे यांनी केले. ज्ञानेश्वर वानखेडे यांनी आभार मानले. मेळावा यशस्वी करण्यासाठी सोपान मारकळ व साईनाथ शिंदे यांच्यासह शेतकऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. *****

शिक्षक अभियोग्यता परीक्षेची गुण यादी प्रसिद्ध

हिंगोली (जिमाका), दि. 4 : शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी परीक्षा 2025 ही दि. 27 ते 30 मे व दि. 2 ते 5 जून, 2025 या कालावधीत 26 जिल्ह्यांतील 60 परीक्षा केंद्रांवर महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने पार पडली. परीक्षेचे आयोजन ऑनलाइन करण्यात आले होते. 8 दिवस तीन सत्रामध्ये ती घेण्यात आली. परीक्षेसाठी 2 लाख 28 हजार 808 परीक्षार्थी, उमेदवारांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 2 लाख 11 हजार 308 जण प्रविष्ठ झाले होते. परीक्षेचा निकाल दि. 18 ऑगस्ट रोजी www.mscepune.in या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आला आहे. तसेच राखीव ठेवण्यात आलेल्या बीएड व डीएलएड परीक्षेचे 6 हजार 320 प्रविष्ठ विद्यार्थी, उमेदवारांपैकी 2 हजार 789 उमेदवारांचा निकाल दि. 25 ऑगस्ट रोजी प्रसिद्ध करण्यात आला आहे. विद्यार्थी, उमेदवारांच्या मागणीनुसार पुन:श्च विहित नमुन्यातील निकाल www.mscepune.in या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात येत आहे. याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी, असे आवाहन महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या आयुक्तांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे. ***

राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त बॅडमिंटन स्पर्धा संपन्न

हिंगोली(जिमाका), दि. 4: जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या वतीने हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांची जयंती साजरी करून व राष्ट्रीय क्रीडा दिनाचे औचित्य साधून हिंगोली येथील जिल्हा क्रीडा संकुलावर पुरुष खुला गट दुहेरी बॅडमिंटन स्पर्धा संपन्न झाल्या. या स्पर्धेत अनिल शिंदे व नवाज खान या जोडीने प्रथम तर द्वितीय पारितोषिक अंकित राठोर व पियुष साहू या जोडीस मिळाले. तृतीय पारितोषिक संतोष कदम व आसाराम घुगे या जोडीने पटकावले. या पुरुष दुहेरी गटात सोळा संघाने सहभाग नोंदवला होता. या स्पर्धेमध्ये प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाच्या विजेत्यांना जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाकडून आकर्षक ट्रॉफीसह पारितोषिक स्वरूपात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे कळमनुरीचे मुख्याधिकारी रविराज दरक, डॉ. श्रीधर कंदी, कृषी अधिकारी पंकज राठोड, दीपक अग्रवाल, अँड. दत्ता देशमुख, सचिन चौधरी, डॉ.योगेश नलवार, अतुल बोरकर उपस्थित होते. स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी कार्तिक यादव, रुपेश सोनी, देविकांत देशमुख, विवेक चिलमुल, बब्बू अग्रवाल, डॉ.अजय शिरडकर, नकुल राठोड, रवि पाटील, रामेश्वर अग्रवाल, जितेश धूत, शेख वासिम व अर्जून पवार यांनी परिश्रम घेतले. या स्पर्धेकरिता जिल्हा क्रीडा अधिकारी राजेश्वर मारावार, क्रीडा अधिकारी आत्माराम बोथीकर, क्रीडा अधिकारी प्रवीण कोंडेकर, क्रीडा अधिकारी गणेश बोडखे व क्रीडा मार्गदर्शक निळकंठ श्रावण यांचे मार्गदर्शन लाभले. **

कापूस पिकावरील गुलाबी बोंडअळी नियंत्रणासाठी उपाययोजना करण्याचे जिल्हाधिकारी यांचे निर्देश

हिंगोली, दि. 4 (जिमाका) : जिल्ह्यातील कापूस पिकावर वाढत्या गुलाबी बोंडअळीच्या प्रादुर्भावाचे नियंत्रण करण्यासाठी जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी उपाययोजना करण्याचे निर्देश कृषि विभागाला दिले. जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीला जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी आर. एस. कदम, कृषी विज्ञान केंद्र तोंडापूरचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. पी. पी. शेळके, तालुका कृषी अधिकारी व शेतकरी प्रतिनिधी उपस्थित होते. विषय विशेषज्ञ अजय सुगावे यांनी गुलाबी बोंडअळीच्या एकात्मिक व्यवस्थापनाबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. त्यांनी लागवड करतेवेळी, लागवडीनंतर व हंगाम संपल्यानंतर या तिन्ही टप्प्यातील उपाययोजनांचे महत्त्व स्पष्ट केले. वेळेवर फेरोमोन ट्रॅपचा वापर, योग्यवेळी शिफारशीनुसार कीटकनाशक फवारणी, एकाच कीटकनाशकाचा वारंवार वापर टाळणे तसेच शेतातील अवशेष नष्ट करणे यावर भर देण्यात आला. याशिवाय पिकावरील कीड-रोग सर्वेक्षण व क्रॉपसॅप सल्ल्यानुसार उपाययोजना सुचविल्या. प्रादुर्भावग्रस्त व गळालेली पाने व बोंडे गोळा करून नष्ट करावीत. गुलाबी बोंडअळीमुळे डोमकळ्या दिसल्यास त्या तोडून अळ्या नष्ट कराव्यात. प्रति हेक्टर 4 ते 5 कामगंध सापळे तर नर पतंग पकडण्यासाठी 25 सापळे लावावेत. हेक्टरी 25 पक्षीथांबे उभारून पक्ष्यांद्वारे अळ्यांचे नियंत्रण करावे. ट्रायकोग्रॉमाटॉयडीया बॅक्ट्री या परोपजीवी किडीचे कार्ड पिकावर लावावेत. निंबोळी अर्क किंवा अँझाडीरॅक्टीन 5 टक्के वापरून फवारणी करावी. आर्थिक नुकसान पातळी गाठल्यानंतरच शिफारस केलेल्या कीटकनाशकांचा आलटून पालटून वापर करावा. पायरेथ्रॉईड गटातील कीटकनाशकांची फवारणी नोव्हेंबरपूर्वी करू नये, अन्यथा पांढऱ्या माशीचा उद्रेक होऊ शकतो. जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी संबंधित विभागांनी ही माहिती शेतकऱ्यांपर्यंत प्रभावीपणे पोहोचवावी, तसेच जनजागृती करावी, अशा सूचना दिल्या. *****

02 September, 2025

अनुकंपा उमेदवारांना १५ सप्टेंबरला नियुक्ती देण्यासाठी जिल्हास्तरावर प्रक्रिया सुरू

हिंगोली, दि. २ (जिमाका): मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानुसार १५० दिवसांच्या कार्यक्रमांच्या अंतर्गत गट-क संवर्गातील प्रतीक्षा सूचीतील अनुकंपा उमेदवारांना नियुक्ती देण्यासाठी वेळापत्रक निश्चित करण्यात आले आहे. त्यानुसार १५ सप्टेंबर रोजी हे नियुक्तीपत्र देण्यात येणार आहेत, असे जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी प्रसिद्धीपत्रकाव्दारे कळविले आहे. जिल्हास्तरावर सर्व कार्यालय प्रमुख,नियुक्ती प्राधिकाऱ्यांच्या स्तरावर गट-क अनुकंपा प्रतीक्षासूची एकत्रित करण्यात आली आहे. या प्रक्रियेत अनुकंपा तत्त्वावर गट-क पदांवर नियुक्तीसाठी उपलब्ध असलेल्या रिक्त पदांची माहिती सर्व प्रतीक्षासूचीतील उमेदवारांना उपलब्ध करून देण्यात आली आहे. शासनाच्या निर्देशानुसार जिल्हाधिकारी कार्यालय, हिंगोली येथे दि. २९ ऑगस्ट व २ सप्टेंबर रोजी एकूण ३२ उमेदवारांचा मेळावा घेण्यात आला. या मेळाव्यात उमेदवारांकडून नियुक्तीबाबत विकल्प घेण्यात आले असून शैक्षणिक पात्रता व उपलब्ध रिक्त पदांनुसार नियुक्ती प्राधिकाऱ्यांकडे शिफारस करण्यात येणार आहे. शासनाने ठरवून दिलेल्या वेळापत्रकानुसार संबंधित नियुक्ती प्राधिकाऱ्यांनी शिफारस केलेल्या अनुकंपा उमेदवारांना दि. १५ सप्टेंबर रोजी नियुक्ती आदेश देण्यात येणार असल्याचेही जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे. *****