31 August, 2016

अवयवदान कसे व केंव्हा करता येते ?  
अवयव दान म्हणजे काय ?
जिवंतपणी अथवा मृत झाल्यानंतर आपले अवयव दुसऱ्या व्यक्तीला देणे म्हणजे अवयव दान होय. अवयवदान हे सर्वश्रेष्ठ दान असून ज्याद्वारे आपण मृत्यूनंतर आपले अवयव दान करुन अंतिम स्वरुपी ज्यांचे अवयव निकामी झाले आहेत, अशा अनेक रुग्णांचे प्राण वाचवू शकतो. ज्या रुग्णाचे अवयव कायम स्वरुपी निकामी झाले आहे, अशा रुग्णांसाठी अवयवदान हाच एक आशेचा किरण आहे.
अवयव प्रत्यारोपण / प्रतिरोपण म्हणजे काय ?
 मानवी आवयव प्रत्यारोपण म्हणजे आधुनिक वैद्यकीय शास्त्राची एक मोठी उपलब्धीच आहे. या उपचारामध्ये एखाद्या जिवंत वा मृत व्यक्तीचा अवयव अथवा मानवी अवयवाचा काही भाग शस्त्रक्रियेद्वारे विलग करुन तो एखाद्या गरजवंत रुग्णामध्ये प्रत्यारोपित करतात. ज्यांचा एखादा अवयव कायमस्वरुपी निकामी झाला आहे. अशा रुग्णांसाठी ही प्रमाणित व उपलब्ध अशी उपचार पध्दती आहे.
आपण कोणत्या अवयवांचे दान करु शकतो ?
अ) मेंदू स्तंभ मृत्यू (Brain Death) : मृत व्यक्ती जिची ह्दयक्रिया चालू आहे. पण जिचा मस्तिष्क स्तंभ मृत्यू झाला आहे. अशी व्यक्ती बहुतेक प्रमुख अवयवांचे म्हणजे मुत्रपिंड, फुफ्फुस, यकृत, स्वादूपिंड, हृदय, आतडी, डोळे, त्वचा, ह्दयाची झडप आणि कानांचे ड्रम यांचे देखील दान करु शकते.
ब) सामान्य मृत्यू (Normal Death) : मृत व्यक्ती जिची ह्दयक्रिया बंद पडली आहे. अशी व्यक्ती फक्त डोळे व त्वचा या अवयवांचे दान करु शकते.
क) जिवंत व्यक्ती (Live Donor) : जिवंत व्यक्ती फक्त आपल्या जवळच्या नातेवाईकांसाठीच अवयवदान करु शकते. रुग्ण दात्याच्या जवळचा नातेवाईक म्हणजे आजी, आजोबा, नातू, मुलगा, मुलगी, आई, वडील, भाऊ, बहीण अथवा पती किंवा पत्नी असावा लागतो. या व्यतिरिक्त कोणालाही रुग्णासाठी अवयवदान  करायचे असल्यास शासनाची परवानगी घ्यावी लागते. शासन, रुग्ण व दाता यामध्ये काही अर्थिक देवाण घेवाण नसून फक्त  प्रेम व स्नेह या नात्यानेच अवयवदान होत आहे, याची खात्री झाल्यावरच अवयवदानास परवानगी देते. जिवंत व्यक्ती फक्त काही मर्यादित आवयवांचे म्हणजेच मूत्रपिंड अथवा यकृताचा काही भाग दान करु शकतो.
मस्तिष्क स्तंभ मृत्यू म्हणजे काय ?
वैद्यकीय शास्त्रानुसार एखाद्या व्यक्तीची चेतना व श्वासोच्छवास कायम स्वरुपी बंद झाल्यास त्याला मृत घोषित करता येते. चेतना व श्वासोच्छवास या दोन्हीचे केंद्र आपल्या मेंदूतील मस्तिष्क स्तंभ’ या भागात असते. अपघातात डोक्याला मार लागल्याने मेंदूत रक्तस्त्राव झाल्याने अथवा मेंदूच्या शस्त्रक्रियेनंतर मस्तिष्क स्तंभास कायम स्वरुपी इजा झाल्यास त्या व्यक्तीचा मस्तिष्क स्तंभ मृत्यू होऊ शकतो.
एखाद्या व्यक्तीचे अतिदक्षता विभागात उपकरणांच्या सहाय्याने हृदय कृत्रिमरित्या क्रियाशिल ठेवले असेल तसेच काही ठरविक व प्रमाणित वाचण्यांच्या अधारे जर तिचा मस्तिष्क स्तंभ मृत झाल्याचे निश्चित झाले तर त्या व्यक्तीस मृत घोषित करता येते. अशा व्यक्तीचे ह्दय जास्तीत-जास्त 16 ते 72 तासांपर्यंत कृत्रिमरित्या क्रियाशिल ठेवता येते व याच कालावधीत प्रमुख अंतर्गत अवयवांचे दान होऊ शकते. यासाठी त्या रुग्णांच्या जवळच्या नातेवाईकांची संमती आवश्यक असते. असे अवयवदान फक्त शासनाने प्रतिरोपणासाठी मान्यता दिलेल्या रुग्णालयांतील अतिदक्षता विभागात मस्तिष्क स्तंभ मृत्यू झाल्यासच होऊ शकते.
मस्तिष्क स्तंभ मृत्यूचे निदान कसे होते ?
सरकाने मान्यता दिलेले चार डॉक्टर्स एकत्रीतपणे मस्तिष्क स्तंभ मृत्यूच्या चाचण्या करुन एखाद्या रुग्णास ब्रेन डेड अथवा मस्तिष्क स्तंभ मृत घोषित करतात. या चार डॉक्टरांचा अवयव प्रत्यारोपणाशी काहीही संबंध नसतो. मस्तिष्क स्तंभ मृत्यू फक्त अवयव प्रतिरोपणासाठी आणि निव्वळ अवयव काढण्याकरिता सरकारी मान्यता असलेल्या रुग्णालयामध्येच घोषित करता येतो. मस्तिष्क मृत्यूला आपल्या देशात नाही तर जगात मान्यता आहे व मृत व्यक्तींच्या नातेवाईकांना मस्तिष्क स्तंभ मृत्यूचा दाखला देण्यात येतो.
मस्तिष्क स्तंभ मृत अथवा ब्रेन डेड व्यक्ती जगण्याची काही शक्यता असते का ?
नाही. एखाद्या व्यक्तीस मस्तिष्क स्तंभ अथवा ब्रेन डेड घोषित केले असेल तर ती व्यक्ती जगण्याची शक्यता अजिबात नसते व ती व्यक्ती मृत असते मस्तिष्क स्तंभ मृत व्यक्ती व कोमातील रुग्ण यामध्ये फरक आहे. कोमातील रुग्ण मृत नसतात व ते परत जगण्याची शक्यता असते. तसेच मस्तिष्क स्तंभ मृत घोषित करणे म्हणजे इच्छामरण असे बिल्कूल नाही. मस्तिष्क स्तंभ मृत व्यक्ती ही मृत असते.
अवयवदान करायचे असल्यास मृत्यू हा रुग्णालयात येणे गरजेचे आहे का ?
हो. मस्तिष्क स्तंभ मृत्यू हा प्रतिरोपणासाठी मान्यता असलेल्या रुग्णालयात घोषित करता येत असल्याने अशा रुग्णालयातील अतिदक्षता विभागातच मृत्यू झाल्यास अवयवांचे दान होऊ शकते. परंतु, डोळे व त्वचा यांचे दान मृत्यूनंतर सहा तासांपर्यंत घरी मृत्यू झाला तरी होऊ शकते.                                                                                       
मस्तिष्क स्तंभ मृत्यू करणे व अवयवदान कायदेशीर आहे का ?
हो. भारतामध्ये मानवी अवयव प्रत्यारोपण कायदा 1994 नुसार मस्तिष्क स्तंभ मृत्यू व अवयवदान या दोन्हींना मान्यता दिली आहे. या कायद्याची खालील विशेष उद्दिष्टे आहेत.
·         मस्तिष्क स्तंभ मृत्यूला मान्यता देणे जेणेकरुन मृत्यूनंतर अवयवदान होऊ शकेल.
·         रुग्णांच्या उपचारासाठी मृत व्यक्तींचे अवयव काढणे, साठवणे व प्रतिरोपण करणे यावर नियंत्रण ठेवणे.
·         मानवी अवयवांच्या व्यापारावर प्रतिबंध घालणे. कायद्याने अवयव विकणे, विकत घेणे व त्यासाठी जाहिरात किंवा अवयव मिळवून देण्यासाठी व्यापारी तत्वावर मध्यस्थी करणे यावर बंदी घालण्यात आलेली आहे.
अवयव दानानंतर मस्तिष्क स्तंभ व्यक्तींचे शरीर त्यांच्या नातेवाईकांना परत दिले जाते का ?
हो. मस्तिष्क स्तंभ मृत व्यक्तींचे अवयव काढल्यानंतर त्याचे शरीर सन्मानपूर्वक त्यांच्या नातेवाईकांना अंत्यविधीसाठी परत दिले जाते. अवयवदान व देहदान या दोन्हींमध्ये फरक आहे. देहदानामध्ये मृताचे शरीर वैद्यकीय प्रशिक्षणासाठी वैद्यकीय महाविद्यलयांमध्ये ठेवून घेतले जाते. अवयदानामधील सदर अवयव प्रत्यारोपणासाठी वापरले जातात व शरीर नातेवाईकांना परत केले जाते.
दान केलेल्या अवयवांचे वितरण कसे होते ? ते फक्त श्रीमंत व्यक्तींनाच दिले जाते का ?
नाही. गरजू रुग्णांचे वय, रक्त गट, त्यांच्या आजाराची तीव्रता, ते किती दिवस अवयवांची प्रतीक्षा करीत आहेत. त्यांची वैद्यकीय गरज या सर्वांसाठी प्रत्येक रुग्णास काही गुण दिले जातात. या सर्व गरजू रुग्णांची एक सामाईक प्रतीक्षा यादी केली जाते व सर्वाधिक गरजू रुग्णास अवयव दिला जातो. रुग्णांची आर्थिक स्थिती, त्याची जात व धर्म याचा प्रमीक्षा यादीत त्याचे स्थान ठरविताना काही संबंध नसतो. अवयवांचे वितरण हे महाराष्ट्र शासनाने घालून दिलेल्या नियमानुसार विभागीय अवयव प्रत्यारोपण समन्वय समिती यांच्यामार्फत पारदर्शकपणे होते.
मस्तिष्क स्तंभ मृत दात्याच्या नातेवाइकांना अवयव कोणाला दिले आहेत हे कळू शकते का ?
नाही. नातेवाईकांना अवयव मिळालेल्या रुग्णांचे नाव व पत्ता सांगितला जात नाही.
अवयव दान केल्याने मस्तिष्क स्तंभ मृत दात्याच्या शरीरावर काही विद्रुपता येते का ?
नाही. मस्तिष्क स्तंभ दात्याच्या ऑपरेशन थिएटरमध्ये नेऊन त्याचे अवयव काळजीपूर्वक काढले जातात व शरीरावर विद्रुपता येत नाही. एखाद्या जिवंत व्यक्तीची शस्त्रक्रिया जितक्या काळजीपूर्वक केली जाते. तितक्याच काळजीपूर्वकरितीने अवयव काढले जातात व जखम पुन्हा शिवली जाते. शरीरावर, पोटावर अथवा छातीवर शस्त्रक्रिया केल्याचे टाके मात्र राहतात.
अवयव दानाला धर्माची परवानगी आहे का ?
हो. भारतातील सर्वच धर्मांनी अवयवदानाला पाठिंबा दिला आहे व अवयवदान हे एक पुण्याचे काम आहे.
अवयव दान केल्यानंतर मस्तिष्क स्तंभ मृत व्यक्तीच्या नातेवाईकांला काही मोबदला दिला जातो का ?
नाही. अवयवदानासाठी मस्तिष्क स्तंभ मृत व्यक्तींच्या नातेवाईकाला आर्थिक अथवा कुठल्याही स्वरुपाचा मोबदला दिला जात नाही. म्हणून अवयवदान हे शुध्द व श्रेष्ठ दान ठरते. परंतु, अवयवदानाला संमती दिल्यानंतर अवयव दानासाठी करण्यात येणाऱ्या चाचण्यांचा तसेच इतर काही वैद्यकीय खर्च मृताच्या नातेवाईकांना करावा लागत नाही.
अवयदान करायची इच्छा असल्यास काय करावे ?
एखाद्या व्यक्तीस मृत्यूनंतर आपल्या अवयवांचे दान करण्याची इच्छा असल्यास त्यांनी कायद्यानुसार संमतीनुसार करणे आवश्यक आहे. संमतीपत्रावर एखाद्या जवळच्या सज्ञान नातेवाईकांना सही घेणे देखील आवश्यक आहे. असा फॉर्म भरल्यावर त्या व्यक्तीस डोनर कार्ड दिले जाईल, हे कार्ड दात्याने सतत आपल्या जवळ बाळगावे, जेणे करुन त्याच्या नातेनाईकांना अथवा मित्र परिवाराला त्याच्या अवयव दान करण्याच्या इच्छेविषयी माहिती होईल.
जरी आपण डोनर कार्डवर सही केली असली तरी आपल्या मृत्यूनंतर आपल्या जवळच्या नातेवाईकांच्या संमती शिवाय अवयवदान होऊ शकत नाही. म्हणून आपल्या इच्छेविषयी नातेवाईकांना माहिती असणे आवश्यक आहे.
डोनर कार्ड व अवयवदानासंबंधी काही अधिक माहिती हवी असल्यास खालील पत्यावर संपर्क साधावा
www.dmer.org. व www.notto.nic.in विभागीय अवयव प्रत्यारोपण समन्वयन समिती, मुंबई , एल. टी. एम. जी.  हॉस्पीटल (सायन हॉस्पिटल), कॉलेज बिल्डींग, दुसरा मजला, औषध भांडाराच्या बाजूला, सायन (पश्चिम), मुंबई-400022. www.ztccmumbai.org, organtransplant@ztccmimbai.org, दूरध्वनी 022-24028197, मो. 9320063468, 9167663469.  विभागीय अवयव प्रत्यारोपण समन्वयन समिती, पुणे, द्वारा केईएम हॉस्पिटल, रास्ता पेठ, पुणे-11. www.ztccpune.org,  मो. 9890210011. विभागीय अवयव प्रत्यारोपण समन्वयन समिती-औरंगाबाद, नेफ्रोलॉजी विभाग, एम. जी. एम. मेडिकल कॉलेज, एन-6, सिडको, औरंगाबाद-431003. Sudhirkul1979@gmail.com. दूरध्वनी 0240-2333591 मो. 9422713691. विभागीय अवयव प्रत्यारोपण समन्वयन समिती, नागपूर, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, मानेवाडा, नागपूर-440003. raviwankhede@gmail.com, gmcssh@gmail.com, मो. 9423683350.

                                                                                                                      संकलन
जिल्हा माहिती कार्यालय

          हिंगोली

No comments: