10 July, 2020

बँकांनी शेतकऱ्यांना तात्काळ पिक कर्ज वितरीत करावे - पालकमंत्री प्रा. वर्षाताई गायकवाड






बँकांनी शेतकऱ्यांना तात्काळ पिक कर्ज वितरीत करावे

- पालकमंत्री प्रा. वर्षाताई गायकवाड

 हिंगोली,दि.10: खरीप हंगाम 2020-21 करीता जिल्ह्यातील बँकांना पिक कर्ज वितरीत करण्यासाठी 1 हजार 169 कोटी उद्दिष्ट ठरवून देण्यात आले होते. त्यापैकी 40 हजार शेतकऱ्यांना उदिष्टाच्या केवळ 208 कोटी म्हणजे 18 टक्के पिक कर्ज वितरीत केले आहे. तर जिल्ह्यात 82 टक्के शेतकऱ्यांना अद्यापपर्यंत पिक कर्ज वितरण झालेले नाही. त्याकरीता सर्व शेतकऱ्यांना वेळेत पिक कर्ज मिळावे यासाठी अग्रणी बॅंकेच्या जिल्हा व्यवस्थापकांनी योग्य नियोजन करून कोणत्याही परिस्थितीत तात्काळ पिक कर्ज वितरणांचे नियोजन करावे, असे निर्देश जिल्ह्याच्या पालकमंत्री तथा शालेय शिक्षण मंत्री प्रा. वर्षाताई गायकवाड यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन सभागृहात आयोजित आढावा बैठकीत पालकमंत्री प्रा. गायकवाड या बोलत होत्या. यावेळी जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, जिल्हा परिषदेची मुख्य कार्यकारी अधिकारी राधा विनोद शर्मा, अप्पर जिल्हाधिकारी शंकर बरगे, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी यांची उपस्थिती होती.

यावेळी बॅंकांनी शेतकऱ्यांना उद्दिष्टाप्रमाणे पिक कर्ज वितरीत केले आहे का ? किती शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळाला असून, किती शेतकरी अजून कर्जमाफी पासून वंचित आहेत याची यावेळी माहिती घेत पालकमंत्री प्रा. गायकवाड म्हणाल्या की, खरिप हंगाम सुरु होवून महिना झाला आहे तरी आतापर्यंत जिल्ह्यातील केवळ 18 टक्केच शेतकऱ्यांना पिक कर्जाचे वितरण झाले आहे. बँका शेतकऱ्यांना पिक कर्ज वितरणाकरीता टाळा-टाळ करत असल्याच्या तक्रारी प्राप्त होत आहे. ज्या बॅंका शेतकऱ्यांना पिक कर्ज वितरीत करण्याबाबत टाळा-टाळ किंवा दिरंगाई करत आहे अशा सर्व बॅंकांचा जिल्हाधिकाऱ्यांनी आढावा घेवून त्यांना पिक कर्ज वितरणांसाठी गाव व बॅंक निहाय आराखडा तयार करावा. तसेच त्यांना तात्काळ पिक कर्ज वितरण करण्याचे निर्देश देवून दररोज याबाबत पाठपूरावा करावा. जिल्ह्याकरीता किती बी-बियाणे आणि खत उपलब्ध झाले होते. तसेच किती शेतकऱ्यांना पेरणीसाठी आवश्यक असलेले बी-बियाणे आणि खत उपलब्ध करून दिले. तसेच पेरलेल्या सोयाबीन शेतकऱ्यांच्या शेतात बियाणे उगवल्या नसल्याच्या किती तक्रारी प्राप्त झाल्या असून किती गुन्हे दाखल करण्यात आले आहे. ज्या शेतकऱ्यांच्या तक्रारी आल्या त्याचा पंचनामा करावा. तसेच दोषीवर कायदेशीर कारवाई करावी. कोरोना महामारीमुळे अनेकांचे रोजगार गेल्याने बेरोजगार झाले आहेत. त्यांना रोजगार हमी योजने अंतर्गत कामे उपलब्ध करुन द्यावीत असे निर्देश पालकमंत्री प्रा. गायकवाड यांनी यावेळी दिले.

पालकमंत्री प्रा. गायकवाड यांनी कृषि, सहकार, रेशीम आणि रोजगार हमी योजना विभागाचा आढावा घेतला. यावेळी विविध विभागाचे विभाग प्रमुखाची उपस्थिती होती.

****

 


No comments: