17 July, 2020

नागरीकांनी पूर परिस्थितीत घ्यावयाची काळजी व खबरदारी घेण्याचे आवाहन · नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

नागरीकांनी पूर परिस्थितीत घ्यावयाची काळजी व खबरदारी घेण्याचे आवाहन

·         नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

 

हिंगोली, दि.17 : नागरीकांनी पावसाळ्यात उद्भवणाऱ्या पुर आपत्ती पासून स्वतःचा बचाव करावा याबाबत जिल्हा प्रशासनाच्या वतीने आवाहन केले आहे. राज्यात तसेच जिल्ह्यात पावसाचा जोर दिवसेंदिवस वाढतअसून नद्यांची पात्रे भरून वाहत आहेत यामुळे नद्यांना पुर येण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यास अनुसरून नदी,नाले,ओढे काठच्या गावांना तसेच जेथे पुरस्थिती उद्भवू शकते अशा गावांसाठी उपाययोजना व खबरदारी घेण्याबाबत मा.जिल्हाधिकारी यांनी सूचना दिलेल्या आहेत.

पुरस्थितीमध्ये काय करावे: गावात पुरस्थिती निर्माण झाल्यास अथवा पुराबाबत पूर्व कल्पना मिळाल्यास घरातील उपयुक्त सामान, महत्वाची कागदपत्रे, जनावरे सुरक्षित ठिकाणी हलवा, विजेवर चालणाऱ्या उपकरणांचा वीज पुरवठा बंद करावा,गावात अचानक पूरस्थिती निर्माण झाल्यास तात्काळ प्रशासनास कळवावे,गावात,घरात जंतुनाशक असतील तर ते पाण्यात विरघळणार नाहीत याची दक्षता घ्या,पुर स्थितीत उंच ठिकाणी जावे तसेच जाते वेळी सोबत रेडिओ, टॉर्च, सुके खाण्याचे पदार्थ, पिण्याचे पाणी सोबत ठेवावे, शक्य असल्यास घरातील वाहने उंच ठिकाणी हलवा.घर सोडून जाताना दारे, खिडक्या सर्व घट्ट बंद करून जा,कुटुंबातील सर्व व्यक्तींकडे ओळखपत्र राहील याची काळजी घ्या,पुरामध्ये अडचणीत सापडला असाल तर आजूबाजूच्या साधनांचा वापर करा. (उदा. पाण्यावर तरंगणारे मोठे लाकूड, प्लास्टिकचे ड्रम याचा वापर करा), कोणी व्यक्ती वाहत जात असेल तर दोरीच्या सहाय्याने त्याला वाचवण्याचा प्रयत्न करा,पुर स्थितीत घाबरून जाऊ नका, सरकारी सुचनांचे पालन करा, तात्काळ स्थानिक तहसील कार्यालयास किंवा जिल्हाधिकारी कार्यालय नियंत्रण कक्ष क्र.०२४५६-२२२५६० या क्रमांकावर संपर्क साधावा.

पूर परिस्थतीत काय करू नये:पुर असलेल्या भागात, नदीच्या पुलावर विनाकारण भटकू नका,पुराच्या पाण्यात चुकुनही जावू नका, तसेच पुर आल्यानंतर पुलावरुन गाडी घालण्याचा, अथवा पूल ओलांडण्याचा प्रयत्न करून नका,दुषित,उघड्यावरील अन्न- पाणी टाळा शक्यतो उकळलेले पाणी व सुरक्षित अन्न सेवन करा,सुरक्षित ठिकाणी रहा व विद्युत् तारांना स्पर्श करू नका,पोहता येत असेल तरच बुडणाऱ्या व्यक्तींना वाचवा परंतु अपरीचीत व खोल पाण्यात जाऊ नका, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणचे  अध्यक्ष रुचेश जयवंशी यांनी केले आहे.

00000

 


No comments: