11 July, 2020

पालकमंत्री प्रा. वर्षाताई गायकवाड यांनी घेतला विविध विभागाचा आढावा



·       कोरोना उपाययोजना संदर्भात हिंगोली जिल्ह्याने पॅटर्न निर्माण केला.

हिंगोली,दि.11: नागरिकांना भौतिक सुविधा व शेतक-यांना पूरक व्यवसायाच्या माध्यमातून उत्पन्न वाढविण्यासंदर्भात करण्यात येणाऱ्या उपायोजनांबाबत पालकमंत्री वर्षाताई गायकवाड यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेतली. यात कोवीड-19 प्रादूर्भाव रोखण्याकरिता करण्यात आलेल्या उपाययोजना, महावितरणमार्फत वितरीत करण्यात आलेल्या सौर कृषी पंप, सामाजिक न्याय विभागातंर्गत घरकुल योजना, सार्वजनीक बांधकाम विभाग आदी विषयांचा समावेश होता.
जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन सभागृहात आयोजित आढावा बैठकीत पालकमंत्री प्रा. गायकवाड या बोलत होत्या. यावेळी जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, जिल्हा परिषदेची मुख्य कार्यकारी अधिकारी राधा विनोद शर्मा, अप्पर जिल्हाधिकारी शंकर बरगे, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी यांची उपस्थिती होती.
            यावेळी पालकमंत्री प्रा. गायकवाड म्हणाल्या की, कोवीड-19 चा प्रादूर्भाव रोखण्याकरीता जिल्ह्यात जिल्हा प्रशासनाने योग्य नियोजन करुन उत्कृष्ट काम केले आहे. कोरोना उपाययोजना संदर्भात जिल्ह्याने पॅटर्न निर्माण केला असून  जिल्ह्यात कोविड-19 चे एकूण 328 रुग्ण झाले आहेत, त्यापैकी 272 रुग्ण बरे झाल्यामुळे त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आज घडीला एकूण 56 रुग्णांवर उपचार चालू आहे. परंतू जिल्ह्यात उपचार करण्यात आलेल्या रुग्णांपैकी एकाचा ही मृत्यू झालेला नाही. तसेच कोरेानामुळे जिल्ह्यातील 03 जणांचा मृत्यू झाला आहे पंरतू ते जिल्ह्याबाहेर उपचार घेत होते. संचालक आरोग्य सेवा, पूणे यांच्या अहवालानुसार हिंगोली जिल्हा कोरोना विषाणूजन्य आजाराचे बाधीत रुग्ण बरे होण्यामध्ये (Recovery Rate) महाराष्ट्रातून पहिल्या क्रमांकावर आला असून ही जिल्ह्याकरीता अत्यंत अभिमानास्पद बाब आहे. तसेच ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय पद रिक्त असल्याने स्थानिक डॉक्टरांची कंत्राटीपध्दतीने नियूक्ती करावी, असे ही त्यांनी यावेळी निर्देश दिले.
            मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजने अंतर्गत ज्या लार्भार्थ्यांचे अर्ज रद्द ठरविण्यात आले त्यांचे अर्ज पुन्हा नव्याने परिपूर्ण भरुन त्यांना या योजनेचा लाभ देण्यात यावा अशा सूचनाही यावेळी त्यांनी दिल्या. सामाजिक न्‍याय विभागातंर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध योजना करीता केंद्र व राज्य शासनामार्फत येणाऱ्या निधीचा आढावा घेत जो निधी अद्यापपर्यंत प्राप्त झालेला नाही त्याची माहिती सादर करण्यास सांगितले. तसेच सार्वजनीक बांधकाम विभागांनी जिल्ह्यात नादूरुस्त असलेले पुलांची पाहणी करुन त्यांची तात्काळ दूरुस्ती करण्याच्या सूचना  पालकमंत्री वर्षाताई गायकवाड यांनी यावेळी दिल्या.
****


No comments: