11 October, 2021

 

शेतकऱ्याने अतिवृष्टीत तग धरणाऱ्या रेशीम शेतीकडे वळावे

 

             हिंगोली (जिमाका), दि. 11 : सध्याचे बदलते हवामान आणि सरासरी पेक्षा जास्त पडणारा पाऊस सध्याला चिंतेचा विषय आहे. खरीप तसेच फळबागाचे अमाप नुकसान होऊन दरवर्षी शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी होत आहे.अशा परिस्थितीत शेतकऱ्यांने पिक पध्दतीत बदल करणे आवश्यक आहे. पावसाने झोडपले आणि राज्याने मारले तर तक्रार करायची कोणाकडे अशी एक म्हण जुन्या काळी रुढ होती. कारण शेती ही उघडया आकाशाखाली करावी लागते. अशातच पर्यावरणीय असमतोलामुळे कोणत्या भागात कधी आणि किती पाऊस पडेल याचा नेम नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकाचे अमाप नुकसान होत आहे. कर्ज काढुन लाखो रुपयाची गंतवणुक,अमर्याद शारीरिक श्रम करुनही आलेले पिक हातात येईल की नाही हे ठरविण्याचा अधिकार मात्र निर्सगाने स्वत: कडे ठेवला आहे. येणारा काळ हा जास्त पाऊस असेल की कमी हे आत्ताच सांगणे कठीण आहे. परंतु शेतकऱ्यांना जर या दोन्हीचा सामना करायचा असेल तर शेतकऱ्यांनी  रेशीम शेतीकडे वळले पाहिजे, असे आवाहन जिल्हा रेशीमचे प्रकल्प अधिकारी अशोक वडवळे यांनी केले आहे.

           सध्या संपूर्ण महाराष्ट्रात विशेष करुन मराठवाडयात पावसाने थैमान घातले असून पिक काढायच्या वेळी पडणारा तुफान पाऊस सर्वांनाच हतबल करणारा आहे. यामधे सोयाबीन, उडीद, मूग, कापूस तसेच इतर पिकांचे प्रचंड नुकसान होऊन शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. मराठवाडयात खरीप पिकामधे सोयाबीनचे क्षेत्र सर्वाधिक आहे. सुरुवातीला एक महिना पावसाने दडी मारल्याने त्याचा प्रत्यक्ष परिणाम उत्पादनावर झालेला होता. त्यातच आता सोयाबीनचे पिक काढणीस आले असता येन काढायच्या हंगामात धो- धो पाऊस पडुन प्रचंड नुकसान होत आहे. अशीच परिस्थिती मागील 2 ते 3 वर्षापासून होत आहे. हाती  आलेले पिक पाण्यात जाताना पाहिले तर सर्वाचेंच डोळे पानावत आहेत. अशा परिस्थितीपुढे शासन देखील हतबल होत असून शासनाने कितीही जरी मदत केली तरी प्रत्यक्ष उत्पादना एवढी मदत देणे शासनाला देखील शक्य नाही.

            वरील सर्व गोष्टीचा विचार करता शेतकऱ्याने स्वत:मधे परिवर्तन करुन यामधून स्वत:हुन मार्ग काढावा आणि अतिवृष्टीत तग धरणाऱ्या पिकांची लागवड करावी. यामधे प्रामुख्याने रेशीम शेतीचा उल्लेख करावा लागेल. रेशीम शेतीमधे भरपूर फायदे असून शेतकऱ्याने तुती या बहुवार्षिक पिकांची लागवड करावयाची आहे. तुती हे बहुवार्षिक पीक असून ते झाड वर्गीय असल्यामुळे अतिवृष्टीत प्रत्यक्ष एखाद्या तुती बागेवर गारपीट जरी झाली तरी त्याचे काहीच नुकसान होत नाही. त्यामुळे कितीही पाऊस झाला तरी रेशीम शेतकरी चिंतेत नसतो. तसेच एकदा तुतीची लागवड केल्यानंतर तेच झाड 10 ते 15 वर्ष पाला देत असल्यामुळे दरवर्षी लागवड करायची गरज नाही. त्यामुळे पुढील 15 वर्ष लागवडीचा खर्च वाचेल तसेच तुतीच्या पाल्यापासून उत्तम दर्जाचा कोष तयार होऊन भाव सुध्दा चांगला मिळेल. यातून शेतकऱ्यांची  आर्थिक स्थिती नक्की सुधारेल. सर्वात महत्वाची बाब म्हणजे रेशीम अळीपासुन 28 दिवसात कोष बनून विकणे ही प्रक्रिया वर्षातून 3 ते 4 वेळेस करता येईल. म्हणजेच प्रत्येक शेतकऱ्याला वर्षातून 3 ते 4 वेळेस क्रॉप काढता येईल. प्रत्येक क्रॉप मधून शेतकऱ्याला किमान 30 ते 35 हजार रुपये उत्पन्न मिळते. म्हणजे प्रत्येक शेतकऱ्याला वर्षाला किमान एक ते सव्वा लाख रुपये उत्पन्न प्रति एकरी मिळेल. सध्याच्या काळात शेती हा सर्वात अविश्वासार्ह व्यवसाय मानला जातो. यामधे सतत बदलत्या हवामानाचा घटक जास्त परिणामकारक दिसून येत असला तरी रेशीम शेती हा त्यावरील सक्षम पर्याय म्हणून पुढे येत आहे. यात प्रामुख्याने बीड, जालना, हिंगोली, परभणी येथील शेतकऱ्याने भरघोस असे उत्पादन घेऊन एक वेगळा आदर्श इतर शेतकऱ्या समोर ठेवला आहे. रेशीम शेतीत अतिवृष्टीचा परिणाम दिसून येत नाही. तसेच प्रतिवर्षी लागवड करावयाची गरज  नाही. तसेच वर्षाला एक ते सव्वा लाख रुपये उत्पन्न मिळेल, रासायनिक किटकनाशक यांच्या वापरण्याची गरज नाही त्यामुळे तो खर्च टाळता येईल. तसेच प्रत्येक रेशीम शेतकऱ्यास मनरेगा मधून 3 लाख 35 हजार रुपये अनुदान तर पोखरा मधून 2 लाख 16 हजार रुपये अनुदान मिळते. या सर्व वैशिष्टयामुळे अलिकडील काळात रेशीम शेती हा  सर्व पर्यायावर एक सक्षम पर्याय म्हणुन समोर येत आहे. असे जरी असले तरी आपल्याकडील शेतकरी सहजा सहजी नविन तंत्र अवगत करण्यासाठी धजावत नाही. पारंपारिक पिकामंधून शेतकरी सहजासहजी बाहेर पडत नाहीत. मात्र बदलते हवामान वाढत जाणारा खर्च, निर्सगाचा फटका या सर्वांचा विचार करुन शेती ही फायदेशीर करण्यासाठी पारंपारिक पिकांमधून प्रत्येक शेतकऱ्याला बाहेर पडणे गरजेचे आहे. वाढत्या महागाई मध्ये टिकून राहण्यासाठी  आपल्या स्वप्नांना साकार करण्यासाठी भविष्यात रेशीम शेती शिवाय पर्याय नाही, असे सांगितले आहे.

****

No comments: