03 April, 2023

 




हिंगोलीत जिल्हास्तरीय पडोस युवा संसद कार्यक्रम संपन्न

 

हिंगोली (जिमाका), दि. 03 : नेहरु युवा केंद्र युवा कार्यक्रम एवं खेल मंत्रालय भारत सरकारच्या वतीने शासकीय तंत्रनिकेतन येथे दि. 28 मार्च रोजी जिल्हास्तरीय पडोस युवा संसद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

हा जिल्हास्तरीय पडोस युवा संसद कार्यक्रम देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय युवक व क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांच्या संकल्पनेतून जी-20 अध्यक्षपद भारताने मिळवत वसुधैव कुटुंबकम च्या माध्यमातून एक पृथ्वी, एक कुटुंब, एक भविष्य ही भावना समोर ठेवून जिल्हास्तरीय पडोस युवा संसद कार्यक्रम घेण्यात आला.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शासकीय तंत्रनिकेतनचे प्राचार्य डॉ. अशोक उपाध्याय हे होते. यावेळी जिल्हा युवा अधिकारी आशिष पंत, शासकीय तंत्रनिकेतनचे माजी पाचार्य प्रकाश पोपळे, जी-20 आणि इंटरनॅशनल मिलेट्स या विषयावर व्याख्याता म्हणून उपस्थित असलेले शिवाजी महाविद्यालयाचे डॉ.सुधीर वाघ उपस्थित होते.

नेहरु युवा केंद्राचे जिल्हा युवा अधिकारी डॉ.आशिष पंत यांनी भारताला मिळालेल्या जी-20 आणि पौष्टिक तृणधान्ये वर्षाबद्दल माहिती दिली. त्याचबरोबर भारत हा एक लोकशाही असलेला देश आहे. या देशाला आपले योगदान देणे गरजेचे आहे. यासाठी युवकांनी पुढाकार घ्यावा, असे उपस्थित युवकांना सांगितले. डॉ. सुधीर वाघ यांनी भारताचे जी-20 मध्ये अध्यक्षपद त्याचप्रमाणे आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्षाबद्दल माहिती दिली . जी-20 मध्ये भारताचे अध्यक्षपद जगाला कशा प्रकारे दिशादर्शक ठरेल. त्याचप्रमाणे भारताने आजपर्यंत प्रगतीची गाठलेली विविध शिखरे भारताला महासत्ताक बनवेल, असे सांगितले. 

कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ.अशोक उपाध्याय यांनी आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्ष, पौष्टिक तृणधान्याचे आहारातील महत्व, पोष्टिक तृणधान्यामुळे शेतकऱ्यांना व पर्यावरणाला होणारे फायदे याबद्दल युवकांना मार्गदर्शन केले.

तसेच काही युवकांनी पडोस युवा संसद कार्यक्रमांमध्ये मनोगत व्यक्त केले. यामध्ये जी-20 या विषयावर चेतन साठे, आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य या विषयावर पुष्यमित्र जोशी यांनी युवकांना संबोधित केले. माजी प्राचार्य प्रकाश पोपळे यांनीही युवकांना माहिती दिली.

या जिल्हास्तरीय पडोस युवा संसद कार्यक्रमात युवकांनी विविध कलागुणांचे प्रदर्शन केले. नृत्याविष्कार व सांस्कृतिक कार्यक्रमामुळे या कार्यक्रमास चांगलीच रंगत आली होती. या कार्यक्रमाचे उद्घाटन युवकांचे प्रेरणास्थान असलेल्या स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रजल्वन करुन करण्यात आले. यावेळी विविध कलाविष्कार सादर करणाऱ्या युवकांना सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन नेहरु युवा केंद्राचे तालुका युवा समन्वयक प्रवीण पांडे यांनी केले. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी नेहरु युवा केंद्राचे सर्व तालुका समन्वयक व शासकीय तंत्रनिकेतनचे तानूरकर व महाविद्यालयातील कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

*****

 

No comments: