29 April, 2023

 सर्व सामान्य लोकांपर्यंत पोहचविण्यासाठी हिंगोली जिल्ह्यात "शासकीय योजनांची जत्रा"

जिल्हाधिकारी यांनी ठरवून दिले विभागनिहाय लार्भार्थ्यांचे उद्दिष्ट

 


हिंगोली (जिमाका), दि. 29 : जिल्ह्यात विविध शासकीय योजनांचा लाभ देण्यासाठी " शासकीय योजनांची जत्रा"चे आयोजन करायचे असून त्या दृष्टीने सर्व विभागाने तयारी करावी अशा सूचना जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिल्या आहेत.

             जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्ह्यातील सर्व कार्यालय प्रमुखांच्या सोबत दि. 27 एप्रिल रोजी झालेल्या बैठकीत जिल्हाधिकारी श्री. पापळकर बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अनुप शेंगुलवार, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक नामदेव केंद्रे, विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

"शासकीय योजनांची जत्रा" या विशेष कार्यक्रमासाठी जिल्हा प्रशासनातील सर्व विभाग सहभागी होणार असून यात अनेक नावीन्यपूर्ण गोष्टी करण्याचे नियोजन करण्यात येणार आहे. यासाठी जिल्ह्यातील सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांना विभागनिहाय लाभाचे उद्दिष्ट ठरवून देण्यात आले आहे. त्यानुसार संबंधित अधिकाऱ्यांनी नियोजन करुन शासकीय योजनांची जत्रा या विशेष उपक्रमांतर्गत जास्तीत जास्त लाभार्थ्यांना लाभ देण्यात यावा, असे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी या बैठकीत दिले. याबाबत तालुकापातळीपर्यंत याचे नियोजन केले जाणार असल्याचेही यांनी यावेळी सांगितले आहे.

             लोक कल्याणाचे ध्येय समोर ठेवून शेवटच्या गरजू पर्यंत शासकीय योजनांचा लाभ पोहचावा यासाठी 'शासकीय योजना सुलभीकरण अभियान ' राबविण्याचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा निर्धार असून त्या अनुषंगाने प्रत्येक जिल्ह्यात 75 हजार लाभार्थ्यांना शासकीय योजनांचा लाभ देण्यासाठी राज्यात " "शासकीय योजनांची जत्रा " हा विशेष उपक्रम राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

****

No comments: