27 February, 2022

 

जिल्ह्यात कोविड-19 चा नवीन एकही रुग्ण नाही

एका रुग्णांचा मृत्यू, तर 32 रुग्णांवर उपचार सुरु

 

हिंगोली, (जिमाका) दि. 27 : जिल्ह्यात कोविड-19 चा नवीन एकही रुग्ण आढळून आलेला नाही. तर आज एका कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक , हिंगोली यांनी आज दिली आहे.

           जिल्ह्यात आजपर्यंत कोविड-19 चे एकूण 19 हजार 512 रुग्ण झाले असून, त्यापैकी  19 हजार 76 रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आज घडीला जिल्ह्यात एकूण 32  रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तसेच कोविड-19 मुळे जिल्ह्यात आतापर्यंत 404 व्यक्तींचा मृत्यू झाला असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक, हिंगोली यांनी कळविले आहे.

****

 





सिरसम व बळसोंड येथे जिल्हा परिषद अध्यक्ष गणाजी बेले यांच्या हस्ते

राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेचे उद्घाटन

 

 

           हिंगोली, (जिमाका) दि. 27 : आज सिरसम व बळसोड येथे राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेचे उद्घाटन जिल्हा परिषद अध्यक्ष गणाजी बेले यांच्या हस्ते बालकांना डोस पाजून करण्यात आले.

            यावेळी सहायक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कैलास शेळके, वैद्यकीय अधिकारी डॉ. मालू, वैद्यकीय अधिकारी डॉ. गट्टू, आरोग्य विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. यावेळी बळसोंड (अंतुले नगर) येथील प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी पल्स पोलिओ लसीकरण जनजागृती रॅली काढली होती. या विद्यार्थ्यांनी बाळाला लसीकरण करुन घ्यावे आणि पोलीओला टाळावे अशा घोषणाही यावेळी दिल्या.

            तसेच सुरेगाव येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्रात जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष तथा आरोग्य सभापती मनीष आखरे यांच्या हस्ते राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेचे उदघाटन करण्यात आले. यावेळी राज्यस्तरीय नोडल अधिकारी डॉ. डि. बी घोलप, जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. गणेश जोगदंड, तालुका आरोग्य अधिकारी डॉ अनुराधा गोरे, वैद्यकीय अधिकारी डॉ. मालू, आरोग्य कर्मचारी बबन कुटे, आरोग्य सेविका संगीता गोबाडे आदी उपस्थित होते.

 

नरसी नामदेव येथे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय दैने यांच्या हस्ते

राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेचे उदघाटन

 

हिंगोली तालुक्यातील नरसी नामदेव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी संजय दैने यांच्या हस्ते राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेचे उद्घाटन करण्यात आले.

यावेळी नरसीचे सरपंच, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन भायेकर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.नामदेव कोरडे, वैद्यकीय अधिकारी डॉ. खांडेकर, डॉ.शुभांगी वाणी, जिल्हा विस्तार व माध्यम अधिकारी प्रशांत तुपकरी, विस्तार अधिकारी कमलेश इशी, आरोग्य सहाय्यक डी.आर.पारडकर, जोजारे, गायकवाड, श्रीमती खाडे, श्रीमती सोनुने आदी उपस्थित होते.

नरसी येथून हिंगोली कडे परत येत असताना मुख्य कार्यकारी अधिकारी संजय दैने यांनी इतर राज्यातून कामासाठी आलेल्या कामगारांच्या वस्तीला भेट देऊन पोलिओ बाबत विचारपूस केली व लाभार्थ्यांना पोलिओचा डोस पाजला .

 

*****

 




मराठी भाषा दिनानिमित्त शासकीय जिल्हा ग्रंथालयात ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन

 

 

           हिंगोली, (जिमाका) दि. 27 : ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त कविवर्य कुसुमाग्रज यांचा जन्मदिन दरवर्षी मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा करण्यात येतो. त्यानिमित्ताने येथील जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयात मराठीतील विविध ग्रंथांच्या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. या ग्रंथ प्रदर्शनाचे उदघाटन  डॉ. महेश मंगनाळे यांच्या हस्ते आज करण्यात आले.

याप्रसंगी डॉ. महेश मंगनाळे यांनी मार्गदर्शन करताना म्हणाले, मराठी ही ज्ञान भाषा होण्यासाठी सर्वंकष प्रयत्न होणे गरजेचे आहे, असे सांगितले.

            या कार्यक्रमास जेष्ठ साहित्यिक अशोक अर्धापूरकर, जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष खंडेराव सरनाईक, औरंगाबाद विभाग ग्रंथालय संघाचे कोषाध्यक्ष संतोष ससे, जिल्हा ग्रंथालय अधिकारी आशिष ढोक, मिलिंद सोनकांबळे, रामभाऊ पुनसे  व ग्रंथालय पदाधिकारी यांची प्रमुख उपस्थिती होती.  

हे ग्रंथप्रदर्शन जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, नेहरु नगर, रिसाला नाका हिंगोली येथे सर्वांसाठी खुले असून सर्वांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा ग्रंथालय अधिकारी आशिष ढोक यांनी केले आहे.

 

*****

 



पाच वर्षाखालील सर्व बालकांना पोलिओचा डोस पाजून

भारत पोलिओ मुक्त करण्यास सहकार्य करावे

- जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर

 

हिंगोली, (जिमाका) दि. 27 : जिल्ह्यातील सर्व गावांतील नागरिकांनी जवळच्या पोलिओ लसीकरण केंद्रावर जाऊन आपल्या पाच वर्षाखालील सर्व बालकांना पोलिओचा डोस पाजावा व भारत पोलिओ मुक्त करण्यास सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी केले.

येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात आमदार तान्हाजी मुटकुळे आणि जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या हस्ते बालकांना पोलिओचा डोस पाजून जिल्हास्तरीय उद्घाटन करण्यात आले. यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राजेंद्र सुर्यवंशी, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. गोपाल कदम, बालरोग तज्ज्ञ डॉ. दीपक मोरे, डॉ. नंदिनी भगत, जिल्हा कार्यक्रम अधिकारी उध्दव कदम, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.नामदेव कोरडे यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी बोलताना जिल्हाधिकारी श्री. पापळकर म्हणाले, जिल्ह्यातील 1 लाख 27 हजार 748 बालकांना पोलिओचा डोस पाजण्यात येणार आहे. यासाठी 1175 बूथची स्थापना करण्यात आली असून यासाठी 3128 कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आपल्या नजीकच्या लसीकरण केंद्रावर जाऊन आपल्या पाल्यांना पोलिओचा डोस पाजावा, असे आवाहन केले.

या कार्यक्रमास जिल्हा रुग्णालयातील अधिकारी, कर्मचारी, परिचारिका, नागरिक उपस्थित होते.

****

 

26 February, 2022

 

जिल्ह्यात कोविड-19 चा नवीन एकही रुग्ण नाही

03 रुग्ण बरे झाल्याने डिस्चार्ज, तर 33 रुग्णांवर उपचार सुरु

 

हिंगोली, (जिमाका) दि. 26 : जिल्ह्यात कोविड-19 चा नवीन एकही रुग्ण आढळून आलेला नाही. तर आज 03 रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक , हिंगोली यांनी आज दिली आहे.

सद्य:स्थितीत जिल्हा सामान्य रुग्णालयातील आयसोलेशन वार्डमध्ये भरती असलेल्या कोविड-19 रुग्णांपैकी 01 रुग्णांची  प्रकृती गंभीर असल्याने त्यांना ऑक्सिजन चालू आहे.

           जिल्ह्यात आजपर्यंत कोविड-19 चे एकूण 19 हजार 512 रुग्ण झाले असून, त्यापैकी  19 हजार 76 रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आज घडीला जिल्ह्यात एकूण 33  रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तसेच कोविड-19 मुळे जिल्ह्यात आतापर्यंत 403 व्यक्तींचा मृत्यू झाला असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक, हिंगोली यांनी कळविले आहे.

****

25 February, 2022


 

एचआयव्ही सहजीवन जगणाऱ्या व्यक्तींना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी

सामाजिक लाभाच्या योजना मिळवून देण्यासाठी सहकार्य करावे

                                               - जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर

हिंगोली, (जिमाका) दि. 25 : जिल्ह्यात एचआयव्ही सहजीवन जगणाऱ्या व्यक्तींना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सामाजिक लाभाच्या योजना मिळवून देण्यासाठी सर्वच विभाग प्रमुखांनी पुढाकार घेऊन त्यांना सहकार्य करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी आज आयोजित केलेल्या बैठकीत दिले.

आज येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण समितीची त्रैमासिक आढावा बैठक जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीस जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजेंद्र सुर्यवंशी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शिवाजी पवार, जिल्हा सरकारी कामगार अधिकारी टी. ई. कराड, जिल्हा क्षयरोग अधिकारी, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी यांचे प्रतिनिधी, विहान प्रकल्पाचे प्रतिनिधी, सेतू चॅरिटेबल ट्रस्टचे प्रतिनिधी उपस्थित होते.  

यावेळी बोलताना जिल्हाधिकारी श्री. पापळकर म्हणाले, एचआयव्ही सहजीवन जगणाऱ्या महिलांची कुटुंबकल्याण शस्त्रक्रिया, गर्भाशयाची शस्त्रक्रिया आणि एचआयव्ही पॉझिटिव्ह असलेल्या गरजू रुग्णांच्या डोळ्यांची शस्त्रक्रिया करण्यासाठी तज्ज्ञ डॉक्टरांची नेमणूक करावी, आवश्यक संसाधने खरेदी करावेत. त्यासाठी योग्य नियोजन करावेत. तसेच महिला व बालविकास विभागामार्फत एचआयव्ही पाझिटिव्ह व अनाथ असलेल्या सर्व मुलांना बालसंगोपन योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी योग्य ती कार्यवाही करावी, अशा सूचना केल्या. तसेच एचआयव्ही/एड्स च्या मोफत हेल्पलाईन टोल फ्री क्र. 1097 ची प्रसिध्दी करण्यासाठी जिल्ह्यातील सर्वच गावांमध्ये ग्रामपंचायतीच्या निधीतून किमान एक भिंती चित्र काढण्यात यावेत. या संबंधीचे आदेश पंचायत उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सर्व गा्रमपंचायतींना द्यावेत. जागतिक महिला दिनानिमित्त दि. 8 मार्च, 2022 रोजी एचआयव्ही पॉझिटिव्ह महिलांना आधारकार्ड  काढण्यासाठी जिल्हा रुग्णालयात विशेष शिबीराचे आयोजन करावे, अशा सूचनाही जिल्हाधिकारी श्री. पापळकर यांनी यावेळी दिल्या. 

जिल्हा कार्यक्रम अधिकारी उध्दव कदम यांनी एप्रिल ते डिसेंबर, 2021 या कालावधीत सामान्य गटातील 30 हजार 420 व्यक्तींची तर 25 हजार 885 गरोदर मातांची मोफत एचआयव्ही चाचणी करण्यात आली. त्यातील सामान्य गटाचे 115 टक्के आणि गरोदर मातांचे 112 टक्के उद्दिष्ट साध्य करण्यात आले आहे. या चाचणीमध्ये सामान्य गटातील 16 आणि गरोदर मातांमधून 06 नवीन एचआयव्ही संसर्ग झालेले व्यक्ती आढळून आलेले आहेत. या सर्वांना एआरटी औषधोपचारावर ठेवण्यात आलेले आहे. याच कालावधीत 11 एचआयव्ही पाझिटिव्ह  असलेल्या मातांनी जन्म दिलेली बालके योग्य उपचार पध्दतीच्या आणि स्तनपान समुपदेशनामुळे 18 महिन्याच्या एचआयव्ही चाचणीमध्ये  एचआयव्ही निगेटीव्ह म्हणजेच एचआयव्ही मुक्त करण्यात यश आले आहे. तसेच टीबी (क्षयरोग) आणि एचआयव्ही असे दोन्ही आजार असलेले 7 रुग्ण आढळून आले आहेत. या सर्वांना एआरटी आणि डॉटस्‍ या दोन्ही उपचार पध्दतीवर ठेवण्यात आले आहे, अशी माहिती बैठकीत सादर केली.

शेवटी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राजेंद्र सुर्यवंशी यांनी बैठकीस उपस्थित सर्व समिती सदस्यांचे आभार मानले.

******

 

भिक्षावृत्तीमुक्त भारत उपक्रमासाठी प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन

 

 

हिंगोली, (जिमाका) दि. 25 : भारत सरकारच्या सामाजिक न्याय आणि सशक्तीकरण मंत्रालयाने ‘SMILE- Support For Marginalized Individuals For Livelihood and Enterprise’ उपजिविका आणि उपक्रमासाठी उपेक्षित व्यक्तींसाठी समर्थन ही योजना तयार केली आहे. ज्यामध्ये भीक मागण्याच्या कृतीत गुंतलेल्या व्यक्तींचे सर्व समावेशक पुनर्वसन या उपयोजनेचा समावेश आहे. उपयोजनेमध्ये भीक मागण्याच्या कृतीत गुंतलेल्या व्यक्तींसाठी कल्याणकारी उपायांसह अनेक व्यापक उपायांचा समावेश आहे. पुनर्वसन , वैद्यकीय सुविधांची तरतूद , समुपदेशन , मुलभूत  कागदपत्रे , शिक्षण कौशल्य विकास, आर्थिक संबंध इत्यादींवर या योजनेचा भर आहे. ही योजना राज्य, केंद्रशासित प्रदेश सरकार, स्थानिक नागरी संस्था, स्वयंसेवी संस्था, नागरी संस्था संघटना, समुदाय आधारित संस्था आणि इतरांच्या पाठिंब्याने राबविण्यात येणार आहे.

या उपयोजनेतून देशाला भीक्षावृत्तीमुक्त भारत (भिक्षेपासून मुक्त) बनविण्यासाठी भीक मागण्याच्या कृतीत गुंतलेल्या व्यक्तींपैकी केंद्र आणि राज्य सरकार , स्थानिक स्वराज्य संस्था क्षेत्रात काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्था, सामाजिक कार्यकर्ते आणि मोठ्या प्रमाणावर जनता अशा विविध भागधारकांच्या समन्वित कार्यवाहीव्दारे भीक मागण्यात गुंतलेल्या व्यक्तींचे सर्व समावेशन करण्याचे धोरण निश्चित करण्यात आले आहे. भीक मागण्यात गुंतलेल्या व्यक्तींचे सर्वेक्षण आणि ओळख, भीक मागण्यात गुंतलेल्या व्यक्तींचे एकत्रीकरण, निवारा, पुन:भीक मागण्यात गुंतलेल्या व्यक्तींचा शाश्वत विकास करण्यासाठी आणि लक्षित लोकसंख्येचे एकूण आरोग्य आणि कल्याण सुधारणे हा या योजनेचा उद्देश आहे. त्यानुसार संस्थेचे  अनुभव पात्रतेच्या आधारे पुढील प्रक्रियेसाठी स्वयंसेवी संस्थांची निवड केली जाईल. संस्थेची निवड खालील प्रमाणे करण्यात येईल. संस्थेची मान्य कर्मचारी संख्या, संस्थेतील कर्मचाऱ्याची भिक्षेकरीमुक्त क्षेत्रात कामाची गुणवता, भिक्षेकरीमुक्त शहराचा प्रकल्प अहवाल इत्यादी बाबींवर आधारित संस्थेची निवड होणार आहे.

ही योजना दिल्ली, बेंगलोर, चेन्नई, हैद्राबाद, इंदौर, लखनऊ, मुंबई, नागपूर, पटना, अहमदाबाद इत्यादी शहरांसाठी राबविण्यात येत आहे. यासाठी पुढील दिलेल्या संकेतस्थळावर  https://grants.msje.gov.in/ngo-login या लिंकवर e-anudaan वर गुगल फॉर्मव्दारे प्रस्ताव ऑनलाईन सादर करणे आवश्यक आहे, असे जिल्हा महिला व बालविकास अधिकारी, हिंगोली यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे.

******