15 August, 2019



शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा नागरिकांनी लाभ घ्यावा
                              - पालकमंत्री अतुल सावे
हिंगोली, दि. 15 : प्रत्येक सामान्य नागरिकांना स्वत:च्या मालकीची घरे मिळावी हिच शासनाची इच्छा असून  ग्रामीण नागरिकांनी पंतप्रधान आवास योजनेबरोबर शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन पालकमंत्री अतुल सावे  यांनी केले.
मौजे लिंगदरी ता. सेनगांव येथे आयोजित प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण व महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानांतर्गत घरकूल लोकार्पन व भूमीपूजन सोहळा कार्यक्रमात पालकमंत्री अतुल सावे  बोलत होते. यावेळी आमदार तान्हाजी मुटकुळे, जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, मुख्य कार्यकारी अधिकारी एच. पी. तुम्मोड, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक पी. पी. घुले, उपविभागीय अधिकारी अतुल चोरमारे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री. दाताळ, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (महिला व बाल) श्री. गणेश वाघ,  तहसिलदार जिवककुमार कांबळे, लिंगदरी गावचे सरपंच विठ्ठल राठोड,  यांच्यासह  अधिकारी व पदाधिकारी, नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
पालकमंत्री श्री. सावे म्हणाले की, राज्याचे मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील विकासापासून वंचित राहिलेली सुमारे 1 हजार गावे दत्तक घेतली असून त्यातील  हे मौजे लिंगदरी गाव असून एकूण एकशे अकरा घरकुल मंजुर असलेले जिल्ह्यातील एकमेव गाव आहे. येथील नागरिकांप्रमाणेच राज्यातील प्रत्येक विकासापासून वंचित असलेल्या गावातील ग्रामस्थांना सुख सोयी उपलब्ध करुन देण्यासाठी शासन कटिबध्द असल्याचेही यावेळी त्यांनी सांगितले.
केंद्र शासनाने सुरु केलेल्या आयुष्यमान भारत योजनेमध्ये सामान्य नागरिकांना सुमारे 5 लाख रुपयांचा विमा मोफत मिळणार असून या योजनेतंर्गत सुमारे 10 कोटी कुटुंबांना आरोग्याच्या मोफत सुविधा देण्यात येणार असल्याचेही यावेळी पालकमंत्री अतुल सावे यांनी सांगितले. तसेच उज्वला गॅस योजना, मुद्रा लोन योजना, प्रधानमंत्री आवास योजना, प्रधानमंत्री किसान सन्मान योजना, अशा अनेक शासनाच्या कल्याणकारी योजना असून त्याचा लाभ घेण्याचे आवाहनही यावेळी पालकमंत्री यांनी केले.   
         कार्यक्रमाचे प्रास्ताविकात लिंगदरी गावचे उपसरपंच सुमित राठोड यांनी लिंगदरी गाव विकासाकडे वाटचाल करत असून या गावाने शासनाच्या जलयुक्त शिवार योजना, नानाजी देशमुख कृषि संजिवनी योजना, राष्ट्रीय पेयजल योजना, मनरेगा योजना आदी शासनाच्या योजनांचा लाभ घेतला असल्याचे त्यांनी सांगितले.  
            प्रारंभी पालकमंत्री श्री. सावे यांच्या हस्ते लाभ मिळालेल्या गावातील ग्रामस्थांना प्रातिनिधीक स्वरुपात शिधापत्रिकेचे वाटप करण्यात आले तसेच  महिला बचत गटांना फिरता निधी मंजुर प्रमाणपत्र,  शेतकरी गटांचे नोंदणी प्रमाणपत्र , जिल्हा उद्योग केंद्राअंतर्गत व्यवसाय प्रशिक्षण प्रमाणपत्र व महाराष्ट्र हरित सेना सदस्य प्रमाणपत्र आदि प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले. शेवटी आभार मुख्याध्यापक श्री. मुळे यांनी मानले.
*****


पालकमंत्री अतुल सावे यांची ‘लोकराज्य’ स्टॉलला भेट


पालकमंत्री अतुल सावे यांची ‘लोकराज्य’ स्टॉलला भेट


हिंगोली, दि. 15 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय मार्फत प्रकाशित करण्यात येणाऱ्या महाराष्ट्र शासनाचे  मुखपत्र असलेल्या 'लोकराज्य' या मासिकाचा भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या 72 व्या वर्धापन दिन कार्यक्रमानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात लोकराज्य मासिकाचा स्टॉलला राज्याचे उद्योग आणि खनिकर्म, अल्पसंख्यांक विकास व वक्फ विभागाचे राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे यांनी भेट दिली.
लोकराज्य मासिकात ग्रामपंचायत ते मंत्रालय येथील कारभाराची माहिती प्रतिबिंबीत करण्यात येते. तसेच महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात शासनाची माहिती पोहचविणारे राज्य शासनाचे मुखपत्र असलेले हे एकमेव मासिक असल्याचेही पालकमंत्री श्री. सावे यावेळी म्हणाले.
यावेळी खासदार हेमंत पाटील, आमदार तान्हाजी मुटकुळे, जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, जिपचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. एच. पी. तुम्मोड, पोलीस अधिक्षक योगेश कुमार यांनी देखील लोकराज्य स्टॉल ला भेट दिली.
यावेळी पालकमंत्री यांच्यासह इतर मान्यवरांनी महाराष्ट्र राज्याचे मुखपत्र असलेल्या लोकराज्य मासिकाच्या स्टॉलला भेट दिली.
*****

पालकमंत्री यांच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन


पालकमंत्री यांच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन

हिंगोली, दि. 15:  पालकमंत्री अतुल सावे यांच्या मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीमधील हिंगोली जिल्ह्याच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन आज सकाळी त्यांच्या हस्ते संपन्न झाले.
यावेळी खासदार हेमंत पाटील, आमदार तान्हाजी मुटकूळे, जिल्हाधिकारी रुचेश जयंवशी, पोलीस अधीक्षक योगेश कुमार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. एच. पी. तुम्मोड, अप्पर जिल्हाधिकारी जगदिश मिनियार, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी यांची पमुख उपस्थिती होती.  
नागरिकांनी आपल्या समस्या अथवा निवेदन या कार्यालयात सादर करण्याचे आवाहनही पालकमंत्री श्री. सावे यांनी यावेळी केले.
**** 

आश्वासक औद्योगिकरणामूळे महाराष्ट्र राज्य गुंतवणूकीकरीता प्रथम क्रमांकाचे राज्य -पालकमंत्री अतुल सावे



आश्वासक औद्योगिकरणामूळे महाराष्ट्र राज्य गुंतवणूकीकरीता प्रथम क्रमांकाचे राज्य
-पालकमंत्री अतुल सावे
हिंगोली,दि.15: प्रारंभी पासूनच देशातील सर्व राज्यांनी विविध क्षेत्रात प्रगती साधण्याचा प्रयत्न केला. परंतू देशाच्या प्रगतीत महाराष्ट्राचे नेहमीच मोठे योगदान राहिले असून यापूढे ही ते राहणार आहे. राज्यातील आश्वासक औद्योगिकरणामूळे महाराष्ट्र राज्य गुंतवणूकीकरीता प्रथम क्रमांकाचे राज्य असल्याचे प्रतिपादन राज्याचे उद्योग आणि खनिकर्म, अल्पसंख्यांक विकास व वक्फ विभागाचे राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे यांनी केले .
येथील जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित स्वातंत्र्य दिनाच्या 72 व्या वर्धापन दिनानिमित्त ध्वजारोहणाच्या मुख्य शासकीय कार्यक्रमप्रसंगी पालकमंत्री अतुल सावे बोलत होते. यावेळी, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शिवराणीताई नरवाडे, खासदार हेमंत पाटील, आमदार सर्वश्री तान्हाजी मुटकुळे, जिल्हाधिकारी रूचेश जयवंशी, जिपचे मुख्य कार्यकारी अधिकारी एच. पी. तुम्मोड, पोलीस अधीक्षक योगेश कुमार, अप्पर जिल्हाधिकारी जगदिश मिनियार, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी यांची प्रमुख उपस्थिती होती.
            मागील दोन वर्षात संपन्न झालेल्या ‘मेक इन इंडिया व मॅग्नेटिक महाराष्ट्र’ गुंतवणूक परिषदेमध्ये जवळपास रु. 20 लक्ष कोटी रुपयाची गुंतवणूक अपेक्षित असून अंदाजे 60 लाख रोजगार उपलब्ध होणे अपेक्षित आहे. मागील 5 वर्षात एकूण 10 लक्ष 27 हजार 07 लघु उद्योग स्थापित झालेले असून, त्यामध्ये रु. 16 हजार 562 कोटी रुपयाची गुंतवणूक झाली आहे व 59.42 लक्ष रोजगार निर्मिती झालेली आहे. डिसेंबर 2014 ते ऑगस्ट 2019 या कालावधीत राज्यामध्ये सर्वात जास्त थेट विदेशी गुंतवणुकीचे प्रस्ताव प्राप्त झालेले असून, देशात एकूण झालेल्या विदेशी गुंतवणूकीपैकी 30 टक्के गुंतवणूक म्हणजेच  रु. 3 लक्ष 68 हजार कोटीची गुंतवणूक महाराष्ट्र राज्यात झालेली आहे. 
जून-जूलै महिन्यात पावसाची सुरुवात चांगली झाली नाही. परंतू मागील काही दिवसापासून जिल्ह्यात पावसाला चांगली सुरुवात झाली आहे. वार्षिक सरासरीच्या तुलनेत जिल्ह्यात आतापर्यंत 42 टक्के पाऊस झाला असून जिल्ह्याला अद्यापही दमदार पावसाची प्रतीक्षा आहे. खरीप हंगामात जिल्ह्यात 3 लाख 67 हजार हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. शेतकऱ्यांना पेरणीकरीता बियाणे आणि खताची उपलब्धता व्हावी यासाठी योग्य नियोजन करण्यात आले असून, खतांची ई-पॉस मशिनद्वारे ऑनलाईन विक्री करण्यात येत आहे. जिल्ह्यातील 2 लाख 82 हजार शेतकरी बांधवानी 2 लाख 35 हेक्टरवरील पिकांसाठी सुमारे 90 कोटी रुपयांचा पीकविमा उतरविला आहे. तर श्री  छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजने अंतर्गत जिल्ह्यातील 66 हजारहून अधिक शेतकऱ्यांना रु. 267 कोटी रुपयांची कर्जमाफी झाली आहे. राज्य शासनाच्या महत्वकांक्षी जलयुक्त शिवार अभियानामुळे जिल्ह्यातील प्रत्येक गावात शाश्वत पाणी आणि शेतीकरीता सिंचनाची सोय उपलब्ध झाली आहे. या अभियाना अंतर्गत सन 2016 ते 2019 या कालावधीत जिल्ह्यात एकुण 419 गावांची निवड झाली होती. निवड केलेल्या गावामध्ये पूर्ण झालेल्या कामामुळे 42 हजार टि.सी.एम. पाणीसाठा निर्माण झाला आहे. त्या पाणीसाठ्यानुसार 84 हजार हेक्टर संरक्षित सिंचन  क्षेत्र जिल्ह्यात निर्माण झाले आहे. ʿमागेल त्याला शेततळेʾ योजने अंतर्गत जिल्ह्यास अडीच हजार शेततळ्यांचे उद्दिष्ट प्राप्त झाले होते. त्यानुसार आज रोजी 3 हजार 557 शेततळे पूर्ण करुन उद्दिष्टपूर्ती केली आहे. हिंगोली जिल्ह्यास वाढवून मिळालेले व सुधारीत 2500 लक्षांक साध्य करुन सुध्दा अतिरिक्त मागणीनुसार 3 हजार 557 शेततळे पूर्ण करुन योजनेच्या नावाप्रमाणेच जिल्ह्यात योजना उत्कृष्टपणे कृषी विभागातर्फे राबविण्यात आली असल्याचेही यावेळी पालकमंत्री यांनी सांगितले.
            राज्य स्वच्छ महाराष्ट्र अभियानाअंतर्गत हिंगोली नगर परिषदेचा राज्यामध्ये 33 वा क्रमांक आला असून मराठवाड्यात पहिला क्रमांक आला आहे. राज्य शासनाने जिल्ह्यातील सर्व नगर पालिका आणि नगर पंचायती हागणदारी मुक्त घोषित केल्या आहे. 33 कोटी वृक्ष लागवड उपक्रमाअंतर्गत जिल्ह्याने उल्लेखनीय काम केले असून, जिल्ह्यात आतापर्यंत 54 लाख वृक्ष लागवड करण्यात आली आहे. रमाई योजनेअंतर्गत ग्रामीण भागासाठी 3 हजार 500 तर शहरी भागासाठी 249 घरकुल मंजूर झाली आहेत. तसेच कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजनेतंर्गत 11 अनुसूचित जातीच्या लाभार्थ्यांना 43 एकर शेतीचे वितरण करण्यात आले आहे.  तसेच  प्रधानमंत्री आवास योजना, मुख्यमंत्री ग्राम सडक योजना, मुद्रा बँक योजना, प्रधानमंत्री उज्ज्वला योजना अंतर्गत जिल्ह्याने भरीव कामगिरी केली असून राज्याच्या महसूलात महत्वाचा वाटा असणारे खनिज पदार्थ उत्खनन करताना पर्यावरणाला हानी पोहचणार नाही असे तंत्रज्ञान विकसित करण्यात आले आहे. उद्योगांना कोळसा उपलब्ध करुन देणे बरोबरच त्यांना सवलतीच्या दरात वीज उपलब्ध करुन देऊन त्यांचे क्लस्टर निर्माण करण्यात आले आहे. राज्यातील सर्व खाणपट्ट्यात डिजीटलायजेशन करण्यात आले आहे. अल्पसंख्यांक समाजाच्या सक्षमीकरणासाठी तसेच त्यांच्या सामाजिक व आर्थिक प्रगतीसाठी  अल्पसंख्यांक विभागाने अनेक उपक्रम राबविले आहेत. राज्य सरकारने मराठवाडा, विदर्भ व उत्तर महाराष्ट्राच्या जलद विकासासाठी उपाययोजना राबविण्यासाठी 2018 साली विशेष कार्यक्रम जाहीर केला होता. याअंतर्गत अल्पसंख्याक समाजातील महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी त्यांचे बचत गट निर्माण करून त्यांना कौशल्य विकास प्रशिक्षण देऊन, त्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या जाणार असल्याचे पालकमंत्री यांनी यावेळी सांगितले. 
राज्यातील कोल्हापूर सांगलीसह पाच जिल्ह्यांमध्ये महापूरामुळे जनजीवन पूर्णत: विस्कळीत झाले आहे. शासनातर्फे आपादग्रस्तांना सर्वतोपरी मदत केली जात आहे. आपणही त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून त्यांना मदतीचा हात देऊन भक्कम पाठबळ देण्याचे आवाहनही यावेळी पालमंत्री श्री. सावे यांनी केले.
यावेळी पालकमंत्री श्री. सावे यांच्या हस्ते जिल्हा उद्योग केंद्रामार्फत देण्यात येणारा सन 2017  चा प्रथम पुरस्कार मे. राधा जिनिंग व प्रेसिंग फॅक्ट्री लिंबाळा एमआयडीसी चे उद्योजक श्री. हनुमान द्वारकादास मुंदडा यांना प्रथम तर द्वितीय मे. निर्मल शिव इंडस्ट्रीज सहकारी औद्योगिक वसाहत हिंगोली चे उद्योजक श्री सावरमल बद्रीप्रसाद अग्रवाल  यांना देण्यात आला. तर सन 2018 चा जिल्हा पुरस्कार मे. निर्मल फुड प्रॉडक्टस एन.आ.सी. तापडीया ईस्टेट हिंगोली चे उद्योजक श्री. श्याम राजकुमार नयनवाणी  यांना प्रथम तर द्वितीय पुरस्कार मे. नंदिनी गृह उद्योग पानकन्हेरगाव ता. सेनगाव चे उद्योजक श्री. महादेव राधाअप्पा कोतेवार यांना देण्यात आला.
तसेच वन विभागामार्फतही यावेळी पुरस्काराचे वितरण यावेळी करण्यात आले. वन विभागामार्फत संत तुकाराम वनग्राम योजना अंतर्गत प्रथम पुरस्कार वन परिक्षेत्र तालुका सेनगांव अंतर्गत वनव्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री गजानन लक्ष्मण राठोड यांना देण्यात आला. तर द्वितीय पुरस्कार वन परिक्षेत्र औढा अंतर्गत वनव्यवस्थापन समितीचे अध्यक्षा श्रीमती सविता मारोती बेले यांना तर वन परिक्षेत्र तालुका हिंगोली अंतर्गत व्यवस्थापन समितीचे राहोली जिल्हास्तरीय तृतीय पुरस्कार प्राप्त समितीचे अध्यक्ष श्री. प्रभाकर खुडुजी जावळे यांना तृतीय पुरस्कार पालकमंत्री श्री. सावे यांच्या हस्ते देण्यात आला.
कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रामार्फत हिरकणी नवउद्योजक महाराष्ट्राची या योजनेंतर्गत जिल्हास्तरावर निवड करण्यात आलेल्या दहा महिला बचत गटांचा सत्कार यावेळी पालकमंत्री यांच्याहस्ते सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देवून करण्यात आला. यामध्ये रोकडेश्वर स्वयंसहाय्यता महिला बचत गट वारंगा फाटा, ता. कळमनुरी. गजानन महाराज स्वयंसहायता समुह कळमनुरी. महालक्ष्मी महिला बचत गट, रेगाव ता. सेनगाव. सतिआई महिला बचत गट गोरेगाव ता. सेनगांव. जय जिजाऊ स्वयंसहायता बचत गट अकोली ता. वसमत. अहिल्याबाई होळकर स्वयंसहायता महिला समुह आंबा ता. वसमत. सावता माळी महिला बचत गट गडद ता. औंढा. महानंदा महिला बचत गट जवळा बाजार ता. औंढा. शिवशक्ती स्वयंसहायता समुह अमला ता जि. हिंगोली व रमाबाई स्वयंसहायता समुह, कोथळज ता. जि. हिंगोली 
एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कळमनुरीचे प्रकल्प अधिकारी डॉ. विशाल राठोड यांना राज्यस्तरीय उत्कृष्ट प्रशासक विशेष गौरव पुरस्काराचे स्मृतीचिन्ह पालकमंत्री यांच्या हस्ते देण्यात आले तसेच एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे कबड्डी स्पर्धेतील राज्यस्तरीय प्रथम क्रमांक विजेत्या मुले व मुलींच्या संघांना ट्रॉफी देवून गौरवण्यात आले.
यावेळी उपजिल्हा  निवडणूक अधिकारी भाऊसाहेब जाधव, उपजिल्हाधिकारी निवृत्ती गायकवाड,  उपजिल्हाधिकारी गोविंद रणवीरकर, उपविभागीय अधिकारी अतुल चोरमारे, हिंगोली नगर परिषदेचे मुख्याधिकारी रामदास पाटील, विभागीय वन अधिकारी केशव वाबळे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी नितीन दाताळ, उप मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश वाघ, जिल्हा शल्य चिकित्सक श्रीवास, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी राहूल जाधव, सहायक संचालक रेणुका तम्मलवार, डायटचे प्राचार्य गणेश शिंदे  यांच्यासह विविध विभागातील अधिकारी-कर्मचारी, स्वातंत्र्य सैनिक, ज्येष्ठ नागरिक,  पत्रकार, विद्यार्थी-विद्यार्थींनी आणि नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
 ****

14 August, 2019

जिल्हा वार्षिक योजनेतील कामे वेळेत पूर्ण करा · पालकमंत्री अतुल सावे







जिल्हा वार्षिक योजनेतील कामे वेळेत पूर्ण करा
·        पालकमंत्री अतुल सावे

            हिंगोली,दि.14: जिल्हा वार्षिक योजने अंतर्गत मंजूर नियतव्यय खर्च करण्यासाठी संबंधित विभागांनी तांत्रिक मान्यता, प्रशासकीय मान्यता, निविदा प्रक्रिया पूर्ण करून प्रस्तावित कामे वेळेत पूर्ण करावी असे निर्देश राज्याचे उद्योग आणि खनिकर्म, अल्पसंख्यांक विकास व वक्फ विभागाचे राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे यांनी दिले.
            येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात आयोजित जिल्हा वार्षिक योजना आढावा बैठकीत पालकमंत्री श्री. सावे बोलत होते. यावेळी जिप अध्यक्षा शिवराणीताई नरवाडे खासदार हेमंत पाटील, आमदार सर्वश्री तान्हाजी मुटकुळे, डॉ. संतोष टारफे, विप्लव बाजोरिया, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एच. पी. तुम्मोड यांची प्रमुख उपस्थिती होती.
            यावेळी श्री. सावे म्हणाले की, आगामी कालावधीत विधानसभा निवडणूकीची आचारसंहिता लक्षात घेवून सर्व यंत्रणांनी जिल्हा वार्षिक योजने अंतर्गत चालू आर्थिक वर्षातील मंजूर झालेला योजनातंर्गत निधींच्या तांत्रिक व प्रशासकीय मान्यतेसाठी पाठपुरावा करावा. तसेच तांत्रिक मान्यता मिळालेल्या कामे पूर्ण करून उपलब्ध निधी वेळेत खर्च करावा. सदर निधी समर्पित होणार नाही याची दक्षता सर्व विभागांनी घ्यावी. सर्व संबंधीत विभागांनी दर आठवड्याला कामांचा आणि खर्चीत-अखर्चीत निधीचा अहवाल सादर करावा. तसेच जिल्हा वार्षिक योजना सन 2018-19 अंतर्गत पुनर्विनियोजनाचे प्रस्ताव आणि जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण), अनुसूचित जाती उपयोजना आणि अनुसूचित जमाती उपयोजना सन 2019-20 चे आराखडे शासन निर्णयातील निर्देशनुसार वेळेत संबंधीत विभागाकडे सादर करावेत, असे निर्देश ही श्री. सावे यांनी यावेळी दिले.
            सन 2018-19 मध्ये जिल्हा वार्षिक योजना सर्वसाधारण अंतर्गत मंजूर नियतव्यय 100.75 कोटी होता त्यापैकी 1.75 कोटी खर्च झाला. तर अनुसूचित जाती अंतर्गत मंजूर नियतव्यय 50.47 कोटी होता त्यापैकी 50.46 कोटी खर्च झाला असून आदीवासी उपयोजना अंतर्गत मंजूर नियतव्यय 32.17 कोटी होता त्यापैकी 30.38 कोटी खर्च झाला असल्याची माहिती जिल्हाधिकारी श्री. जयवंशी यांनी यावेळी दिली.
            यावेळी पालकमंत्री श्री. सावे यांनी महावितरण, शिक्षण, महिला व बालविकास, आरोग्य, सार्वजनीक बांधकाम जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र आदी विभागांचा योजनानिहाय आढावा घेतला. यावेळी जिल्हा नियोजन समिती सदस्य, जिल्हा नियोजन अधिकारी किरण गिरगावकर, समाज कल्याण सहायक आयुक्त भाऊराव चव्हाण, एकात्मिक आदीवासी  विकास प्रकल्प कार्यालयाचे प्रकल्प अधिकारी विशाल राठोड यांच्यासह सर्व विभाग प्रमुखांची उपस्थिती होती.
****


परिवहन कायदा करणारे आपले पहिले राज्य -परिवहन मंत्री दिवाकर रावते







परिवहन कायदा करणारे आपले पहिले राज्य
-परिवहन मंत्री दिवाकर रावते

हिंगोली, दि. 14: वाहतूकीचे नियम पालन न केल्याने दररोज अनेक अपघात होतात. यामुळे अनेक कुंटूंब उध्वस्त होतात. त्याकरीता या अपघातावर नियंत्रण आणण्यासाठी परिवहन कायदा करणारे आपले पहिले राज्य असल्याचे प्रतिपादन राज्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी केले.
येथील उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या नुतन इमारत उद्घाटनाप्रसंगी श्री. रावते बोलत होते. यावेळी पालकमंत्री अतुल सावे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शिवराणीताई नरवाडे, खासदार हेमंत पाटील, आमदार सर्वश्री तान्हाजी मुटकुळे, विप्लव बाजोरिया, राहूल पाटील,  जिल्हाधिकारी रूचेश जयवंशी, जिपचे मुख्य कार्यकारी अधिकारी एच.पी. तुम्मोड, पोलीस अधीक्षक योगेश कुमार, प्रादेशिक परिवहन अधिकारी शैलेश कामत आणि उप प्रादेशिक परिवहन अधिकारी राहूल जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती.
पुढे श्री. रावते म्हणाले की, आजची पिढी ही भौतिक व वैचारीक दृष्टीने गतीमान आहे. राज्यात सुमारे 3 कोटी 27 लाख वाहने असून, त्यात पावणे दोन कोटी वाहने ही दूचाकी आहेत. आणि त्यांचे अपघाताचे प्रमाण जास्त आहे. आज जे रस्ते अपघात होतात, त्यात 19 ते 35 वयोगटातील व्यक्तींचा मृत्यू होत असल्याचे निदर्शनास येते. आणि हे त्या मृत झालेला व्यक्तीच्या कुंटूंबासाठी आणि देशासाठी हानी आहे. याकरीता हेल्मेट वापरणे आवश्यक आहे. कारण आपला देश हा तरुणांचा देश म्हणुन ओळखला जातो. अपघात हे कधी ही सांगुन होत नसतात. त्याकरीता आपणच आपली काळजी घेणे आवश्क आहे. एस. टी. महामंडळाच्या बसच्या अपघातात मृत्यू झाल्यास संबंधीताच्या कुंटूंबास 10 लाख रुपयांची मदत दिली जाते. याकरीता अल्यूमिनियमद्वारे एस. टी. महामंडळाच्या बसची होणारी बांधणी ही आता लोखंडाद्वारे होत आहे. तसेच एस.टी. महामंडळात कामावर असतांना मद्य प्राशन करुन सेवा करणाऱ्यावर दोन तासात निलंबनाची कारवाई करण्याचे आदेश देण्यात आल्याचे श्री. रावते यांनी सांगितले.
आजचे युग हे मुलींना क्रांती घडविण्याचे युग आहे. त्याकरीता एक वर्ष छोटे वाहन चालविण्याचा अनुभव असणाऱ्या मुलींना एक वर्षाचे प्रशिक्षण देवून वाहनचालक पदाची नियूक्ती देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मुलींनी एस.टी. बस चालविण्याचा हा प्रयोग देशातील पहिला प्रयोग असल्याचे ही श्री.रावते यावेळी म्हणाले.  
पालकमंत्री श्री. सावे यावेळी म्हणाले की, जिल्ह्याची निर्मिती होवून 20 वर्ष झाल्यानंतर आज प्रादेशिक परिवहन कार्यालयास ही अत्यंत अत्याधुनिक अशी इमारत मिळाली आहे. तसेच हे कार्यालय संपूर्णरित्या संगणकीकृत असल्याने ऑनलाईन पध्दतीने नागरिकांना सर्व सेवा प्राप्त मिळण्यास मदत होणार आहे.
खासदार श्री. पाटील म्हणाले की, उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या नुतन इमारत ही अत्याधूनिक आहे. यामुळे नागरिकांना सुविधा मिळण्यासाठी मदत होणार आहे. परंतू या ठिकाणी अधिकारी-कर्मचारी पदांचा असलेला अनुशेष भरुन दिल्यास अधिक चांगली सेवा नागरिकांस मिळण्यास मदत होईल.  तसेच अपघातग्रस्तांना तातडीच्या उपचारासाठी आर्थिक मदत आणि रस्ते अपघातातील मृत्यूच्या प्रमाणात घट करण्यासाठी बाळासाहेब ठाकरे अपघात विमा योजना सुरु केली. तसेच सर्वसामान्य प्रवशांना सुखकर प्रवासाकरीता शिवशाही बस सुरु केली असल्याचे पाटील यावेळी म्हणाले.
प्रारंभी परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्या हस्ते उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या नुतन इमारतीचे फित कापून  उद्घाटन करण्यात आले. तसेच यावेळी ‘रस्ता सुरक्षा अभियान’ पुस्तिकेचे विमोचन करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रादेशिक परिवहन अधिकारी शैलेश कामत यांनी केले. तर उप प्रादेशिक परिवहन अधिकारी राहूल जाधव यांनी आभार मानले. यावेळी मोठ्या संख्येने नागरिकांची उपस्थिती होती.
*****  


कंत्राटी ग्रामसेवक प्रताप रामसिंग ठाकूर हे विना परवानगी गैरहजर


कंत्राटी ग्रामसेवक प्रताप रामसिंग ठाकूर हे विना परवानगी गैरहजर

हिंगोली,दि.14: पंचायत समिती, हिंगोली येथील कंत्राटी ग्रामसेवक प्रताप रामसिंग ठाकूर हे दिनांक 1 मे] 2019 पासून कोणत्याही प्रकारची पूर्व सूचना न देता कामावर विनापरवानगी अनाधिकृत गैरहजर आहेत.
या प्रसिध्दी पत्राद्वारे प्रताप ठाकूर यांना अंतिम सूचना देण्यात येत आहे की, ही सूचना प्रसिध्द झाल्यापासून सात दिवसांत पंचायत समिती, हिंगोली येथे कंत्राटी ग्रामसेवक या पदावर हजर व्हावे. अन्यथा आपणांस दिलेल्या नियुक्ती आदेशातील अटी व शर्तींचा भंग केल्यामुळे आपली दिनांक 1 मे, 2019 पासून सेवा समाप्त करण्यात येईल, असे उप मुख्य कार्यकारी अधिकारी (पं.), जिल्हा परिषद, हिंगोली यांनी एका प्रसिध्दी पत्रद्वारे कळविले आहे.
****