15 October, 2020

महिला लोकशाही दिनाचे 19 ऑक्टोबर रोजी आयोजन

 


        हिंगोली, दि. 15 : राज्यघटनेने प्रत्येक नागरिकाला समान हक्क व समान संधी असा मुलभूत हक्क दिलेला आहे. त्याअंतर्गत समस्याग्रस्त व पिडित महिलांना त्यांचे प्रश्न मांडण्यासाठी व्यासपीठ मिळावे. तसेच त्यांच्या तक्रारी, अडचणी यांची शासकीय यंत्रणेकडून सोडवणूक करण्यासाठी एक प्रभावी उपाययोजना म्हणून जिल्हास्तरावर दर महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी किंवा तिसऱ्या सोमवारी सार्वजनिक सुट्टी असल्यास त्यानंतर येणा-या कामकाजाच्या दिवशी जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिन राबविण्यात येतो. या महिला लोकशाही दिनाचे आयोजन दिनांक 19 ऑक्टोबर, 2020 रोजी सकाळी 11.00 वाजता जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली त्यांच्या दालनात करण्यात आले आहे.

            समस्याग्रस्त व पिडीत महिलांनी त्यांच्या अडचणी मांडण्यासाठी विहित नमुन्यातील अर्ज जिल्हा महिला व बालविकास अधिकारी,  मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, हिंगोली यांच्या कार्यालयात सादर करावेत. यामध्ये न्याय प्रविष्ठ प्रकरणे, विहित नमुन्यात नसणारे व आवश्यक ती कागदपत्रे न जोडलेले, सेवा विषयक, आस्थापना विषयक बाबी, तक्रार निवेदन वैयक्तिक स्वरुपाची नसेल तर, असे अर्ज स्विकारले जाणार नाहीत.

समस्याग्रस्त व पिडीत महिलांनी शासनाने उपलब्ध करुन दिलेल्या व्यासपीठाचा उपयोग आपल्या अडचणी सोडविण्यासाठी करावा, असे आवाहन जिल्हा महिला व बालविकास अधिकारी, हिंगोली यांनी केले आहे.

*****

जिल्हाधिकारी कार्यालयात डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांना अभिवादन

 

हिंगोली, दि. 15 :- येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जयंती निमित्त त्यांच्या प्रतिमेस उपजिल्हा निवडणूक अधिकारी गोविंद रणवीरकर यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.

यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयातील व मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीतील अधिकारी, कर्मचारी यांनीही डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करुन अभिवादन केले.

 ***** 

14 October, 2020

जिल्ह्यात कोविड-19 चे नवीन 18 रुग्ण ; तर 12 रुग्ण बरे झाल्याने डिस्चार्ज · 192 रुग्णांवर उपचार सुरु तर एकाचा मृत्यू

         हिंगोली,दि. 12 : जिल्ह्यात 18 नवीन कोविड-19 रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजेंद्र सुर्यवंशी यांनी आज दिली आहे.

            आज प्राप्त झालेल्या अहवालानुसार रॅपीड अँटीजन टेस्टद्वारे हिंगोली परिसरात 14 व्यक्ती, वसमत परिसरात 01 व्यक्ती, कळमनुरी परिसरात 01 व्यक्ती  व सेनगाव परिसरात 02 व्यक्ती असे एकूण 18 कोविड-19 पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. तर आज 12 कोविड-19 रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच आज एका कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

       सद्य:स्थितीत जिल्हा सामान्य रुग्णालयातील आयसोलेशन वार्डमध्ये भरती असलेल्या कोविड-19 रुग्णांपैकी 32 रुग्णांची  प्रकृती गंभीर असल्याने त्यांना ऑक्सीजन चालू आहे. तर कोविड-19 च्या 07 रुग्णांची प्रकृती अतिगंभीर असल्याने त्यांना बायपॅप मशीनवर ठेवण्यात आले आहे. असे एकूण 39 रुग्णांची सद्य:स्थितीत प्रकृती चिंताजनक असून तज्ज्ञ डॉक्टरामार्फत त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. 

           जिल्ह्यात आजपर्यंत कोविड-19 चे एकूण 2 हजार 890 रुग्ण झाले असून, त्यापैकी 2 हजार 653 रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आज घडीला जिल्ह्यात एकूण 192 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तसेच कोविड-19 मुळे जिल्ह्यात आतापर्यंत 45 व्यक्तींचा मृत्यू झाला असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राजेंद्र सुर्यवंशी यांनी कळविले आहे.

 

****

13 October, 2020

‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ मोहिमेंचे शंभर टक्के उद्दिष्ट पूर्ण, जिल्ह्यातील 2 लाख 36 हजार 716 कुटुंबांचे सर्वेक्षण

        

 

हिंगोली दि. 13 : कोरोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणात आणण्यासाठी तसेच मृत्यूदर कमी करण्यासाठी जिल्ह्यात ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ या मोहिमेंतर्गत 02 लाख 36 हजार 716 कुटुंबाचे सर्वेक्षण करुन शंभर टक्के उद्दिष्ट पूर्ण करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शिवाजी पवार यांनी दिली आहे.

कोविडमुक्त महाराष्ट्र निर्माण करण्यासाठी जिल्ह्यात ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ ही मोहिम दोन टप्प्यात राबविण्यात येणार आहे. याचा पहिला टप्पा दि. 15 सप्टेंबर ते 12 ऑक्टोबर, 2020 असा असून तो पूर्ण झाला आहे. तर दुसरा टप्पा दि. 14 ऑक्टोबर ते 25 ऑक्टोबर, 2020 या कालावधीत राबविण्यात येणार आहे.

जिल्ह्यात पहिला टप्पा पूर्ण झाला असून यामध्ये ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ ही मोहिम यशस्वीपणे राबविण्यात आली आहे. या मोहिमेत शहरी भागातील 42 हजार 979 आणि ग्रामीण भागातील 1 लाख 93 हजार 737 कुटुंबे असे एकूण 2 लाख 36 हजार 716 कुटुंबांचे सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले आहे. जिल्ह्यात शहरी भागातील लोकसंख्या 2 लाख 18 हजार 954 एवढी आहे. तर ग्रामीण भागातील लोकसंख्या 9 लाख 98 हजार 504 एवढी असून शहरी व ग्रामीण मिळून 12 लाख 17 हजार 458 एवढी जिल्ह्याची लोकसंख्या आहे.   

या सर्वेक्षणामध्ये सारीचे 42 रुग्ण, आयएलआयचे 283 रुग्ण आणि कोविडचे 198 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. या सर्वांना पुढील उपचारासाठी फेवर क्लिनिकमध्ये संदर्भीत करण्यात आले आहेत. तसेच कोमार्बीड (मधुमेह, उच्च रक्तदाब, दमा, लठ्ठपणा, किडनी आजार, लिव्हर आदी) आजाराचे 46 हजार 170 व्यक्ती आढळून आले आहेत.

या मोहिमेच्या उद्दिष्ट पूर्ततेसाठी आरोग्य विभागाच्या वतीने 595 पथके स्थापन करुन यामध्ये एक हजार 785 कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या सर्व कर्मचाऱ्यांना बॅच, कॅप, टीर्शट देण्यात आले आहे. तसेच संदर्भ सेवेसाठी 37 वैद्यकीय अधिकारी, 29 रुग्णवाहिका आणि 30 फेवर क्लिनिकची व्यवस्था करण्यात आली आहे.

या मोहिमेअंतर्गत आरोग्य विभागामार्फत गावोगावी जाऊन कुटुंबातील सर्व सदस्यांची तपासणी करुन त्यांना आरोग्य शिक्षण देण्यात येत आहे. त्याचबरोबर माहिती पुस्तिका, फोल्डर, चित्ररथ, स्टीकर्सच्या माध्यमातून जनजागृती केली जात आहे, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शिवाजी पवार यांनी दिली आहे.

 

*****

12 October, 2020

जिल्ह्यात कोविड-19 चे नवीन 22 रुग्ण ; तर 20 रुग्ण बरे झाल्याने डिस्चार्ज · 175 रुग्णांवर उपचार सुरु तर एकाचा मृत्यू

         हिंगोली,दि. 12 : जिल्ह्यात 22 नवीन कोविड-19 रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजेंद्र सुर्यवंशी यांनी आज दिली आहे.

            आज प्राप्त झालेल्या अहवालानुसार रॅपीड अँटीजन टेस्टद्वारे हिंगोली परिसरात 15 व्यक्ती, कळमनुरी परिसरात 03 व्यक्ती तर आरटीपीसीआर टेस्टद्वारे हिंगोली परिसर 03 व्यक्ती, सेनगाव परिसर 01 व्यक्ती असे एकूण 22 कोविड-19 पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. तर आज 20 कोविड-19 रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच आज एका कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

       सद्य:स्थितीत जिल्हा सामान्य रुग्णालयातील आयसोलेशन वार्डमध्ये भरती असलेल्या कोविड-19 रुग्णांपैकी 25 रुग्णांची  प्रकृती गंभीर असल्याने त्यांना ऑक्सीजन चालू आहे. तर कोविड-19 च्या 07 रुग्णांची प्रकृती अतिगंभीर असल्याने त्यांना बायपॅप मशीनवर ठेवण्यात आले आहे. असे एकूण 32 रुग्णांची सद्य:स्थितीत प्रकृती चिंताजनक असून तज्ज्ञ डॉक्टरामार्फत त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. 

           जिल्ह्यात आजपर्यंत कोविड-19 चे एकूण 2 हजार 858 रुग्ण झाले असून, त्यापैकी 2 हजार 640 रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आज घडीला जिल्ह्यात एकूण 175 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तसेच कोविड-19 मुळे जिल्ह्यात आतापर्यंत 43 व्यक्तींचा मृत्यू झाला असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राजेंद्र सुर्यवंशी यांनी कळविले आहे.

 

****

अस्वच्छतेच्या मागे हात धुवून लागा…!

 

अस्वच्छतेच्या मागे हात धुवून लागा…!

 

            हिंगोली, दि.12: माणूस आणि इतर प्राण्यात दोन गोष्टींत महत्वाचे फरक आहे. तो म्हणजे माणसाचा मेंदू हा प्राण्यापेक्षा अतिविकसीत आहे आणि माणसाला हात आहेत. या दोन गोष्टींमुळे माणूस निसर्गातील सर्वात श्रेष्ठ बनण्याचा सतत प्रयत्न करत असतो. अगदी हिंस्त्र व माणसापेक्षाही शक्तीमान प्राण्यावर मात करण्याची तयारी माणसाची असते ती याच दोन गोष्टींमुळे. पण याच दोन गोष्टी माणसासाठी घातकही आहेत. मेंदू आणि हात ही ! त्या एवढ्या घातक आहेत की याच विशेषतेमुळे हिंस्त्र किंवा अवाढव्य दिसणाऱ्या प्राण्यावर मात करणारा माणूस नजरेने न दिसणाऱ्या अतिसुक्ष्म विषाणू, जिवाणू व जंतुंना अगदी सहज बळी पडतो.

            कोरोना या अतिसुक्ष्म विषाणूने संपूर्ण जगाला एकाच वेळी हादरा दिला. हा विषाणू वाऱ्यासारखा पसरला असला तरी तो वाऱ्याने पसरत नाही किंवा कोणा प्राण्यामार्फत पसरत नाही. तो पसरतो केवळ माणसामुळेच ! तो ही माणसाच्या ज्या दोन शक्ती आहेत त्या शक्तीमुळेच ! माणसाच्या ज्या सवयी आहेत त्यांचे नियंत्रण मेंदूमध्ये असते. नकळत तो त्या सवयीप्रमाणे वागून जातो. त्याने मनात आणल तर त्यात बदल घडवू शकतो. स्वच्छ राहण प्रत्येकाला आवडत आणि प्रत्येकाची स्वच्छतेची स्वत:ची अशी व्याख्या असते. त्यामुळे कुणी स्वच्छतेबद्दल सांगू लागल की वाईट वाटत. आम्ही काय अस्वच्छ आहोत का ? अस बोलल जातं. परंतु कोरोनाने आता सर्वांनाच दाखवून दिल आहे की,  काही तरी चुकत आहे !  माणसाला अजून बरंच काही शिकायचं आहे !’

            कोरोनापासून रक्षण व्हावे म्हणून मास्क वापरणे, दोन व्यक्तींमध्ये कमीत-कमी 2 मिटर अंतर ठेवणे या नवीन गोष्टी कराव्या लागत आहेत. परंतु हात साबणाने वारंवार स्वच्छ करणे, अस्वच्छ हाताने डोळ्याला, नाकाला व तोंडाला स्पर्श करु नये हे काही सांगण्याची गरज पडायला नको होती. हे तर शालेय  शिक्षणापासूनच सांगितले जाते की, हात-पाय  धुवून जेवायला बसा !’ तरीही हे सांगायची वेळ आलीय याचाच अर्थ असा की माणसाने त्यांच्या मेंदुला हात स्वच्छ ठेवण्याचे शिकवलेच नाही. आपल्याला हे जाणून दु:खच वाटलं पाहिजे की भारतासारख्या देशात 0 ते 5 वर्ष वयोगटातील दररोज 1000 बालकं डायरियासारख्या आजाराने दगावतात. असंही संशोधनात समोर आलं आहे की केवळ साबण आणि पाण्याने हात स्वच्छ धुतल्यामुळे डायरियापासून 48 टक्के तर श्वसनाशी संबंधित 20 टक्के आजारापासून बचाव होवू शकतो. हात म्हणजे काय हे ही माहिती व्हायच्या अगोदर दुसऱ्या कुणातरी जाणत्याच्या हातामुळे बालकांचा घात होतो, हे अत्यंत गंभीर आहे.

            हात धुण्याबाबत आपण एवढे निष्काळजी झालोय की कोरोना येईपर्यंत आपण त्याला जास्त गंभीर घेतलच नव्हत. यापूर्वी Ebola, Shigellosis, SARS व Hepatitis E या आजारावेळी ही हात धुणे ही अत्यंत महत्वाची सवय मानली गेली होती. मात्र त्याला तेवढ गांभीर्याने घेतल नव्हत. एक अभ्यास अस सांगतो की नियमीत हात धुण्याच्या सवयीमुळे कोरोनापासून होणाऱ्या कोव्हीड-19 या आजारापासून 36 टक्के रक्षण होवू शकते मात्र आताही अनेक महाभाग असे आहेत की, ते कधी-मधी लोक लाजेस्तव हात धुतात !

           

 

 

 

 

 

 

 

पान क्र.2

भारताचा विचार केला तर 97 टक्के निवाससंस्थांमध्ये हात धुण्यासाठी व्यवस्था असते परंतु केवळ 60 टक्के कुटूंबाकडेच हात धुण्यासाठी पाणी आणि साबण उपलब्ध आहे. (NFHS 4 (2015-16)), तर केवळ 36 टक्के लोकच जेवणापूर्वी साबण व पाण्याने हात धुतात. 74 टक्के लोक शौचाला जावून आल्यानंतर हात धुतात. (76th round NSSO (2018) तर केवळ 50 टक्के महिला स्वयंपाकापूर्वी, बाळाला भरविण्यापूर्वी, जेवण वाढताना साबण व पाण्याने हात धुतात. (Spotlight on handwashing in rural India, WaterAid (2017). कोरोनाच्या काळात यात बदल निश्चीत झाला आहे. Migration & COVID Brief, Population Council (2020) यांनी 1237 प्रवाशी कामगारांच्या कुटूंबाचा सर्वे केला तर त्यातील 75 लोकं वारंवार हात धुताना आढळून आले. याचाच अर्थ असा की कोरोना आला नसता तर हात धुण्याला तेवढस गांभिर्याने घेतल गेल नसत.

            हात हे असे अंग आहे की त्याच्या माध्यमातून आपण कोणत्याही रोगराईला निमंत्रण देवू शकतो. जर रोगराईला टाळायचं असेल तर मग हाताची स्वच्छता हवीच. आपल्या हातावर असंख्य अतिसुक्ष्म जंतु असतात पण ते डोळ्याने दिसत नाहीत, त्यामुळे आपली फसगत होते.  मात्र कोरोनाने आता सर्वांचे डोळे उघडले आहेत. स्वयंपाक करण्यापूर्वी, वाढण्यापूर्वी, जेवणापूर्वी, पाणी हाताळण्यापूर्वी, मास्क लावण्यापूर्वी, नाकाला, डोळ्याला व तोंडाला स्पर्श करण्यापूर्वी, शौचाला जावून आल्यानंतर, बाळाची शी धुतल्यानंतर, ‍शिंकल्यानंतर, खोकल्यानंतर, कोणत्याही पृष्ठभागाला स्पर्श केल्यानंतर हात साबण आणि पाण्याने स्वच्छ करणे आवश्यक आहे, तसेच वारंवार मास्कला हात लावू नये,  इकडे तिकडे अनावश्यक स्पर्श न करणे, हस्तांदोलन न करणे या गोष्टी ही पाळणे आवश्यकच आहे.

            सन 2008 पासून 15 ऑक्टोबर हा ‘जागतीक हात धुणे दिवस’ (Global Hand washing day) म्हणुन जगभर साजरा केला जातो. उद्देश हाच आहे की माणसांचे हातावरील असंख्य जीवघेण्या विषाणू, जीवाणू व जंतुंपासून रक्षण व्हावे. त्यासाठी मोठ्या प्रमाणात जनजागृती व्हावी. आज याला 12 वर्षे झाली तरी ही कोरोना येईपर्यंत माणूस खडबडून जागा झाला नव्हता. यावर्षीची ‘Hand Hygiene for All’ अशी थीम असुन प्रत्येकाने या रोगराईच्या विरोधात केवळ पाण्याने नाही तर साबणाने हात धुवून अस्वच्छतेच्या मागे लागुन आपले आणि इतरांच्या आरोग्याचे संरक्षण करायचे आहे. 

00000

                                                                                                                  --अरुण सुर्यवंशी,

                                                                                                                  जिल्हा माहिती अधिकारी

      जिल्हा माहिती कार्यालय

हिंगोली

 

08 October, 2020

जिल्ह्यात कोविड-19 चे नवीन 15 रुग्ण ; तर 27 रुग्ण बरे झाल्याने डिस्चार्ज · 202 रुग्णांवर उपचार सुरु

         हिंगोली,दि. 8 : जिल्ह्यात 15 नवीन कोविड-19 रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजेंद्र सुर्यवंशी यांनी आज दिली आहे.

            आज प्राप्त झालेल्या अहवालानुसार रॅपीड अँटीजन टेस्टद्वारे हिंगोली परिसरात 12 व्यक्ती, औंढा परिसरात 03 व्यक्ती असे एकूण 15 कोविड-19 पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. तर आज 27 कोविड-19 रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

            सद्य:स्थितीत जिल्हा सामान्य रुग्णालयातील आयसोलेशन वार्डमध्ये भरती असलेल्या कोविड-19 रुग्णांपैकी 35 रुग्णांची  प्रकृती गंभीर असल्याने त्यांना ऑक्सीजन चालू आहे. तर कोविड-19 च्या 08 रुग्णांची प्रकृती अतिगंभीर असल्याने त्यांना बायपॅप मशीनवर ठेवण्यात आले आहे. असे एकूण 43 रुग्णांची सद्य:स्थितीत प्रकृती चिंताजनक असून तज्ज्ञ डॉक्टरामार्फत त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. 

           जिल्ह्यात आजपर्यंत कोविड-19 चे एकूण 2 हजार 808 रुग्ण झाले असून, त्यापैकी 2 हजार 564 रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आज घडीला जिल्ह्यात एकूण 202 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तसेच कोविड-19 मुळे जिल्ह्यात आतापर्यंत 42 व्यक्तींचा मृत्यू झाला असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राजेंद्र सुर्यवंशी यांनी कळविले आहे.

 

****