24 July, 2024

किटकनाशक फवारणीतून होणारी संभाव्य विषबाधा टाळण्यासाठी जनजागृती करा - जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर

हिंगोली (जिमाका), दि. 24 : किटकनाशके, बुरशीनाशकांची फवारणी करतांना निष्काळजीपणामुळे, अनावधानाने अथवा नजर चुकीने होणारी संभाव्य विषबाधा टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी घ्यावयाची काळजी याबाबत व्यापक प्रमाणावर जनजागृती करावी, सूचना जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिल्या. शेतकऱ्यांना किटकनाशके, बुरशीनाशके उत्पादक कंपन्यांनी तसेच कृषि विभागाने क्षेत्रीय स्तरावर व्यापक प्रमाणात कार्यशाळांचे आयोजन करुन मार्गदर्शन करावे. तसेच विषबाधा होऊ नये याबाबत प्रचार व प्रसिध्दी करावी, असेही त्यांनी सांगितले. किटकनाशके वापरामुळे होणाऱ्या विषबाधा व त्यावरील उपाययोजना संबंधी तज्ज्ञ समितीची बैठक नुकतीच जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. यावेळी बैठकीस जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी राजेंद्र कदम, पोलीस निरीक्षक सुधीर वाघ, जिल्हा परिषदेचे कृषि विकास अधिकारी ए. एस. वायसे, तोंडापूर कृषि विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ डॉ. राजेश भालेराव, सहायक प्राध्यापक (मृद विज्ञान) डॉ. प्रविण राठोड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कैलाश शेळके, वैद्यकीय अधिकारी डॉ. एन. एल. भालेराव, सौरभ शेंगोकर यांच्यासह विविध किटकनाशके उत्पादक कंपन्यांचे जिल्हा प्रतिनिधी उपस्थित होते. शेतकऱ्यांनी घ्यावयाची काळजी वारा शांत असतांना म्हणजे सकाळी लवकर अथवा सायंकाळी उशीरा फवारणी करावी. फवारणी वाऱ्याच्या प्रवाहाच्या दिशेने करावी, विरुध्द दिशेने करु नये. किटकनाशके, बुरशीनाशकांची फवारणी करण्यापूर्वी शरीराच्या उघड्या भागावर खोबरेल तेलाचे लेपन करुन फवारणी करावी. त्यामुळे त्वचेला बाधा होणार नाही. फवारणी करतांना किटकनाशकाचा त्वचेशी व डोळ्याशी संपर्क होणार नाही याची दक्षता घ्यावी. फवारणी करतांना किटकनाशकाचे अंश नाकाव्दारे श्वसन मार्गात व तोंडाद्वारे पोटात प्रवेश करणार नाहीत यासाठी नाकाला व तोंडाला मास्क, रुमाल बांधावा. तसेच डोळ्यावर चशमा घालावा, केस झाकावेत. फवारणी करतांना अंगभर कपडे घालावेत. शक्यतो वाटर प्रुफ सुरक्षा कीटचा वापर करावा. पिकाची उंची एक फुट वा त्यापेक्षा जास्त असल्यास फवारणी करतांना गम बुटचा वापर करावा. फवारणीचा व्यवसाय करणारे शेतकरी, शेतमजुर यांनी तालुक्याच्या आरोग्य केंद्रामध्ये नियमित आरोग्य तपासणी करुन घ्यावी. किटकनाशके, बुरशीनाशके पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोतापासुन व खाद्यपदार्थापासुन दूर ठेवावेत. तसेच फवारणीनंतर फवारा व किटकनाशकाचे रिकामे डबे वाहत्या पाण्यात धूऊ नये. किटकनाशकाचे रिकामे डबे इतर उपयोगासाठी न वापरता ते खोलवर जमिनीत पुरुन टाकावेत. किटकनाशके, बुरशीनाशके फवारणी करतांना ते वा त्यांचे अंश जनावरांच्या चाऱ्याच्या, खाद्यपदार्थांच्या संपर्कात येणार नाहीत वा त्यावर उडून जाणार नाहीत याची दक्षता घ्यावी. विहीर, नदी, नाले, ओढे अथवा पानवठे यांच्या संपर्कात किटकनाशके, बुरशीनाशके येणार नाहीत याची दक्षता घ्यावी. फवारणी करतांना वा फवारणी झाल्यानंतर शेतकरी, शेतमजुरास अस्वस्थ वाटत असल्यास घरगुती उपचार न करता त्वरीत नजीकच्या आरोग्य केंद्रात पुढील उपचारासाठी दाखल करावे. ढगाळ वातावरणात EC फॉर्मूलेशन ऐवजी SC फॉर्मुलेशन च्या किटकनाशके, बुरशीनाशकांची फवारणी करावी. तसेच प्रसार माध्यमांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी वर्तमानपत्रातून याची मोफत व व्यापक प्रमाणात प्रसिध्दी देण्यात यावी ,असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी व कृषि विभागाने केले आहे. ******

No comments: