29 July, 2024

'बालविवाहमुक्त हिंगोली जिल्हा' करण्यासाठी विविध शाळेत जनजागृती कार्यक्रम

हिंगोली (जिमाका), दि. 29 : जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी आर. आर. मगर यांच्या मार्गदर्शनाखाली व जिल्हा बाल संरक्षण अधिकारी सरस्वती कोरडे यांच्या सूचनेनुसार जिल्हा परिषद प्र. शाळा येहळेगाव (सोळंके) व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भांडेगाव येथे तसेच आदर्श विद्यालय हिंगोली येथे 'बालविवाह मुक्त हिंगोली जिल्हा' करण्यासाठी जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमात जिल्हा बाल संरक्षण कक्ष व चाईल्ड हेल्प लाइन 1098 कक्षाकडून बालकासंदर्भात आणि बालकाशी निगडीत विविध विषयावर कार्यक्रम घेण्यात आला. बालविवाह म्हणजे काय, विवाहाचे योग्य वय, बालविवाह होण्याची अनेक कारणे असून, यामध्ये कुटुंबाचे स्थलांतर, आर्थिक परिस्थिती, कुटुंबातील मुलीचे प्रमाण, वडिलांचे व्यसन, किशोरवयीन मुला-मुलीच्या हातून होणाऱ्या चुका इत्यादी बालविवाह होण्याचे प्रमुख कारणे आहेत. परंतु बालविवाह केल्याने होणाऱ्या दुष्परिणामाचा सामना मुलगा-मुलगी व त्यांचे कुटुंबांना करावा लागतो, बालविवाह प्रतिबंधक अधिनियम, 2006 नुसार असे विवाह बेकायदा ठरतात आणि या विरोधात गुन्हा नोंदविला जाणे अपेक्षित आहे. अशा गुन्ह्यास एक लाख रुपये दंड व दोन वर्षे सक्त मजुरीची शिक्षा आहे. या कायद्याच्या अंमलबजावणीसाठी ग्रामीण भागासाठी ग्रामसेवक आणि शहरी भागासाठी बाल विकास प्रकल्प अधिकारी यांना बालविवाह प्रतिबंधक अधिकारी नियुक्त करण्यात आलेले आहेत. तसेच ग्रामस्तरावर ग्राम बाल संरक्षण समिती स्थापन करण्यात आल्या असून या समितीचे अध्यक्ष सरपंच आहेत व सदस्य सचिव अंगणवाडी सेविका आहेत. या सर्वानी आपापल्या कार्यक्षेत्रात बालविवाह होणार नाही याबाबत योग्य ती खबरदारी घ्यावी. तसेच मुलीच्या वयाची 18 वर्ष व मुलाच्या वयाची 21 वर्षे पूर्ण होण्याच्या आगोदर लग्न करणे हा कायद्याने गुन्हा आहे, अशी माहिती जिल्हा बाल संरक्षण अधिकारी सरस्वती कोरडे यांनी दिली. तसेच माता मृत्यूचे प्रमाण, कुपोषित मूल जन्माला येणे, त्यावर उपपाययोजना म्हणून मुलींना शिक्षण देणे आवश्यक आहे. मुलींनीसुध्दा आपल्या पालकांना विश्वासात घेऊन शिक्षण पूर्ण केले पाहिजे, आपल्या सभोवताली कुठेही बाल विवाह होत असेल तर चाईल्ड हेल्पलाईन 1098 या टोल फ्री क्रमांकावर माहिती दिली पाहिजे. 1098 हा बालकांसाठी तात्काळ मदत करणारी हेल्पलाईन आहे. 1098 या टोल फ्री क्रमांकावर मिळालेली माहिती गोपनीय असते. बालकाला मदतीची गरज असते त्यावेळी 1098 या टोल फ्री क्रमाकांवर संपर्क साधावा, अशी माहिती चाईल्ड हेल्पलाईनचे प्रकल्प समन्वयक संदीप कोल्हे यांनी दिली. बालक म्हणजे काय, बालकांचे हक्क व अधिकार याबाबत तसेच बालकांवर होणारे अन्याय अत्याचार थांबविण्यासाठी समुदायातील लोकांनी पुढाकार घ्यावा. बालविवाह मुक्त हिंगोली जिल्हा होण्यासाठी आपण स्वतः पासून सुरवात केली पाहिजे. मुलींनी काळजी व सरंक्षणाच्या दृष्टीकोनातून कोणत्याही प्रकारे त्रास सहन करु नये. शाळेतून येताना व जाताना टवाळखोरांचा त्रास होत असेल तर दामिनी पथकाशी संपर्क करावा, अशी माहिती जिल्हा दामिनी पथकाच्या आरती साळवे यांनी दिली. बालविवाह निर्मूलन अधिनियम 2006 या कायद्याची प्रकरणी अंमलबजावणी होण्यासाठी शालेय विद्यार्थ्यांकडून बालविवाह जनजागृतीबाबत प्रतिज्ञा सामाजिक कार्यकर्ते रामप्रसाद मुडे यांनी दिली. बालकांना चांगला स्पर्श, वाईट स्पर्श बाबतची माहिती चाईल्ड हेल्पलाईन केस वर्कर राजरत्न पाईकराव व सुपरवायजर धम्मप्रिया पखाले यांनी दिली. जिल्हा बाल सरंक्षण कक्ष व चाईल्ड हेल्पलाईन 1098 कडून जिल्हाभरात बालकांसदर्भात जनजागृती करणे सुरू आहे. यावेळी चाईल्ड हेल्पलाईन कक्षातील समुपदेशक अंकुर पाटोडे, सुपरवायजर विकास लोणकर, जिल्हा दामिनी पथकाचे अर्चना नखाते, शेखर देशमुख, बाळु राठोड, संबंधित शाळेतील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. ******

No comments: