09 July, 2024

क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले बाल संगोपन योजनेच्या लाभासाठी जाहीर आवाहन

हिंगोली (जिमाका), दि. 09 : बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियमानुसार महिला व बाल विकास विभागाअंतर्गत शून्य ते 18 वयोगटातील अनाथ, एकपालक, निराधार, बेघर, आर्थिकदृष्ट्या दुर्बल, दुर्धर आजाराने ग्रस्त पाल्यांची बालके, दुर्धर आजार असलेली बालके, कैद्यांची बालके, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांची बालके, तीव्र मतीमंद बालके, एचआयव्हीग्रस्त किंवा कॅन्सरग्रस्त बालके, 40 टक्क्यापेक्षा अधिक अपंगत्व असलेली बालके, अंध दिव्यांग बालके, भिक्षा मागणारी बालके, पोक्सो अधिनियमांतर्गत बळी पडलेली बालके, तीव्र कुपो्षित बालके, सॅमबालके व इतर आपत्ती अशा काळजी व संरक्षणाची गरज असलेल्या बालकांना शासन निर्णयान्वये विहित करण्यात आलेल्या निकषानुसार बालकांना शैक्षणिक सहाय्यासाठी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले बाल संगोपन योजनेचा लाभ देण्यात येतो . एका कुटुंबातील दोन बालकांना सदर योजनेचा लाभ घेता येतो. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले बाल संगोपन योजना ही महिला व बाल विकास विभागाअंतर्गत काळजी व संरक्षणाची गरज असलेल्या बालकांसाठी विनाशुल्क राबविली जाते. या योजनेसाठी महिला व बाल विकास विभागाकडून कोणतेही शुल्क आकारले जात नाही. या योजनेचा लाभ घेण्यासाठी पालकांनी आवश्यक कागदपत्रांची पुर्तता करुन संबंधित गावातील अंगणवाडी सेविका किंवा तालुक्यातील एकात्मिक बाल विकास प्रकल्प अधिकारी, एकात्मिक बाल विकास सेवा योजना कार्यालय येथे संरक्षण अधिकारी (कनिष्ठ) यांच्याकडे दाखल करता येईल. जर एखादे पुरुष, महिला किंवा दलाल या योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी पैशाची मागणी करत असेल तर अशा व्यक्तींना बळी पडू नये. अशा पुरुष, महिला किंवा दलाल व्यक्ती ह्या महिला व बाल विकास विभागातील अधिकारी, कर्मचारी यांच्या नावाने पैशाची मागणी करीत असून महिला व बाल विकास विभागाची प्रतिमा मलिन करत आहे. त्यामुळे जनतेनी व लाभार्थ्यांनी योजनेच्या लाभासाठी कोणालाही पैसे देऊ नयेत, असे आवाहन जिल्हा महिला व बालविकास अधिकारी, हिंगोली यांनी केले आहे. *****

No comments: