15 July, 2016

नागरीकांनी पुर परिस्थितीत घ्यावयाची काळजी व खबरदारी
नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
हिंगोली, दि. 15 :- राज्यात पावसाचा जोर दिवसेंदिवस वाढत असून नद्यांची पात्रे भरून वाहत आहेत यामुळे नद्यांना पुर येण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यास अनुसरून नदी/नाले/ओढे काठच्या गावांना तसेच जेथे पुरस्थिती उद्भवू शकते अशा गावांसाठी उपाययोजना व खबरदारी घेण्याबाबत मा. जिल्हाधिकारी यांनी सूचना देण्यात आली असून नागरीकांनी पावसाळ्यात उद्भवणाऱ्या पुर आपत्तीपासून स्वतःचा बचाव करावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाने केले आहे.
काय करावे: 1) गावात पुरस्थिती निर्माण झाली अथवा पुराबाबत पूर्व कल्पना मिळाल्यास घरातील उपयुक्त सामान, महत्वाची कागदपत्रे, जनावरे सुरक्षित ठिकाणी हलवा व विजेवर चालणाऱ्या उपकरणांचा वीज पुरवठा बंद करावा. 2) गावात अचानक पूरस्थिती निर्माण झाल्यास तात्काळ प्रशासनास कळवावे. 3) गावात/घरात जंतुनाशक असतील तर ते पाण्यात विरघळणार नाहीत याची दक्षता घ्या. 4) पुर स्थितीत उंच ठिकाणी जावे तसेच जाते वेळी सोबत रेडिओ, टॉर्च, सुके खाण्याचे पदार्थ पिण्याचे पाणी सोबत ठेवावे, शक्य असल्यास घरातील वाहने उंच ठिकाणी हलवा. 5) घर सोडून जाताना दारे, खिडक्या सर्व घट्ट बंद करून जा. 6) कुटुंबातील सर्व व्यक्तींकडे ओळखपत्र राहील याची काळजी घ्या. 7) पुरामध्ये अडचणीत सापडला असाल तर आजूबाजूच्या साधनांचा वापर करा. (उदा. पाण्यावर तरंगणारे मोठे लाकूड, प्लास्टिकचे ड्रम याचा वापर करा), कोणी व्यक्ती वाहत जात असेल तर दोरीच्या सहाय्याने त्याला वाचवण्याचा प्रयत्न करा. 8) पुर स्थितीत घाबरून जाऊ नका, सरकारी सुचनांचे पालन करा.
काय करून नये: 1) पुर असलेल्या भागात, नदीच्या पुलावर विनाकारण भटकू नका. 2) पुराच्या पाण्यात चुकुनही जावू नका, तसेच पुर आल्यानंतर पुलावरुन गाडी चालवण्याचा, अथवा पूल ओलांडण्याचा प्रयत्न करून नका. 3) दुषित/उघड्यावरील अन्न पाणी टाळा. (शक्यतो उकळलेले पाणी व सुरक्षित अन्न सेवन करा.) 4) सुरक्षित ठिकाणी रहा व विद्युत् तारांना स्पर्श करू नका. 5) पोहता येत असेल तरच बुडणाऱ्या व्यक्तींना वाचवा परंतु अपरीचीत व खोल पाण्यात जाऊ नका.

*****

No comments: