09 May, 2017

शौचालय नसणाऱ्या कुटूंबांचे 15 मे नंतर राशन व केरोसिन बंद होणार
·         स्वच्छ भारत मिशन अभियानास गती देण्यासाठी जिल्हा प्रशासनाचा निर्णय
        हिंगोली, दि. 9 : स्वच्छ भारत मिशन (ग्रा.) अंतर्गत सन 2017-18 मधील वार्षिक कृती आराखड्यामध्ये सर्व हागणदारी मुक्ती करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, 02 ऑक्टोबर, 2017 पर्यत जिल्हा हागणदारी मुक्त करण्याचा जिल्हा प्रशासनाचा मानस  असून दि. 15 मे, पर्यंत वैयक्तीक शौचालय नसणाऱ्या जिल्ह्यातील कुंटुबांना स्वस्त धान्य दुकानातून मिळणारे राशन आणि केरोसिन बंद करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे.
            स्वच्छ भारत मिशन (ग्रा.) या अभियानाची प्रभावी अंमलबजावणी  करण्यासाठी  जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात विविध उपक्रमाच्या माध्यमातुन जनजागृती करुन देखील नागरिक स्वच्छतेकडे गांभीर्याने पाहत नसल्याचे प्रशासनाच्या निर्दशनास येत आहे. स्वच्छ भारत मिशन (ग्रा.) या अभियानास गती देण्यासाठी प्रशासनाने यापुढे कठोर पाऊल उचलण्याचा निर्णय घेतला आहे. उघड्यावर शौचास जाणाऱ्या नागरिकांना आळा घालण्यासाठी  प्रत्येक ग्रामपंचायती मध्ये गुडमॉर्निंग पथकात पोलिस प्रशासनाच्या मदतीने संबधीतावर कलम 115 व 117 अन्वये कार्यवाही करण्यात येणार. सदर कलमान्वये रु. 1 हजार 200 पर्यंतची दंडात्मक कार्यवाही देखील केली जाणार आहे.
           स्वच्छ भारत मिशन (ग्रा.) अभियानाचे गांभीर्य नागरिकांना कळावे यासाठी दि. 15 मे, 2017 पर्यंत वैयक्तीक शौचालय न बांधणाऱ्या कुंटुबांना कोणत्याही शासकीय योजनेचा लाभ मिळणार नाही असा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. यात प्रामुख्याने स्वस्त धान्य दुकानातुन नागरिकांना प्राप्त होणारे राशन व केरोसिन बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यापुढे ज्या कुंटुंबाना राशन अथवा केरोसिन हवे असेल त्यांना यापुढे आपले वैयक्तीक शौचालय असल्याचे संबंधीत ग्रामपंचायतीच्या ग्रामविकास अधिकारी / ग्रामसेवकाचे प्रमाणपत्र स्वस्त धान्य दुकानदाराकडे सादर करणे बंधककारक असणार आहे. वैयक्तीक शौचालय असल्याबाबतचे प्रमाणपत्र नसल्यास संबधितास वरीलप्रमाणे लाभ दिला जाणार नाही. तसेच ग्रामपातळीवरील सर्व तलाठी, ग्रामसेवक आणि कृषी सहाय्यक यांच्या कडुन दिले जाणारे विविध दाखले देखील न देण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे.
            तरी जिल्ह्यातील ज्या कुटूंबानी अद्यापपर्यंत आपले वैयक्तीक शौचालय बांधले नसल्यास त्यांनी तात्काळ म्हणजे 15 मे पूर्वी वैयक्तीक शौचालय बांधुन स्वच्छ भारत मिशन (ग्रा.) अभियानांतर्गंत जिल्हा हागणदारी मुक्त करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी अनिल भंडारी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. एच.पी. तुम्मोड यांनी केले आहे.

*****

No comments: