20 May, 2017

दहशतवाद व हिंसाचार विरोधी दिनानिमित्त निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली प्रतिज्ञा

हिंगोली, दि.20: तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांच्यावरील दहशतवादी हल्ल्याचा विरोध म्हणून ‘दहशतवाद व हिंसाचार विरोधी दिवस’ पाळण्यात येतो. या दहशतवाद व हिंसाचार विरोधी दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात निवासी उपजिल्हाधिकारी अनिल माचेवाड यांनी जिल्हा प्रशासनातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रतिज्ञा दिली.
यावेळी रोहयो उपजिल्हाधिकारी खुदाबक्ष तडवी यांच्यासह वरिष्ठ अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.
दहशतवाद व हिंसाचार विरोधी दिनानिमित्त घेण्यात आलेली प्रतिज्ञा

आम्ही, भारताचे नागरिक, आपल्या देशाच्या अहिंसा व सहिष्णूतेच्या
परंपरेविषयी दृढ निष्ठा बाळगून याद्वारे, सर्व प्रकारच्या दहशतवादाचा व
हिंसाचाराचा आमच्या सर्व शक्तीनिशी मुकाबला करण्याची गांभीर्यपूर्वक
प्रतिज्ञा करत आहोत. आम्ही प्रतिज्ञा करतो की, आम्ही सर्व मानवजातीमध्ये
शांती, सामाजिक एकोपा आणि सामंजस्य टिकवू व वर्धिष्णू करु, तसेच मानवी
जिवीत आणि मूल्ये धोक्यात आणणाऱ्या विघटनकारी शक्तींचा प्रतिकार करु.
*****

 

No comments: