01 May, 2017

खत वितरणात पारदर्शकतेसाठी खतांची ऑनलाईन विक्री करण्यात येणार  
                                                                -- पालकमंत्री दिलीप कांबळे
हिंगोली,दि.1: यंदाच्या खरीप हंगामात शेतकऱ्यांना दर्जेदार खते मिळावी आणि खत वितरणात पारदर्शकता यावी याकरीता सर्व कृषी सेवा केंद्रावर ई-पॉस मशिनद्वारे ऑनलाईन खतांची विक्री करण्यात येणार असल्याचे माहिती सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य, मदत व पुनर्वसन, भुकंप व पुनर्वसन, अल्पसंख्याक विकास व वक्फ राज्यमंत्री तथा पालकमंत्री दिलीप कांबळे यांनी दिली.
येथील संत नामदेव पोलिस कवायत मैदानावर महाराष्ट्र दिनाच्या 57 व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित ध्वजारोहणाच्या मुख्य शासकीय कार्यक्रमप्रसंगी पालकमंत्री कांबळे बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा श्रीमती शिवराणी नरवाडे, नगराध्यक्ष बाबाराव बांगर, जिल्हाधिकारी अनिल भंडारी, पोलिस अधिक्षक अशोक मोराळे, मुख्य कार्यकारी अधिकारी एच.पी. तुम्मोड, राज्य राखीव पोलिस बलाचे समादेशक एन. एम. मिठ्ठेवाड, निवासी उपजिल्हाधिकारी अनिल माचेवाड, अप्पर पोलीस अधिक्षक सचिन गुंजाळ, उपविभागीय अधिकारी विवेक काळे आणि हिंगोली नगर परिषदेचे मुख्याधिकारी रामदास पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
पालकमंत्री श्री. कांबळे यावेळी म्हणाले की, यंदा खरीप हंगामात जिल्ह्यात 3 लाख 90 हजार हेक्टर क्षेत्रावर खरीप पिकांची पेरणी होणार आहे. या पेरणी  क्षेत्रावर पेरणीकरीता पुरेशा प्रमाणात बियाणे आणि खतांची उपलब्धता झाली आहे. खत वितरणात पारदर्शकता यावी याकरीता शेतकऱ्यांना यावर्षी ई-पॉस मशिनद्वारे ऑनलाईन खतांची विक्री करण्यात येणार आहे. प्रधानमंत्री कृषि पिक विमा योजने अंतर्गत सर्व पिकांना विम्याचे संरक्षण देण्यात येत असून, जास्तीत-जास्त शेतकऱ्यांनी या योजनेत सहभागी होण्याचे आवाहन कांबळे यांनी करत हवामान खात्याने यावर्षी 96 टक्के पावसाचा अंदाज व्यक्त केला असून, चांगला पाऊस होणार असल्याचे सांगत डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजने अंतर्गत 2016-2017 या आर्थिक वर्षात मुदतीत पिक कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 5 कोटी रुपयांचे अर्थसहाय्य देण्यात आले आहे. राज्यात यंदा तुर डाळीचे विक्रमी उत्पन्न झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शासनाने  5 हजार 50 रुपये प्रती क्विंटल या हमीभावाने नाफेडमार्फत जिल्ह्यात 7 हजार 582 मेट्रीक टन तुर डाळीची खरेदी केली असल्याचे कांबळे यावेळी म्हणाले.
पालकमंत्री श्री. कांबळे पुढे म्हणाले की, प्रत्येक गावात शाश्वत पाण्याची उपलब्धता आणि शेतीकरीता सिंचनाची सोय उपलब्ध करुन देण्यासाठी जलयुक्त शिवार अभियानाच्या पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील 124 तर दूसऱ्या टप्प्यात 100 गावांमध्ये जलसंधारणाची कामे हाती घेण्यात आली. तर तिसऱ्या टप्प्यात यावर्षी 80 गावांची निवड झाली असून, कामे सुरु करण्यात आली आहेत. जलयुक्त अंतर्गत जिल्ह्यात नदी-नाला खोलीकरण व सरळीकरणाची मोठ्या प्रमाणात कामे झाली आहेत. तसेच नदी-नाला खोलीकरण व रुंदीकरणाची कामे आणि विविध प्रकल्पातून लाखो घनमीटर गाळ लोकसहभागातून काढून शेतजमीनीवर टाकल्याने जमीन सूपीक होण्यास मदत झाली असल्याचे ते म्हणाले.
गतवर्षीच्या 2 कोटी वृक्ष लागवड कार्यक्रमामध्ये मिळालेले यश उल्लेखनीय असून, राज्य शासनाने पुढील तीन वर्षात राज्यात 50 कोटी वृक्ष लागवडीचा कार्यक्रम हाती घेतला आहे. यानुसार राज्यात सन-2017 मध्ये 4 कोटी तर हिंगोली जिल्ह्यास 7 लाख वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट ठरविण्यात आले आहे.
जिल्ह्यात 795 रास्तभाव दुकानापैकी 696 दुकाने ईपॉस अंतर्गत ऑनलाईन करण्यात आली आहेत. या दूकानामार्फत शिधापत्रिकाधारकांची आधार क्रमाकांशी ओळख जुळवून अन्न-धान्य वितरीत करण्यात येत आहे. आतापर्यंत 12 हजार कुटूंबाना ईपॉस मशीनद्वारे अन्नधान्य वितरीत करण्यात येत असल्याचे ही पालकमंत्री यावेळी म्हणाले.
जिल्ह्यातील तरुणांना स्वत:चा व्यवसाय उभारण्यासाठी आर्थिक सहाय्य तसेच रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात यासाठी मुद्रा बँक योजने अंतर्गत आतापर्यंत जिल्ह्यातील शिशु, किशोर आणि तरुण या गटातील 3 हजाराहून अधिक लाभार्थ्यांना 50 कोटी रुपयांचे कर्जाचे वितरण करण्यात आले आहे.
            जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेमार्फत सर्वांना घरकुल योजने अंतर्गत ग्रामीण भागातील 4 हजार 512 लाभार्थ्यांना घरकुल मंजूर करुन बांधकामासाठी योजनानिहाय लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर अनुदान देण्यात येत
आहे. वसमत, कळमनुरी पोलीस स्टेशनचे काम पुर्णत्वास आले असून, सर्व पोलीस स्टेशन मध्ये महिलांकरीता विश्रांती कक्ष आणि प्रसाधनगृह सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. अल्पसंख्याक विद्यार्थ्यांकरीता दोन वसतीगृह बांधून पूर्ण झाले आहे. तसेच हुतात्मा स्मारक दूरुस्तीसाठी शासनाने 1 कोटी रुपयांचा निधी देखील उपलब्ध करुन दिला आहे.
            सन-1999 साली जिल्हा स्थापन होऊन देखील जिल्ह्यात अद्यापपर्यंत काही शासकीय व निमशासकीय कार्यालय सुरु झालेली नाहीत. सदर जिल्हा कार्यालय सुरु करण्यासाठी पाठपूरावा करण्यात येत असून, जिल्ह्यात यावर्षी लघु पाटबंधारे विभाग आणि सह जिल्हा निबंधक तथा मुद्रांक जिल्हा अधिकारी ही दोन नवीन कार्यालये सुरु झाले असल्याची माहिती श्री. कांबळे यांनी दिली.
            केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत अभियानाच्या धर्तीवर राज्यामध्ये ‘स्वच्छ महाराष्ट्र अभियान’ राबविण्यात येत आहे. त्यानुसार सन 2016-17 या आर्थिक वर्षात जिल्ह्यातील 125 ग्रामपंचायतीमध्ये वैयक्तिक शौचालय बांधकामाचे 100 टक्के उद्दिष्ट पुर्ण झाले आहे. तसेच आतापर्यंत 291 ग्रामपंचायतीना निर्मल ग्राम पुरस्कार प्राप्त झाले असून, 142 ग्रामपंचायती हागणदारी मुक्त घोषित झाल्या आहेत. नुकतेच राज्य शासनाने हिंगोली आणि कळमनुरी नगर परिषदांना हागणदारी मुक्त घोषित केले आहे. तर वसमत नगर परिषदेने याबाबत ठराव घेतला आहे. तसेच औंढा नागनाथ आणि सेंनगाव पंचायत समिती यांनी मे अखेर पर्यंत हागणदारी मुक्त करण्याचा निर्धार केला असल्याचे हि पालकमंत्री श्री. कांबळे यावेळी म्हणाले.
            यावेळी पालकमंत्री यांच्या हस्ते विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या अधिकारी-कर्मचारी आणि विद्यार्थी यांना पुरस्काराचे वितरण करण्यात आले. तसेच यावेळी पोलीस प्रशासनाच्या वतीने तयार करण्यात आलेल्या ‘दामिनी (एक स्वयंपूर्णा)’ या पूस्तिकेचे विमोचन पालकमंत्री श्री. कांबळे यांच्या हस्ते करण्यात आले.
प्रारंभी पालकमंत्री दिलीप कांबळे यांच्या हस्ते पोलिस कवायत मैदानावर महाराष्ट्र दिनाचा 57 व्या वर्धापन दिनानिमित्त मुख्य ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर परेड कमांडर पोलीस उप-अधिक्षक सिध्देश्वर भोरे यांच्या समवेत पालकमंत्री कांबळे यांनी परेडचे संचलन करून मानवंदना स्वीकारत जिल्हावासियांना महाराष्ट्र दिन, कामगार दिन व हिंगोली जिल्ह्याचा स्थापना दिनानिमित्त सर्व जिल्हावासियांना शुभेच्छा दिल्या.
            यावेळी स्वातंत्र्य सैनिक, ज्येष्ठ नागरिक, विविध विभागाचे अधिकारी व कर्मचारी, पत्रकार, विद्यार्थी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

*****

 

No comments: